बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

कुणबी नोंद कशी शोधावी?

सर्वांनी कुणबी नोंदी शोधणे सुरु करा. शोधा म्हणजे सापडेल. कुणबी नोंदी कुठे मिळतील याबाबत काही माहिती.

१. सर्वात आधी आपल्या शेताचे आज जे गट नंबर आहेत त्यांना आधी सर्वे नंबर होते ते शोधा. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातून ९(३)९(४) मिळवा.  मिळालेल्या सर्वे नंबर ची हक्क नोंदणी ( याला मराठवाड्यात खासरा म्हणतात)  रेकॉर्ड रूम , तहसील कार्यालय येथुन मिळावा. यावर कुठे कुणबी नोंद आहे का पहा. ही पाने सविस्तर वाचा. अधिक माहिती xyz पानावर असेही तिथे नोंद असते.
२. भूमी अभिलेख कार्यालयातून नमुना ३३ व ३४ मागवा.  यातही अनेक कुणबी नोंदी मिळत आहेत.
३. जन्म मृत्यू नोंदी कोटवार बुकात(गाव नमुना नंबर 14) असतात त्या पाहाव्यात.(रेकॉर्ड रूम,तहसील)
४. पीक पेरे जुने यात अनेक नोंदी कुणबी मिळत आहेत. (रेकॉर्ड रूम,तहसील)
५. पोलीस स्टेशन मधील नोंदी जर एखाद्या प्रसंगात कोणी जेल मध्ये गेला असेल वा गुन्हा नोंद असेल.
६. शिक्षण विभागात जुन्या मराठी शाळेत पूर्वजांचे दस्त तपासा त्याचे नक्कल मिळावा.

शासन शोधत आहेच पण आपल्या पूर्वजांच्या लिंक्स आपल्याला जास्त माहिती आहेत.

मुख्यतः शेती , जन्म मृत्यू , भूमी अभेलेख, शिक्षण/शाळा येथे या कुणबी नोंदी मिळत आहेत. कृपया सर्वानि शोधा . 

१ कुणबी नोंद २० ते ३० लोकांना आरामात certificate देऊन जाईल.

सर्वांचे पूर्वज पाहिले शेतीच करत होते. त्यामुळे १००% नोंदी कुणबी मिळणार आहेत. मनापासून शोधा.

सुरुवात शेती पासून करा.
आज जे गट नंबर आहेत त्याला आधी सर्वे नंबर होते ते मिळवा. त्याआधारे पीक पेरा व हक्क नोंदणी पाहिल्यान्दा शोधा. बरकाईने वाचा. 

ज्यांनी शेती विकली आहे. त्यांनी सुद्धा त्या शेतीचे जुने दस्त वरीलप्रमाणे शोधायचे आहे. आपले पूर्वज कुणबी होते फक्त एवढं सिद्द करायचे आहे. ती शेती आज रोजी आपल्याकडे नसेल किंवा आपण भूमिहीन झाला असल तरीही. 

*यासाठी सर्वांनी पाहिलं पाऊल - भूमी अभेलेख कार्यालयातून आपल्या गटाचा ९(३)९(४) काढा. त्यावर सर्वे नंबर आहे. नंतर या सर्वे नंबर चे सर्व दस्त आपण तपासायचे आहेत. जसे की खासरा(हक्क नांदणी) , पिक पेरा.
*प्लस नमुना ३३ व ३४ भूमी अभिलेख मधून.  येथे शक्यता जास्त आहे.*

कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे?

 कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील/चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/आत्या, खापर पणजोबांचे चुलते/आत्या यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

जातीचा पुरावा मिळवण्यासाठी काय कराल?

रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा.

स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासा, त्या नोंदी मिळवा.

आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी(६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे.

भूमि अभिलेख कार्यालयातील फॉर्म न. 33 व 34 वरील नोंदी तपासाव्यात, यातही सर्वत्र कुणबी नोंदी आढळून येतात .

रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.

रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल.

सभार : मराठा क्रांती मोर्चा, फेसबुक पेज

सोमवार, २६ जून, २०२३

फुजैरा किल्ला

फुजैरा किल्ला हा युएई मधील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या किल्ल्यापैकी एक मानला जातो. हा किल्ला कोणी व कधी बांधला याबाबत ठोस पुरावा उपलब्ध नाही. पोर्तुगीज कालखंडात सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस हा किल्ला बांधला गेला असावा. हा किल्ला जुन्या फुजैरा शहराच्या मध्यवर्ती भागात अंदाजे २० मीटर उंचीच्या टेकडीवर बांधलेला आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे ६५०० चौरस फूट आहे. किल्ल्याची निर्मितीसाठी दगड-माती या स्थानिक साधनांचा वापर केलेला आढळतो. धाब्याच्या छताला आधार देण्यासाठी खजूर आणि खारफुटीच्या लाकडांचा वापर केलेला आढळतो. किल्ल्याच्या बांधकामानंतर आजूबाजूच्या परिसरात लोकवस्ती निर्माण होऊन जुने फुजैरा शहर वसले असावे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जुन्या फुजैरा शहराचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण शहरा भोवती संरक्षक भिंत बांधलेली होती. हा किल्ला समुद्र किनाऱ्यापासून अंदाजे एक ते दिड किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला सामरीक दृष्ट्या खूप महत्त्वाच्या ठिकाणी बांधलेला होता. किल्ल्यावरून आजूबाजूच्या परिसरावर तसेच फुजैरा बंदर आणि समुद्र किनाऱ्यावर सहज नजर ठेवता येत असे. फुजैरा किल्ल्यावर एकूण चार बुरुंज (Watch Tower) असून, त्यापैकी तीन गोलाकार तर एक चौकोनी आहे. हे सगळे बुरुंग तटबंदीने एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. चौकोनी बुरुंजास मुबारा असे म्हणतात.
पोर्तुगीज हे इराणच्या आखातात राज्यविस्तार आणि व्यापारासाठी येणारी पहिली युरोपियन महासत्ता होती. वास्को द गामाने १४९८ साली आफ्रिका खंडाला वळसा घालून भारतात येण्याचा मार्ग शोधून काढला. त्यानंतर सोळाव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीज सत्तेचा आरबी समुद्रात वावर वाढला. अरबी समुद्रातून होणाऱ्या व्यापारावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी १५०७ साली पोर्तुगीज आरमाराचा नौदलप्रमुख असलेल्या अफोन्सो दे अल्बुकर्क याने होर्मुझ बेट आपल्या ताब्यात घेतले. होर्मुझ बेट इराणच्या आखाताला आणि ओमानच्या आखाताला जोडणाऱ्या एका अरुंद सामुद्रधुनी जवळ स्थित आहे. यालाच होर्मुझची सामुद्रधुनी असेही म्हणतात. होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हे महत्वाचे आणि मोक्याचे ठिकाण पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी अरबी लोकांच्या अधिपत्याखालील असणारी अनेक महत्वाची ठिकाणे काबीज केली. त्यात मस्कत, सोहार, खोरफंक्कन, अल बिदीया, डिब्बा, खासाब, कतिफ आणि बहरीन यांचा समावेश होता. अल बिदीया आणि खोरफंक्कन या शहरांच्या नजीकच दक्षिणेला फुजैरा किल्ला स्थित आहे.

फुजैरा किल्ला हा स्थानिक शेख यांचे अधिकृत निवासस्थान आणि सत्तेचे मुख्य केंद्र होते. या किल्ल्यातील मोकळ्या अंगणाचा उपयोग विविध सण, उत्सव साजरे करण्यासाठी केला जात असे. वेळ प्रसंगी येथे कैद्यांना जाहीर मृत्युदंड देखील दिला जात असे. किल्ल्यात कैद्यांना ठेवण्यासाठी एक छोटे कारागृह देखील होते.

ऐतिहासिक नोंदीनुसार या किल्ल्यावर अनेक आक्रमणे झालेली दिसतात. सन १८०८ साली वहाबी योद्ध्यांनी या किल्ल्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. १८०८ ते १८१० असे जवळपास दोन वर्ष हा किल्ला वहाबी लोकांच्या ताब्यात होता. सन १८१० साली स्थानिक जमातीच्या फौजांनी यावर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर पुढे १९२५ साली गुलामगिरी विरोधात गस्तीवर असतांना राॅयल इंडियन नेव्हीच्या 'एच एम आय एस लाॅरेन्स' (HMIS Lawrence) या युद्ध नौकेने केलेल्या भडीमारात या किल्ल्याचे तीन बुरुंज हे उद्ध्वस्त झाले होते. यावेळी झालेल्या चकमकीत ब्रिटिशांनी तत्कालीन शेख यांच्याकडून १५०० रुपये खंडणी देखील वसूल केला होती. इंग्रजांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेला फुजैरा किल्ला पुढे अनेक वर्ष नादुरुस्त आणि पडक्या स्थिततीतच होता. युएईची स्थापना झाल्यानंतर मात्र या किल्ल्यावरील वावर कमी होऊन त्याची बरीचशी पडझड झाली. फुजैरा राज्याच्या पुरातन वारसा विभागामार्फत इ. स. १९९८ ते २००० दरम्यान या किल्ल्याचा जीर्णोद्धार करून त्याला पुर्वीचे ऐतिहासिक रुप देण्यात आले. हा किल्ला आता फुजैरा शहरातील महत्वाचे पर्यटन केंद्र बनले आहे.

सोमवार, २२ मे, २०२३

सहाम खोऱ्यातील कातळचित्रे (Petroglyphs of Wadi Saham, Fujairah)

 



वादी सहाम कातळचित्रे 

सहाम खोरे अथवा 'वादी सहाम' हे फुजैरा शहरापासून पश्चिमेला असलेल्या हाजार डोंगर रांगेत स्थित आहे. फुजैरा शहरापासून वादी सहामचे अंतर अंदाजे १७ किलोमीटर आहे. वादी सहाम हे आपल्या निसर्गरम्य आणि सोप्या चढाईसाठी युएईतील गिर्यारोहकांचे (Hikers) आवडते ठिकाण आहे. वादी सहामच्या डोंगरा मधून पावसाळ्यात वाहणारा झरा हे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्र असते. जवळपास ४५० मीटर चढाई केल्यानंतर आपल्याला डोंगर माथ्यावर पोहचता येते. मथ्यावरून पुर्वेला असलेल्या फुजैरा शहराचे आणि आरबी समुद्राचे विहंगम दृश्य बघायला मिळते.

वादी सहाम हे जरी निसर्गरम्य चढाईसाठी प्रसिद्ध असले, तरी ते अजुनही एका कारणासाठी अनेकांच्या आवडीचे ठिकाण आहे. आणि ते कारण म्हणजे वादी सहाम येथील प्राचीन कालखंडातील कातळचित्रे (पेट्रोग्लिफ्स/Petroglyphs). वादी सहामचा आजूबाजूच्या परिसरात इ.स. पुर्व १३०० ते इ.स. पुर्व ३०० दरम्यान मानवी वस्ती असल्याच्या खाणाखुणा बघायला मिळतात. वादी सहामच्या पायथ्यालगत एक प्राचीन मार्ग आहे. या मार्गच्या बाजूलाच एका भल्या मोठ्या उभट त्रिकोणी कातळावर अनेक चित्रं रेखाटलेली पाहायला मिळतात. युएईचा प्राचीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी या कातळचित्रांचे विषेश महत्त्व आहे. या कातळचित्रांवरून प्राचीन काळी येथे राहणाऱ्या लोकांविषयी बहुमोल माहिती मिळते. ही कातळचित्रे ताम्र युग आणि लोह युग कालखंडात साकारण्यात आली असावीत, असा संशोधकांचा दावा आहे. फुजैरा अमिरातच्या पुरातत्व विभागच्या माहितीनुसार, फुजैरा राज्यात आजगायत जवळपास ३१ ठिकाणी कातळशिल्पे/कातळचित्रे आढळून आलेली आहेत. त्यात वादी सहाम मधील कातळचित्रांचा समावेश आहे.

वादी सहाम येथील त्रिकोणी कातळाच्या चारही बाजूंनी जवळपास तीस वेगवेगळी चित्रं रेखाटलेली आहेत. काळाच्या ओघात अनेक चित्रं ही आता अस्पष्ट झालेली आहेत. या चित्रात साप, मानव, घोडेस्वार, विविध प्राणी आणि चिन्हे तसेच इंग्रजी टी (T) आकाराचा समावेश आहे.

वादी सहाम कातळचित्रे 
वादी सहाम

 

सोमवार, ८ मे, २०२३

हायस्कूलचे दिवस


नव्वदचे दशक नुकतेच सुरू झाले होते. जागतिकीकरण अजून भारतात दाखल झाले नसल्याने, त्याचे दुष्परिणाम समाजात कुठेच दिसत नव्हते. सामाजिक मूल्ये आणि आत्मीयता जपणारा तो काळ होता. मी तेव्हा अमरापूरच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होतो. शाळेत जातांना आम्ही अमरापूर हायस्कूलमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थी आणि एकूणच हायस्कूल विषयी अतिशय कुतूहल वाटायचे. कुतूहलाचे मुख्य कारण म्हणजे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बेंच असत, तर प्राथमिक शाळेत त्यावेळी शेणाने सारवलेल्या वर्गातच बसावे लागे. दुसरे कारण म्हणजे हायस्कूल गावाबाहेर असल्याने तिथे चालत जायला खूपच मज्जा वाटे. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला आम्ही प्राथमिक शाळेतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर हायस्कूलवर धावत जात असू. हायस्कूलवर त्यावेळी मिळणाऱ्या विविधरंगी गोळ्यांचे आम्हाला फार अप्रूप वाटे.

१९९२ साली मी अमरापूर हायस्कूलला इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यावेळी हायस्कूलला पश्चिमाभिमुखी पत्र्याच्या खोल्यांचे वर्ग आणि तीन उत्तराभिमुखी स्लॅबचे अपुर्ण बांधलेले वर्ग होते. शाळेला बोर्डिंग देखील होते. एका ग्रामीण भागातील शाळेत ज्या सुविधा असाव्यात त्या सगळ्या सुविधा आम्हाला हायस्कूलमध्ये मिळत असत. शाळेला प्रशस्त मैदान होते. प्रयोगशाळेचे साहित्य होते तसेच ग्रंथालय देखील होते. त्याकाळी शिक्षकांविषयी सगळ्यांनाच आदरयुक्त भीतीचे वातावरण असे. गृहपाठ न करणार्‍या विद्यार्थ्यांना छडीचा प्रसाद खावा लागत असे. लवांडे सर, गरड सर, पुजारी सर, खोले सर, बेहळे सर, भिसे सर, वावरे सर असे आदर्श शिक्षक आम्हाला लाभले. त्याच बरोबर वांद्रे सर आणि कांबळे सर यांच्यासारखे आदर्श आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापकही लाभले. तुपे सर क्लार्क म्हणून काम बघत असत. आराख मामा, औतडे मामा, लवांडे मामा आणि वांढेकर मामा या सारखे प्रेमळ शिपाई त्यावेळेस हायस्कूलवर कार्यरत होते.

सगळ्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी होती. पुजारी सर आणि बेहळे सर शिकवताना खूप विनोद करत आणि संपूर्ण वर्गाला नेहमीच हसवत असत. बेहळे सर आम्हाला विज्ञान विषय शिकवायचे. बेहळे सरांना आध्यात्माची खूप आवड होती. ते स्वतः एक उत्तम कीर्तनकार देखील होते. लवांडे सर आम्हाला समाज अभ्यास शिकवायचे. ते पाचवी ते सातवीपर्यंत माझे वर्गशिक्षक होते. आम्हाला खोले सरांची अतिशय भीती वाटत असे, कारण ते इंग्रजी विषय शिकवायचे. वावरे सर हिंदी आणि खेळाचे शिक्षक होते. वावरे सरांनी शाळेत अनेक खेळाडू घडवले. खो-खो आणि कबड्डी या मैदानी खेळाकडे आमचा फार ओढा असायचा. भिसे सर माझे आठवी ते दहावीपर्यंत वर्ग शिक्षक होते. ते आम्हाला गणित विषय शिकवायचे.
 

स्वर्गीय आबासाहेब काकडे यांचा एफ. डी. एल. संस्था स्थापन करण्या मागचा हेतू खूप व्यापक होता. गोरगरीब आणि सामान्य माणसांची मुलं शिक्षणापासून वंचित राहाता कामा नये, त्यांना रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी शेवगाव सारख्या मागास आणि दुष्काळी तालुक्यात शिक्षण संस्था चालू केली. अमरापूर हे अनेक खोट्या मोठ्या खेड्यांना जोडणारे गाव होते. तेथील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी शेवगावला जावे लागत असे. अमरापूरला हायस्कूल स्तरावरची शाळा चालू करणे खूप सोईचे होते, म्हणूनच आबासाहेबांनी अमरापूर गावाची हायस्कूल उभारण्यासाठी निवड केली असावी. हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारी सगळीच मुले ही शेतकरी आणि शेतमजूरांची होती. तेव्हा सगळेच विद्यार्थी गरीब आणि मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असणारे होते. शिक्षण घेण्यासाठी अनेकजण सुट्टीच्या दिवशी शेतात रोजंदारीवर कामाला जात असत. त्याकाळी फार काही आधुनिक शालेय साहित्य उपलब्ध नसे. खताच्या गोण्यांचा सर्रास दप्तराच्या पिशवीसाठी वापर केला जायचा तर उरलेल्या जुन्या वह्यांची पाने एकत्र शिवून नवी वही तयार करण्याची तेव्हा प्रथा होती. नवीन पुस्तकं विकत न घेता जुनीच पुस्तकं वापरली जात असत. एकच गणवेश धुवून वापरला जायचा.

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट व्यतिरिक्त शाळेत विविध सण आणि उत्सव साजरे केले जात असत, त्याच प्रमाणे विविध स्पर्धा आणि शैक्षणिक सहली देखील आयोजित केल्या जात. शाळेत दहा दिवसाचा गणपती बसवला जायचा. सकाळी प्रार्थनेच्या वेळी आरती केली जाई. रोज एक वर्ग आरतीसाठी प्रसाद म्हणून घरून मोदक बनवून आणायचे. रोज सकाळी मोदक खायला मिळायचे. काही विद्यार्थी मुद्दाम साखरे ऐवजी मोदकात मीठ किंवा मिरचीचा ठेचा घालत असत. हायस्कूलमध्ये रक्षाबंधन साजरा करण्याची देखील त्यावेळी प्रथा होती. प्रत्येक वर्गात त्यावेळी दत्ताचा फोटो असे. दर गुरूवारी पहिल्या तासाला दत्ताची आरती केली जात असे. क्रमाक्रमाने प्रत्येकाला आरतीसाठी प्रसाद आणावा लागे. याशिवाय विविध राष्ट्र पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जात असत. त्याच आमचा नेहमीच सक्रिय सहभाग असे.

आयुष्यातील यशात अमरापूर हायस्कूल मधील शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे. हायस्कूलमध्ये दाखल झालो तेव्हा बॅकबेंचर आणि ढ विद्यार्थी म्हणून माझी गणती होत असे. कालांतराने आमच्या आदर्श शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने मी १९९७ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झालो. त्यावर्षी मी शाळेत पहिला येण्याचा मान पटकावला. आज मागे वळून बघतांना ज्या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतले ती परिस्थितीच आमच्या यशासाठी कारणीभूत ठरली असे म्हणावे लागेल. आज शाळेला सुसज्ज इमारत आहे. शाळा ज्ञान दानाचे आणि विद्यार्थी घडवण्याचे काम अखंडपणे करते आहे याचे कौतुक वाटते. भविष्यातही अमरापूर हायस्कूलने खूप प्रगती करेल आणि येथून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करत राहतील. 

रविवार, २ एप्रिल, २०२३

गुदौरीतील हिमवृष्टीचा आनंद

 जॉर्जिया भ्रमंती मधला आजचा दिवस आमच्यासाठी फार महत्वाचा होता कारण आम्ही आज बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद घेणार होतो. आयुष्यात पहिल्यांदाच बर्फवृष्टी अनुभवणार असल्याने आम्ही फार उत्साही होतो. सकाळीपासूनच तिब्लिसी शहरात पाऊस कोसळत होता. पावसामुळे तापमान शून्य अंशाच्या खाली आले होते. सकाळी नाश्ता करण्यासाठी आम्ही हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर गेलोत. चहा नाश्ता झाल्यावर रेस्टॉरंटच्या गच्चीवर जाऊन गारठ्याचा जरा अंदाज घेतला. बापरे! बाहेर कमालीचा गारवा होता. हात पाय लटलटायला लागले. आम्ही तर पटकन आत आलोत. तेंव्हाच जानवले की आज जरा जास्तच गरम कपडे घालावे लागतील. मी रूमवर आल्यावर शर्टवर स्वेटर आणि त्यावर टोपीचे जॅकेट घातले. कानटोपी, हातमोजे, असे साहित्यही बरोबर घेतले.


आजही ऐका आणि डेव्हिड आम्हाला बरोबर सकाळी दहा वाजता घेण्यासाठी हॉटेलवर आले. आजचा प्रवास जरा लांबचाच होता. म्हणजे संपूर्ण दिवस आमचा फिरण्यातच जाणार होता. सकाळी तिब्लिसी शहर पावसात न्हाऊन निघाले होते. रहदारीचे नियम सगळीकडे पाळले जात होते. कर्णकर्कश हॉर्न कुठे वाजवतांना जाणवले नाही. एक गोष्ट मला प्रकर्षाने नमुद करावीशी वाटते ती म्हणजे जॉर्जियात दोन्ही बाजूने ड्रायव्हींग करणाऱ्या गाड्या होत्या. मला हे जरा विचीत्रच वाटले. एखाद्या देशात एका विशिष्ट पद्धतीचीच ड्रायव्हींग असतं, उदाहरणार्थ डावीकडून किंवा उजवीकडून. जशी भारतामध्ये उजव्या हाताला ड्रायव्हर सीट असते. पण जॉर्जिया मध्ये मिस्त्र प्रकारची ड्रायव्हिंग होती. बहुतांश गाड्यांचे ड्रॉयव्हर सीट हे डाव्या हाताला होते तर तुरळक गाड्यांचे ड्रायव्हर सीट हे उजव्या बाजूला होते, तरीही सगळीकडे डव्या हाताच्या ड्रायव्हींगचे नियम पाळले जात होते.

कुरा नदीच्या किनाऱ्यावरून वळणे घेत गाडी तिब्लिसी शहराबाहेर पडत होती. कुरा नदीचे हिरवेगार पाणी आणि त्यावरील विविध पूल नजर वेधून घेत होते. गाडीत डेव्हिडने जॉर्जियन भाषेत गाणी लावली होती. त्या भाषेतील गाणी न समजणारी होती पण त्याचे संगीत खूप छान होते. म्हणतात ना सांगितला भाषा नसते. गाडी तिब्लिसी शहराबाहेर पडली, तसे आम्हाला पांढरे डोंगर दिसायला लागले. समोरून येणाऱ्या गाड्यांच्या टपावर बर्फाचे मोठे थर दिसत होते. म्हणजे जवळपास बर्फवृष्टी चालू होती. सकाळी  ऐकाने सांगितले होते की, बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत त्यामुळे पुढे काझबेगि याठिकाणी जायला जमणार नाही. आजच्या नियोजनानुसार आम्ही अनानुरी किल्ला आणि चर्च, गुदौरी स्की रिसॉर्ट, रशिया-जॉर्जिया सीमा आणि काझबेगि याठिकाणी जाणार होतो.

आमची गाडी एव्हाना शहर सोडून बरीच लांब आली होती. पावसाचे थेंब आता बर्फात रूपांतरित होतांना दिसत होते. काही वेळाने बर्फवृष्टीची तीव्रता वाढत गेली आणि सगळीकडे फक्त बर्फाची पांढरी चादर दिसू लागली.  बर्फाचे कण अलगद जमिनीवर पडत होते. डेव्हिडने काहीतरी खाण्यासाठी गाडी एका रेस्टॉरंटवर थांबवली. तसा मी बाहेर आलो. अतिशय थंड हवा, आकाशातून होणारी बर्फवृष्टी हे वातावरण खरोखरच अवर्णनीय असेच होते. मी हातमोजे गाडीतच विसरलो होतो. माझी बोटं गारठ्याने थिजायला लागली म्हणून मी चटकन गाडीत शिरलो. तोपर्यंत माझ्या कानटोपीवर बर्फाचे शिंपण झाले होते. काही अंतर गेल्यावर सगळीकडे नुसता बर्फच बर्फ दिसत होता. घरं, गाड्या, झाडं सगळी बर्फाखाली बुजली जात होती. निष्पर्ण झालेल्या झाडांना जणू बर्फाची पालवी फुटली होती. काही रहिवाशी आपल्या दरातील बर्फ खोऱ्याने बाजीला सारून येजा करण्यासाठी रस्ता बनवत होते. काही लोक आपल्या अडकलेल्या गाड्यासमोरील बर्फ हटवून मार्ग बनवत होते. रस्त्याकडेच्या गावातील लोक अंदाजे दोन फुटापर्यंत साचलेल्या बर्फातून येजा करत होती. रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. पुढे रस्ता बंद असल्याने मालाचे अनेक ट्रक मधेच अडकून पडले होते. हा रस्ता पुढे रशियाला जात होता. कदाचित हा व्यापारी मार्ग असावा.




गुदौरी हे ठिकाण काकेशस पर्वत रांगेत असून ते तिब्लिसी शहरापासून उत्तरेला १२० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. गुदौरीची समुद्र सपाटीपासून उंची ७२०० फूट एवढी असल्याने हे ठिकाण उन्हाळ्यातही अतिशय थंड असते. गुदौरीपर्यंत पोहचण्यासाठी काकेशस पर्वत रांगेत अनेक घाट चढून जावे लागते. या मार्गाने बर्फाने झाकलेले पर्वतांचे मनोहारी दृश्य बघण्यास मिळते.  घाटातून वळणं घेत आमची गाडी गुदौरीला पोहचेपर्यंत वाटेत बर्फवृष्टीने अगदी डोळ्याचे पारणे फेडले. दुतर्फा निष्पर्ण झालेल्या आणि बर्फाची शाल पांघरलेल्या दाट झाडीतून जेंव्हा गाडी पुढे जात होती तेंव्हा आपण स्वर्गात आहोत की काय? असा भास होत होता. मी असला बर्फ फक्त द्वितीय महायुद्धाशी संबंधित युद्धपटात पहिला होता. ‘स्टॅलिनग्राड’ हा मला आवडलेला एक युद्धपट. यात देखील अशाच बर्फात नाझी सैन्य अडकून पडले होते. त्या नाझी सैन्याचे काय हाल झाले असतील याचा प्रत्यय मात्र मला आज आला.

गुदौरीत पर्यटकांची गर्दी होती. जिकडे तिकडे बर्फाच्या छोट्या मोठ्या टेकड्या तयार झाल्या होत्या. बुलडोझर रस्त्यावर पडलेला बर्फ बाजूला सारून रास्ता मोकळा करत होते. इमारतींची फक्त दारं उघडतील एवढीच जागा शिल्लक होती. बाकी सगळीकडे बर्फाने त्यांना झाकून टाकले होते. या इमारती जणू बर्फाच्या गुहा भासत होत्या. बर्फवृष्टी मात्र थांबत नव्हती. आम्हाला स्कीईंग रिसॉर्टवर जवळ सोडण्यात आले. तासाभरात स्कीईंग रिसॉर्टची भेट आटपून परत सोडले त्याच ठिकाणी भेटा, आणि लवकरात लवकर येथून आपल्याला निघावे लागेल नाहीतर येथे आपण अडकून पडू असे आम्हाला ऐकाने बजावले. गाडीच्या खाली उतरल्यावर मला तर हुडहुडीच भरली. आमचे पाय बर्फात फसत होते. आम्ही वाट काढत स्कीईंग रिसॉर्टवर पोहचलो. तिथे विविध देशातून आलेले असंख्य पर्यटक स्कीईंगचा आनंद घेत होते. तिथे आम्हाला जॉर्जियात MBBS  शिकत असलेल्या मराठी मुलामुलींचा मोठा ग्रुप भेटला. जॉर्जियामध्ये अनेक भारतीय, विशेषतः मराठी विद्यार्थी हे MBBS  शिकण्यासाठी येतात. 

जॉर्जियातील अप्रतिम ऑर्थोडॉक्स चर्च

 ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटी हा जाॅर्जियाचा अधिकृत राष्ट्रीय धर्म आहे. लोकसंख्येच्या जवळपास ८५% नागरीक हे या धर्माचे आहेत. सोव्हिएत युनियन वगळता प्राचीन काळापासून सर्वच राज्यकर्त्यांनी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटीला अधिकृतपणे राष्ट्रीय धर्माचा दर्जा दिल्याने येथे त्या धर्माशी निगडीत प्राचीन खाणाखुणा आजही पाहायला मिळतात. या प्राचीन खुणा म्हणजे जाॅर्जियन बनावटीची अप्रतिम ऑर्थोडॉक्स चर्च. ही सर्व चर्च म्हणजे वास्तुशास्त्रातील आश्चर्य म्हणावे लागतील. यातील काही चर्चचा युनेस्को जागतिक वारसा स्थळात समावेश झाला आहेत. 


ऐतिहासिक ज्वारी माॅनेस्ट्री (Jvari Monastery) ही तिब्लिसी शहराजवळ आहे. शहरापासून गाडीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनिटे लागतात. ज्वारी माॅनेस्ट्री हे चर्च ज्वारी नावाच्या डोंगराच्या शिखरावर बांधले असून याच्या दोन बाजूंनी खोल दरी आहे. या माॅनेस्ट्रीची निर्मिती ६ व्या शतकात करण्यात आली होती. चर्चच्या दोन बाजूंच्या भिंती या निसटत्या कड्याला लागून बांधलेल्याआहेत. त्या आपल्याकडील किल्ल्याच्या तटबंदीसारख्या भासतात. ६ व्या शतकातील बांधकाम अजूनही सुस्थितीत असून त्यात काहीही बदल करण्यात आलेले नाही, हे या चर्चचे आश्चर्य म्हणावे लागेल. या माॅनेस्ट्रीला चर्च ऑफ होली क्राॅस म्हणूनही संबोधिले जाते. संपुर्ण चर्च हे पिवळ्या रंगाच्या दगडांपासून बनवले असल्याने ते खूप आकर्षक दिसते. चर्चच्या प्रवेशद्वारावर आणि अजूबाजूच्या भिंतीवर प्राचीन जाॅर्जियन भाषेतील शिलालेख पहाण्यास मिळतात. भिंतीवर अनेक मुर्ती कोरलेल्या आहेत. चर्चच्या आतमध्ये मुख्य घुमटाखाली प्राचीन लाकडी क्रॉस असून तो ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन लोकांसाठी खूप पवित्र मानण्यात येतो. जाॅर्जियासह शेजारील काॅकेशस देशांचे अनेक श्रद्धाळू येथे दर वर्षी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.




ज्वारी माॅनेस्ट्री पाहण्यासाठी आम्ही सकाळीच तेथे पोहचलो. पहाटे नुकतीच बर्फ वृष्टी होऊन गेलेली होती. ज्वारी डोंगर चढताना सगळीकडे पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर पसरलेली दिसली. गाडीतून खाली उतरताच अतिशय थंड वाऱ्याने आमचे स्वागत केले. तापमान हे उणे चार अंश इतके होते. डोंगर माथ्यावर आल्याने तिथे खूप जोरदार वारा जाणवत होता. ज्वारी माॅनेस्ट्री हे पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण असल्याने इथे मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. वाहनतळाहून आम्ही चर्चच्या दिशेने जात असताना वाटेत अनेक भिकारी बसलेले आढळले. चर्चच्या प्रवेशद्वाराजवळच्या मोकळ्या जागेत आल्यावर आम्हाला समोर निसर्गाचे खूप सुंदर रुप पाहण्यास मिळाले. निळी जांभळी डोंगर रांग आणि त्यांची शिखरं पांढऱ्या बर्फाने चमकत होती. याच डोंगरांच्या आडून लपाछपी खेळत येणाऱ्या कुरा आणि अराग्वी या दोन नद्यांच्या संगमाचे दृश्य नजर वेधून घेत होते. हिरव्यागार रंगाचे पाणी असणारी अराग्वी तर दुसरी गढूळ पाणी असणारी कुरा अशा दोन नद्या एकमेकीत एकरूप होत होत्या. त्या दोन नद्यांच्या दुआबात मत्सखेटा हे छोटेसे टुमदार शहर वसलेले होते. मत्सखेटा हे आयबेरीया (प्राचीन जाॅर्जिया) राज्याच्या राजधानीचे शहर होते. डोंगर माथ्यावरून मत्सखेटा शहरातील कौलारू घरं कोकणातील गावाची आठवण करून देत होती. ज्वारी माॅनेस्ट्री आणि त्या समोरचे निसर्गचित्र मनाला भुरळ घाडणारे असेच होते. जणूकाही आपण एखाद्या चित्रकाराने साकारलेले सुंदर चित्र बघत आहेत असाच भास होत होता. 

लोखंडी दार ओलंडल्यानंतर आम्ही माॅनेस्ट्रीच्या आत आलोत. आतमध्ये वातावरण थोडेसे उबदार होते. प्रकाश खेळता राहावा म्हणून माॅनेस्ट्रीच्या घुमटावर चार बाजूंनी झरोके होते तर भिंतीवर खिडक्या बनवलेल्या होत्या. आतमधली बांधकामाच्या पद्धतीवरून ही वास्तू प्राचीन असल्याचे जाणवत होते. इथे एक पुजारी मेणबत्त्या विकत होता. आम्ही त्याच्याकडून दोन छोट्या मेणबत्त्या घेऊन तेथील ख्रिस्ताच्या फोटो समोर प्रज्वलित केल्या. आमची गाईड आम्हाला एकेका गोष्टीची माहिती देत होती. ज्वारी माॅनेस्ट्री खरोखरच जाॅर्जियन संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असल्याचे आम्हाला जाणवले. 




ज्वारी माॅनेस्ट्री पाहिल्यानंतर आम्ही मत्सखेटा या शहराकडे जाण्यासाठी निघालो. मत्सखेटा हे शहर जाॅर्जियन संस्कृतीचे आणि आजच्या घडीला जाॅर्जियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटीचे धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहराच्या प्राचीन महत्त्वामुळे १९९४ साली युनेस्कोने याला Historical Monuments of Matskheta या नावाने जागतिक वारसा स्थळात सामिल केले गेले आहे. ज्वारी डोंगराहून खाली उतरले की कुरा नदिच्या किनाऱ्यावर वळणं घेत अगदी दहा बारा मिनिटात आम्ही मत्सखेटा या शहरात पोहचलो. जुन्या दगडी फरशीच्या रस्त्याने चालत आम्ही स्वेटित्सखोवेली कॅथेड्रलच्या (Svetitskhoveli Cathedral, Mtskheta) प्रवेशद्वारापाशी पोहचलो. स्वेटित्सखोवेली कॅथेड्रलचा अर्थ जिवंत खांबाचे चर्च असा काहीसा होतो. हे चर्च अतिशय भव्य असे आहे. आपल्याकडील भोईकोटांसारखी त्याला चारही बाजूंनी भली मोठी तटबंदी आहे. तटबंदीच्या पश्चिमेला महाद्वार असून त्यावर बनवलेल्या मनोऱ्यावर मोठी घंटा बांधलेली आहे. 




कॅथेड्रलचे छत खूप उंच असून त्याला भल्या मोठ्या खाबांनी आधार दिला आहे. वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या कॅथेड्रलची गणना होते. या कॅथेड्रलमध्ये अनेक शाही कार्यक्रम व्हायचे. जसे की, राजाचा राज्याभिषेक, लग्न वगैरे. त्याचबरोबर हे कॅथेड्रल शाही परिवाराची दफनभूमी म्हणून देखील वापरले जायचे. यामध्ये विविध कालखंडात होऊन गेलेले राजे किंवा राणी यांना दफन करण्यात आले आहे. एरेकल द्वितीय, वखतांग गोर्गासाली आणि सहावा जाॅर्ज यासारख्या प्रमुख राजांच्या समाध्या येथे बघण्यास मिळतात. ४ थ्या शतकापासून या कॅथेड्रलच्या वास्तूमध्ये अनेक बदल करण्यात आहे आहेत. अरब, इराणी आणि रशियन आक्रमणात या कॅथेड्रलचे अनेकदा नुकसान झाले होते. त्यामुळे मध्ययुगात याच्या चौफेर तटबंदी बांधली असावी. या कॅथेड्रलमध्ये येशू ख्रिस्ताने वापरलेले कपडे पुरले असल्याची मान्यता आहे. पूर्वीच्या काळातील बांधकामात सर्व कॅथेड्रलच्या आतील भिंतीवर चित्र काढण्यात आली होती परंतु रशियन कालखंडात ती नष्ट करण्यात आली. त्यात वाचलेली काही चित्र आजही येथील भिंतीवर बघायला मिळतात. येथू ख्रिस्ताचे भव्य चित्र आणि त्यासमोरील काचेचे तोरण खूप आकर्षक आहे. 



मत्सखेटा कॅथेड्रल अतिशय सुंदर असून जाॅर्जिया फिरायला जाणाऱ्या प्रत्येकाने ते अवश्य बघायला पाहिजे. थोडक्यात ह्या वास्तू जरी बोलत नसल्या तरी त्यांची बांधकामाची शैली, आजूबाजूचा परिसर, वास्तूवर कोरलेल्या मुर्ती, रंगवलेली चित्रे हे सगळं वैभव आपल्याला तो ऐतिहासिक कालखंड कसा होतो याचा अनुभव करून देतात. स्वेटित्सखोवेली कॅथेड्रल फिरताना बाहेरील जगाचा पुर्णपणे विसर पडतो आणि आपण एका वेगळ्याच विश्वात आल्याचा भास होतो.




कॅथेड्रलच्या आवारात अनेक दुकाणं थाटलेली पाहण्यास मिळतात. तिथे अनेक शेभेच्या वस्तू, दागिने, खाद्य पदार्थ आणि विशेषतः जाॅर्जियन बनावटीची वाईन विक्रीसाठी ठेवलेली असते. आम्ही कॅथेड्रडची सफर पुर्ण झाल्यानंतर या दुकानातून बरीच खरेदी केली. जाॅर्जियाची आठवण म्हणून मी काही पोस्टकार्ड, कीचेन यासारख्या गोष्टी आवर्जून विकत घेतल्या. 

(सूचना : पोस्ट मधील सर्व फोटोग्राफ हे लेखकाने स्वतः काढलेले आहेत) 

रविवार, १९ मार्च, २०२३

दुबईतील टेहाळणी बुरुज (Watchtowers of Dubai)

 दुबई शहर हे विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत फक्त एक खेडेगाव होते यावर आज क्वचितच कुणाचा विश्वास बसेल. मध्ययुगीन दुबई शहर हे समुद्र किनाऱ्या लगत वसलेले होते. इराणच्या आखातातून नदीसारखी एक खाडी काहीशी मुख्य भागात घुसून तिने जमीनीचे दक्षिणोत्तर असे दोन भाग पाडलेले आहेत. या खाडीलाच आज दुबई क्रिक (Dubai Creek) म्हणून संबोधले जाते. खाडीच्या उत्तर किनाऱ्यावर देअरा आणि दक्षिण किनाऱ्यावर बरदुबई अशा दोन छोट्या गावांच्या वसाहती त्याकाळी अस्तित्वात होत्या. विसाव्या शतकाच्या आरंभी या दोन वसाहतींची लोकसंख्या पाच ते आठ हजारा दरम्यान होती. मासेमारी आणि इराणच्या आखातातील उथळ पाण्यात बुडी मारून मोती गोळा करणे (Peal Diving) असे व्यवसाय त्याकाळी दुबईचे लोक करत असत. कुडामातीच्या घरात राहणाऱ्या येथील लोकांचे जीवन खूप खडतर होते. मोत्याच्या बदल्यात खाद्यपदार्थ, मसाले आणि कापड अशा जीवनावश्यक वस्तू दुबईत येऊ लागल्या. या व्यापारामुळे दुबईत एक प्रकारची सुबत्ता आली.




हल्लोखोरांपासून दुबईचे संरक्षण करण्यासाठी बरदुबई आणि देअरा या दोन्ही वसाहती भोवती तटबंदी बांधून त्यांना सुरक्षित केले होते. शहराचा विस्तार करण्यासाठी कालांतराने ही तटबंदी पाडावी लागली. तटबंदी पाडल्यामुळे दुबईच्या संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा नव्याने विस्तृत भागात तटबंदी बांधणे खूप खर्चिक होते म्हणून बरदुबई आणि देअरा भागात मोक्याच्या ठिकाणी टेहाळणी बुरुज (Watchtower) बांधण्यात आले. एकूण २७ टेहाळणी बुरुज त्याकाळी अस्तित्वात असल्याचे उल्लेख मिळतात. पैकी २० बुरुज हे देअरा भागात तर ७ बुरुज बरदुबई भागात उभारले होते. यातील काही टेहाळणी बुरुज आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

दुबई समुद्र किनाऱ्यावरचे शहर असल्यामुळे लुटारु टोळ्यांचे हल्ले जमिनी मार्गापेक्षा समुद्र मार्गाने जास्त होत असत. समुद्र मार्गाने होणाऱ्या हल्ल्याची पुर्व कल्पना देण्यासाठी अनेक टेहाळणी बुरुज हे किनाऱ्यालगत उभारले गेले होते. नागरिकांना हल्ल्याची सुचना देण्याबरोबरच या बुरुजांचा उपयोग इतर कारणांसाठी देखील केला जात असे. ईदचा चंद्र पाहण्यासाठी त्याकाळी हेच शहरातील सर्वात उंच ठिकाण होते. दौऱ्यावरुन परतणारा राजा, राजकुमार किंवा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या आगमनाची सूचना शहरवासीयांना याच ठिकाणाहून दिली जात असे. सूचना मिळाल्यावर शहरातील लोक त्यांच्या स्वागतासाठी वेशींपर्यंत जायचे. याबरोबरच महत्त्वाच्या दवंडी याच टेहाळणी बुरुजावरुन दिल्या जायच्या. दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या जवळीची शस्त्रे ही बुरुजांवरील पहारेकऱ्याकडे जमा करावी लागत असे. व्यापारासाठी येणाऱ्या जहाजांना दुबई खाडीत प्रवेश करण्यापूर्वी टेहाळणी बुरुजांवर नोंदणी करावी लागे. 


टेहाळणी बुरुजांची रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण होती. प्रारंभीचे बुरुज हे गोलाकार होते. गोलाकार बुरुजांचा मुख्य फायदा म्हणजे याला कुठेच कोपरा नसल्यामुळे हल्लेखोरांना लपुन बसण्यास संधी मिळत नसे. गोलाकार बुरुज निर्माण करणे हे खूप वेळखाऊ, खर्चिक आणि किचकट काम होते. नंतरच्या काळात अनेक बुरुजांची आवश्यकता भासू लागल्याने चौकोनी आकाराचे बुरुज बांधण्यात आले. चौकोनी बुरुज कमी खर्चात आणि कमी वेळत पुर्ण व्हायचे. टेहाळणी बुरुज बांधण्यासाठी प्रवाळ दगड (Coral Stone), जिप्सम, चुनखडी आणि वाळू अशी सामग्री वापरली जायची. बुरुजात प्रवेश करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने तळमजल्यावर कुठलेच प्रवेशद्वार नसायचे. त्याऐवजी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर एक खिडकी असे. बुरुजांवरील पहारेकरी या खिडकीतून दोर किंवा शिडीच्या माध्यमातून खालीवर ये-जा करत. चढतांना पायाला आधार मिळावा म्हणून भिंतीवर छोट्या चौकोनी खाचा केलेल्या असत. बुरुजात पहारेकरी राहण्याची सोय होती. हल्लेखोरांवर उकळते तेल ओतण्यासाठी इतर बाजूंनी खिडक्या होत्या. या खिडक्यांना बाहेरील बाजूने नाकासारखा आकार देऊन त्यांना हल्लेखोरांच्या माऱ्यापासून सुरक्षित केले होते. बुरुजाचे छत हे खजुराच्या पानाने अच्छादून पहारेकऱ्यांसाठी सावली बनवली जात असे. बुरुजावर गरजेपुरता दारुगोळा ठेवण्यासाठी कोठार देखील असायचे. बुरुजाच्या मोक्याच्या जागी बंदुकीतून गोळ्या झाडण्यासाठी चौकोनी छिद्र (जंग्या) असत. या छिद्रांचे बांधकाम विविध अंशाच्या कोनात केल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या शत्रूला टिपणे शक्य होते. बाहेरून या छिद्रांच्या आत मारा करता येत नसल्याने आतला पहारेकरी सुरक्षित राही. बुरुजाच्या सगळ्यात वरच्या भागावर सुंदर पाकळ्यांची नक्षी (Castellation) केलेली असायचे. या पाकळ्यांची त्रिकोणी रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर होती. या पाकळ्यांची आडून शत्रूवर मारा करता येत असे.

~ गणेश भाऊसाहेब पोटफोडे (दुबई)

सिगिरीया-Sigiriya (सिंहगिरी) चा इतिहास

सिगिरिया किल्ला 

श्रीलंकेच्या अगदी मध्यभागी घनदाट जंगलाने वेढलेल्या भागात जमीनीपासून २०० मीटर उंचीचा एक भला मोठा खडक आहे. इ. स. ५ व्या शतकात कश्यप राजाची राजधानी असणारा आणि नियोजनपूर्वक नगररचनेचे उत्कृष्ट उदाहरण असणारा हा किल्ला युनेस्को ने जागतिक वारसा स्थळात सामिल केला आहे. जगभरातील लाखो पर्यटकांचे आकर्षक असणारा हाच तो जगप्रसिद्ध सिगिरीया किल्ला अर्थात सिंहगिरी. सिगिरीयाचा परिसर जितका निसर्गसंपन्न आहे तितकाच त्याचा इतिहास देखील अतिशय रंजक आहे. 

श्रीलंकेच्या इतिहासाची साधणे - चूलवंश/महावंश :
श्रीलंकेच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला महावंश आणि चूलवंश या ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. सिगिरीया किल्ल्याची बांधणी संबंधित माहिती आपल्याला चूलवंश मध्ये मिळते. चूलवंश हा पाली भाषेत लिहिलेला ग्रंथ असून यात श्रीलंकेतील बौद्ध राजांच्या ऐतिहासिक नोंदी काव्यशैलीत लिहिलेल्या आहेत. त्यात इ. स. ४ थ्या शतकापासून तर थेट श्रीलंकेत ब्रिटिश सत्ता स्थापन होण्यापर्यंत म्हणजे इ.स. १८१५ पर्यंतच्या नोंदी आढळतात. या ग्रंथाची रचना विविध बौद्ध भिक्षूंनी केली आहे. चूलवंश हा ग्रंथ महावंश ग्रंथाचा उत्तरार्ध मानला जातो. महावंश (अर्थात महान इतिहास) हा देखील पाली भाषेतील काव्यग्रंथ असून त्यात कलिंग देशाचा राजा विजय (इ. स. पुर्व ५४३) याच्या श्रीलंकेतील आगमनापासून ते थेट राजा महासेन (इ. स. ३३४ - इ. स. ३६१) पर्यंतचे वर्णन आढळते. महावंश ग्रंथात तथागत गौतम बुद्धांच्या श्रीलंका भेटेचे उल्लेखही आढळतात. 

धातूसेन कालखंड : 
धातूसेन हा श्रीलंकेचा राजा होऊन गेला. त्याचा कालखंड इ. स. ४५५ ते इ. स. ४७३ असा होता. धातूसेनने अनुराधापूरा येथून राज्य केले. धातूसेन राजा सत्तेत येण्यापूर्वी श्रीलंकेच्या उत्तर भागावर द्रविडांनी (तमिळ) सत्ता स्थापन केली होती. वेगवेगळ्या सहा द्रविड राजांनी श्रीलंकेवर राज्य केले. म्हणून त्यांना 'सहा द्रविडांचे राज्य' असे म्हणतात. हे सगळे राजे पांडियन राजाचे प्रतिनिधी होते. उत्तरेतील या तमिळ आक्रमणाला प्रतिकार करत धातूसेनने एक एक करत सगळ्या द्रविड राजांचा पराभव करून श्रीलंकेला स्वातंत्र्य आणि एकसंघ केले. गादीवर आल्यानंतर धातूसेन राजाने राज्याची विस्कटलेली शासन व्यवस्था पूर्वपदावर आणली आणि जनतेच्या हितासाठी अनेक विकासकामे केली. सामान्य लोकांच्या हितासाठी धातूसेन राजाने एकूण १८ तलाव बांधल्याची नोंद सापडते. त्याच बरोबर त्याने 'योधा इला' नावाचा सिंचन कालवा बांधला. अवुकाना येथील १२ मी. उंचीची बुद्ध प्रतिमेची निर्मिती देखील याच्याच कालखंडात झाली. एकूणच धातूसेनच्या काळात शेती व्यवसायाची पुन्हा भरभराट झाली.

धातूसेन राजाला कश्यप आणि मोघलान नावाचे दोन पुत्र होते. त्यात कश्यप सर्वात मोठा होता परंतु तो दासीपुत्र होता. तर मोघलान हा त्याच्या आवडत्या राणीचा पुत्र होता. मोघलान हा अधिकृत राजकुमार असल्याने तोच राज्याचा खरा उत्तराधिकारी होता. धातूसेन राजाला एक मुलगी देखील होती. तिचा विवाह त्याने आपल्या सख्ख्या बहिणीच्या मुलाशी लावून दिला होता. धातूसेनच्या बहिणीचा नवरा अर्थात त्याचा मेहुणा हा सेनापती होता. त्याचे नाव मीगारा असे होते. 

कश्यपला आपणच राजा व्हावं अशी महत्त्वाकांक्षा होती. तो मोघलानचा खूप तिरस्कार करत असे. धातूसेनची मुलगी आणि बहिण या सासू सूनात भांडणे होऊ लागली. एकदा भांडण इतके विकोपाला गेले की, धातूसेनाने आपल्या बहिणीस ठार मारण्याची आज्ञा दिली. मीगाराला या घटनेचा खूप राग आला. त्याला कश्यपची राजा होण्याची महत्त्वाकांक्षा माहिती होती. म्हणून त्याने कश्यपला पित्याविरुद्ध बंड करण्यासाठी उद्युक्त केले. आपण जर उठाव केला नाही तर आपल्याला राजसिंहासन कधीही मिळणार नाही याची कश्यपला जाणीव होती. म्हणून तो या संधीचा फायदा घेऊन आपल्या पित्याविरुद्ध बंड करून धातूसेनास कैद करतो आणि स्वतःला राजा घोषीत करतो. मोघलान आपल्या जीवाच्या भितीने जंगलात पळून जातो. 

मीगाराच्या सांगण्यावरून कश्यप धातूसेनाचा शाही खजिन्यासाठी खूप छळ करतो. धातूसेनने मोघलानला देण्यासाठी खूप मोठा खजिना दडवून गुप्त ठिकाणी ठेवला असल्याचे त्याला वाटत असते. धातूसेन त्रासाला कंटाळून दडवून ठेवलेला खजिना कश्यपला दाखवण्यास तयार होतो. त्या बदल्यात धातूसेन केलावेवा कालव्यात अंघोळ करण्याची अट घालतो. केलावेवा कालव्याची निर्मिती स्वतः धातूसेनने केलीली असते. जेव्हा त्याला कालव्यात आणण्यात येते तेव्हा तो ओंजळीत पाणी घेऊन कश्यपला सांगतो की, तू जो खजिना शोधत होतास तो हाच आहे. या सगळ्या घटनेचा कश्यपला अतिशय संताप येतो आणि तो धातूसेनला जिवंत गाडण्याची आज्ञा देतो. 

कश्यप कालखंड :
इ. स. ४७३ साली आपल्या पित्याची हत्या करुन कश्यप श्रीलंकेचा राजा होतो. कश्यप हा इ. स. ४९५ पर्यंत राजा म्हणून राहिला. एका दासीपुत्राने अधिकृत राजकुमाराला डावलून आणि पित्याची हत्या करुन सिंहासन काबीज करणे हे जनतेला आणि खास करुन बौद्ध भिक्षूंना रूचनारे नव्हते. ते सर्व कश्यपचा तिरस्कार करू लागले. पित्याच्या हत्तेनंतर बौद्ध भिक्षू त्याला 'पितृ घातक कश्यप' या नावाने ओळखू लागले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळालेला मोघलान हा पूढे दक्षिण भारतात जातो आणि स्थानिक राजाच्या मदतीने तो स्वतःची सैन्य दल निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कश्यपला नेहमी भिती वाटत रहाते की मोघलान कधीही आपल्यावर हल्ला करू शकतो म्हणून तो आपली राजधानी अनुराधापूरा येथून हलवून दक्षिणेला काहीशा सुरक्षित अशा सिगिरीया येथे नेण्याचा निर्णय घेतो. 


सिगिरीयाची निर्मिती आणि रचना:
कश्यप राजाने आपली राजधानी सिगिरीया येथे हलवण्यापूर्वी तिथे काही शकतं आधीपासून बौद्ध भिक्षूंच्या गुहा आणि मंदिरे होते. बौद्ध भिक्षूच्या वास्तव्याचे पुरावे तेथिल शिलालेखातून मिळतात. या शिलालेखानुसार हे ठिकाण बौद्ध भिक्षूंना दान दिल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखांचा कालावधी इ. स. पुर्व ३ रे शतक ते इ. स. १ ले शतक असा आहे. 

सिगिरीया किल्ल्याची निर्मिती खूप नियोजनपूर्वक करण्यात आली. हा किल्ला म्हणजे नगर रचनेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल. इ. स. ५ व्या शतकात उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञान, अभियांत्रिकी कौशल्ये आणि कल्पकता याची सांगड घालून या किल्ल्याची निर्मिती केली गेली. संपूर्ण किल्ला बांधून तयार व्हायला जवळपास सात वर्षांचा कालावधी लागला. रुंद खंदक, चौफेर भक्कम तटबंदी, बगीचे, महाल, पिण्याच्या पाण्याचे तलाव, जलतरण तलाव, कारंजे, भित्तीचित्र, रंगमहाल, राजसभा आणि बालेकिल्ला आदींचा यात समावेश होता. सिगिरीयामध्ये दोन राजवाड्यांची निर्मिती करण्यात आली होती. डोंगर माथ्यावर पावसाळी राजवाडा तर पायथ्याशी उन्हाळी राजवाडा. 


उन्हाळी राजवाड्याचे अवशेष 
शाही उद्याने :
सिगिरीयाचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिम दिशेला आहे. हे प्रवेशद्वार भल्या मोठ्या तटबंदीवर बनवलेले आहे. तटबंदी समोर रुंद आणि खोल खंदक असून त्यात मगरीचा मुक्त संचार असायचा. कश्यप राजा हा खूप विलासी वृत्तीचा होता. म्हणून त्याने सिगिरीया किल्ल्याच्या आतमध्ये विविध उद्याने बनवून घेतली. त्यात जल उद्यान (Water Garden), शिळा उद्यान (Bolder Garden) आणि गच्चीवरचे उद्यान (Terraced Garden) यांचा समावेश होतो. 

i) जल उद्यान (Water Garden) :
पश्चिम प्रवेश द्वारातून आत गेल्यावर डाव्या आणि उजव्या बाजूस समरुप (Symmetrical) असे जल उद्यान बनवलेले आहे. या उद्यानात पिण्याच्या पाण्याचे तलाव, तरण तलाव, फुलांचे बगीचे, भूमिगत पाईपलाईन करून कारंजे बनवले होते. या कारंज्याचे पाणी एक मीटर पेक्षा उंच उडायचे. यातील काही कारंजे आजही व्यवस्थित चालतात. विविध तलावातील पाणी भूमिगत पाईपलाईनने या उद्यानात आणून हायड्रोलिक्स आणि गुरुत्वाकर्षणाच्या सिध्दांताची सांगड घालून ही कारंजे बनवलेली गेली. जल उद्यानाच्या तरण तलावात कश्यप राजा आपल्या अप्सरांबरोबर जलक्रिडा करत असे. जल उद्यानाच्या थोडे पुढे गेल्यावर तलाव आणि कालव्यांनी वेढलेली दोन्ही बाजूस बेटे आहेत. या बेटांवर उन्हाळी राजवाडा बनवलेला होता. उद्यानातील सर्व तलाव हे भूमिगत पाईपलाईनने एकमेकांना जोडलेले होते. 


पश्चिम महाद्वार 

 ii) शिळा उद्यान (Bolder Garden) :
जल उद्यानानंतर सिगिरीयाच्या अगदी पायथ्याशी विविध गोलाकार खडकांची सुंदर रांग लागते. हेच ते शिळा उद्यान. मोठमोठ्या खडकांच्या मधून येण्याजाण्यासाठी पदपथ बनवलेले आहेत. अनेक खडकांवर इमारती आणि गच्च्या बनवल्या होत्या. तर गोलाकार खडकांखाली नैसर्गिक देवड्या किंवा गुहा बनलेल्या आहेत. अनेक खडकांवर एका विशिष्ट आकाराचे चौकोनी काप किंवा खड्डे कोरलेले दिसतात. या कापांचा उपयोग लाकडी किंवा विटांच्या इमारतींना आधार किंवा टेकू देण्यासाठी करण्यात येत असे. शिळा उद्यानाचा वापर कश्यप राजाच्या पुर्वी आणि नंतर बौद्ध भिक्षूंनी मोठ्या प्रमाणात केलेला आढळतो. याठिकाणी साधारणपणे २० विविध आकाराच्या गुहा आहेत. या गुहांचे छत हे प्लास्टरने सजवून त्यावर सुंदर भित्तीचित्र साकारण्यात आली होती. यातील काही गुहांवर ब्रह्मी लिपीतील शिलालेख पाहण्यास मिळतात. या गुहांच्या छतावरचे पावसाचे पाणी ओघळून गुहेत जावू नये म्हणून त्यावर काप देण्यात आले होते जेणेकरून पाणी बाहेरच पडेल.
 
शिळा उद्यानातील गुहा 

iii) गच्चीवरचे उद्यान (Terraced Garden) :
गच्चीवरचे उद्यान किंवा टेरेस गार्डन हा सिगिरीया डोंगराचा सपाट भाग असून तिथे डोंगर माथ्यावर जाण्यासाठी मुख्य जिना आहे. हा जिना पूर्वी डोंगरात कोरलेल्या भल्यामोठ्या सिंह प्रतिमेच्या तोडांतून जायचा. या मोठ्या सिंहावरूनच याला सिंहगिरी असे संबोधण्यात येत असे. सिंहगिरीचा पुढे अपभ्रंश होऊन त्याचे सिगिरीया झाले. या गच्चीवरून पुर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेचा परिसर न्याहाळता येतो. या गच्चीच्या उत्तर आणि पश्चिम दिशेला खाली-वर जाण्यासाठी जिने बनवलेले आहेत. खडकात कोरलेल्या सिंहाचे तोंड काळाच्या ओघात नष्ट झाले असले तरी दोन पंजे अजूनही अस्तित्वात आहेत. 


टेरेस गार्डन 

पावसाळी बालेकिल्ला:
पावसाळी बालेकिल्ला हा सिगिरीया खडकाच्या अगदी माथ्यावर बांधण्यात आला होता. या बालेकिल्ल्यावर पोहचवण्यासाठी खडकात कोरलेल्या सिंहाच्या तोंडातून मार्ग होता. सिंहाच्या तोंडातून आत गेल्यावर वर जाण्यासाठी अवघड जिना लागतो. बालेकिल्ल्यात विविध इमारती होत्या. त्यात रंगमहाल, तरण तलाव, पिण्याच्या पाण्याचे तलाव, राण्यांची दालणे, मुदपाकखाना आदींचा समावेश होता. रंगमहाल खास पद्धतीने बनवलेला होता. कश्यप राजा या रंगमहालाच्या आसनावर बसून अप्सरांचे नृत्य आणि गायनाचा आनंद घेत असे. पावसाळी बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ जवळपास दोन हेक्टर असून त्यावर अनेक दुमजली इमारती बनवलेल्या होत्या. पायथ्या पासून पावसाळी राजवाड्यापर्यंत येण्यासाठीच्या सर्व पायऱ्या या पांढऱ्या रंगाच्या चमकदार खडकापासून (Moonstone) बनवलेल्या होत्या. चांदण्या रात्री त्या पायऱ्या चमकत असत. 



पावसाळी बालेकिल्ला

भित्तीचित्र (Frescoes) आणि आरसा भिंत (Mirror Wall) :
पायथ्याला शिळा उद्यान जिथे संपते तिथे दोन भलेमोठे गोलाकार खडक एकमेकांना चिटकून उभे आहेत. त्या दोघांमधल्या पोकळीत नैसर्गिक कमान (Natural Arch) तयार झाली आहे. ही कमान ओलांडल्यावर जिन्याने पायथ्यापासून १०० मी उंचीवर सिगिरीयाच्या पश्चिम कड्यावर प्लास्टर लावून त्याकाळी अंदाजे ५०० विविध अप्सरांची भित्तीचित्रे साकारण्यात आली होती (आज त्यातील फक्त २१ अस्तित्वात आहेत). या कड्याच्या कडेने जाण्यासाठी पुल बनवण्यात आला आहे. हा पुलचा काही भाग नैसर्गिक तर काही कृत्रिम फलाट तयार करून बनवला आहे. पुलाच्या डाव्या बाजूस आरसा भिंत (Mirror Wall) आणि उजव्या बाजूस डोंगराची कपार आहे. मधोमध दिड मीटर रुंदीचा पदपथ आहे. या पदपथाच्या जवळपास वीस ते तीस फुट उंचीवर डोंगराचा थोडासा भाग आत गेलेला असून तिथे थोडेसे नैसर्गिक छत तयार झाले आहे. त्या छताला देखील प्लास्टर लावून भित्तीचित्रे साकारण्यात आली आहेत. आरसा भिंत ही अत्युच्च दर्जाच्या प्लास्टर पासून बनवलेली होती. तिच्या आतल्या बाजून चमकदार पाॅलिश करून त्याला आरशा सारखे चकचकीत करण्यात आले होते. डोंगर कपारीवर रंगवलेल्या भित्तीचित्रांचे व येता जाता कश्यप राजाला स्वतःचे प्रतिबिंब या भिंतीवर दिसायचे म्हणून तिला आरसा भिंत असे म्हणले जात असे. सिगिरीया येथील भित्तीचित्राची शैली महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यातील चित्राच्या शैलीशी मिळती जुळती आहे. 

आरसा भिंत 

भित्तीचित्र 
कश्यपचा मृत्यू :
अनेक वर्ष हद्दपार असणारा मोघलान दक्षिण भारतातून स्वतःचं सैन्यदल घेऊन श्रीलंकेत दाखल होतो. सिगिरीया जवळील हाबरणा मैदानात मोघलान आणि कश्यप एकमेकांसमोर उभे ठाकतात. कश्यप हत्तीवर स्वार होऊन आपल्या सेनेचे नेतृत्व करत असतो. युद्धात मोघलानच्या सैन्यावर चाल करतांना कश्यपचा हत्ती एकेठिकाणी थोडासा वळसा मारण्यासाठी मागे वळून पुढे जातो. जेव्हा हत्ती मागे वळतो तेव्हा सैन्याला वाटते की कश्यप राजाने हार पत्करली असून तो मागे धावत आहे. कश्यपच्या सगळ्या सैन्यात एकच गदारोळ उडतो आणि ते विचलित होऊन मागे धावू लागते. पण सैन्य आपल्याला सोडून पळ काढत आहे हे कश्यपला कळत नाही. त्याचा हत्ती युद्धभूमीत अगदी मधोमध जाऊन थांबतो. सैन्याविना कश्यपचा हत्ती एकटाच युद्धभूमीत दाखल होतो. शत्रू सैन्याने घेरले गेल्यावर तो शरणागती स्विकारण्यास तयार होत नाही आणि स्वतःचा गळा चिरुन कश्यप राजा आत्महत्या करतो.

मोघलान कालखंड आणि बौद्ध माॅनेस्ट्री :
आपला सावत्र बंधू कश्यपच्या मृत्यूनंतर मोघलान राजगादीवर विराजमान होतो. वडिलांची हत्या करुन कश्यपने उभा केलेले सिगिरीयाचे वैभव त्याला नकोसे वाटते. तो सिगिरीया किल्ल्याचा त्याग करुन आपली राजधानी परत अनुराधापूरा येथे हलवतो. कश्यपने आपल्या विलासासाठी उभी केलेली सिगिरीया नगरी तो बौद्ध भिक्षूंना दान करुन टाकतो. परत एकदा सिगिरीयाच्या विविध गुहा बौद्ध भिक्षूंनी फुलून जातात. कश्यपच्या कालखंडानंतर जवळपास १३ व्या शतकापर्यंत सिगिरीयामध्ये बौद्ध भिक्षूंचा वावर होता. १३व्या शतकानंतर बौद्ध भिक्षू हे ठिकाण सोडून जातात. इ. स. १८३१ साली पोलोननरुवा येथून अनुराधापूरा कडे जात असताना इंग्रज अधिकारी मेजर जाॅनाथन फोर्ब्ज हा कुतूहलाने सिगिरीया डोंगराजवळ येतो. त्याला तेथे झाडीत इमारतींचे अवशेष सापडतात आणि सिगिरीया किल्ला परत जगासमोर येतो.



Reconstruction of Sigiri Lion Entrance and Palace. Sirinimal Lakdusinghe Felicitation Volume (2010)


संदर्भ आणि बाह्य दुवे :

. Sigiriya : M. M. Ananda Marasinghe
http://www.archaeology.gov.lk/

श्रीलंका : डांबुला येथील बौद्ध लेणी

 बौद्ध धर्म आणि डोंगरात कोरलेल्या लेणी यांच्यात एक घट्ट नाते आहे. भारतीय उपखंडातील बहुतांश लेणी या बौद्ध धर्माशी निगडीत आहेत. बौद्ध लेणी म्हणजे थोडक्यात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या भिक्खुसाठी बनवलेले निवासस्थान. बौद्ध लेणी समुहात विशेषकरून विहार, प्रार्थनास्थळ, भिक्खुसाठी निवासस्थान, स्वयंपाकगृह आदींचा समावेश असायचा. अशा अनेक लेणी समुहात गौतम बुद्धाच्या कोरलेल्या मुर्ती पाहण्यास मिळतात. गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना चारही दिशांना धर्मप्रचारासाठी पाठवले होते. हे शिष्य अर्थात भिक्खु वर्षभर बुद्धाने सांगितलेल्या मार्गाने धर्म प्रसार करत आणि पावसाळ्यात सर्वजण डोंगरात कोरलेल्या लेण्यात वास्तव्यासाठी येत. या ठिकाणांना विहार, संघराम किंवा बौद्ध मठ असे देखील संबोधतात. या विहारातून बौद्ध धर्माचे शिक्षण देखील देण्यात येत असे. भारतात, खास करून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बौद्ध लेण्या आढळतात. यात वेरुळ, अजंठा, कान्हेरी, कार्ले आणि घारापुरी आदी महत्त्वाच्या लेणी समुहांचा समावेश होतो. यातील कुठल्या ना कुठल्या लेणी समुहास आपण नक्कीच भेट दिलेली असणार. भारताबाहेर विविध देशात देखील बौद्ध लेण्या आढळतात. त्यात आपल्या शेजारच्या श्रीलंका देशाचा समावेश होतो. 


डंबुला बौद्ध लेणी 

श्रीलंकेच्या मध्य प्रांतातील मातले जिल्हात डांबुला शहराजवळील डोंगरात असाच एक लेणी समुह आहे. त्याचा युनेस्कोने १९९१ साली जागतिक वारसा स्थळात समावेश केलेला आहे. डांबुला लेणी समुह हा श्रीलंकेतील सर्वात मोठा लेणी समुह असून त्याचे उत्तम रित्या संवर्धन करण्यात आलेले आहे. डांबुला शहराच्या जवळपास ८० लेणी असल्याचा उल्लेख आहे पण त्यातील रणगिरी येथील पाच लेण्यांचा समुह हा मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. या पाच लेण्यांचे एकूण क्षेत्रफळ हे २१०० चौ. मीटर इतके असून हा समूह डोंगर पायथ्यापासून जवळपास १६० मीटर उंचीवर आहे. या लेणी समुहात एकूण १५३ बुद्ध मुर्ती आहेत. याबरोबर तीन मुर्ती या श्रीलंकेच्या राजांच्या असून चार मुर्ती या हिंदू देवता विष्णू व गणेश यांच्या आहेत. गौतम बुद्धाच्या विविध मुद्रा येथील मुर्तीतून पहाण्यास मिळतात.

गौतम बुद्धाची प्रतिमा 

डांबुला लेण्यांची निर्मिती श्रीलंकेचा राजा वत्तागामिनी अभया याने इ. स. पुर्व पहिल्या शतकात केली. द्रविड आक्रमणामुळे वत्तागामिनी राजाने जवळपास १५ वर्षे भूमिगत होऊन याठिकाणी वास्तव्य केले होते. अनुराधापूरावर पुन्हा राज्य स्थापन केल्यानंतर वत्तागामिनीने (इ. स. पुर्व ८९ - इ. स. पुर्व ७७) या लेण्यांना मूर्त रूप देऊन तिथे बौद्ध विहार बनवले. वत्तागामिनी राजाने या लेण्या बनवण्यापुर्वी येथे काही लेणी या नैसर्गिक होत्या आणि त्यांचा वापर हा बौद्ध भिक्खुंकडून साधनेसाठी होत होता असे याठिकाणी आढळलेल्या ब्रह्मी लिपीतील शिलालेखातून अधोरेखित होते. या लेण्यांच्या छतावर आणि भिंतीवर सुंदर चित्रकारी केलेली आहे. ही चित्रे गौतम बुद्धाच्या आयुष्याशी संबंधित आहेत तर काही चित्रे ही श्रीलंकेच्या इतिहासावर साकारलेली आहेत. 

लेण्यातील भिक्तिचित्र

वत्तागामिनी राजाच्या कालखंडानंतर हा लेणी समुह प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून उदयास आले. विविध कालखंडातील राजांनी या लेणी समुहाचा जिर्णोद्धार केला. पोलोननरुवाचा राजा निशंका मल्ला (इ. स. ११८७-११९६) याने याठिकाणी अनेक बौद्ध मुर्ती कोरल्या तर लेण्यातील चित्रांवर त्याने सोनेरी मुलामा दिला. यानंतर या लेणी समुहास 'सुवर्णगिरी गुहा' असे नामकरण केले गेले.