राजकारण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकारण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३१ जुलै, २०२२

महाराष्ट्र द्वेष्टे राज्यपाल : भगतसिंह कोश्यारी


राज्यपाल हे भारतीय राज्यघटनेप्रमाणे अतिशय महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. परंतू अलिकडच्या काळात राज्यपालांचा वापर राजकीय हत्यार म्हणून करण्याचा पायंडा संघराज्य सरकारने पाडला आहे. विशेषकरून विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये राज्यपाल नेहमीच पक्षपाती कारभार आणि निर्णय घेताना दिसतात. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या पक्षपातीपणाचे शिरोमणीच ठरावेत असे वागताना दिसत आहेत. महाराष्ट्राला इतिहासात अतिशय बुद्धिमान आणि प्रतिभावंत राज्यपालांची परंपरा लाभलेली आहे. भगतसिंह कोश्यारी हे त्याला अपवाद आहेत, हे खेदाने म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यभार स्विकारल्या पासून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षात काम केलेले नेते आहेत. विशेष म्हणजे कोश्यारी हे प्राध्यापक, संपादक आणि अनेक महत्वाच्या राजकीय पदांवर काम केलेले आणि अनुभवी व्यक्ती आहेत. २००१ साली उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. ते उत्तराखंड मधून राज्यसभेचे सदस्य म्हणून देखील निवडून गेले होते. एवढे अनुभवी व्यक्ती असूनही कोश्यारी यांनी अनेकदा महाराष्ट्राबाबत आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून आणि बोलण्यातून महाराष्ट्राचा अपमानच केलेला दिसतो. राज्यपाल कोश्यारी किती महाराष्ट्र द्वेष्टे आहेत हे अनेकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून सिद्ध केले आहे. कोश्यारी हे आपल्या दिल्लीश्वरांच्या खुश करण्यासाठी असे बोलत आहेत की, मुळात त्यांची बुद्धीच इतकी संकुचित आहे? हा मात्र संशोधनाचा विषय ठरू शकतो.

भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा अनादर केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी अतिशय बालिश आणि अपमानास्पद विधान केले होते. खरं तर राज्यापाल पदावरील व्यक्तीला असले फालतू विधान शोभणारे नव्हते. त्यानंतर संभाजीनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. "समर्थ रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी विचारले नसते" अशा प्रकारचे ते विधान होते. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते की नव्हते हा महाराष्ट्रात अत्यंत वादाचा मुद्दा आहे. ब्राह्मण जातीतील अनेक व्यक्तींना छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू म्हणून चिकटवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील अनेक तथाकथित इतिहासकारांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने स्वतःच्या हिमतीवर आणि आठरापगड जातीतील आपल्या सहकाऱ्यांच्या बळावर स्वराज्याची निर्मिती केली हा इतिहास राज्यपाल कोश्यारी यांना माहित नसावा. स्वराज्य निर्माण करण्यात समर्थ रामदास यांचे काय योगदान होते? असा प्रश्न आता महाराष्ट्रा पडू लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असताना राज्यपालांनी किमान महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आगोदर समजून घ्यायला हवा होता.

२९ जुलै २०२२ रोजी भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बाबत आणि मराठी माणसांबाबत अजून एक वादग्रस्त वक्तव्य केले. "मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी आणि राजस्थानी निघून गेल्यास या शहरात अजिबात पैसा उरणार नाही. मग या शहराला आर्थिक राजधानी कोण म्हणेल?" असे म्हणून त्यांनी एक प्रकारे मराठी माणूस भिकारी आहे असे अप्रत्यक्षपणे म्हणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मुंबई उभी राहिली ती कष्टकरी मराठी माणसांच्या घामावर. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नाना शंकरशेठ, डाॅ. भाऊ दाजी लाड, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या सारख्या विभूतींचे मुंबईसाठी दिलेले योगदान माहिती तरी असेल का? मुंबईतील गुजराथी आणि राजस्थानी लोक खूप पैसेवाले आहेत हे नाकारता येणार नाही. आजच्या घडीला मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला जात आहे ही देखील वस्तुस्थिती असली तरी गुजराथी आणि मारवाड्यांनी कुठल्या मार्गाने पैसा कमावला हे राज्यपालांनी सांगायला हवे होते. सरकारी बँकांना गंडा घालून लाखो कोटी घेऊन पळालेले लोक कोण होते? आणि ते कुणाच्या आशिर्वादाने देशाबाहेर पळाले हे देखील कोश्यारी यांनी सांगायला हवे होते. 

शिवसेना पक्ष फोडल्यानंतर मुंबईतील मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न कोश्यारी करत होते, हे यावरून स्पष्ट होत आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सध्या दिल्लीत बसलेल्या गुजराथी शेठ लोकांच्या डोक्यात शिजत आहे, हे काही लपून राहिलेले नाही. मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती रक्त सांडून. मुंबईवर सर्वप्रथम  हक्क आहे तो इथल्या मराठी आग्री, कोळी बांधवांचा. जर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा जर कुणाचा डाव असेल तर महाराष्ट्रात मराठी माणसांचा ज्वालामुखी उसळल्याशिवाय राहाणार नाही. याचे परिणाम भारतीय संघराज्य खिळखिळे होण्यास कारणीभूत ठरतील हे दिल्लीश्वरांनी ध्यानात ठेवावे. राज्यपालांना यावेळी सांगावेसे वाटते की, गुजराथी आणि मारवाडी लोकांनी खुशाल आपापल्या राज्यात जावे आणि तिथली राज्य श्रीमंत करावीत. महाराष्ट्रातील मराठी माणूस हा भिकारी नाही. मुळात गुजराथी आणि राजस्थानी हे पैसेवाले होते तर त्यांना महाराष्ट्रात येण्याची काय गरज होती? ते मुंबईत कशासाठी आले? या प्रश्नाचे उत्तर कोश्यारी यांनी द्यावे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कामकाज हे घटनेला धरून नाही हे अनेकदा महाराष्ट्राने अनुभवले आहे. कोरोना काळात राजभवनातून समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न असो, किंवा राज्यपाल नियुक्त १२ विधानसभा सदस्य निवडी संदर्भात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या नावांना केराची टोपली दाखवणे असो. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी अनेकदा सांगूनही ती त्यांनी जाणीवपूर्वक घेतली नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी त्यांची भुमिका देखील राज्यघटनेच्या विरुद्धच होती उघड झाले आहे.

एकूणच महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करणासाठीच गुजरात धार्जिण्या संघराज्य सरकारने भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती केलेली दिसते. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या या राज्यपालाची तत्काळ उचलबांगडी करून या माणसाची 'थेरं' बंद करावीत, अन्यथा मराठी माणूस या म्हाताऱ्याला हिसका दाखवल्या शिवाय राहाणार नाहीत.

(३१ जुलै २०२२)



मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

शरद पवार : राजकारणातील तेल लावलेला पैलवान



शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेले एक अजब रसायन म्हणावे लागेल. गेल्या जवळपास पन्नास वर्षापासून शरद पवार यांचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात वावर आणि दबदबा राहिलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रात विविध खात्याचे मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास. पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा झाली पण संख्याबळाच्या अभावी त्यांना हे पद भुषविता आले नाही. शरद पवार यांचे राजकारण मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत असल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शैक्षणिक संस्था, विविध क्रीडा संस्था तसेच सहकारी संस्था यामध्येही शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे. असा हा अष्टपैलू नेता २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खरा महानायक ठरला.

ऐन निवडणूकीच्या तोंडावर शिखर बँकेतील अयोग्य कर्जवाटपाप्रकरणी शरद पवारांसह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाने आदेश दिला. संबंध नसतानाही शरद पवारांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात आल्याने केंद्र सरकार सुडाचे राजकारण करते की काय? असा प्रश्न उपस्थित केला गेला. ईडी कडून गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर राज्यभरात शरद पवार यांच्या समर्थनात ठिकठिकाणी मोर्चे निघाले. केंद्र सरकार दबावतंत्राचे राजकारण करण्यासाठी ईडी आणि सीबीआय चा दुरुपयोग करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. आपण स्वतः चौकशीला सामोरे जाण्यासाठी ईडी कार्यालयात जाणार असल्याची घोषणा करून पवारांनी एकच खळबळ उडवून दिली. २७ सप्टेंबरला राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत जमू लागले. अनेक ठिकाणी मोर्चे निघू लागले. राज्यात विषेशतः मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उद्भवू नये म्हणून पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचा आपला निर्णय शेवटच्या क्षणी मागे घेतला. शेवटी व्हायचे तेच झाले या साऱ्या घटनाक्रमाचा शरद पवारांनी फायदा उचलून स्वतःविषयी सहानुभूतीचे वातावरण निर्माण केले. ईडी सारखे संकट डोळ्यासमोर असतांनाही शरद पवार यांनी आपल्या राजकीय चातुर्याने त्याला संधीत रुपांतरीत केले.



निवडणुका लागायच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मधुकरराव पिचड, विजयसिंह मोहीते पाटील, उदयनराजे भोसले यासारखे पवारांच्या तालमित वाढलेले दिग्गज नेते त्यांना सोडून गेले. ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आमदार, खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सोयीनुसार भाजप अथवा शिवसेनेत डेरे दाखल होत होते. एव्हढी पक्षाला गळती लागूनही शरद पवार खचले नाहीत. ८० वर्षाचे वय, कर्करोगासारखा झालेला गंभीर आजार यांच्यापुढे हात न टेकता शरद पवारांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या हातात घेतली आणि पायाला भिंगरी लागल्यागत त्यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करून चाळीसहून अधिक प्रचारसभा घेतल्या. एखाद्या तरुण नेत्याला लाजवेल या उत्साहात शरद पवार ठिकठिकाणी सभांना संबोधित करत होते. काँग्रेस हायकमांडने तर महाराष्ट्राच्या निवडणूकीकडे संपूर्णपणे पाठ फिरवल्याचे याठिकाणी नमूद करावे लागेल. जणूकाही निवडणुकीच्या आधीच त्यांनी हार पत्करली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, स्टार प्रचारक प्रियंका गांधी या महाराष्ट्रात फिरकल्या देखील नाहीत. राहूल गांधी यांच्या जेमतेम पाच सभा या निवडणूकी दरम्यान महाराष्ट्रात झाल्या. याचा फायदा काँग्रेसला कीतपत झाला असेल हे सांगणे कठीणच आहे. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे स्वतःच्याच मतदार संघात अडकवून पडल्याने आघाडीच्या वतीने एकटे शरद पवारच प्रचाराचा किल्ला लढवत असल्याचे जाणवले.

सोमवार, २५ मार्च, २०१९

सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित?


मार्च २०१९ चा महिना नगरच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या महिन्यात नगर जिल्ह्यात खूप राजकीय उलथापालथ झाली. विधान सभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डाॅ सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. नगर लोकसभेच्या जागेसाठी हट्ट करून बसलेल्या सुजय विखे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली होती. शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला सोडली अशी बातमी आली होती परंतू नंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सावरासावर करून ही जागा राष्ट्रवादीच लढवणार हे स्पष्ट केले. पडद्याआड राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यासाठी देखील विखे पाटील यांनी प्रयत्न केले परंतू पवार - विखे यांच्यातील राजकीय वैमनस्यामुळे हे देखील अशक्‍यच होते. तेंव्हा सुजय विखे पाटील यांनी भाजपाशी संधान साधन्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सुजय विखे पाटील यांची मुंबईला गुप्त बैठक झाल्यानंतर महाजन यांनी नगरचा अचानक दौरा केला. या दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते पण विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना जाणीवपूर्वक या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. खरंतर या बैठकीतच सुजय विखे यांना भाजपाकडून उमेदवारी निश्चित झाली होती पण राहीली होती ती फक्त त्यांच्या भाजपात प्रवेशाची औपचारिकता. गिरीश महाजन यांच्या या खासगी दौऱ्यामुळे गांधी संमर्थकात अस्वस्थता पसरली. डाॅ सुजय विखे पाटील यांच्या भाजपाप्रवेशाने दिलीप गांधी यांची तिकीट मिळण्याची शक्यता मावळली होती कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे हे भाजपाचे उमेदवारी असतील अशी घोषणा केली. 

भाजपा तर्फे डाॅ सुजय विखे पाटील यांना उमेदवारी नक्की झाल्यानंतर त्याच्या विरोधात तुल्यबळ असा उमेदवार शोधणे राष्ट्रवादी काँग्रेसपूढील मोठे आव्हानच होते. राष्ट्रवादी तर्फे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले गेले. अलीकडच्या काळात गडाख कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आपला स्वतःचा नवीन पक्ष उभारला आहे. त्यामुळे गडाख कुटुंबातील कुणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार होईल हे दुरापास्तच होते.

प्रशांत गडाख यांनी उमेदवारीस नकार दिल्यानंतर नगर शहरातील विद्यमान आमदार आणि माजी महापौर संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. खरंतर यामगे शरद पवार यांचे फार मोठे राजकारण होते. एक तर त्यांना संग्राम जगताप यांच्यारूपाने तुल्यबळ उमेदवार मिळाला होता तसेच जगताप हे युवा असल्याने दोन युवकांमध्ये ही निवडणूक रंगणार होती. महत्वाचा मुद्दा म्हणजे संग्राम जगताप हे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई असल्याने कर्डिले यांना कैचीत पकडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली. आता यंदाची निवडणूक म्हणजे शिवाजी कर्डिले यांची सत्वपरीक्षा ठरणार आहे. कर्डिले जरी भाजपात असले तरी ते शेवटपर्यंत सुजय विखे पाटील यांचे काम करतील की जवायाला छुपी मदत करतील?? हा ही मोठा प्रश्न आहे. 

भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी हे भाजपाकडून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. वडीलांना तिकीट नाकारल्याने दुखावल्या गेल्याने ते अपक्ष लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली. असं झाल्यास त्याचा फटका नक्कीच सुजय विखे पाटील यांना बसणार आहे. गांधी हे जैन समाजाचे आहेत आणि नगरदक्षिण मतदारसंघात जैन समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष अर्ज भरल्यास यंदा तीन तरूणांमध्ये ऐतिहासिक लढत होईल यात शंकाच नाही.

शेवटी नगर दक्षिणमध्ये भाजपाला पोषक वातावरण आहे. त्यात विखे पाटील यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. डाॅ सुजय विखे पाटील यांनी गेल्या तीन वर्षांत सर्व मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे डाॅ सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

शनिवार, २ मार्च, २०१९

नगरमध्ये विखे पाटील बाजी मारणार?


गेल्या काही महिन्यापासून नगर दक्षिणच्या लोकसभा जागेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील तिढा सुटला आहे. ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला म्हणजेच युवा नेते डाॅ सुजय विखे पाटील यांना सोडल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यामुळे विखे पाटीलांनी विजयाची पहीली पायरी सर केली आहे. गेल्या काही काळापासून विखे पाटील हे वेगवेगळ्या मार्गाने राष्ट्रवादीवर दबाव बनवत होते. कधी पक्षांतर करून भाजपमध्ये जाऊ अन्यथा गरज पडल्यास अपक्ष लढण्याची तयारी असल्याचे सूतोवाच विखे पाटलांनी दिले होते. शेवटी मोठ्या दबावाला राष्ट्रवादी काँग्रेसला झुकावे लागले आणि नगर दक्षिणची जागा पदरात पाडून घेण्यात विखे पाटील यांना यश आले.

डाॅ सुजय विखे पाटील यांनी गेल्या जवळपास दोन वर्षांपासून नगर दक्षिणमध्ये खूप जनसंपर्क वाढवला आहे. ठिकठिकाणी आयोग्य शिबिर आयोजित करून जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांपर्यत पोहचण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षापासून ते रोज मतदारसंघात नियमाने प्रचार करत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी नगर दक्षिणची जागा दोनदा लढवली आहे. १९९८ साली बाळासाहेब विखे पाटील यांनी नगर दक्षिणच्या जागेवर शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांचा वाजपेयी मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून देखील वर्णी लागली होती. अहमदनगर जिल्हा परिषद सध्या विखे यांच्याच ताब्यात आहे. सौ शालिनीताई विखे पाटील या वर्तमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यांनी दुसऱ्यांना हे पद मिळवले आहे.

विखे पाटील यांची यंत्रणा खूप मोठी आहे. विविध शिक्षण संस्था, साखर कारखान्याचे सभासद, यामुळे नगर दक्षिणेत मोठा कर्मचारी व कार्यकर्त्यांचा ताफा त्यांच्या दिमतीला आहे. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांना मानणारे मतदार संघात अजूनही खूप लोक आहेत. त्यामुळे डाॅ सुजय विखे पाटील यांना त्याचा मोठा फायदाच होणार आहे.

२०१४ च्या मोदी लाटेनंतर मतदार संघात लोकांच्या विचारात खूप मोठे बदल झाले आहेत. वर्तमान खासदार दिलीप गांधी हे तीनवेळा नगर दक्षिणेत निवडून आलेले आहेत. गेल्यावेळीची निवडणूक त्यांनी मोदी लाटेवर मोठ्या फरकाने जिंकली होती. पण आता २०१९ ची निवडणूक खासदार गांधीसाठी सोपी राहिलेली नाही कारण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे. हा मतदार संघ दुष्काळी असून शेतकऱ्याच्या विविध समस्यांनी हा मतदारसंघ घेरलेला आहे. यंदातर दक्षिणेतील तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गात खूप नाराजी आहे. कर्जमाफीत शेतकरी वर्गाला झालेला त्रास सर्वत्रूत आहे. तसेच कांद्याला गेल्या वर्षभरात भाव नसल्याने येथील शेतकऱ्यांचे अक्षरशः वाटोळे झाले आहे. दक्षिणेतील शेतकरीवर्ग सध्या खूप असंतोषात आहे. याचा फायदा नक्कीच विखे पाटील घेतील अशी शक्यता आहे.

गेल्या अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेनेच्या हातून सत्तेचा घास भाजपने हिसकावून घेतला. त्यामुळे यंदा सेना भाजप युती होऊनही नगर शहरातील आणि एकूणच मतदार संघातील शिवसैनिक भाजपला किती मदत करतील हे सांगणे कठीण आहे. शिवसैनिकांना महानगरपालिकेतील वचपा काढण्याची आयती संधी चालून आली आहे. याचा फायदा विखे पाटील नक्कीच उचलतील यात शंका नाही.

डाॅ सुजय विखे पाटील हे तरुण असल्याने दक्षिणेतील तरुण वर्गात त्यांच्या विषयी आदर आणि खूप कुतुहल आहे. ठिकठिकाणच्या सभेत तरुणवर्ग मोठी गर्दी करत आहे. गेल्या दोन वर्षापासून डाॅ सुजय विखे पाटील करत असलेल्या प्रचाराचे रूपांतर नक्कीच मतदानात होईल अशी आशा आहे. तेंव्हा विखे पाटलांनी यंदाची नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची केली आहे. त्यात वर्तमान खासदार दिलीप गांधी यांची वाढलेली मुजोरी आणि गुंडगिरी ही नक्कीच वर्तमान खासदारांना त्रासदायक ठरणार आहे यात शंकाच नाही. तेंव्हा डाॅ सुजय विखे पाटील यांच्यारुपाने नगरला नक्कीच तरुण खासदार मिळणार असे भाकीत वर्तवण्यात येत आहे.

~ @gbp125 ( गणेश भाऊसाहेब पोटफोडे )