मला आवडलेले ग्रंथ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मला आवडलेले ग्रंथ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

प्रेरणादायी "डाॅक्टर ते आयर्न मॅन"



जर मानवी शरीराच्या सहनशक्तीची परिक्षा घ्यायची ठरल्यास ती फक्त 'आयर्न मॅन' या सारख्या खडतर स्पर्धेतूनच घेता येऊ शकते. चपराक प्रकाशन कडून प्रकाशित केलेले 'डाॅक्टर ते आयर्न मॅन' हे प्रेरणादायी पुस्तक आज वाचून पुर्ण केले. हे पुस्तक वाचल्यानंतर तर माझा वरील विधानावर ठाम विश्वास बसला आहे. 

वडनेर भैरव या नाशिक जिल्ह्यातील एका खेडेगावात जन्मलेल्या आणि पेशाने बालरोगतज्ज्ञ असलेल्या डाॅ. अरुण गचाले यांच्या डबल आयर्न मॅन होण्याचा चित्तथरारक प्रवास लेखिका सुरेखा बोऱ्हाडे यांनी अगदी सहज सोप्या भाषे या पुस्तकातून शब्दबद्ध केला आहे. 

आयर्न मॅन म्हणजे ४ कि.मी. स्विमिंग, १८० कि.मी. सायकलिंग आणि ४२.२ कि.मी. रनिंग असे तीन क्रिडा प्रकार हे सलग न थकता पुर्ण करायचे असतात. आणि हे सगळे क्रिडा प्रकार दिलेल्या १७ तासांच्या वेळत पुर्ण करायचे असतात. 

हि स्पर्धा पुर्ण करण्यासाठी करावे लागणारे खडतर प्रशिक्षण आणि आव्हाने यावर डाॅ. अरुण गचाले यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेले आहे. 

आयर्न मॅन, सायकलिंग, Triathlon, मॅरेथॉन यासारख्या स्पर्धा पुर्ण करु इच्छिणाऱ्यांना हे पुस्तक नक्कीच मोलाचे मार्गदर्शक ठरेल. 

पुस्तकाचे नाव : डाॅक्टर ते आयर्न मॅन
लेखिका : सुरेखा बोऱ्हाडे
प्रकाशन : चपराक प्रकाशन, पुणे
प्रकाशक : घनश्याम पाटील
किमंत : २४०₹

बुधवार, १२ जुलै, २०१७

कथासंग्रह : आभाळ (शंकर पाटील)


कथासंग्रह : आभाळ
लेखक : शंकर पाटील
प्रकाशन : मेहता पब्लिकेशन हाऊस
किंमत : १०० रू

शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक अढळ स्थान मिळवून आहे. त्यांच्या ग्रामीण कथा म्हणजे मराठी साहित्याला मिळालेले लेणे आहे. ग्रामीण जीवनाच्या संघर्षाचे पारदर्शी चित्रण तसेच त्यांचे चटपटीत संवाद आपल्याला त्यांच्या कथांतून अनूभवायला मिळतात. नैसर्गिकपणे आलेला कोल्हापुरी भाषेचा बाज हा त्यांच्या कथेला ताजेपणा आणतो. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन यांचा ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम ते फार चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात. खेड्यातील माणसं, त्यांच्यातील परस्पर संबंध आणि खेड्याचं मन हे त्यांच्या कथांचे विषय.

कथा, कादंबरी, वगनाट्य, स्फुटलेखन, चित्रपट कथा सारख्या साहित्यिक प्रकारात त्यांचे योगदान मोठे आहे. ऊन, खुशखरेदी, खुळ्याची चावडी, खेळखंडोबा, जुगलबंदी, टारफुला, धिंड, पाऊलवाटा यासारखे अनेक कथासंग्रहाने त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. 

समाज हा नेहमीच परिवर्तनशील राहीला आहे. समाजातील घटकांचा त्यांच्या आजूबाजूच्या निसर्गाचा, मानसांचा आणि आपल्या वयाचा परिणाम झालेला आपल्याला नेहमी दिसतो. नैसर्गिक कारणांमुळे ग्रामीण भागात होणारे परिवर्तन आपल्यातील अनेकांनी अनुभवले आहे. अशाच ग्रामीण जीवनावर भाष्य करणारा "आभाळ" हा कथासंग्रह आहे. यात लेखकाने ग्रामीण जीवनातील विविध विषय टिपलेले आहेत. या कथासंग्रहात एकून १३ कथा आहेत. या कथांच्या माध्यमातून लेखक समकालीन परिस्थितीचे चित्र हुबेहुब आपल्या डोळ्यासमोर साकारण्यात यशस्वी होतात.

म्हातारपणात आपल्या आगोदर सोडून गेलेली बायको, स्वतःच्या संसारात व्यस्त झालेला मुलगा आणि रामजी काकांना आलेले मानसिक एकटेपण, मुलाचे बापाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे रागावून रानातल्या खोपीत आलेले रामजी काका. भर पावसात खोपीच्या तोंडाशी अंधारात बसून आपल्या भूतकाळातील आठवणीत हरवून गेलेले आणि खोपीबाहेर डोळे किलकिले करून अनंतात पहात बसलेले असतात. भाकरीचं गटळं घेऊन आलेला चंद्रप्पा आणि रामजी काका यांच्यातील संवाद मनाची घालमेल करतात. आपल्या हृदयाला स्पर्श करणारी "निचरा" ही पहिली कथा आहे. या कथेतून आईबापानी बालपणात आणि आपल्या सुखासाठी, आपल्याला वाढवण्यात घेतलेले कष्ट मुलं लग्न झाल्यावर कसे विसरतात; या सामाजिक समस्येवर या कथेतून भाष्य केले आहे.

कधीकाळी आपल्या पळवून नेलेल्या बायकोला परत घेऊन जाण्यासाठी गाढवावर बसून व एका प्रतिष्ठित पाटलाकडे फिर्याद घेऊन आलेला बेलदार. हातावर असलेले पोट. आपण चार आणे कमवले तर बायको किमान तीन आणे तरी कमवील हा त्याच्या जगण्याचा हिशोब आपल्याला "हिशोब" या कथेतून पाहण्यास मिळतो. 

रादूबाई ही आपली बायको याच गावात असून तिला आपल्याला परत करावी याची विनंती तो पाटलाला करतो. पाटील तपास घेतात तेंव्हा त्यांना समजते की बेलदाराची बायको गावातील राऊ जांबळ्याकडे आहे. त्याला चावडीत बोलावण्यात येते. नागू पैलवानानं पळवलेली बेलदाराची बायको आपण दोनशे रूपयात घेतली. जर बेलदाराला ती परत पाहीजे असेल तर त्याने ती दोनशे रूपये देऊन घेऊन जावी. बेलदाराची गरीब परिस्थिती कळल्यावर राऊ जांबळ्यात शंभर रूपयावर ती देण्यास तयार होतो. पण रादूबाईला दोन मुलं आहेत हे कळल्यावर बेलदाराच्या जगण्याचा हिशोबच चुकतो. ही मुलं जर बायकोबरोबर आली तर ती आपल्याला परवडणारी नाहीत. म्हणून तो बायको न घेताच परत जातो.

म्हातारपणीही बाई माणसाचं संसारात किती मन गुंतलेले असते याचे सुरेख वर्णन आपल्याला "कावळा" आणि "वावटळ" या दोन कथांमधून अनुभवायला मिळते. म्हातारपणी उसणवारी, व्याजावर दिलेले पैसे तसेच राहतात. मेल्यावर मात्र त्या पैशांसाठी आत्मा घटमळत असतो.

म्हातारपणी वावराशिवारातही बाई माणसांचा जीव अडकलेला असतो. भर पावसात, वा-या वादळात आंब्याच्या कै-या गोळा करण्यासाठी आर्ध्या रस्त्यातून परत फिरणारी व त्या पडलेल्या कै-या कुणी चोरून नेवू नये म्हणून रात्री भर पावसात त्याला राखन बसणारी म्हतारी. या दोन्ही कथा फारच सुंदर असून ग्रामीण स्त्री मनाचा त्या वेध घेतात.


"सोबत" कथेत तालुक्याच्या ठिकाणीहून गावाकडे निघालेला गोपाळ. एका तरूण व देखण्या आणि आड वाटेने एकट्याच निघालेल्या बाईवर भुलतो. या नादात स्वतःची वाट सोडून त्या बाईबरोबर निघतो. इचलकरंजीहून बदलून आलेली शिक्षिका उद्या शनिवारची सकाळच्या शाळेत वेळेवर पोहण्यासाठी आधल्या दिवशीच त्या गावी निघालेली असते. पण गाडीच्या बिघाडीमुळे तिला उशीर झालेला असतो. गोपाळ त्या तरूण बाईला तिच्या ठिकाणापर्यंत सोबत करतो. पण शेवटी त्याला निराशाच मिळते.

ग्रामीण जीवनात आपल्याला पदोपदी उपेक्षित जीवन कंठत असलेले म्हातारे आईबाप नेहमीच दिसतात. भीमा व शिवा या दोन भावांच्या वाटणीत भलडलेले गेलेले म्हतारे आईबाप आणि त्यांचे शेवटी होणारे हाल हे "वाटणी" या कथेतून लेखक मांडतात.

"आभाळ" ही शिर्षक कथा शेतक-यावर निसर्गामुळे येणा-या मानसिक दडपणाचे वर्णन करते. कधी पाऊस वेळेवर येत नाही, आला तर पिक जेंव्हा काढणीला आलेले असते नेमका त्याचवेळी पाऊस येतो. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला जातो आणि या परिस्थितीत जेंव्हा शेतकरी सापडतो तेव्हा तो फार मानसिक दडपणाखाली असतो. अशाच एका प्रसंगाचे वर्णन आपल्याला या कथेतून प्रतिबिंबित झालेले दिसते.

आकाश ढगांनी भरून येते, शेतात कापून वाळत घातलेल्या तंबाखूच्या चापाचे काय होणार याची चिंता हरीबाला सतावत असते. तर पाऊस आला तर सगळ्यांचेच नुकसान होईल या विचारात त्याची बायको बिनघोर झोपलेली असते. आपले कष्ट काया जातात की काय याची चिंता मात्र हरीबाला असते. तो मनाचे समाधान होण्यासाठी गावभर फेरी मारतो व पावसाचा अंदाज घेतो.

"कोंडी", "अर्धली", "जीत" आणि "वंगण" या कथादेखील ग्रामीण जीवनाचे व ग्रामीण कौटुंबिक समस्यांचे यथार्थ वर्णन करतात. तर शेवटच्या दोन कथा "पानगळ" आणि "वाटचाल" या कौटुंबिक वातावरणात उद्भवणा-या समस्यांमुळे माणसाच्या मनावर होणार आघात आणि त्यामुळे होणारे मानसिक विकार अत्यंत चपखलपणे मांडतात.

_ गणेश भाऊसाहेब पोटफोडे

बुधवार, १४ जून, २०१७

सम्राट अशोक चरित्र (लेखक: वासुदेव गोविंद आपटे)


सम्राट अशोक चरित्र
लेखक: वासुदेव गोविंद आपटे
विस्तार : प्र. रा. अहिरराव
सुधारीत आवृत्ती : डिसेंबर २००२
प्रकाशक : वरदा बुक्स
किंमत : २५० रु

भारताच्या राजमुद्रेवर, नाण्यांवर किंवा चलणी नोटांवर आपण अशोकस्तंभ रोज पाहतो. भारताच्या राष्ट्रध्वजावरही अशोक चक्र उमटलेले आपण पाहतो. पण ही जी प्रतिकं ज्या राजाची आहेत तो सम्राट अशोक राजा नक्की कोण होता?

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी या भारतभूमीवर आपले अधिपत्य निर्माण करणारा इतिहासात अतिउच्च स्थान असलेला असा "सम्राट अशोक" नावाचा राजा होऊन गेला. त्याने न केवळ सर्व भारतखंडावर राज्य केले, तर येथील जनतेला धर्मज्ञान, सदाचार व भूतदया यांची शिवकण दिली. प्रजेने त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा धरून तसा प्रयत्न आयुष्यभर केला. अशा या महान सम्राट अशोकाची माहिती आपल्याला वासुदेव गोविंद आपटे लिखीत "सम्राट अशोक चरित्र" हा ग्रंथातून सविस्तरपणे मिळते. लेखकाने पुराणे किंवा दंतकथा यावर विसंबून न राहता आत्तापर्यंत मिळालेल्या अशोकाच्या शिलालेखांचा योग्यप्रकारे अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीने हे चरित्र लिहिले आहे.

पार्श्वभूमी :

वासुदेव गोविंद आपटे यांनी इ स १८९८ मध्ये सम्राट अशोक याच्या चरित्राची रूपरेखा लिहून 'ग्रंथमाला' मासिकाद्वारे प्रकाशित केली होती. त्याकाळी सम्राट अशोकाच्या चरित्राबाबत फार कमी साधने उपलब्ध होती. इंग्रजी भाषेतही तेंव्हा अशोकाचे एकही चरित्र लिहीले गेले नव्हते. आपटे यांनी सुरूवातीला लिहीलेल्या या चरित्रात अशोकाच्या काही दंतकथा, अशोकाच्या काही लेखांचा सारांश, व त्यावरून अशोकाचा स्वभाव, वर्तन, राज्यव्यवस्था, धर्मपरायणता, तत्कालीन समाजस्थिती इत्यादी गोष्टींच्या संबंधाने काढलेली अनुमाने याचाच समावेश होता. परंतु अशा तर्हेचा मराठीत केलेला सामान्य प्रयत्न सुद्धा अपूर्व वाटावा असा तो काळ होता. त्यावेळच्या ग्रेटप्रायमर टाइपाचें ८८ पृष्ठांचा हा चरित्र ग्रंथ तयार झाला. तत्कालीन अनेक प्रख्यात मराठी वृत्तपत्रांतून व मासिकांतून या चरित्र ग्रंथाविषयी प्रशंसापर लेख प्रसिद्ध झाले होते. या ग्रंथाचा तेंव्हा हिंदी, उर्दू आणि गुजराती भाषांत अनुवादही करण्यात आला होता.

कालांतराने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अशोकासंबंधाचे कितीतरी नवीन शोध लागले. अशोकाच्या स्तंभ व गिरीलेखांची पाश्चात्य व भारतीय पंडितांनी केलेली चिकित्सा ग्रंथाच्या रूपाने वाचकांना उपलब्ध झाली. विन्सेंट स्मित या जगप्रसिध्द इतिहासकाराचे इंग्रजी भाषेत अशोकाचे चरित्र लिहील्याने अनेकांना याचा फायदा झाला. वासुदेव गोविंद आपटे यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहीलेल्या मराठीतील पहिल्या सम्राट अशोक चरित्राला श्री प्र. रा. अहिरराव यांनी आधुनिक संशोधनाच्या माध्यमातून परिपूर्ण विकसित केले. त्याची सुधारीत आवृत्ती डिसेंबर २००२ ला वरदा बुक्सच्या माध्यमातून प्रसारित केली.

अशोक पुर्वीचा काळ :
अशोककालीन काही स्थळांचा उल्लेख वायुपुराण, विष्णूपुराण आणि भिष्मपुराण यामध्ये आढळतो. पुराणकारांनी अशोकाच्या मौर्य घराण्याची वंशावळ दिली आहे पण त्यात एकवाक्यता नाही. मौर्य घराण्याचा उदय होण्यापूर्वी मगधावर अनेक घराण्यांनी राज्य केले. मौर्यांची मगधवर सत्ता स्थापन होण्याच्या आधी महापद्मनंद हा नंद वंशाचा राजा राज्य करत होता. याच्याच कारकिर्दीत इतिहास प्रसिध्द जगज्जेता अलेक्झांडर ऊर्फ सिंकदर याची भारतावर स्वारी आली होती. पण अलेक्झांडर पंजाबची हद्द ओलांडून खाली न आल्याने त्याचा व महापद्मनंद याचा मुकाबला झालाच नाही. महापद्मनंद हा मोठा शूर व पराक्रमी, पण तितकाच लोभी व निर्दय राजा होता. नंदवंशाचा उच्छेद चंद्रगुप्त मौर्य याने ब्राह्मण मुत्सद्दी कौटिल्य अथवा चाणक्य याच्या साह्याने करून मगधावर इ.स. पुर्व ३३२ साली आपली सत्ता स्थापण केली. पुराण कथेप्रमाने चंद्रगुप्त हा मुरा नावाच्या दासीचा पुत्र होता म्हणून त्याच्या वंशास मौर्य हे नाव पडले. मौर्य सत्तेचा संस्थापक चंद्रगुप्त हा अशोकाचा अजोबा होता.

चंद्रगुप्त मौर्य चा काळ :
ग्रीक राजा अलेक्झांडर याच्या मृत्यूनंतर त्याच्या सम्राज्याचे विभाजन होऊन मध्य अशिया, अफगाणिस्तान येथे ग्रीकांची सत्ता कायम राहीली. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचा सेनापती सेल्सूकस निकेटर हा मध्य अशियातील बॅक्ट्रियाचा सम्राट बनला. त्याने आपला राज्यविस्तार करण्यासाठी भारतावर आक्रमण केले. त्याचा चंद्रगुप्त मौर्य ने दारून पराभव केला. त्याला चंद्रगुप्तशी तह करावा लागला. या तहानुसार त्याला पाचशे हत्ती, काबूल, हिराम व कंदाहर हे तीन प्रांत आणि आपली कन्या चंद्रगुप्तला द्यावे असे ठरले. या तहानंतर सेल्युकस ने मेगॅस्थनीजला पाटलीपुत्र येथे वकील म्हणून पाठवले. मेगॅस्थनीजने आपल्या सहा वर्षांच्या काळात भारताची भौगोलिक, सामाजिक व धार्मिक स्थिती यावर बरीच माहिती आपल्या "इंडिका" या ग्रंथात लिहून ठेवल्याने त्याचा उपयोग इतिहासकारांना झाला आहे.
  चंद्रगुप्तने आपल्या २४ वर्षांच्या शासन काळात मगध राज्याला फार वैभवशाली बनवले. अनेक परदेशी राज्यांपर्यंत मगधाच्या ऐश्वर्याची चर्चा होत असे. विविध देशातील राजांनी आपले वकिल मधग राज्यात ठेवले होते. मगधची राजधानी पाटलिपुत्र ही एक संपन्न आणि वैभवशाली अशी नगरी होती. हिची लांबी ५ कोस व रूंदी सुमारे २ कोस होती. तिच्या भोवती मजबूत तट व तटाभोवती खंदक होते. तटाची भिंत ४०० हात रूंद व ३०० हात उंच होती. तटात ५७० बुरूंज व ६४ दरवाजे होते. पाटलिपुत्र शहराची लोकसंख्या ४ लाख होती. राज्याच्या रक्षणासाठी ६० हजार पायदळ, ३० हजार घोडेस्वार व ८ हजार हत्ती होते. याशिवाय युद्धाच्या कामी उपयुक्त अशी ६ लाख खडी फौज होती.

चंद्रगुप्ताने मोठ्या हुशारीने सर्वांवर दबदबा ठेऊन राज्य केले. जैन ग्रंथातील उल्लेखानुसार चंद्रगुप्तने शेवटी जैन धर्माचा स्वीकार केला. आपला पुत्र बिंदुसार याच्याकडे सत्ता सोपवून तो जैन साधु होऊन दक्षीणेकडे निघून गेला.

सम्राट बिंदुसारचा कालखंड :
सम्राट बिंदुसारचे इतिहासात फारसे उल्लेख सापडत नाहीत. ग्रीक इतिहास ग्रंथात बिंदुसारचा उल्लेख अमित्रघात असा आढळतो. परंतु हिंदुचे विष्णूपुराण, बोद्धांचा महावंश ग्रंथ आणि जैनांचा परिशिष्टपर्व ग्रंथ यातून चंद्रगुप्तच्या मुलाचे नाव बिंदुसार हेच आढळते.

बिंदुसारने चंद्रगुप्तच्या वेळेचे राज्यकारभाराचे धोरण चालू ठेऊन देशात शांतता राहील असे प्रयत्न केले. चंद्रगुप्ताने जो ग्रीक राजांशी स्नेहसंबंध जोडला तो बिंदुसारनेही चालू ठेवला.  बिंदुसारच्या पदरी खल्लटक आणि राधागुप्त नावाचे दोन हुशार मंत्री होते. २५ वर्षे राज्य केल्यानंतर इ.स. पुर्व २७३ साली त्याचा मृत्यु झाला.

अशोकाचे राज्यारोहन :
बौद्ध धर्म ग्रंथातून अशोकाच्या संबंधी अनेक दंतकथा रूढ आहेत. त्यानुसार तो स्वभावाने अत्यंत क्रूर व दुष्ट होता. राज्य मिळवण्यासाठी त्याने आपल्या ९९ भावंडांना ठार मारले व क्षुल्लक कारणांवरून आपल्या राण्यांचा शिरच्छेद केला असा उल्लेख आढळतो. परंतु विन्सेंट स्मित व इतर मान्यवर इतिहासकारांनी हे विधान चुकीचे ठरवले आहे. अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याचे जे साधुत्वाचे वर्तन त्याच्या चरित्रातून दिसून येते ते बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे घडलेले परिवर्तन होय आणि असे परिवर्तन घडवून आणण्याची अलौकिक शक्ती त्या धर्माच्या ठायी आहे हे लोकांच्या डोळ्यात भरावे म्हणून अशोकाच्या पुर्वायुष्यावर बौद्ध ग्रंथकारांनी काजळ फासले असावे.

अशोकने संम्राट होण्यापूर्वी तक्षशिला व उज्जेन येथे राजप्रतिनिधी म्हणून खूप चांगले काम केले होते. तेथिल बंड त्याने कुठलाच रक्तपात न करता मोडून काढले होते. त्या मानाने त्याचा मोठा भाऊ सुशीम हा फार क्रुर व दुष्ट होता. या दोघांत सम्राट बिंदुसारच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी युद्ध झाले असणार आणि त्यात सुशीमचा मृत्यू होऊन अशोक मगधचा सम्राट झाला ही शक्यता अनेक इतिहासकारांनी मान्य केली आहे.

कलिंग विजय :
कलिंग विजय ही प्राचीन भारताच्या इतिहासातली फार मोठी घटना आहे. या युद्धामुळे प्राचीन भारतीय इतिहासात फार दूरगामी परीणाम झाल्याचे दिसतात. कलिंग राज्य भारताच्या पूर्वेला ओरीसा राज्याच्या जवळपास होते. या युद्धामुळे अशोकाच्या चरित्राचा प्रवाह बदलून तो एक विस्तारवादी राजा ते धर्मिक व मानवतावादी राजा बनला. कलिंग सारखे प्रचंड राज्य काबीज केले म्हणजे आपल्या पुर्वजांनी आरंभिलेला भारतदिग्विजय पुर्ण होईल या लालसेने त्याने या देशावर आक्रमण केले असावे. कलिंग युद्ध अशोकाच्या राज्यारोहणापासून १३ व्या वर्षी म्हणजे इ. स. पुर्व २६१ ला घडले.

अशोकाने स्वतःच या प्रसंगाचा उल्लेख आपल्या १३ व्या गिरीलेखात विस्ताराने केला आहे. त्यात म्हटले आहे की देवांचा प्रिय राजा याने राज्याभिषेकाला आठ वर्षे होऊन गेल्यावर कलिंग देश जिंकला. तेंव्हा दीड लक्ष लोक कैद करण्यात आले, एक लक्ष लोकांना मारण्यात आले, आणि या संख्येच्या अनेक पट लोक युद्धामुळे धान्यचंटाई, महामारी किंवा साथीच्या रोगांनी बळी पडले. इतकी प्राणहानी आपली विजयप्राप्तीची आकांक्षा व साम्राज्यविस्ताराची हाव यांच्यामुळे घडून आली. हे पाहुन अशोकाच्या मनाला घोर पश्चात्ताप झाला आणि तेंव्हापासून त्याने निश्चय केला की हिंसाचाराचा मार्ग यानंतर कधीच अवलंबायचा नाही.

बौद्ध धर्माचा स्वीकार :
कलिंगविजयाच्या वेळी झालेल्या भयंकर प्राणहानीमुळे झालेल्या पापापासून प्रायश्चित्त घेण्यासाठी व अंतःकरणाला शांती देण्यासाठी भूतदयाप्रधान बौद्ध धर्म योग्य असल्याने तो अशोकाने स्वीकारला असावा. अशोकाच्या वेळी बौद्धधर्म त्याच्या शुद्ध स्वरूपात होता. आणि निरनिराळ्या धर्मप्रचारकांकडून तो उपदेशिला जात होता. मगध राज्यात असा कुठलाच प्रदेश नव्हता तिथे बौद्धभिक्षूंचा व धर्मप्रचारकांचा प्रवेश झाला नव्हता. बौद्धधर्म स्विकारल्यानंतर अशोकाने अनेक ठिकाणी तर्थयात्रा केली.
अशोकाचे शिलालेख :

सम्राट अशोकाच्या संबंधीत जी विश्वसनीय इतिहास सामग्री उपलब्ध झाली आहे ती मुख्यत्वे त्याचे विशाल गिरीलेख, लघु गिरीलेख, विशाल स्तंभलेख, लघु स्तंभलेख आणि गुंफा लेख  अशा पाच प्रकारच्या शिलालेखतून मिळते.

शिलालेखांची भाषा आणि लिपी :
सम्राट अशोकाने सगळे लेख रस्त्याने जाणा-या येणा-या लोकांना कळावेत म्हणून मुद्दामहून महत्वाच्या मार्गांवर कोरले आहे. सर्व लेखांची भाषा सुटसुटीत व सोपी असून ते प्रादेशिक लिपीत लिहीले गेले आहेत. अशोकाचे लेख हे सामान्यपणे प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत कोरलेले आढळतात परंतु भारताच्या वायव्य भागात आढळलेले लेख आरमाइक भाषेत व खरोष्ठी लिपीत आढळतात. अफगाणिस्तानात ते आरमाइक व ग्रीक भाषांमध्ये कोरलेले आहेत. ब्राह्मी लिपी ही देवनागरी लिपीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहीली जाते. तर खरोष्ठी लिपी पारशी-अरबी लिपीप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते.

या लेखांवरून असा अंदाज लावता येतो की त्या काळी प्राकृत भाषा ही भारतात मोठ्या प्रमाणावर बोलली जात होती व भारत खंडातील सर्व भाषा या ब्राह्मी लिपीतून लिहीण्याचा प्रघात होता. 

अशोकाचे चौदा गिरीलेख ऊर्फ आदेश :

अशोकाच्या सर्व लेखात त्याच्या चौदा गिरीलेख किंवा आदेशांचे विशेष महत्त्व आहे. हे चौदा आदेश आठ वेगवेगळ्या ठिकाणी विखूरलेले आहेत. त्यात धौली, शाहबाजगढी, मानसेहरा, कालसी, जौगढ, सोपरा, एरागुडी आणि गिरनार या ठिकाणांचा समावेश होतो. प्रत्येक लेखात काही ना काही महत्वाचा विषय आला आहे व त्यावरून अशोकाचा स्वभाव, त्याची धर्ममते, राज्यव्यवस्था, तत्कालीन समाजस्थिती इत्यादी गोष्टींवर महत्वाचा प्रकाश पडला आहे.

अशोकाच्या सर्व शिलालेखांचे मराठीत भाषांतर लेखकाने या ग्रंथात दिल्याने हा ग्रंथ इतिहास अभ्यासकांसाठी फार मोल्यवान ठरला आहे.

अशोकाचे चौदा आदेश व त्यांचे विषय

आदेश १ : प्राण्यांच्या बळी देण्याच्या प्रथेला विरोध
आदेश २ : मनुष्य व प्राणी यांच्या चिकीत्सालयाची निर्मिती
आदेश ३ : राज्यातील सर्व वरिष्ठ राजुक अधिका-यांना प्रत्येक पाच पाच वर्षांनी धर्म प्रचारासाठी दौरे काढण्याचा आदेश.
आदेश ४ : लोकांत धर्माचरण वाढल्याचे समाधान व ते आणखी वाढण्यासाठी राजाची वचनबद्धता व्यक्त
आदेश ५ : राज्यात धर्ममहामात्रांची नियुक्ती. या पाचव्या आदेशात राष्ट्रीक व प्रतिष्ठानिक असे शब्द आले असून ते अनुक्रमे महाराष्ट्र व प्रतिष्ठान किंवा पैठण यांचा उल्लेख आहे.
आदेश ६ : राजा म्हणून प्रजेची कामे सर्व ठिकाणी करत राहीन. या आदेशात अशोकाची प्रजेच्या हिताची तळमळ व स्वतःच्या सुखाचा त्याग करण्याची तयारी यागोष्टी दर्शविल्या आहेत.
आदेश ७ : सर्व संप्रदायांनी एकत्र राहावे
आदेश ८ : तिर्थ यात्रेचे वर्णन
आदेश ९ : धर्मकृत्ये आणि मंगलकृत्ये याचे वर्णन
आदेश १० : राजा व उच्च अधिकारी नेहमी प्रजेच्या हितासाठी दक्ष राहतील
आदेश ११: धम्म आणि धर्म याची व्याख्या
आदेश १२ : स्रीधर्ममहामात्रांची नियुक्ती. सर्व संप्रदायांनी परस्परांशी मित्रत्वाने वागावे
आदेश १३ : कलिंग युद्धाचे व झालेल्या हाणीचे वर्णन. अशोकाचे मन परिवर्तन घडवून आल्याचे या आदेशावरून स्पष्ट होते.
आदेश १४ : धार्मिक जीवन जगण्याची प्रेरणा. हा शेवटचा आदेश उपसंहाराच्या स्वरूपाचा आहे.

अशोकाचे स्तंभलेख :
अशोकाचे स्तंभलेख दिल्ली - तोपरा, मीरत, अलाहाबाद, सारनाथ, सांंची, कंधार अफगाणिस्तान, अमरावती या ठिकाणी मिळून एकंदर सात आहेत. हे लेख नुसत्या अधिका-यांनाच उद्देशून लिहिलेले नसून एकंदरीत प्रजेला उद्देशून आहेत, व त्यात राज्यशासनाची तत्वे, धर्माचरण, आत्मपरीक्षण, हितसंबंधाचे नियम, धर्मानुराग, धर्मप्रचार्थ योजना इत्यादी भिन्न भिन्न विषय आलेले आहेत.

शिलालेखांचे ऐतिहासिक महत्त्व :
अशोकाचे शिलालेख हे अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची अशी साधने आहेत. ज्या ज्या ठिकाणी हे आलेख सापडले त्यावरुन मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे शक्य होते. अशोकाच्या कारकिर्दीत झालेल्या कलिंगच्या युद्धाची माहिती त्याच्याच कलिंग आलेखातून मिळते. अशोकाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम निश्चित करण्यासाठी या आलेखांची मदत झाली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचा पुरावा यामधून मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी, अशोक कर्मठ नव्हता तसेच आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा अशोकाने कधीच प्रयत्न केला नसल्याचेही या आलेखांतून स्पष्ट होते. परदेशात बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी अशोकाने बौद्ध भिक्षूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखांतून मिळतो.

अशोक कालीन राज्यव्यवस्था व समाजस्थिती :
मगध हे भव्य राज्य होते. त्यावेळच्या मगध राज्यात आत्ताचा बहुतांश भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या यांचा समावेश होता. २५०० वर्षापूर्वी एवढ्या मोठ्या साम्राजाची व्यवस्था ठेवणे किती कठीण काम असेल याची कल्पनाच न केलेली बरी. मगध राज्याचे पाच वेगवेगळ्या प्रांतात विभाजन करण्यात आले होते. हे प्रांत म्हणजे मगध, तक्षशिला, सुवर्णगिरी, उज्जेन आणि तोसली. मगध प्रांताचा कारभार राजा स्वतः पाही तर इतर प्रांतावर राजकुमारांची प्रांतपाल किंवा सुभेदार म्हणून नेमणूक करण्यात येई. चंद्रगुप्त मौर्यचा पंतप्रधान चाणक्याने घालून दिलेल्या नियमानुसारच अशोकाची राज्य पद्धती होती. राज्यकारभार पाहण्यासाठी वेगवेगळे विभाग व आधिकारी होते. अशोकाने नवीन आधिका-यांच्या नियुक्त्या केल्याचा उल्लेख त्याच्या लेखात आला आहे. अशोकाच्या कारकिर्दीत कुठे त्याच्या राज्यात उठाव व बंड झाल्याने आढळून येत नाही. यावरून त्याची संपूर्ण मगध राज्यावर मजबूत पकड होती असे दिसते. एकुणच अशोकाच्या काळी समाजात सुबत्ता होती. उत्कृष्ट न्यायदान अधिकारी तत्पर आधिकारीवर्ग यामुळे राज्यकारभारही चांगल्याप्रकारे होत होता.

त्याकाळी मगध राज्य हे शिक्षण व्यवस्थेसाठी फार प्रसिद्ध होते. तक्षशिला आणि नालंदा या विद्यापीठातून उत्कृष्ट शिक्षण दिले जात होते. या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी विदेशातून विद्यार्थी येत होते, असे उल्लेख सापडतात. संस्कृत भाषा, पाली भाषा, तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि धर्मशास्र यासारख्या विविध विषयात शिक्षण दिले जात होते.

या ग्रंथात तिस-या धर्मपरीषदेची ही सविस्तर माहीती देण्यात आली आहे. त्याच बरोबर अशोक कालिक स्थापत्यकला यांचीही माहिती विस्ताराने दिली आहे. सम्राट अशोकासंबंधी प्रचलित असलेल्या विविध धर्म ग्रंथातील दंतकथाही देण्यात आल्या आहेत. अशोकाचा मृत्यू व त्यानंतरच्या कालखंडावर लेखकाने बरीच माहीती दिली आहे.

एकूणच हा ग्रंथ प्राचीन इतिहास अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त व संग्राह्य असा बहुमोल ग्रंथ आहे.

~ © गणेश भाऊसाहेब पोटफोडे

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

तू भ्रमत आहासी वाया (वपु काळे)


प्रेमभंगा नंतर काय? आत्महत्या की आयुष्य निराशेच्या गर्द अंधारात ढकलून द्यायचे? की प्रेमभंग करणाऱ्या प्रियकर/प्रेयसीला गुरू मानून एक नवीन आयुष्य सुरू करायचे.

तैसी हे जाण माया|
तू भ्रमत आहासी वाया|
शस्त्री हाणीतलीया छाया|
जैसी अंगी न रूपे||

या संत ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने प्रेरित होऊन वपुंनी आपल्या आध्यात्मिक चिंतनाला लेखनीची ऐश्वर्यजोड देऊन जगण्याचे तत्वज्ञान सांगणारी ही लघु कादंबरी निर्माण करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

सायरा आपल्या प्रेमभंगा नंतर सावरते. नवीन आयुष्य जगते. जगत असतांना आपल्या सहकारी व बाॅसचेही आयुष्य पार बदलून टाकते. धर्माने मुस्लिम असणाऱ्या पण स्वतःला निधर्मी समजणारी सायरा शिक्षणासाठी आपले घर सोडते. प्रा. मंडलिकांच्या मदतीने आपले शिक्षक पूर्ण करते. या शैक्षणिक जीवनात तिच्या आयुष्यात समीर नावाचा प्रियकर येतो. पैशाच्या मागे धावणारा हा प्रियकर तिला सोडुन जातो आणि येथूनच सायरा बदलून जाते. कायमची. आपल्या बरोबर ती ओंकारनाथलाही बदलून टाकते.

नातरीं येथिचा दिवा|
नेलिया सेजिया गांवा|
तो तेथें तरी पाडवा|
दीपचि की||

या गावात तेवत असलेला दिवा जरी दुसर्‍या गावाकडे नेला तरी तो दिवाच असतो. प्रकाश हा त्याचा धर्म असतो. तसेच सायरासारखी काही उत्तुंग व्यक्तिमत्व असतात. त्या दिव्यासारखी ती सहवासात येणाऱ्या आपल्या अहंकारी बाॅस ओंकारनाथचे आयुष्य उजळून टाकते.
ही वाचकांना अंतर्मुख करणारी कादंबरी आहे त्यामुळे एकदातरी ही नक्की वाचावी.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं (पान १)
२. सांत्वन म्हणजे दुःखाचे मूल. मूल आईपेक्षा मोठे कसे होईल (पान १)
३. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे, तोच खरं प्रेम करू शकतो. (पान ३)
४. प्रचिती आली की ती तुमची तत्वं होतात आणि तुमची तत्वं  इतरांसाठी थेअरी होतात. (पान ४)
५. प्रवाहाला साथ देणारी व्यक्ती फक्त सागराशी एकरूप झाल्यावर तृप्त होते. पण समर्पणाचं धाडस नसलं म्हणजे जात-पात, समाज, आर्थिक परिस्थिती, तारतम्य, विवेक असे किनारे सापडतात. (पान ११)
६. स्वतःच्या विचारांप्रमाणे जगता येण्याचं स्वातंत्र्य म्हणजे क्रांती (पान ४६)
७. वस्तूंचा संग्रह जितका वाढवत न्यावा तितका अहंकार वाढत जातो. (पान ४६)
८. जगातला सर्वोच्च आनंद निर्भयतेत आहे आणि माणसाला निर्भय करण्याचं सामर्थ्य फक्त प्रेमात आहे. (पान ५५)


प्रकाशन : मेहता पब्लिकेशन हाऊस
प्रथमावृत्ती : २५ डिसेंबर १९९२
पाने : ८४
किंमत : ९०

~ गणेश

सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

अपॉइंटमेंट (वि. वा. शिरवाडकर)


वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हे एक अभिजात कवी, कल्पनारम्य नाटककार, कादंबरीकार आणि शैलीदार ललित लेखक म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. तरी एक कथालेखक म्हणून त्यांचा परिचय आपल्याला फारसा नाही. पण शिरवाडकरांची प्रतिभा कथालेखन क्षेत्रातही त्याच तोलामोलाची आहे, हे अपॉइंटमेंट कथासंग्रह वाचल्यावर जानवते.

एकूण तेरा कथा असलेल्या या संग्रहात वेगवेगळे भाव लेखकाने व्यक्त केले असून आपल्या नानाविध लेखन शैलीने या संग्रहाला सजवले आहे. कर्णाच्या जीवनावर थोडक्यात दृष्टिक्षेप टाकणारी 'रथचक्र' ही कथा विशेष असून रस, सीतेचे चित्र, आघात आणि पाहुणे या कथा फार भावस्पर्शी आहेत.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. आगगाडी डोळ्यांसमोरून निघून जाते. नंतर तिचा आवाजमात्र कानांवर येतो, आणि पुढे तोही नाहीसा होऊन आगगाडी कुठं गेली हे दर्शविणार काळे लोखंडी रूळ मात्र दृष्टीला पडतात! (पान ९)
२. परंतु स्टेशनवरचे बिघडलेले नळ, चावी मागेपुढे कितीही फिवरली तरी सारखे वाहत राहतात त्याप्रमाणे त्याचं प्रदीर्घ भाषण आमच्या उद्गारांनी  खंडित होऊ शकले नाही (पान ३०)
३. कर्तव्याकर्तव्याच्या भयानक संघर्षातून अंतःकरणाला जाळणाऱ्या विविध यातनांतून सुटण्याचा हा एकच उपाय आहे. मित्रासाठी लढायचे आणि भावासाठी मरायचे. त्यामुळे भावांचा मार्ग मोकळा होईल आणि मित्रासंबंधीचे आपले कर्तव्यही पार पडल्यासारखे होईल : कर्ण (पान ५०)

बहुत काय लिहीणे.


प्रकाशन : काॅन्टिनेन्टल
प्रथमावृत्ती : जानेवारी १९७८
पाने : १७५
किंमत : १५०

~ गणेश

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

आपुलकी (पु. ल. देशपांडे)



शाळेत असतांना (बहुतेक इयत्ता नववीत) अभ्यासक्रमात संत नामदेवांचा फार सुंदर अभंग होता.

परिसाचेनी संगे लोह होय सुवर्ण|
तैसा भेटे नारायण संतसंगे ||

अर्थात परीसासोबत राहिल्याने लोखंडाचे पण सोने होते. तसेच संतांबरोबर राहिल्याने देवाची प्राप्ती होते. असा या अभंगाचा मतितार्थ आहे. मी या अभंगाचा उल्लेख यासाठी करत आहे कारण असेच अनेक परीस पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यात येऊन गेले आणि त्याच्या आयुष्याचे खरोखरच सोनं झाले. हा ग्रंथ वाचल्यावर पु. ल. देशपांडे किती समृद्ध आयुष्य जगले असतील याची कल्पना येते. पु. ल. देशपांडे यांनी लिहलेला प्रत्येक ग्रंथ आणि त्या ग्रंथाची प्रत्येक ओळ म्हणजे वाचकांसाठी अद्वितीय अनुभव आहे. त्यासाठी कुठल्याच समीक्षेची गरजच नाही. मला त्यांच्या साहित्याची समीक्षा करण्याचा अजिबात अधिकार नाही पण ही माझी समीक्षा नसून असला विलक्षण ग्रंथ हातात पडल्यावर निघालेले आनंदाचे उद्गार आहेत.

पु. ल. देशपांडे यांना आपल्या जीवनात भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आठवणीचा शब्दबद्ध केलेला ठेवा म्हणजेच 'आपुलकी' होय. या ग्रंथात भाईंनी पंधरा व्यक्तिमत्त्वाचा उलगडा केला आहे. यात इतिहास संशोधक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, कवी गिरीश ऊर्फ प्रा. शंकर केशव कानिटकर, श्री. रा. टिकेकर, माधव आचवल, शरद तळवलकर, आवाबेन देशपांडे, वसंतराव देशपांडे, अनंत काणेकर, शिक्षण तज्ञ जे. पी. नाईक, शंकर घाणेकर, कवी सदाशिव अनंत शुक्ल, माधवराव वालावलकर, मटा संपादक गोविंदराव तळवलकर, नाटक प्रेमी मदनमोहन लोहिया आदींचा समावेश यात आहे.

प्रत्येक व्यक्ती बरोबर आपली ओळख कशी झाली यापासून ते थेट त्या व्यक्तीचा त्या त्या क्षेत्रातील कार्याचा आवाका, सहवासातील गमती जमती ह्या पुलंनी आपल्या अद्वितीय शब्दात वर्णन केल्या आहेत. आयुष्यात एकदातरी नक्की वाचावे असला हा ग्रंथ आहे. यातील बहुतेक व्यक्ती आता कोणाच्याही स्मरणात नसतील. हेच त्या व्यक्तींचे मोठेपण आहे. कारण यातील एकही जण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काम करत नव्हता. ध्येय वेडाने झपाटलेली ही माणसे शेवटपर्यंत साहित्य, कला, संगीत, नाटक, शिक्षण, समाजकार्य असल्या क्षेत्राच्या उन्नतीसाठी झगडत राहिली. काळाच्या ओघात आपणही त्याचे कार्य विसरत चाललो आहेत ही नक्कीच शोकांतिका आहे.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. प्रतिभासंपन्न कलावंताला सर्वसामान्यांपेक्षा अधिक दिसत असते, अधिक ऐकू येत असते, किंबहुना त्याच्या साऱ्या इंद्रियांना सारेच काही अधिक जाणवत असते. (पान ४३)

२. आणि पायांनी कुणीतरी रांगोळी विस्कटावी तसे ते गाणे कानांवर येता येता विस्कटले जाते. त्याच्या नसण्याच्या वेदनेवर ते सूर मात करू शकत तर नाहीच, पण तिची तीव्रता वाढवतात. (पान ७२)

प्रकाशक :मौज प्रकाशन गृह
प्रथमावृत्ती : ८ नोव्हेंबर १९९८
पाने : १४०
किंमत : १२५

~ गणेश

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

स्वामी (रणजीत देसाई)


स्वामी ही रणजीत देसाई यांची थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. मराठी साहित्य जगात सर्वाधिक गाजलेली आणि सुरेख लेखन शैलीने नटलेली अद्वितीय कलाकृती असाही तिचा उल्लेख करावा लागेल. आतापर्यंत या कादंबरी बाबतीत अनेकांनी लिहिले आहे आणि भविष्यातही लिहिले जाईल यात शंका नाही. लेखकाने खऱ्या अर्थाने माधवरावांचा जीवन पटाला बोलके करून वाचकांपर्यंत पोहोचवले आहे ते 'स्वामी' च्या 30 पेक्षा अधिक निघालेल्या आवृत्त्यावरून स्पष्ट होते. रणजीत देसाई यांनी विपुल लेखन कार्य करून मराठी भाषेला समृद्ध केले त्यांची छत्रपती शिवाजी महाराजावरील 'श्रीमान योगी', कर्णा वरील 'राधेय' आणि बाजी प्रभू देशपांडे वरील 'पावनखिंड' या इतर प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबर्‍या आहेत. स्वामीने वाचकांच्या मनावर कसे अधिराज्य गाजवले हे या कादंबरीस मिळालेल्या पुरस्कारावरून दिसते. 1963 ला स्वामी कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि हरी नारायण आपटे पुरस्कार मिळाले तर 1964 ला साहित्य वर्तुळात नावाजलेला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

स्वामी वैशिष्ट्य म्हणजे यात केलेले स्थलवर्णन, व्यक्तीवर्णन. ही वर्णने वाचताना हुबेहुब व्यक्ती आणि प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. असली वर्णने साकारणे हे कादंबरीकारासाठी मोठे दिव्य असते. यासाठी त्यांना इतर किती गोष्टींचा अभ्यास करावा लागत असेल हे त्यानाच ठाऊक, असो. ह्या कादंबरीत माधवरावाच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटना, त्या भोवती फिरणारे राजकारण, सरदार आणि कारभारी लोकात बसलेली तरूण पेशव्याची वचक, राघोबादादांची कारस्थाने आणि महत्वाचे म्हणजे रमाबाई आणि माधवराव याचे प्रेम संबंध यावर सविस्तर विश्लेषण केले आहे. स्वामी तीन प्रकरणात विभागली गेली आहे. ही तीन प्रकरणे विभागतांना लेखकाने फार काळजी घेतली आहे.

14  जानेवारी 1761 ला पानपतावर सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखालील मराठी फौजेचा पराजय होतो. या युद्धात भाऊंसह विश्वासराव हा भावी पेशवा धारातिर्थी पडतो. गिलच्यांचा हातुन मराठी फौजेची व बाजार बुणग्यांची बेसुमार कत्तल होते. नानासाहेब पेशवे हा धक्का सहन न करू शकल्याने पानपतानंतर काही महिन्यातच (23 जुन 1761) त्यांचा मृत्यु होतो. पेशवाईचे मुख्य वारस विश्वासराव आधीच लढाईत मारले गेल्याने पेशवाईची वस्त्र नानासाहेबांचे द्वितीय पुत्र माधवराव यांना मिळतात. अवघ्या सोळाव्या वर्षी 20 जुलै 1761 रोजी माधवराव पेशव्यांच्या मसनदीवर आरूढ होतात. पेशवे पदासाठी गुडघ्यावर बाशिंग बांधुन बसलेल्या नानासाहेब पेशव्यांचे धाकले भाऊ राघोबादादांना हे सहन होत नाही आणि येथूनच सुरूवात होते ती गृह युद्धाला.

पानपतावर जबरदस्त हानी नंतर दख्खन मधील निजाम व कर्नाटकातील हैदर अली यांना जोर चढतो. त्यात अजून कमी की काय नागपूरकर भोसल्यांना देखील सातारा गादीचे स्वप्न पडू लागतात. माधवरावाची जेमतेम 11 वर्षांची कारकीर्द याच घटनांनी व्यापून जाते. हैदरचा बिमोड करण्यासाठी कर्नाटकच्या चार, निजाम विरूद्ध दोन आणि भोसल्या विरूद्ध दोन अश्या एकूण आठ स्वाऱ्या हा तरूण पेशवा जबाबदारीने पार पाडतो. राघोबादादांना अनेक वेळा समजावून सांगितो, त्याच्या कडे आळेगावत स्वतःला ओलिस ठेवतो परंतु राघोबादादांच्या कारवायांना पुर्णपणे पायबंद बसत नसल्याने शेवटी माधवराव त्यांना नजर कैदेत ठेवण्याचा हुकूम देतात.

माधवरावाच्या जीवनातील महत्वाची भावनिक बाजू म्हणजे त्यांची आई गोपिकाबाई. निजामाच्या स्वारीत असतांना निजाम पुण्यात येऊन सर्व शहर लुटतो. पर्वतीवर श्री भंग करतो. यावेळी पेशव्यांचे सख्खे मामा रास्ते हे निजामाला मदत करतात म्हणून माधवराव त्यांना 5000 रूपये दंड ठोठावतात. दंड मागे घे नाहीतर मी शनिवारवाड्यात पाणी पिण्यासही थांबणार नाही असे गोपिकाबाई माधवरावास ठणकावून सांगतात. परंतू कर्तव्यदक्ष माधवराव दंड मागे घेत नाहीत. याचा राग येऊन गोपिकाबाई कायमच्या गंगापूरला निघून जातात. परत माधवरावांची व गोपिकाबाई यांची भेट होत नाही. माधवराव एकाकी पडतात. रमाबाई सोडल्यास त्यांना जवळचे असे कोणीच रहात नाही. सारख्या धकाधकीच्या जीवनात त्याना रमाबाईना वेळ देता येत नाही. यातच माधवरावना क्षयाचा गंभीर आजार होतो. या आजारात माधवराव थेऊर येथे दि. 18 नोव्हेंबर 1772  रोजी मरण पावतात. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. माधवरावाच्या आदेशानुसार नुसार रमाबाई सहगमन करतात. तिचे वृंदावन थेऊरयेथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.

स्वामीची शेवटची 20 पाने फार भावनिक आहेत. रमाबाई सती जातानांचा प्रसंग वाचतांना काळजात फार कालवा कालव होते. डोळ्यात अश्रु तरळतात.

मी ही कादंबरी आत्तापर्यंत दोनदा वाचली आहे. अजून किती वेळेस वाचेल हे सांगता येत नाही.