दुबई डायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुबई डायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ मे, २०२२

यूएई चे नवे राष्ट्रपती MBZ (मोहम्मद बिन झायेद)

 



यूएई चे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अलनह्यान यांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद अलनह्यान यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. मोहम्मद बिन झायेद यांचा परिचय करण्यापूर्वी यूएईच्या राज्य पद्धतीची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे. यूएई हा एक संवैधानिक राजेशाही देश असून यात एकूण सात राजशाह्यांचा (अमिरात) अंतर्भाव होतो.  १९७१ साली अबू धाबीचे राजे शेख झायेद बिन सुलतान अलनह्यान यांच्या नेतृत्वाखाली अबू धाबी, दुबई, शारजा, अजमान, रास अलखैमा, उम अलकुवैन आणि फुजैरा या सात स्वतंत्र राज्यांचे राजे (म्हणजेच शेख ) एकत्र येऊन त्यांनी संयुक्त अरब अमिरात या संघराज्यची स्थापन केली.

यूएईच्या स्थापने पासून अबू धाबीच्या राज गादीवर असणारे शेख हे देशाचे राष्ट्रपती तर दुबईच्या राज गादीवर असणारे शेख हे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान असतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची अधिकृत निवड ही सर्वोच्च सांघिक समिती (Federal Supreme Council) करते. या समितीचे सदस्य हे यूएईच्या सात राज्यांचे शेख असतात. यूएईच्या उपराष्ट्रपती पदावर असणारी व्यक्ती हीच या देशाचे पंतप्रधान देखील असते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अधिकृत कार्यकाळ जरी पाच वर्षांचा असला तरी या पदांवरील व्यक्तींना तयहयात या पदांवर कायम ठेवण्याची इथली परंपरा आहे. शेख झायेद हे यूएईचे पहिले राष्ट्रपती होते. २००४ साली शेख झायेद यांच्या निधनानंतर त्यांचे थोरले पुत्र शेख खलिफा यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली होती. नवनिर्वाचित राष्ट्रपती शेख मोहम्मद हे यूएईचे तिसरे राष्ट्रपती आहेत.

यूएईचे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे राजे ६१ वर्षीय शेख मोहम्मद बिन झायेद यांचा जन्म ११ मार्च १९६१ रोजी अलऐन शहरात झाला. शेख मोहम्मद यांचे पूर्ण नाव 'शेख मोहम्मद बिन झायेद बिन सुलतान बिन झायेद बिन खलिफा बिन शाखबौत बिन तय्यब बिन इसा बिन नह्यान बिन फलाह बिन यास' असे आहे. शेख मोहम्मद हे शेख झायेद यांचे तृतीय चिरंजीव आहेत. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे वडलांच्या देखरेखी खाली अलऐन आणि अबू धाबी शहरात झाले. त्यांना १९७९ साली उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. इंग्लंच्या नामांकित सॅण्डहर्स्ट रॉयल मिलिटरी अकॅडेमी येथून त्यांनी सैन्य शिक्षणात पदवी संपादन केली. यूएई मध्ये परत आल्यानंतर त्यांनी देशाच्या सैन्य दलात अनेक वर्ष सेवा केली. ते हवाई दलाचे उत्तम वैमानिक देखील आहेत. १९९१ साली झालेल्या पहिल्या आखाती युद्धात त्यांनी कुवैतच्या बाजूने सहभाग घेतला होता. यूएई सैन्य दलाचे आधुनिकीकरण करण्याचे सगळे श्रेय हे शेख मोहम्मद यांनाच दिले जाते.

शेख मोहम्मद बिन झायेद यांची २००४ साली अबू धाबीच्या युवराज पदावर (Crown Prince) नियुक्ती झाली. २००५ साली त्यांना यूएई सैन्य दलाचे डेप्युटी सुप्रीम कमांडर करण्यात आले. शेख खलिफा यांच्या आजारपणात शेख मोहम्मद यांनी देशाची धुरा अगदी समर्थपणे सांभाळली. यूएईच्या जनमानसात शेख मोहम्मद बिन झायेद हे खूप लोकप्रिय नेते असून सामान्य जनतेत त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. अरब जगतातही शेख मोहम्मद बिन झायेद एक शक्तिशाली नेते म्हणून ओळखले जातात. आपल्या देशाची रुढिवादी ओळख मिटवून त्यांनी उदारमतवादी आणि सहिष्णू धोरण अवलंबवले. अनेक दाशकांपासून असलेले इस्त्राईल बरोबरचे शत्रुत्व त्यांना पुढाकार घेऊन मिटवले. यूएई-इस्त्राईल या देशांनी मैत्रीचा हात धरत पहिल्यांदाच राजनैतिक संबंध स्थापित केले. इस्त्राईल आणि यूएई यांच्यात झालेल्या शांतात कराराचे खरे शिल्पकार हे शेख मोहम्मद बिन झायेद होते. धार्मिक सहिष्णुतेचे नवे धोरण त्यांनी राबवले. याचाच भाग म्हणून त्यांनी २०१९ साली पोप फ्रान्सिस यांना यूएईच्या भेटीसाठी आमंत्रित केले. पोप पहिल्यांदाच अरब खंडात येत होते, त्यामुळे त्यांचा हा दौरा खूप ऐतिहासिक ठरला. शेख मोहम्मद बिन झायेद यांनी अबू धाबी येथे हिंदू मंदिर बांधण्यास परवाणगी देखील दिली. बीएपीएस स्वामीनारायण या संस्थेच्या माध्यमातून या मंदिराची निर्मिती करण्यात येत असून लवकरच याचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

सगळ्याच आघाड्यावर देशाला पुढे घुवून जाण्यासाठी शेख मोहम्मद बिन झायेद हे प्रयत्नशील आहेत. त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे आज यूएई हा देश आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, पर्यटन या सारख्या क्षेत्रात जगात आघाडीवर जात आहे. शेख मोहम्मद बिन झायेद हे देशाला याच्याही पुढे घेऊन जाण्यास समर्थ आहेत.


शनिवार, ३ जून, २०१७

पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हर

ओवीची शाळा फार दूर आहे. सकाळी तिला शाळेत जाण्यासाठी पहाटे पाचलाच उठवावे लागते कारण पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी तिची बस येते. आम्हाला तिच्या शाळेत जायचं म्हटलं तरी मेट्रो स्टेशनवर उतरून टॅक्सीने जावे लागते. मेट्रोपासून तिची शाळा फार लांब आहे आणि तिथं बसही जात नाही. त्यामुळे तिथं पोहचवण्यासाठी गाडी नसल्याने टॅक्सी हा एकमेव पर्याय आमच्याकडे आहे. मेट्रो स्टेशनच्या बाहेर टॅक्सी ब-याचवेळा पटकन मिळते पण येतांना टॅक्सी मिळत नाही. काॅल टॅक्सी बोलावून घ्यावी लागते.

असच एकदा काही कामानिमित्त मला तिच्या शाळेत जावे लागले. कडक उन्हाळ्यामुळे सकाळी सकाळीच तापमानाचा पारा चढायला लागतो. मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर मला पटकन टॅक्सी मिळाली. या ड्रायव्हरला शाळा कुठे आहे हे सुदैवाने माहिती होते. नाहीतर ब-याचवेळा टॅक्सी ड्रायव्हरनाही रस्ता दाखवत तेथे न्यावे लागते अशी ही शाळा आडवळणी आहे. त्याने मला बरोबर ठीकाणावर पोहचवले. पण मला परत कसं जायचं याची काळजी वाटत होती. मी टॅक्सीच्या बाहेर पडतांना टॅक्सी ड्रायव्हरला म्हणलो की,
"तुम्ही कृपया दहा पंधरा मिनीटं माझ्यासाठी थांबाल का? जर तुम्हाला भाडं मिळाले तर तुम्ही जा."
तो बिचारा थोडावेळ थांबण्यास तयार झाला.

मी शाळेच्या कार्यालयात जावून माझे काम मी करून आलो. पण माझ्या कामाला मला अर्धा तास लागला. मी विचार केला की टॅक्सीवाला तो माणूस गेला असेल. आता उगाचच उन्हात उभा राहुण काॅल टॅक्सी येईल पर्यंत थांबावे लागेल. मी शाळेच्या गेटबाहेर पडलो. शाळा अगदी वाळवंटात बांधली आहे. इकडचा भाग आता विकसीत होत आहे पण तरीही तापलेल्या वाळवंटाचा दाह अंगाची लाही लाही करत होता. घड्याळात पाहिलं तर जेमतेम सकाळचे दहाच वाजलेले होते. भर दुपारी बारा नंतर इथं काय परीस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा.

बाहेर मोघाची पिवळ्या रंगाची नॅशनल टॅक्सी पाहून माझ्या जीवात जीव आला. मी टॅक्सीत बसलो. त्या ड्रायव्हरचे मी धन्यवाद मानले. तो ही मला म्हणाला की "तुम्ही मला थांबवले नसते तर मलाही परत रिकामेच जावे लागले असते. तेंव्हा मी ही तुमचा आभारी आहे."
टॅक्सीवाला बोलता झालेला पाहुण मी ही त्याच्याशी गप्पा मारण्यास सुरूवात केली. त्याचे उर्दूचे अस्खलित उच्चार ऐकून हा पाकिस्तानी आहे, असा मला अंदाज लावायला वेळ लागला नाही. नाहीतरी बहुतांश टॅक्सी ड्रायव्हर हे पाकिस्तानीच असतात.
"तुम्ही जर इथं रोज येत असाल तर माझा नंबर घेऊन ठेवा, मी येत जाईन तुमच्यासाठी" तो फार प्रेमाने म्हणाला.
"मी काय रोज येत नाही, परंतू कधीतरी यावे लागते. तरीही मी तुमचा नंबर ठेवतो."
त्याच्याकडून नंबर घेतल्यानंतर मी तो माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करतांना ड्रायव्हरला त्याचे नाव विचारले. त्याने एजाज असे नाव सांगितले.
मी माझे नाव गणेश सांगितल्यावर तो लगेच म्हणाला "तुमच्या नावाचा मला अर्थ माहित आहे, हत्ती..... बरोबर ना"
मी हो म्हटल्यावर तो पुढे बोलू लागला.
"मी सौदीत पुर्वी कामाला होतो. तिथं माझ्या बरोबर गणेश नावाचा मित्र होता. मी सौदीत जेद्दाला एका चांगल्या कंपनीत परचेस काॅर्डीनेटर या पोस्टवर होतो. साडेनऊ वर्षे मी तिथं काम केलं. पण काही कारणांमुळे मला राजीनामा देऊन परत जावे लागले. नंतर मला चांगला व्हिजा मिळाला नाही. ब-याच प्रयत्नानंतर दुबईत टॅक्सी ड्रायव्हर म्हणून व्हिजा मिळाला. माझी मजबूरी होती म्हणून मला आता टॅक्सी चालवावी लागते. मी अजून नवीनच आहे येथे. मला जास्त दुबईतील ठिकाणेही माहीत नाहीत. एक महिनादेखील झाला नाही मला येऊन." तो सांगत होता.

मी विचारले "मग पगार पाणी कसं असते तुमचे?"
"आम्हाला असा ठरावीक पगार नसतो. दोन ड्रायव्हरमध्ये मिळून एक टॅक्सी असते. बारा बारा तासाच्या अंतराने आमची ड्यूटी बदलते. आम्ही जेवढे बारा तासात कमवू त्याच्यावर ठराविक प्रमाणात आम्हाला पैसा मिळतो. कधी दिवसाला ८० ते १०० दिरहम्स होतात. जर काम नाही केले तर काहीच मिळत नाही. तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर कधी सुट्टीच घेत नाहीत. अगदी आजारी असला तरीही नाही." मला त्यांच ते बोलणं ऐकून फार कसंतरी वाटलं. टॅक्सी ड्रायव्हरला किती कष्ट करावे लागत असतील याचा मला जरा अंदाज आला.

"मग आर टी ए (दुबईतील पब्लिक ट्रान्स्पोर्ट चालणारी सरकारी संस्था) काय मिळते यातून?" मी सहजच विचारले
"आर टी ए ची फार दादागिरी आहे. त्यांच्या नावाने सा-या कंपन्या काम करतात. त्यांना वर्षाचे ठरावीक आणि रोजच्या एकून भाड्याची ठरलेली टक्केवारी आयती द्यावी लागते. जर कंपनीने काही नियम मोडल्यास कंपनी दंड भरते नाही तर ड्रायव्हरने काही अपघात केल्यास ड्रायव्हरच्या डोक्यावर तो खर्च येतो. आता मला अजून पहिला पगार झाला नाहीपण माझ्या नावावर पंधराशे दिरहम्स अलरेडी दंड जमा झालाय. ट्रॅफिक अॅक्सिडेंटमध्ये आमची चुक जरी नसली तरी कंपनी आम्हाला दंड करते. तेंव्हा आम्हाला फार काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते. टॅक्सी ड्रायव्हर हमेशा असल्या दंडाच्या कर्जातच जगतो."

"तुम्ही दिवसाला ८०० ते १००० भाडे जमवत असाल ना?" मी प्रश्न केला.
"नाही आमचे जास्तीत जास्त फक्त २०० ते २५० होतात. जे सिनीयर ड्रायव्हर आहेत त्यांचे होतात ८०० ते १०००"

एवढ्या गप्पा मारल्यानंतर माझं मेट्रो स्टेशन आले.  येतांनाचे साडे वीस दिरहम भाडे झाले. मी त्या ड्रायव्हरला पंचवीस दिसहम दिले, तो मला उरलेले पैसे देत होता. मी त्याला वरचे साडेचार दिरहम टिप म्हणून देऊन टाकले. मला त्याची फार दया आली. आभार मानून मी मेट्रोच्या दिशेने चालत निघालो.

दुबईत प्रत्येकाला किती जीव तोडून मेहनत करावी लाजते ना? पण आपल्या देशाततील लोकांना का वाटते की दुबईत गेल्यावर फार पैसा आहे. का तो झाडाचा लागतो काय? हा टॅक्सीवाला किती मेहनत घेतोय बिचारा. असच इतर क्षेत्रातील कामगारही पोटाला चिमटे घेत आपल्या परिवारासाठी जगत असतील. त्यांचीही या टॅक्सी ड्रायव्हर सारखी काही मजबुरी असेल?

~ गणेश

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

ऑफशोअर रीग पर्यंतही पोहचला ग्रंथ तुमच्या दारीचा विस्तार



दुबई/अजमान (२१.०४.२०१७)

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी' या वाचन चळवळीचा विस्तार भारतभर तर झालाच आहे पण भारता व्यतिरिक्त जगाच्या विविध देशातही दर्जेदार मराठी ग्रंथ वाचकांपर्यत पोहोचवण्याचं काम या संस्थेने केले आहे. युएई तील मराठी माणसांत ही योजना फार लोकप्रिय झाली असून दुबई, शारजा, अजमान, आबू धाबी, फुजैरा आणि रास अल खैमा या महत्त्वाच्या अमिरातमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी वाचक वर्ग निर्माण झाला आहे. आता तर या योजनेचा विस्तार आखाती समुद्रात जिथं तेलाचे उत्पादन होते अशा ऑफशोअर प्लॅटफॉर्मपर्यंत पोहचला आहे. ग्रंथ तुमच्या दारी शारजा येथील समन्वयिका सौ. नंदा शारंगपाणी याचे पती श्री जगदीश शारंगपाणी हे ऑफशोअर कंपनीत कार्यरत असून या कंपनीत अनेक मराठी भाषक इंजिनियर  व टेक्निशियन काम करतात. एकदा ऑफशोअर गेल्यावर साधारणपणे दोन तीन महिने सुट्टी नसते अशा वेळी हे लोक विरंगुळा व ज्ञानवर्धनाचे साधन म्हणून मराठी ग्रंथ वाचनाचा आस्वाद घेतात. वाचन झाल्यावर ग्रंथ आपापसात बदलतात, दोन महिन्यांनी परत नवीन ग्रंथ प्लॅटफॉर्मवर घेऊन जातात. यातील एक वाचक तर अझरबेजान या देशात ही असून दर महिन्याला ते नवनवीन ग्रंथ वाचण्यासाठी नेतात. असे सौ. नंदा शारंगपाणी यांनी सांगितले. निमित्त होते ग्रंथ तुमच्या दारी युएई ची त्रैमासिक बैठक. ही बैठक आजमान येथे दिनांक २१ एप्रिलला मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

बैठकीच्या सुरूवातीला समन्वयिका विशाखा पंडित यांचे वडील वि. भा. देशपांडे यांना एक मिनिट शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठी नाट्यकोशकार व प्रसिद्ध नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र  तथा वि. भा. देशपांडे यांचे गेल्या महिन्यात ९ मार्चला पुण्यात निधन झाले होते. यावेळी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

बैठकीस मुख्य समन्वयिका सौ. सुजाता भिंगे यांनी प्रारंभ करून प्रत्येक ग्रंथ पेटी मागे किती वाचक आहेत याचा आढावा घेतला व अजून नवीन वाचक कसे या योजनेत जोडले जातील यासाठी सर्व समन्वयकांनी प्रयत्न करावेत यावर त्यांनी भर दिला. दुबई विभागात आता एकुण २८ पेट्या आणि १९ समन्वयकांचे मिळून जवळपास २०० वाचक झाले आहेत. ग्रंथ परिवारात दाखल झालेल्या समन्वयिका श्वेता पोरवाळ आणि प्रचिती तलाठी गांधी यांनी आपला परिचय करून दिला.

आबू धाबी या राजधानीच्या शहरात मराठी माणसांची संख्या भरपूर असूनही दुबई सारखा तिथं ग्रंथचा प्रसार झाला नाही अशी खंत आबू धाबीच्या समन्वयिका नीलिमा वाडेकर यांनी व्यक्त केली. तिथं ग्रंथचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवीन समन्वयक शोधने आणि जमल्यास गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दुबईत झालेल्या वाचक मेळाव्याच्या धर्तीवर असाच एखाद्या मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे; जेणेकरून आबू धाबीतील वाचक वर्गापर्यंत ग्रंथची ओळख पोहचेल. सध्या आबू धाबीत केवळ एकच ग्रंथ पेटी आहे.

बाल ग्रंथ पेट्या फार लोकप्रिय होत असून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विभागण्यात यावे जेणेकरुन विविध उपनगरातील बाल वाचकांना या बाल साहित्याचा आस्वाद घेता येईल. द गार्डन्स विभागात नेहा अग्निहोत्री यांच्याकडे देण्यात आलेल्या ग्रंथ पेटीच्या महिला वाचक आठवड्यातून एकदा एकत्र जमून ग्रंथ अभिवाचन सारखा स्तुत्य उपक्रम राबवतात. तसेच भारतातून सुट्टीवर आलेले काही जेष्ठ नागरिकही ग्रंथचे वाचक होत आहेत असे नेहा आग्नीहोत्री म्हणाल्या.  

ग्रंथ तुमच्या दारी, दुबई विभाग सोशल मिडीयाच्या वापरात जरा मागे पडला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवीन वाचकापर्यंत पोहचणे शक्य आहे त्यामुळे ग्रंथचे फेसबुक पेज नियमित अपडेट करण्यात यावे असाही ठराव संमत करण्यात आला. समन्वयिका विशाखा पंडित व प्रचिती गांधी मिळून ग्रंथ तुमच्या दारी युएई ची नवीन वेबसाईट तयार करत असून, त्यात ग्रंथची सर्व माहिती अपलोड करण्यात येईल. सर्व समन्वयकांची माहिती, उपलब्ध ग्रंथ, आत्तापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांची माहिती यासारख्या गोष्टी अपलोड करण्यात येणार आहेत. वेगवेगळे समन्वयक यात लेख लिहीणार आहेत. समन्वयक गणेश पोटफोडे हे युट्यूबवर नवीन वाहिनी चालू करत असून त्यासाठी लागणार्या गोष्टीसाठी स्वप्निल जावळे यांचे सहकार्य लाभत आहे. या वाहिनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरील ग्रंथचे परीक्षण, ओळख व चर्चा करण्यात येणार आहे.

प्रत्येक समन्वयकाने आपापल्या वाचकांसाठी काव्यसंमेलने, ग्रंथ अभिवाचन असे कार्यक्रम आयोजित करावेत अशी सूचना किशोर मुंढे यांनी मांडली.

आजमानचे समन्वयक वीरभद्र कारेगांवकर आणि मनिषा कारेगांवकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले.

कार्यक्रमाला सुजाता व घनःशाम भिंगे, नीलिमा वाडेकर, समिश्का व स्वप्निल जावळे, धनश्री व कमलेश पाटील, विशाखा पंडित, नेमिका जोशी, प्रचिती तलाठी गांधी, नंदा शारंगपाणी, अपर्णा पैठणकर, श्वेता व इंद्रनील करंदीकर, किशोर मुंढे, मनिषा व वीरभद्र कारेगांवकर, नेहा व हरी अग्नीहोत्री, श्वेता व सचिन पोरवाळ आणि गणेश पोटफोडे हे उपस्थित होते.

ग्रंथची पुढील बैठक उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर थेट सप्टेंबर महिन्यात होईल अशी माहिती विशाखा पंडित व सुजाता भिंगे यांनी दिली.

~ गणेश भाऊसाहेब पोटफोडे (दुबई)

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

दुबईत साजरा झाला मराठी भाषा दिन









कविवर्य कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस महाराष्ट्रासह जगभरात दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा दुबईतील ग्रंथ तुमच्या दारी व मोरया इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने "कुसुमाग्रज तुमचे आमचे" हा बहारदार कार्यक्रम आयोजित करून दुबईत मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या अनेक कविता, गाणी, आणि नाट्य प्रवेश वाचनाच्या रसग्रहनाने दुबईकर मंत्रमुग्ध झाले.

ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम अवतरला त्या ग्रंथ तुमच्या दारीच्या समन्वयिका विशाखा पंडित यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. मराठीतील दर्जेदार ग्रंथ यु ए ई तील मराठी वाचकांपर्यंत पोहचवणे हा ग्रंथ तुमच्या दारीचा हेतू आहे. या कार्यात अधिकाधिक प्रमाणात वाचकांनी सहभागी व्हावं असे आवाहन त्यांनी केले. दुबईत नवीन ग्रंथ पेट्या वाढत असून हे नवीन वाचक वर्ग वाढत असल्याचे सूचक लक्षण असल्याचे त्यांनी सांगून सर्व समन्वयकांचे व वाचकांचे आभार मानले. थोड्याच कालावधी इंटरनॅशनल सीटी दुबई येथे मोठा वाचक वर्ग तयार झाल्याने तेथील वाचकांच्याच वर्गणीतून नवीन २२वी ग्रंथ पेटी व एक बाल ग्रंथ पेटी समिश्का जावळे व स्वप्निल जावळे या समन्वयकांना सुपूर्द करण्यात याली. जावळे दाम्पत्यांनी त्यांच्या मुलगा स्वराज याच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून ही बाल ग्रंथपेटी प्रायोजित केली आहे.

शाल्वली बोरकर, सानिका गाडगीळ, रिया गायकवाड आणि अनुष्का देसाई या शाळकरी मुलींनी "सरस्वतीच्या नौका या युग यात्रेस निघाल्या" आणि "हसरा लाजरा... सुंदर साजिरा श्रावण आला" ही गीतं रसिकांसमोर सादर करून स्वरमंडपातील वातावरण वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. परदेशात राहूनही या मुली संगीताचे व गायनाचे धडे गायिका चैत्राली जानेफळकर यांच्याकडून घेत असून त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच होते. तसेच गायिका श्रुतिका निमखेडकर यांनीही "तुझ्या तांबुस तेजाची ज्योतं" या गीताने मैफिलीत स्वरांचे रंग भरले. अर्चित अग्निहोत्री याने गायलेल्या "काही बोलायलाचे आहे पण बोलणार नाही" या गीताला प्रेक्षकांनी विषेश दाद दिली. हार्मोनियमवर मेघन श्रीखंडे आणि तबल्यावर प्रसाद सांगोडकर यांनी संगत दिली. 

यानंतर सुरू झाला कुसुमाग्रजांच्या कवितांचा नदी सम प्रवाह समुद्रा रूपी रसिक प्रेक्षकांच्या भेटीच्या ओढीने ओसंडू लागला. डाॅ. सुप्रिया सुधाळकर, वसुधा कुलकर्णी, मनोज पाटील, विशाखा पंडित आणि गणेश पोटफोडे यांनी कुसुमाग्रजांच्या काही प्रसिद्ध काव्यरचना सादर केल्या. दुरस्थ, निरभ्र, तत्वज्ञान, माझ्या मराठी मातीचा, चंद्र, प्रेम कुणावर करावं?, प्रेम कर भिल्ला सारखं, कणा, रद्दी, आगगाडी आणि जमीन, अखेर कमाई, जोगिया, जखमांचे देणे, गाभारा, करार, पाऊलचिन्हे, मौन आणि असाही एक सावता यासारख्या कवितांचा समावेश होता. आहान सुधाळकर या पहिलीत इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या बाल कलाकाराने "टपालवाले टपालवाले" या कवितेचे वाचन करून विदेशात राहूनही आम्ही मातृभाषा शिकतो हा संदेश दिला.

प्रसिद्ध निवेदिका आणि गायिका चैत्राली जानेफळकर यांनी "माझे जगणे होते गाणे", "नवीन काही गा हो आता", "दूर निनादे स्वरसंमेलन", "युगामागुनी चालली रे युगे ही", आणि "वेडात मराठे वीर दौडले सात" या डाॅ गोपाळ मिरीकर यांनी दिलेल्या चालीत दर्जेदार व सुरेल गीतांनी कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत नेली. नाट्य अभिनेते मनोज पाटील आणि लेखिका वसुधा कुलकर्णी या दोघांनी मिळून नटसम्राट नाटकातील आप्पा कावेरी यांच्यातील "बायको म्हणजे बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी" हा प्रसिद्ध संवाद सादर केला. मनोज पाटील यांनी आपल्या कणखर आवाजात नटसम्राट नाटकातील आप्पा बेलकलकर यांचे "आपला बाप चोर आहे", "टु बी ऑर नाॅट बी", "दुर व्हा सगळं निरर्थक आहे" हे गाजलेले संवाद सादर करून प्रेक्षकांच्या काळजाच्या ठीकर्‍या केल्या. त्यांच्या या सादरीकरणाने प्रेक्षकांना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नटसम्राट चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या भूमिकेची आठवण झाली. वसुधा कुलकर्णी यांनीही कावेरीचा एक हृदय पिळवटून टाकणारा संवाद सादर करून रसिकांना काहीकाळ भावनिक केले.

चैत्राली जानेफळकर यांनी कार्यक्रमाचे नियोजनबद्ध सूत्रसंचालन करून प्रेक्षकांना सुरवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवले. कार्यक्रमाचा स्तर हा सर्वांच सहभागी कलाकारांनी फारच वरचा ठेवला व कुसुमाग्रज ह्या नावाला पुर्ण न्याय देवून नक्षत्रांचे देणे या गाजलेल्या कार्यक्रमाची आठवण सर्वांना करुन दिली. भविष्यात असेच साहित्य, कला, संस्कृतीशी निगडीत कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतील असे प्रतिपादन विशाखा पंडित यांनी केले. ग्रंथ तुमच्या दारी दर तीन महीन्यातून एकदा विविध प्रकारचे वाचक केदरीत कार्यक्रम आयोजित करणार आहे. या सारख्या कार्यक्रमाला मोरया इव्हेंट सहकार्य करेल असे मनोज पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाची सांगता सुप्रसिद्ध कलाकार मेघन श्रीखंडे यांनी गायलेल्या "सर्वात्मका सर्वेश्वरा" या ययाती नाटकातील पदाने झाली. डाॅ. सुप्रिया सुधाळकर यांनी मोरया इव्हेंट चे सर्वेसर्वा व कार्यक्रमाचे आयोजक मनोज पाटील, सहभागी कलाकार आणि प्रेक्षकांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आभार मानले. सहभागी सर्व कलाकारांना विशाखा पंडित यांच्या हस्ते  स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

~ गणेश भाऊसाहेब पोटफोडे (दुबई)

रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

दुबईतील वाचन चळवळ भाग २

युएईत यंदाचे वर्ष वाचक वर्ष (रीडिंग ईयर) म्हणून घोषित करण्यात आले होते त्यात ग्रंथ तुमच्या दारीला दुबईत दोन वर्ष पूर्ण होत होती. या दोन्ही सुवर्णसंधीचा फायदा घेऊन ग्रंथ तुमच्या दारीच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त एक वाचक मेळावा आयोजित करावा अशी कल्पना ग्रंथ तुमच्या दारीचे दुबईतील मुख्य समन्वयक डाॅ. संदिप कडवे याच्या मनात आली. या मेळाव्यात सर्व वाचक, समन्वयक, आणि भारतातून एखाद्या साहित्यिकाला आमंत्रित करायचे असे ठरले. या मेळाव्याचा उद्देश म्हणजे अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहचून ग्रंथचा विस्तार करणे हा होता. ज्यावेळी वाचक मेळाव्याची तयारी चालू झाली तेंव्हा कळले की मेळावा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणार असून यात मुख्य वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक आणि गीतकार प्रवीण दवणे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. खरतर प्रवीण दवणे सारखे मराठी साहित्य विश्वातील वरिष्ठ साहित्यिक येणार हीच माझ्यासाठी आणि दुबईतील समस्त वाचकांसाठी आनंदाची मोठी गोष्ट होती. मेळावा आयोजित करण्याचे ठरल्यापासून मी अगदी चातकासारखी या सोहळ्याची वाट पाहू लागलो.

ग्रंथ तुमच्या दारी व आमी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात येणार होता. आमी परिवार अर्थात अखिल अमिराती मराठी इंडियन (AAMI) या संघटनेने अल्पावधीतच दुबईत मोठी लोकप्रियता मिळवली होती. सामाजिक व सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसांचे एक मोठे संघटन केले होते. आमी परिवाराने वाचक मेळाव्याची जबाबदारी व्यवस्थितपणे पेलवत ग्रंथ च्या मदतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी करून कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन केले. स्थळ ठरले शारजा विद्यापीठाचे सभागृह.

जेंव्हा मेळाव्याला मी शारजा विद्यापीठतील सभागृहाबाहेर पोहचलो तेंव्हा मला विश्वासच बसत नव्हता एवढी गर्दी होती. सभागृह खचाखच भरून गेले होते. हा सर्व समन्वयक आणि आमी परिवार यांच्या मेळाव्यासाठी घेतलेल्या अखंड मेहनतीचा परिणाम होता. मेळाव्यास कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विनायक रानडे, विश्वास ठाकुर उपस्थित होते. अजून एक योगायोग घडला तो म्हणजे प्रसिद्ध अनुवादक आणि लेखक रवींद्र गुर्जर हे यावेळी सुट्टीसाठी दुबईत आलेले होते. त्यांनाही या कार्यक्रमाची माहिती मिळाल्याने ते या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहिले. आमीचे संस्थापक संतोष कारंडे, आमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन साडेकर तसेच ग्रंथचे सगळ्या समन्वयकांसहित डाॅ. संदिप कडवे व्यासपीठावर उपस्थित होते.

भारतीय संस्कृती प्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाले. युएईत इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलींनी सरस्वती वंदना गाऊन कार्यक्रमात एक चैतन्य निर्माण केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि ग्रंथ तुमच्या दारीचे प्रवर्तक विनायक रानडे यांनी ही योजना सुरू करण्यामागचे आपले अनुभव सांगितले. दुबई नंतर ग्रंथ आता जगाच्या विविध देशात पोहचले असून दुबईत ५१ ग्रंथ पेट्यांचे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. खरोखरच या माणूसात काहीतरी वेगळ रसायन असल्याचे जाणवले. वाचनाची आवड स्वतःपुरती न ठेवता तिला चळवळीचे रूप देणे आणि लोकांना वाचनासाठी प्रेरणा देण्या पूरतेच न थांबता मोफत ग्रंथही उपलब्ध करून देणे ही सर्वसाधारण गोष्ट नव्हती. ही व्यक्ती माझ्या मनात घर करून गेली.

बर्‍याच दिवसांपासून वाट पहात असलेल्या डाॅ. संदिप कडवे संपादित विश्व पांथस्थ या पहिल्या आखाती मराठी मासिकाचे या मेळाव्यात प्रकाशन झाले. गेल्या जवळपास एक वर्षांपासून डाॅ. कडवे मासिका साठी मेहनत घेत होते. त्यांची मासिका साठीची धडपड मी जवळून अनुभवली होती. मराठी मासिक युएई चालू करण्यासाठी किती तरी परवान्याची आवश्यकता होती. ते सर्व दिव्य पार करून हे मासिक वास्तवात आल्याने खरोखरच मराठी माणसांनी डाॅ. संदिप कडवे यांचे आभार मानायला हवेत. आखातात मराठी मासिक सुरू होणे ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल, कारण म्हणजे इतर भारतीय भाषेत कितीतरी दैनिकं, साप्ताहिकं आणि मासिकं दुबईतून प्रसिद्ध होत होती. जवळपास दिड लाख मराठी माणसांची लोकसंख्या असणाऱ्या या देशात मराठी माणसांसाठी त्यामानाने साधे त्रैमासिकही येथे प्रकाशित होत नव्हते. विश्व पांथस्थच्या रूपाने ही उणीव आता भरून निघणार आहे. हे मासिक आखाती मराठी माणसांचा आरसा होऊन उदयाला येईल यात मला अजिबात शंका वाटत नाही.

प्रवीण दवणे सरांनी दोन वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान दिले. पहिल्या सत्रात 'माझ्या लेखनाची आनंदयात्रा' आणि दुसऱ्या सत्रातील 'सावर रे' सादर करून रसिक प्रेक्षकांना मोहित केले. माझ्या लेखनाची आनंदयात्रा मध्ये श्री दवणे यांनी आपल्या जीवनातील साहित्यिक प्रवासाचे अत्यंत सुंदर वर्णन केले. आपले बालपणीचे विविध अनुभव सांगून त्यांनी श्रोत्यांना कधी हसवले तर कधी भावनिक बनवले. आजच्या आधुनिक काळात तरूण पिढी मोबाईल सारख्या उपकरणांच्या आहारी जावून वाचन संस्कृती विसरत चालली आहे. पैश्याच्या मागे न धावता खऱ्या बौद्धिक श्रीमंतीच्या मागे लागा, मातृभाषेवर प्रेम करा आणि वर्तमानात जगा असा संदेश त्यांनी दिला. दवणे सरांनी आपल्या आयुष्यात पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या सहवासात अनुभवलेल्या अनेक आठवणी ताज्या केल्या. गीत लेखन करण्यास किती मेहनत घ्यावी लागायची याचे अविस्मरणीय अनुभव त्यांनी सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले. प्रवीण सर खरोखरीच किती छान बोलत होते. सभागृहात बसलेल्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना हे व्याख्यान संपूच नये असे वाटत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री व प्रसिद्ध निवेदिका अनुजा पडसलगीकर यांनी उत्तम प्रकारे करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. वाचकांना सहजपणे प्रश्नोत्तरांमधे गुंगवून प्रचिती तलाठी यांनी त्यांना सहभागी करुन घेतले. निवडक ग्रंथच्या वाचकांना मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. त्या निवडक वाचकात माझा समावेश होता. मी कुसुमाग्रज यांच्यात कवितेचा संदर्भ देऊन माझे मनोगत व्यक्त केले.

"आम्हा घरी आहे
शब्दांचेच धन
शब्द देता घेता
झाले आहे आता
शब्दाचेच मन"

माझ्या मनात शब्द पेरण्यात ग्रंथचा मोठा वाटा होता. मी सर्व ग्रंथ टीमचे आभार मानले. मनोगत व्यक्त केल्याबद्दल मला वाचक मेळाव्याचे स्मृतीचिन्ह म्हणून एक छानसा काॅफीमग भेट मिळाला.

मध्यंतरात रवींद्र गुर्जर, विनायक रानडे आणि प्रवीण दवणे यांच्याशी मला गप्पा मारण्याची संधी मिळाली. प्रवीण दवणे यांची काही पुस्तकंही विक्रीला उपलब्ध होती. त्यातील अलिकडेच प्रकाशित झालेला "एक कोरी सांज" हा काव्यसंग्रह विकत घेऊन त्यावर प्रवीण सरांचा स्वाक्षरी संदेश मिळवला. मी डाॅ संदिप कडवे यांची भेट घेऊन विश्व पांथस्थ मासिकाबाबत त्यांचे अभिनंदन केले. ग्रंथ तुमच्या दारीची पेटी मी रहात असलेल्या देअरा भागात उपलब्ध नव्हती. मी त्यांना विनंती केली की, एखादी शिल्लक पेटी असल्यास तिची जबाबदारी मला देण्यात यावी. या मेळाव्यासाठी विनायक रानडे यांनी भारतातून चार नवीन पेट्या वितरीत करण्यासाठी आणल्या होत्या. योगायोगाने त्यातील एक पेटी शिल्लक होती. डाॅ. कडवे यांनी तत्काळ ती पेटी मला देण्याचे मान्य केले. या कार्यक्रमात मला ती पेटी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. ग्रंथ पेटी मिळाल्याने मी फार भारावून गेलो. आजपर्यंत एक ग्रंथचा वाचक होतोच पण आता नवीन  जबाबदारी मिळाली, समन्वयक म्हणून.

या कार्यक्रमानिमित्त दोन महिन्यापूर्वी सर्व वाचकांसाठी 'ग्रंथ पेटीने मला काय दिले' आणि 'मला भावलेले पुस्तक' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा निकाल व बक्षीस समारंभ यावेळी ठेवण्यात आला. रणजीत देसाई यांच्या स्वामी या ऐतिहासिक कादंबरीवर मी 'मला भावलेले पुस्तक' हा विषय घेऊन निबंध लिहीला होता. त्याला बक्षीस मिळणे माझ्यासाठी अजून एक आश्चर्याचा धक्काच होता. बक्षीस म्हणून प्रवीण दवणे यांच्या स्वाक्षरीतील त्यांचेच 'रे जीवना' हा अमूल्य ठेवा मिळाला.

ग्रंथचा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी समन्वयक टीम मधून विशाखा पंडित, धनश्री पाटील, किशोर मुंढे, निखिल जोशी, श्रीकांत पैठणकर यांनी फार मेहनत घेतली. डॉ सुप्रिया सुधाळकर यांनी ६— १२ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट नाट्य वाचन करवून घेतले. आखाती देशात जन्मलेल्या/ वाढलेल्या मुलांचे मराठी वाचन ऐकून श्री प्रवीण दवणे यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले. इतर समन्वयक नेमिका जोशी, अपर्णा पैठणकर, उमानंद आणि जयश्री बागडे, नीलम नांदेडकर, निलीमा वाडेकर, समीश्का जावळे, श्वेता करंदीकर, श्रिया जोशी आणि वीरभद्र कारेगावकर उपस्थित होते.

हा पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा यशस्वी झाला. गेल्या तीन महिन्यांपासून अविरत परिश्रमाचे चीज झाले. वाचक मेळाव्याची सांगता एका चिमुकलीने गायलेल्या पसारदानाने झाली. पसायदानाचे " येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥" हे शेवटचे शब्द कानावर पडले. कार्यक्रम संपला. माझ्यातला वाचक खरोखरच सुखिया होऊन ज्ञानाची शिदोरी घेऊन घरी परतत होता. मी ग्रंथ पेटी, निबंध स्पर्धेतील मिळालेले बक्षीस, आठवण भेट काॅफीमग घेऊन सभागृहाच्या बाहेर पडलो.