दैनंदिनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दैनंदिनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ७ जुलै, २०२१

वडिलांचा स्मृतिदिन

 


आज वडलांना जाऊन ३२ वर्षे झाली. मी जवळपास सहा वर्षांचा असतांना माझे वडील भाऊसाहेब रामभाऊ पोटफोडे यांचा अपघातात मृत्यू झाला. वडील वारले त्यावेळी मी पहिलीला जात होतो. लहान वयात वडलांचे छत्र हरपल्याने त्याचे मानसिक आणि आर्थिक परिणाम मला आणि माझ्या कुटुंबियांना दीर्घकाळ भोगावे लागले. नुकत्याच चाळीशीत प्रवेश केलेल्या घरातील तरुण आणि कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्यामुळे आम्ही सगळे कोलमडून पडलो. वडलांच्या नंतर माझ्या आजीने ती मरेपर्यंत म्हणजे जवळपास १८ वर्षे आपल्या लाडक्या लेकाचे सुतक पाळले. वडलांना घरात आणि गावात सगळे अण्णा म्हणायचे. प्रामाणिक वागणुकीमुळे गावात त्यांना खूप मान आणि प्रतिष्ठा होती. त्यांच्या शब्दाला किंमत होती. गावात सगळे त्यांना घाबरायचे.

अण्णाच्या जाण्यामुळे त्यांनी आमच्या शिक्षणाविषयी जी स्वप्न होती ती पूर्ण होऊ शकली नाहीत. माझे शिक्षण पुढे पूर्ण झाले नाही याची मला आयुष्यभर खंत राहील. घरात मी सगळ्यात लहान असल्याने माझा ते फार लाड करायचे. खाऊ, खेळण्या यांची घरात रेलचेल असे. आमच्याकडे त्यावेळी राजदूत कंपनीची मोटारसायकल होती. राजदूत गाडीच्या पेट्रोल टाकीवर बसून त्यांच्यासोबत जायला मला खूप आवडायचे. अण्णा गाडी घेऊन बाहेर निघाले की, मी मला बरोबर नेण्याचा हट्ट करत असे. कितीतरी वेळा मी त्यांच्या गाडी मागे धावत गेल्याचे आठवते.

राजकीय वर्तुळात त्यांचा सक्रिय सहभाग असे. अहमदनगर जिल्हा दूध संघाचे ते अनेक वर्ष संचालकही होते. त्यांच्या पुढाकाराने गावातील अनेकांना त्यांनी गाई, म्हशी, बैलजोडी त्याचबरोबर शेतीच्या इतर कामासाठी कर्ज मिळवून देण्यात मदत केली. गावातील अनेकांच्या अडीअडचणीत त्यांनी पुढाकार घेऊन मदत केली. म्हणूनच गावातील प्रत्येक घरात त्यांना मान मिळत असे. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांची आठवण काढतात, त्यांचा आदराने उल्लेख करतात. मला असं वाटते हीच त्यांच्या छोट्याश्या आयुष्याची खरी कमाई असावी.

दिनांक ७ जुलै १९८९ ला जिवलग मित्र भाऊसाहेब फलके यांच्या सोबत शेवगावला जात असतांना भगूर गावाजवळ झालेल्या अपघातात दोन्ही भाऊसाहेबांचा मृत्यू झाला. आमचे कायमचे पोरके झालो. नियतीने आमचे बालपण कायमचे हिरावून नेले.

अण्णा तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन _/\_

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

दैनदिनी : देवा म्हातारीला बरं वाटू दे!

आता ह्या मालाबाई, मालाताई ऊर्फ मालाबया कोण? ह्या आमच्या थोर चुलत आजी. माझ्या आजीची तीन नंबरची जाऊबाई. म्हणजे या मालाताई माझ्या बालपणीच्या दुश्मन वगैरे नंबर वन. तर त्यांना गायीने मारले आणि त्या डोक्यावर पडल्या. मग दहा पंधरा दिवस काहीच झाले नाही. काल परवा वगैरे त्या बेशुद्ध पडल्या. मग त्यांना नगरला कुठल्यातरी हाॅस्पिटलमध्ये नेले. लोक म्हणतात त्या वाचण्याची गॅरंटी नाही. आधीच आता म्हातारपण आणि त्यात मुलगा चिकट भोकर. कुणी तब्यतीच्या चौकशीसाठी फोन वगैरे केला तर त्याचं एकच वाक्य, आत्तापर्यंत दोन लाख वगैरे लागले. म्हणजे याला आईच्या तब्यती पेक्षा अजून ही म्हातारी कितीला टाकतेय याची चिंता. म्हणजे कुणाचे काय? अन याचे काय? दोन लाख देऊन एकदम फरक पडतोच का? असा काय नियम आहे का?

या म्हातारा म्हातारीचा याने शासनाकडून पैसा मिळवण्यासाठी वगैरे खूप उपयोग केला. उदाहरणार्थ कुणाच्यातरी पडक्या घरापाशी उभे करून या दोघांचा फोटो काढला आणि इंदिरा आवास योजना की काय त्याच्यासाठी अर्ज भानगडी केल्या. घरी भरपूर जमीन तरी पण निराधार की भूमिहीन दाखवून ह्याने त्यांचे डोल चालू केले. असो. आपल्या काय बापाचे जातयं पण म्हातारपणात कप भर चहा प्यायची ह्या म्हातारा म्हातारीची सत्ता राहिली नाही. सून जे उष्टे-पाष्टे, शिळे-पाके इत्यादी खाऊ घालते त्यावरच यांची पोटं.

आपलं कधी या म्हातारीशी जमलं नाही. आपूण शाळेत असतांना हिच्याशी खूप भांडायचो वगैरे. म्हणजे ही बाई फार भामटी. एकमेकांच्यात भांडणे लीलया लावून देण्यात हिची कला. म्हणजे हिने अनेकांच्यात भांडणे लावून दिली. आमच्या घराची आणि हिच्या घरची भिंत एकच. हिचा रोख जेंव्हा आमच्या घराकडे असायचा तेंव्हा मी बुरूज होऊन उभा वगैरे रहायचो. मग आमची लढाई ठरलेलीच. तिला कधी आमच्या घरात ढवळा ढवळ करू दिली नाही. असो.

आपल्याला जूनी माणसं फार आवडतात. कारण की, ही माणसं आपल्या कुटुंबाचा, गावाचा आणि इलाख्याचा चालता बोलता जीवंत इतिहास असतात. आज मला मालाताईची फारच कीव आली. म्हणजे उष्टे, शिळेपाके खाण्याची वेळ आपल्या दुश्मनावरही येऊ नये. आपण तिच्या तब्यतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. नातू म्हणाला की म्हातारी कोमात आहे.

आपली जरी दुश्मन असली तरी पण तिला चांगले बरे वाटावे हीच माझी इच्छा. परत एकदा या म्हातारीशी भांडाण्याची माझी दिली ख्वाईश आहे. म्हणून देवा म्हातारीला बरं वाटू दे!

~ गणेश
(१४.१०.२०१६)

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

दैनंदिनी

पहाटेचा साडे चारचा अलार्म वाजला. काल मनाशी फारच निश्चय करून वगैरे झोपलो होतो. असा निश्चय गेल्या वर्षभर करतोय. पण साडे चारचा अलार्म वाजून वाजून कंटाळतो अन बंद होतो. परंतू आजचा माझा निश्चय फारच थोर वगैरे. आज उठलोच. हो चक्क. पायात जोडे चढवले आणि घराबाहेर पडलो. पहाटे रस्त्यावरून जातांना एसी चा आवाज येत होता. आता दुबईत हे अजून एक विशेष. हर खोली गणीक एक एसी. त्या सर्व एसी चा आवाज एकमेकांत मिसळून कसलातरी मोठ्या वादळा सारखा भासत होता. थोडेसे पुढे आल्यावर कचरा कुंडीवर दोन मांजरे पेंगळून पडली होती. गल्ली ओलांडून थोडसं पुढे गेल्यावर मेन रस्ता. तिथे मात्र गडबड वाटली. सकाळी बांधकामाच्या कामावर जाणारे कामगार हातात हेलमेट व पिशवीत काहीतरी वगैरे घेऊन निघाली होती. त्यात पाकिस्तानी लोक जास्त. एवढ्या पहाटेही एखाददुसरी गाडी सिग्नलवर थांबत होती. हे फारच थोर. म्हणजे आपल्या पुण्या मुंबईत एकतर असल्या भल्या पहाटे कोन सिग्नलवर थांबतो वगैरे. मग मी खरोखरच पार्कला पळत दोन फेऱ्या मारल्या. हवा फारच छान होती. घरी आल्यावर फारच फ्रेश वाटले.

मग सहा वाजता आक्कासाहेब उठल्या. तसे त्यांना रोज बळजबरीने उठवावे लागते. मग अंघोळ करेपर्यंत इकडून चहा नाष्टा बनवून तयार होता.  इकडची स्वारी म्हणजे देवाने दिलेली मोठी देणगी. असो. आज टिफीनला बिस्कीटं होती त्यामुळे आक्कासाहेब फार खुश. आवरून आम्ही दोघेही निघालोत. आक्कासाहेबांनी इकडे निघतांना हात जोडून नमस्कार केला. खाली गेल्यावर आक्कासाहेबांची बेबी फिंगर  बस आली ( आपल्या इंग्रजीत मीनी स्कूल बस ). मला बाय बाय वगैरे बोबड्या बोलात करून त्या खाडीत बसल्या. मग मी मेट्रो अन मेट्रोतून ऑफीसात आलो.

आज दिवसभर कामाचा ताप. ऑफीसामधल्या त्या भंकस मिटींगा म्हणजे नुसता वैताग. म्हणजे काय तर एक डिपार्टमेन्ट दुसर्‍या डिपार्टमेन्टवर चिखलफेक वगैरे. मग ते फिल्टर कसे बसवायचे. त्यात छिद्र पाडून तो प्रोब की काय कसा घालायचा. यावर थोर इंजिनियरची संभाषणे. आपण नूसतच मान डोलवत त्यांचे चेहरे पहात बसलो. त्यांच्यात मी माझ्या कथेसाठी कोणी नायक मिळतो काय? आणि मिळाला तर त्याचे संवाद हे असेच लिहायचे वगैरे या विचारात मी मिटींग घालवली. वाळवंटात झरा सापडवा तशी ही ऑर्डर मिळाली. तहानलेली सगळीच यावर तुटून पडली. आपण सूम मध्ये. कारण हे काम म्हणजे किस झाड की पत्ती वगैरे.

साडे पाच वाजले. आपण वेळेला फार प्रामाणिक. एक मिनिट उशीर झाल्याला चालत नाही. मग मेट्रोने घरी. घरी आल्यावर परत जाॅगींग. सकाळी भेटलेल्या मांजरी ताज्या तवाण्या होऊन कचारा कुंडीवर मस्तपैकी बसून येणार्‍या जाणार्‍या लोकांकडे पहात होत्या. मी मग पार्कला फेर्‍या वगैरे मारल्या. घरी आल्यावर आक्कासाहेब त्यांच्या इंग्रजी कम मराठी असल्या कसल्यातरी भाषेत आज शाळेत घडलेले प्रसंग सांगत होत्या. 

~ गणेश
(१२.१०.२०१६)