बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

कविता : सुपरनोव्हा



एकत्र येतात अणुरेणू तेंव्हा
या ब्रह्मांडात जन्मतात
सजीव आणि निर्जीव
जन्मतात ग्रह-तारे, उपग्रह, उल्का
माणसं, पशुपक्षी, झाडं-वेली
आणि दगडधोंडे सुद्धा!

जन्मतात म्हणजे एकदिवस मरतातही
कारण
प्रत्येकजण जन्मतो तो मरण्यासाठीच.....

नारायणा!
काही अब्ज वर्षांपूर्वी
तुही असाच जन्मलास या आकाशगंगेच्या उदरात
याच अणुरेणूंच्या पुंजक्यातून
आणि
तुझ्या भोवताली परिक्रमा करणाऱ्या
धुळ-वायूंच्या शिल्लक ढगांतून
तू जन्माला घातलीस
ही सृष्टी आणि हे सौरमंडळ

नारायणा!
तूच निर्मिलीस पंचमहाभूते,
जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी
तूच काठोकाठ भरलेस हे सप्त सागर
तूच हिमाच्छादित केलीस ही उंच गिरीशिखरे
अरे!
हे संपूर्ण चराचर म्हणजे तुझाच तर अंश आहे.....
नाही का?

नारायणा!
आम्ही जेंव्हा आईच्या उदरातून
अणुरेणूंचे गोळे होऊन बाहेर आलो
तेंव्हा तूच कोंबलास आमच्या नाकातून श्वास
आणि तेवत ठेवलेस हे प्राण
तुझ्याच प्रकाश संश्लेषणात बनलेल्या अन्नातून
आम्ही मिळविली जगण्यासाठी लागणारी जीवनसत्वे

नारायणा!
लहानाचे मोठे होत असताना
खेळलो याच अणुरेणूंच्या दगड मातीत
पुढे शिकलो मोठे झालो
तेव्हा वाढत गेली आमची महत्वाकांक्षा
म्हणून
जमा करत बसलो तुझीच मुलद्रव्ये
साठवले अमाप कागदी गठ्ठे
आणि आता म्हणतोयस की,
तुझं आयुष्य संपत चाललंय
अरे!
मग या आमच्या सगळ्या संचयाचे ढिगारे
आम्ही कुणाच्या हवाली करायचे?

नारायणा!
तू म्हणे, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात
फुगत जाशील राक्षसा सारखा
गिळत सुटशील तुझ्या चिल्या-पिल्याना
आणि
तुला जन्म देणारेच अणुरेणू करतील उठाव
तेंव्हा तू क्षणार्धात फुटशील फुग्यासारखा
तुझ्या सुपरनोव्हा मधून निघणाऱ्या ज्वाळातून
तू बेचिराख करशील ह्या सृष्टीतले सगळे अणुरेणू,
त्यात असतील आमच्या संचयाचे ढिगारे देखील
मग आमचा हा मुलद्रव्यांचा अट्टाहास कशासाठी?
.....
(फोटो सौजन्य : नासा)