इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

कुणबी नोंद कशी शोधावी?

सर्वांनी कुणबी नोंदी शोधणे सुरु करा. शोधा म्हणजे सापडेल. कुणबी नोंदी कुठे मिळतील याबाबत काही माहिती.

१. सर्वात आधी आपल्या शेताचे आज जे गट नंबर आहेत त्यांना आधी सर्वे नंबर होते ते शोधा. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातून ९(३)९(४) मिळवा.  मिळालेल्या सर्वे नंबर ची हक्क नोंदणी ( याला मराठवाड्यात खासरा म्हणतात)  रेकॉर्ड रूम , तहसील कार्यालय येथुन मिळावा. यावर कुठे कुणबी नोंद आहे का पहा. ही पाने सविस्तर वाचा. अधिक माहिती xyz पानावर असेही तिथे नोंद असते.
२. भूमी अभिलेख कार्यालयातून नमुना ३३ व ३४ मागवा.  यातही अनेक कुणबी नोंदी मिळत आहेत.
३. जन्म मृत्यू नोंदी कोटवार बुकात(गाव नमुना नंबर 14) असतात त्या पाहाव्यात.(रेकॉर्ड रूम,तहसील)
४. पीक पेरे जुने यात अनेक नोंदी कुणबी मिळत आहेत. (रेकॉर्ड रूम,तहसील)
५. पोलीस स्टेशन मधील नोंदी जर एखाद्या प्रसंगात कोणी जेल मध्ये गेला असेल वा गुन्हा नोंद असेल.
६. शिक्षण विभागात जुन्या मराठी शाळेत पूर्वजांचे दस्त तपासा त्याचे नक्कल मिळावा.

शासन शोधत आहेच पण आपल्या पूर्वजांच्या लिंक्स आपल्याला जास्त माहिती आहेत.

मुख्यतः शेती , जन्म मृत्यू , भूमी अभेलेख, शिक्षण/शाळा येथे या कुणबी नोंदी मिळत आहेत. कृपया सर्वानि शोधा . 

१ कुणबी नोंद २० ते ३० लोकांना आरामात certificate देऊन जाईल.

सर्वांचे पूर्वज पाहिले शेतीच करत होते. त्यामुळे १००% नोंदी कुणबी मिळणार आहेत. मनापासून शोधा.

सुरुवात शेती पासून करा.
आज जे गट नंबर आहेत त्याला आधी सर्वे नंबर होते ते मिळवा. त्याआधारे पीक पेरा व हक्क नोंदणी पाहिल्यान्दा शोधा. बरकाईने वाचा. 

ज्यांनी शेती विकली आहे. त्यांनी सुद्धा त्या शेतीचे जुने दस्त वरीलप्रमाणे शोधायचे आहे. आपले पूर्वज कुणबी होते फक्त एवढं सिद्द करायचे आहे. ती शेती आज रोजी आपल्याकडे नसेल किंवा आपण भूमिहीन झाला असल तरीही. 

*यासाठी सर्वांनी पाहिलं पाऊल - भूमी अभेलेख कार्यालयातून आपल्या गटाचा ९(३)९(४) काढा. त्यावर सर्वे नंबर आहे. नंतर या सर्वे नंबर चे सर्व दस्त आपण तपासायचे आहेत. जसे की खासरा(हक्क नांदणी) , पिक पेरा.
*प्लस नमुना ३३ व ३४ भूमी अभिलेख मधून.  येथे शक्यता जास्त आहे.*

कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे?

 कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील/चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/आत्या, खापर पणजोबांचे चुलते/आत्या यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

जातीचा पुरावा मिळवण्यासाठी काय कराल?

रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा.

स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासा, त्या नोंदी मिळवा.

आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी(६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे.

भूमि अभिलेख कार्यालयातील फॉर्म न. 33 व 34 वरील नोंदी तपासाव्यात, यातही सर्वत्र कुणबी नोंदी आढळून येतात .

रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.

रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल.

सभार : मराठा क्रांती मोर्चा, फेसबुक पेज

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

वाकाटक राजा पृथ्वीसेन द्वितीयच्या राजमुद्रेचा शोध


महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक राजवंशापैकी वाकाटक हे महत्त्वाचे राजघराने आहे. आजही या घराण्याचा इतिहास तितकासा परिचित नाही. ज्या काही ठोस पुराव्याच्या आधारावर वाकाटक राजघराण्याचा इतिहास परिचित आहे ती साधने म्हणजे काही ताम्रपट, शिलालेख, नाणी आणि धार्मिक ग्रंथातील उल्लेख इत्यादी. नवीन सापडलेल्या पुराव्यांच्या आधारावर या राजघराण्यावर सखोल संशोधन, अभ्यास आणि इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची आवश्यकता आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अलिकडेच वाकाटक राजघराण्यातील शेवटचा राजा "पृथ्वीसेन द्वितीय" ची तांब्याची राजमुद्रा सापडली आहे. ही राजमुद्रा गोजोली गावातील प्रकाश उराडे यांनी व्यवस्थित जतन करून ठेवली होती. प्रकाश उराडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रंजित उराडे याने वडीलांची जुनी पेटी उघडली असता, त्यांना त्यात काही नाणी व तांब्याची नाण्यासारखी दिसणारी वस्तू आढळली. या तांब्याच्या गोल वस्तूवर काहीतरी लिहीलेले होते. रंजित यांनी कुतूहलापोटी याची अधिक माहीती घेतली असता इतिहास अभ्यासकांना ही वस्तू म्हणजे दुसरी तिसरी काही नसून ती वाकाटक राजा पृथ्वीसेन द्वितीय याची राजमुद्रा असल्याचे समजले. या राजमुद्रेमुळे वाकाटक राजघराण्याचा खूप मोठा इतिहासावर उजेड पडला आहे.

तांब्याच्या धातूपासून बनवलेली ही राजमुद्रा गोलाकार असून ती साधारण ६० ग्रॅम वजनाची आहे. या राजमुद्रेच्या सर्वात वरच्या भागावर बौद्ध देवता तारा (किंवा राज्यलक्ष्मी) हिचे चित्र आणि त्याखाली ब्रह्मी लिपीत (मध्यप्रदेशी लिपीत) आणि संस्कृत भाषेतील चार ओळींचा लेख कोरलेला आहे. लेख आणि देवतेची प्रतिमा ही उलटी कोरलेली आहे (Mirror Image). याचाच अर्थ या राजमुद्रेचा उपयोग राजआज्ञा, महत्त्वाचे आदेश साक्षांकित करण्यासाठी केला जात असे. या राजमुद्रेच्या मधोमध छिद्र असून तिथे कदाचित या राजमुद्रेला पकडण्यासाठी मुठ बसवण्याची व्यवस्था केलेली असण्याची शक्यता आहे. आणि कालांतराने ती मुठ विलग झाली असावी. या राजमुद्रेवरील लेखाचे देवनागरी लीप्यंतर पुढील प्रमाणे

"नरेन्द्रसेन - सत्सुनौ:
भुर्तरव्वाकाटक श्रीयः
प्रिथिविषेननृपते
जिगिशौर्ज्जयशासनं"


अर्थ : "नरेंद्रसेण याचा पुत्र पृथ्वीसेन याची ही राजमुद्रा"

या मुद्रेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या विनंतीवरून रंजित उराडे यांनी उदार मनाने ही राजमुद्रा नागपूर मध्यवर्ती संग्रहालयास दान केली आहे. लवकरच हा ठेवा इतिहास प्रेमी अभ्यासकांसाठी उपलब्ध होईल.

पृथ्वीसेन द्वितीय चा कालखंड हा इ. स. ४७५ ते इ. स. ४९५ असा होता. अलिकडच्या काळात सापडलेली ही वाकाटक राजघराण्यातील दुसरी राजमुद्रा आहे. याआधी नंदीवर्धन येथील उत्खननात राणी प्रभावतीगुप्त हिची राजमुद्रा सापडली होती.

बुधवार, १४ जून, २०१७

सम्राट अशोक चरित्र (लेखक: वासुदेव गोविंद आपटे)


सम्राट अशोक चरित्र
लेखक: वासुदेव गोविंद आपटे
विस्तार : प्र. रा. अहिरराव
सुधारीत आवृत्ती : डिसेंबर २००२
प्रकाशक : वरदा बुक्स
किंमत : २५० रु

भारताच्या राजमुद्रेवर, नाण्यांवर किंवा चलणी नोटांवर आपण अशोकस्तंभ रोज पाहतो. भारताच्या राष्ट्रध्वजावरही अशोक चक्र उमटलेले आपण पाहतो. पण ही जी प्रतिकं ज्या राजाची आहेत तो सम्राट अशोक राजा नक्की कोण होता?

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी या भारतभूमीवर आपले अधिपत्य निर्माण करणारा इतिहासात अतिउच्च स्थान असलेला असा "सम्राट अशोक" नावाचा राजा होऊन गेला. त्याने न केवळ सर्व भारतखंडावर राज्य केले, तर येथील जनतेला धर्मज्ञान, सदाचार व भूतदया यांची शिवकण दिली. प्रजेने त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा धरून तसा प्रयत्न आयुष्यभर केला. अशा या महान सम्राट अशोकाची माहिती आपल्याला वासुदेव गोविंद आपटे लिखीत "सम्राट अशोक चरित्र" हा ग्रंथातून सविस्तरपणे मिळते. लेखकाने पुराणे किंवा दंतकथा यावर विसंबून न राहता आत्तापर्यंत मिळालेल्या अशोकाच्या शिलालेखांचा योग्यप्रकारे अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीने हे चरित्र लिहिले आहे.

पार्श्वभूमी :

वासुदेव गोविंद आपटे यांनी इ स १८९८ मध्ये सम्राट अशोक याच्या चरित्राची रूपरेखा लिहून 'ग्रंथमाला' मासिकाद्वारे प्रकाशित केली होती. त्याकाळी सम्राट अशोकाच्या चरित्राबाबत फार कमी साधने उपलब्ध होती. इंग्रजी भाषेतही तेंव्हा अशोकाचे एकही चरित्र लिहीले गेले नव्हते. आपटे यांनी सुरूवातीला लिहीलेल्या या चरित्रात अशोकाच्या काही दंतकथा, अशोकाच्या काही लेखांचा सारांश, व त्यावरून अशोकाचा स्वभाव, वर्तन, राज्यव्यवस्था, धर्मपरायणता, तत्कालीन समाजस्थिती इत्यादी गोष्टींच्या संबंधाने काढलेली अनुमाने याचाच समावेश होता. परंतु अशा तर्हेचा मराठीत केलेला सामान्य प्रयत्न सुद्धा अपूर्व वाटावा असा तो काळ होता. त्यावेळच्या ग्रेटप्रायमर टाइपाचें ८८ पृष्ठांचा हा चरित्र ग्रंथ तयार झाला. तत्कालीन अनेक प्रख्यात मराठी वृत्तपत्रांतून व मासिकांतून या चरित्र ग्रंथाविषयी प्रशंसापर लेख प्रसिद्ध झाले होते. या ग्रंथाचा तेंव्हा हिंदी, उर्दू आणि गुजराती भाषांत अनुवादही करण्यात आला होता.

कालांतराने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अशोकासंबंधाचे कितीतरी नवीन शोध लागले. अशोकाच्या स्तंभ व गिरीलेखांची पाश्चात्य व भारतीय पंडितांनी केलेली चिकित्सा ग्रंथाच्या रूपाने वाचकांना उपलब्ध झाली. विन्सेंट स्मित या जगप्रसिध्द इतिहासकाराचे इंग्रजी भाषेत अशोकाचे चरित्र लिहील्याने अनेकांना याचा फायदा झाला. वासुदेव गोविंद आपटे यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहीलेल्या मराठीतील पहिल्या सम्राट अशोक चरित्राला श्री प्र. रा. अहिरराव यांनी आधुनिक संशोधनाच्या माध्यमातून परिपूर्ण विकसित केले. त्याची सुधारीत आवृत्ती डिसेंबर २००२ ला वरदा बुक्सच्या माध्यमातून प्रसारित केली.

अशोक पुर्वीचा काळ :
अशोककालीन काही स्थळांचा उल्लेख वायुपुराण, विष्णूपुराण आणि भिष्मपुराण यामध्ये आढळतो. पुराणकारांनी अशोकाच्या मौर्य घराण्याची वंशावळ दिली आहे पण त्यात एकवाक्यता नाही. मौर्य घराण्याचा उदय होण्यापूर्वी मगधावर अनेक घराण्यांनी राज्य केले. मौर्यांची मगधवर सत्ता स्थापन होण्याच्या आधी महापद्मनंद हा नंद वंशाचा राजा राज्य करत होता. याच्याच कारकिर्दीत इतिहास प्रसिध्द जगज्जेता अलेक्झांडर ऊर्फ सिंकदर याची भारतावर स्वारी आली होती. पण अलेक्झांडर पंजाबची हद्द ओलांडून खाली न आल्याने त्याचा व महापद्मनंद याचा मुकाबला झालाच नाही. महापद्मनंद हा मोठा शूर व पराक्रमी, पण तितकाच लोभी व निर्दय राजा होता. नंदवंशाचा उच्छेद चंद्रगुप्त मौर्य याने ब्राह्मण मुत्सद्दी कौटिल्य अथवा चाणक्य याच्या साह्याने करून मगधावर इ.स. पुर्व ३३२ साली आपली सत्ता स्थापण केली. पुराण कथेप्रमाने चंद्रगुप्त हा मुरा नावाच्या दासीचा पुत्र होता म्हणून त्याच्या वंशास मौर्य हे नाव पडले. मौर्य सत्तेचा संस्थापक चंद्रगुप्त हा अशोकाचा अजोबा होता.

चंद्रगुप्त मौर्य चा काळ :
ग्रीक राजा अलेक्झांडर याच्या मृत्यूनंतर त्याच्या सम्राज्याचे विभाजन होऊन मध्य अशिया, अफगाणिस्तान येथे ग्रीकांची सत्ता कायम राहीली. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचा सेनापती सेल्सूकस निकेटर हा मध्य अशियातील बॅक्ट्रियाचा सम्राट बनला. त्याने आपला राज्यविस्तार करण्यासाठी भारतावर आक्रमण केले. त्याचा चंद्रगुप्त मौर्य ने दारून पराभव केला. त्याला चंद्रगुप्तशी तह करावा लागला. या तहानुसार त्याला पाचशे हत्ती, काबूल, हिराम व कंदाहर हे तीन प्रांत आणि आपली कन्या चंद्रगुप्तला द्यावे असे ठरले. या तहानंतर सेल्युकस ने मेगॅस्थनीजला पाटलीपुत्र येथे वकील म्हणून पाठवले. मेगॅस्थनीजने आपल्या सहा वर्षांच्या काळात भारताची भौगोलिक, सामाजिक व धार्मिक स्थिती यावर बरीच माहिती आपल्या "इंडिका" या ग्रंथात लिहून ठेवल्याने त्याचा उपयोग इतिहासकारांना झाला आहे.
  चंद्रगुप्तने आपल्या २४ वर्षांच्या शासन काळात मगध राज्याला फार वैभवशाली बनवले. अनेक परदेशी राज्यांपर्यंत मगधाच्या ऐश्वर्याची चर्चा होत असे. विविध देशातील राजांनी आपले वकिल मधग राज्यात ठेवले होते. मगधची राजधानी पाटलिपुत्र ही एक संपन्न आणि वैभवशाली अशी नगरी होती. हिची लांबी ५ कोस व रूंदी सुमारे २ कोस होती. तिच्या भोवती मजबूत तट व तटाभोवती खंदक होते. तटाची भिंत ४०० हात रूंद व ३०० हात उंच होती. तटात ५७० बुरूंज व ६४ दरवाजे होते. पाटलिपुत्र शहराची लोकसंख्या ४ लाख होती. राज्याच्या रक्षणासाठी ६० हजार पायदळ, ३० हजार घोडेस्वार व ८ हजार हत्ती होते. याशिवाय युद्धाच्या कामी उपयुक्त अशी ६ लाख खडी फौज होती.

चंद्रगुप्ताने मोठ्या हुशारीने सर्वांवर दबदबा ठेऊन राज्य केले. जैन ग्रंथातील उल्लेखानुसार चंद्रगुप्तने शेवटी जैन धर्माचा स्वीकार केला. आपला पुत्र बिंदुसार याच्याकडे सत्ता सोपवून तो जैन साधु होऊन दक्षीणेकडे निघून गेला.

सम्राट बिंदुसारचा कालखंड :
सम्राट बिंदुसारचे इतिहासात फारसे उल्लेख सापडत नाहीत. ग्रीक इतिहास ग्रंथात बिंदुसारचा उल्लेख अमित्रघात असा आढळतो. परंतु हिंदुचे विष्णूपुराण, बोद्धांचा महावंश ग्रंथ आणि जैनांचा परिशिष्टपर्व ग्रंथ यातून चंद्रगुप्तच्या मुलाचे नाव बिंदुसार हेच आढळते.

बिंदुसारने चंद्रगुप्तच्या वेळेचे राज्यकारभाराचे धोरण चालू ठेऊन देशात शांतता राहील असे प्रयत्न केले. चंद्रगुप्ताने जो ग्रीक राजांशी स्नेहसंबंध जोडला तो बिंदुसारनेही चालू ठेवला.  बिंदुसारच्या पदरी खल्लटक आणि राधागुप्त नावाचे दोन हुशार मंत्री होते. २५ वर्षे राज्य केल्यानंतर इ.स. पुर्व २७३ साली त्याचा मृत्यु झाला.

अशोकाचे राज्यारोहन :
बौद्ध धर्म ग्रंथातून अशोकाच्या संबंधी अनेक दंतकथा रूढ आहेत. त्यानुसार तो स्वभावाने अत्यंत क्रूर व दुष्ट होता. राज्य मिळवण्यासाठी त्याने आपल्या ९९ भावंडांना ठार मारले व क्षुल्लक कारणांवरून आपल्या राण्यांचा शिरच्छेद केला असा उल्लेख आढळतो. परंतु विन्सेंट स्मित व इतर मान्यवर इतिहासकारांनी हे विधान चुकीचे ठरवले आहे. अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याचे जे साधुत्वाचे वर्तन त्याच्या चरित्रातून दिसून येते ते बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे घडलेले परिवर्तन होय आणि असे परिवर्तन घडवून आणण्याची अलौकिक शक्ती त्या धर्माच्या ठायी आहे हे लोकांच्या डोळ्यात भरावे म्हणून अशोकाच्या पुर्वायुष्यावर बौद्ध ग्रंथकारांनी काजळ फासले असावे.

अशोकने संम्राट होण्यापूर्वी तक्षशिला व उज्जेन येथे राजप्रतिनिधी म्हणून खूप चांगले काम केले होते. तेथिल बंड त्याने कुठलाच रक्तपात न करता मोडून काढले होते. त्या मानाने त्याचा मोठा भाऊ सुशीम हा फार क्रुर व दुष्ट होता. या दोघांत सम्राट बिंदुसारच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी युद्ध झाले असणार आणि त्यात सुशीमचा मृत्यू होऊन अशोक मगधचा सम्राट झाला ही शक्यता अनेक इतिहासकारांनी मान्य केली आहे.

कलिंग विजय :
कलिंग विजय ही प्राचीन भारताच्या इतिहासातली फार मोठी घटना आहे. या युद्धामुळे प्राचीन भारतीय इतिहासात फार दूरगामी परीणाम झाल्याचे दिसतात. कलिंग राज्य भारताच्या पूर्वेला ओरीसा राज्याच्या जवळपास होते. या युद्धामुळे अशोकाच्या चरित्राचा प्रवाह बदलून तो एक विस्तारवादी राजा ते धर्मिक व मानवतावादी राजा बनला. कलिंग सारखे प्रचंड राज्य काबीज केले म्हणजे आपल्या पुर्वजांनी आरंभिलेला भारतदिग्विजय पुर्ण होईल या लालसेने त्याने या देशावर आक्रमण केले असावे. कलिंग युद्ध अशोकाच्या राज्यारोहणापासून १३ व्या वर्षी म्हणजे इ. स. पुर्व २६१ ला घडले.

अशोकाने स्वतःच या प्रसंगाचा उल्लेख आपल्या १३ व्या गिरीलेखात विस्ताराने केला आहे. त्यात म्हटले आहे की देवांचा प्रिय राजा याने राज्याभिषेकाला आठ वर्षे होऊन गेल्यावर कलिंग देश जिंकला. तेंव्हा दीड लक्ष लोक कैद करण्यात आले, एक लक्ष लोकांना मारण्यात आले, आणि या संख्येच्या अनेक पट लोक युद्धामुळे धान्यचंटाई, महामारी किंवा साथीच्या रोगांनी बळी पडले. इतकी प्राणहानी आपली विजयप्राप्तीची आकांक्षा व साम्राज्यविस्ताराची हाव यांच्यामुळे घडून आली. हे पाहुन अशोकाच्या मनाला घोर पश्चात्ताप झाला आणि तेंव्हापासून त्याने निश्चय केला की हिंसाचाराचा मार्ग यानंतर कधीच अवलंबायचा नाही.

बौद्ध धर्माचा स्वीकार :
कलिंगविजयाच्या वेळी झालेल्या भयंकर प्राणहानीमुळे झालेल्या पापापासून प्रायश्चित्त घेण्यासाठी व अंतःकरणाला शांती देण्यासाठी भूतदयाप्रधान बौद्ध धर्म योग्य असल्याने तो अशोकाने स्वीकारला असावा. अशोकाच्या वेळी बौद्धधर्म त्याच्या शुद्ध स्वरूपात होता. आणि निरनिराळ्या धर्मप्रचारकांकडून तो उपदेशिला जात होता. मगध राज्यात असा कुठलाच प्रदेश नव्हता तिथे बौद्धभिक्षूंचा व धर्मप्रचारकांचा प्रवेश झाला नव्हता. बौद्धधर्म स्विकारल्यानंतर अशोकाने अनेक ठिकाणी तर्थयात्रा केली.
अशोकाचे शिलालेख :

सम्राट अशोकाच्या संबंधीत जी विश्वसनीय इतिहास सामग्री उपलब्ध झाली आहे ती मुख्यत्वे त्याचे विशाल गिरीलेख, लघु गिरीलेख, विशाल स्तंभलेख, लघु स्तंभलेख आणि गुंफा लेख  अशा पाच प्रकारच्या शिलालेखतून मिळते.

शिलालेखांची भाषा आणि लिपी :
सम्राट अशोकाने सगळे लेख रस्त्याने जाणा-या येणा-या लोकांना कळावेत म्हणून मुद्दामहून महत्वाच्या मार्गांवर कोरले आहे. सर्व लेखांची भाषा सुटसुटीत व सोपी असून ते प्रादेशिक लिपीत लिहीले गेले आहेत. अशोकाचे लेख हे सामान्यपणे प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत कोरलेले आढळतात परंतु भारताच्या वायव्य भागात आढळलेले लेख आरमाइक भाषेत व खरोष्ठी लिपीत आढळतात. अफगाणिस्तानात ते आरमाइक व ग्रीक भाषांमध्ये कोरलेले आहेत. ब्राह्मी लिपी ही देवनागरी लिपीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहीली जाते. तर खरोष्ठी लिपी पारशी-अरबी लिपीप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते.

या लेखांवरून असा अंदाज लावता येतो की त्या काळी प्राकृत भाषा ही भारतात मोठ्या प्रमाणावर बोलली जात होती व भारत खंडातील सर्व भाषा या ब्राह्मी लिपीतून लिहीण्याचा प्रघात होता. 

अशोकाचे चौदा गिरीलेख ऊर्फ आदेश :

अशोकाच्या सर्व लेखात त्याच्या चौदा गिरीलेख किंवा आदेशांचे विशेष महत्त्व आहे. हे चौदा आदेश आठ वेगवेगळ्या ठिकाणी विखूरलेले आहेत. त्यात धौली, शाहबाजगढी, मानसेहरा, कालसी, जौगढ, सोपरा, एरागुडी आणि गिरनार या ठिकाणांचा समावेश होतो. प्रत्येक लेखात काही ना काही महत्वाचा विषय आला आहे व त्यावरून अशोकाचा स्वभाव, त्याची धर्ममते, राज्यव्यवस्था, तत्कालीन समाजस्थिती इत्यादी गोष्टींवर महत्वाचा प्रकाश पडला आहे.

अशोकाच्या सर्व शिलालेखांचे मराठीत भाषांतर लेखकाने या ग्रंथात दिल्याने हा ग्रंथ इतिहास अभ्यासकांसाठी फार मोल्यवान ठरला आहे.

अशोकाचे चौदा आदेश व त्यांचे विषय

आदेश १ : प्राण्यांच्या बळी देण्याच्या प्रथेला विरोध
आदेश २ : मनुष्य व प्राणी यांच्या चिकीत्सालयाची निर्मिती
आदेश ३ : राज्यातील सर्व वरिष्ठ राजुक अधिका-यांना प्रत्येक पाच पाच वर्षांनी धर्म प्रचारासाठी दौरे काढण्याचा आदेश.
आदेश ४ : लोकांत धर्माचरण वाढल्याचे समाधान व ते आणखी वाढण्यासाठी राजाची वचनबद्धता व्यक्त
आदेश ५ : राज्यात धर्ममहामात्रांची नियुक्ती. या पाचव्या आदेशात राष्ट्रीक व प्रतिष्ठानिक असे शब्द आले असून ते अनुक्रमे महाराष्ट्र व प्रतिष्ठान किंवा पैठण यांचा उल्लेख आहे.
आदेश ६ : राजा म्हणून प्रजेची कामे सर्व ठिकाणी करत राहीन. या आदेशात अशोकाची प्रजेच्या हिताची तळमळ व स्वतःच्या सुखाचा त्याग करण्याची तयारी यागोष्टी दर्शविल्या आहेत.
आदेश ७ : सर्व संप्रदायांनी एकत्र राहावे
आदेश ८ : तिर्थ यात्रेचे वर्णन
आदेश ९ : धर्मकृत्ये आणि मंगलकृत्ये याचे वर्णन
आदेश १० : राजा व उच्च अधिकारी नेहमी प्रजेच्या हितासाठी दक्ष राहतील
आदेश ११: धम्म आणि धर्म याची व्याख्या
आदेश १२ : स्रीधर्ममहामात्रांची नियुक्ती. सर्व संप्रदायांनी परस्परांशी मित्रत्वाने वागावे
आदेश १३ : कलिंग युद्धाचे व झालेल्या हाणीचे वर्णन. अशोकाचे मन परिवर्तन घडवून आल्याचे या आदेशावरून स्पष्ट होते.
आदेश १४ : धार्मिक जीवन जगण्याची प्रेरणा. हा शेवटचा आदेश उपसंहाराच्या स्वरूपाचा आहे.

अशोकाचे स्तंभलेख :
अशोकाचे स्तंभलेख दिल्ली - तोपरा, मीरत, अलाहाबाद, सारनाथ, सांंची, कंधार अफगाणिस्तान, अमरावती या ठिकाणी मिळून एकंदर सात आहेत. हे लेख नुसत्या अधिका-यांनाच उद्देशून लिहिलेले नसून एकंदरीत प्रजेला उद्देशून आहेत, व त्यात राज्यशासनाची तत्वे, धर्माचरण, आत्मपरीक्षण, हितसंबंधाचे नियम, धर्मानुराग, धर्मप्रचार्थ योजना इत्यादी भिन्न भिन्न विषय आलेले आहेत.

शिलालेखांचे ऐतिहासिक महत्त्व :
अशोकाचे शिलालेख हे अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची अशी साधने आहेत. ज्या ज्या ठिकाणी हे आलेख सापडले त्यावरुन मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे शक्य होते. अशोकाच्या कारकिर्दीत झालेल्या कलिंगच्या युद्धाची माहिती त्याच्याच कलिंग आलेखातून मिळते. अशोकाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम निश्चित करण्यासाठी या आलेखांची मदत झाली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचा पुरावा यामधून मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी, अशोक कर्मठ नव्हता तसेच आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा अशोकाने कधीच प्रयत्न केला नसल्याचेही या आलेखांतून स्पष्ट होते. परदेशात बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी अशोकाने बौद्ध भिक्षूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखांतून मिळतो.

अशोक कालीन राज्यव्यवस्था व समाजस्थिती :
मगध हे भव्य राज्य होते. त्यावेळच्या मगध राज्यात आत्ताचा बहुतांश भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या यांचा समावेश होता. २५०० वर्षापूर्वी एवढ्या मोठ्या साम्राजाची व्यवस्था ठेवणे किती कठीण काम असेल याची कल्पनाच न केलेली बरी. मगध राज्याचे पाच वेगवेगळ्या प्रांतात विभाजन करण्यात आले होते. हे प्रांत म्हणजे मगध, तक्षशिला, सुवर्णगिरी, उज्जेन आणि तोसली. मगध प्रांताचा कारभार राजा स्वतः पाही तर इतर प्रांतावर राजकुमारांची प्रांतपाल किंवा सुभेदार म्हणून नेमणूक करण्यात येई. चंद्रगुप्त मौर्यचा पंतप्रधान चाणक्याने घालून दिलेल्या नियमानुसारच अशोकाची राज्य पद्धती होती. राज्यकारभार पाहण्यासाठी वेगवेगळे विभाग व आधिकारी होते. अशोकाने नवीन आधिका-यांच्या नियुक्त्या केल्याचा उल्लेख त्याच्या लेखात आला आहे. अशोकाच्या कारकिर्दीत कुठे त्याच्या राज्यात उठाव व बंड झाल्याने आढळून येत नाही. यावरून त्याची संपूर्ण मगध राज्यावर मजबूत पकड होती असे दिसते. एकुणच अशोकाच्या काळी समाजात सुबत्ता होती. उत्कृष्ट न्यायदान अधिकारी तत्पर आधिकारीवर्ग यामुळे राज्यकारभारही चांगल्याप्रकारे होत होता.

त्याकाळी मगध राज्य हे शिक्षण व्यवस्थेसाठी फार प्रसिद्ध होते. तक्षशिला आणि नालंदा या विद्यापीठातून उत्कृष्ट शिक्षण दिले जात होते. या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी विदेशातून विद्यार्थी येत होते, असे उल्लेख सापडतात. संस्कृत भाषा, पाली भाषा, तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि धर्मशास्र यासारख्या विविध विषयात शिक्षण दिले जात होते.

या ग्रंथात तिस-या धर्मपरीषदेची ही सविस्तर माहीती देण्यात आली आहे. त्याच बरोबर अशोक कालिक स्थापत्यकला यांचीही माहिती विस्ताराने दिली आहे. सम्राट अशोकासंबंधी प्रचलित असलेल्या विविध धर्म ग्रंथातील दंतकथाही देण्यात आल्या आहेत. अशोकाचा मृत्यू व त्यानंतरच्या कालखंडावर लेखकाने बरीच माहीती दिली आहे.

एकूणच हा ग्रंथ प्राचीन इतिहास अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त व संग्राह्य असा बहुमोल ग्रंथ आहे.

~ © गणेश भाऊसाहेब पोटफोडे