बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

कुणबी नोंद कशी शोधावी?

सर्वांनी कुणबी नोंदी शोधणे सुरु करा. शोधा म्हणजे सापडेल. कुणबी नोंदी कुठे मिळतील याबाबत काही माहिती.

१. सर्वात आधी आपल्या शेताचे आज जे गट नंबर आहेत त्यांना आधी सर्वे नंबर होते ते शोधा. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातून ९(३)९(४) मिळवा.  मिळालेल्या सर्वे नंबर ची हक्क नोंदणी ( याला मराठवाड्यात खासरा म्हणतात)  रेकॉर्ड रूम , तहसील कार्यालय येथुन मिळावा. यावर कुठे कुणबी नोंद आहे का पहा. ही पाने सविस्तर वाचा. अधिक माहिती xyz पानावर असेही तिथे नोंद असते.
२. भूमी अभिलेख कार्यालयातून नमुना ३३ व ३४ मागवा.  यातही अनेक कुणबी नोंदी मिळत आहेत.
३. जन्म मृत्यू नोंदी कोटवार बुकात(गाव नमुना नंबर 14) असतात त्या पाहाव्यात.(रेकॉर्ड रूम,तहसील)
४. पीक पेरे जुने यात अनेक नोंदी कुणबी मिळत आहेत. (रेकॉर्ड रूम,तहसील)
५. पोलीस स्टेशन मधील नोंदी जर एखाद्या प्रसंगात कोणी जेल मध्ये गेला असेल वा गुन्हा नोंद असेल.
६. शिक्षण विभागात जुन्या मराठी शाळेत पूर्वजांचे दस्त तपासा त्याचे नक्कल मिळावा.

शासन शोधत आहेच पण आपल्या पूर्वजांच्या लिंक्स आपल्याला जास्त माहिती आहेत.

मुख्यतः शेती , जन्म मृत्यू , भूमी अभेलेख, शिक्षण/शाळा येथे या कुणबी नोंदी मिळत आहेत. कृपया सर्वानि शोधा . 

१ कुणबी नोंद २० ते ३० लोकांना आरामात certificate देऊन जाईल.

सर्वांचे पूर्वज पाहिले शेतीच करत होते. त्यामुळे १००% नोंदी कुणबी मिळणार आहेत. मनापासून शोधा.

सुरुवात शेती पासून करा.
आज जे गट नंबर आहेत त्याला आधी सर्वे नंबर होते ते मिळवा. त्याआधारे पीक पेरा व हक्क नोंदणी पाहिल्यान्दा शोधा. बरकाईने वाचा. 

ज्यांनी शेती विकली आहे. त्यांनी सुद्धा त्या शेतीचे जुने दस्त वरीलप्रमाणे शोधायचे आहे. आपले पूर्वज कुणबी होते फक्त एवढं सिद्द करायचे आहे. ती शेती आज रोजी आपल्याकडे नसेल किंवा आपण भूमिहीन झाला असल तरीही. 

*यासाठी सर्वांनी पाहिलं पाऊल - भूमी अभेलेख कार्यालयातून आपल्या गटाचा ९(३)९(४) काढा. त्यावर सर्वे नंबर आहे. नंतर या सर्वे नंबर चे सर्व दस्त आपण तपासायचे आहेत. जसे की खासरा(हक्क नांदणी) , पिक पेरा.
*प्लस नमुना ३३ व ३४ भूमी अभिलेख मधून.  येथे शक्यता जास्त आहे.*

कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे?

 कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील/चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/आत्या, खापर पणजोबांचे चुलते/आत्या यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

जातीचा पुरावा मिळवण्यासाठी काय कराल?

रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा.

स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासा, त्या नोंदी मिळवा.

आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी(६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे.

भूमि अभिलेख कार्यालयातील फॉर्म न. 33 व 34 वरील नोंदी तपासाव्यात, यातही सर्वत्र कुणबी नोंदी आढळून येतात .

रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.

रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल.

सभार : मराठा क्रांती मोर्चा, फेसबुक पेज

सोमवार, २६ जून, २०२३

फुजैरा किल्ला

फुजैरा किल्ला हा युएई मधील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या किल्ल्यापैकी एक मानला जातो. हा किल्ला कोणी व कधी बांधला याबाबत ठोस पुरावा उपलब्ध नाही. पोर्तुगीज कालखंडात सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस हा किल्ला बांधला गेला असावा. हा किल्ला जुन्या फुजैरा शहराच्या मध्यवर्ती भागात अंदाजे २० मीटर उंचीच्या टेकडीवर बांधलेला आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे ६५०० चौरस फूट आहे. किल्ल्याची निर्मितीसाठी दगड-माती या स्थानिक साधनांचा वापर केलेला आढळतो. धाब्याच्या छताला आधार देण्यासाठी खजूर आणि खारफुटीच्या लाकडांचा वापर केलेला आढळतो. किल्ल्याच्या बांधकामानंतर आजूबाजूच्या परिसरात लोकवस्ती निर्माण होऊन जुने फुजैरा शहर वसले असावे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जुन्या फुजैरा शहराचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण शहरा भोवती संरक्षक भिंत बांधलेली होती. हा किल्ला समुद्र किनाऱ्यापासून अंदाजे एक ते दिड किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला सामरीक दृष्ट्या खूप महत्त्वाच्या ठिकाणी बांधलेला होता. किल्ल्यावरून आजूबाजूच्या परिसरावर तसेच फुजैरा बंदर आणि समुद्र किनाऱ्यावर सहज नजर ठेवता येत असे. फुजैरा किल्ल्यावर एकूण चार बुरुंज (Watch Tower) असून, त्यापैकी तीन गोलाकार तर एक चौकोनी आहे. हे सगळे बुरुंग तटबंदीने एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. चौकोनी बुरुंजास मुबारा असे म्हणतात.
पोर्तुगीज हे इराणच्या आखातात राज्यविस्तार आणि व्यापारासाठी येणारी पहिली युरोपियन महासत्ता होती. वास्को द गामाने १४९८ साली आफ्रिका खंडाला वळसा घालून भारतात येण्याचा मार्ग शोधून काढला. त्यानंतर सोळाव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीज सत्तेचा आरबी समुद्रात वावर वाढला. अरबी समुद्रातून होणाऱ्या व्यापारावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी १५०७ साली पोर्तुगीज आरमाराचा नौदलप्रमुख असलेल्या अफोन्सो दे अल्बुकर्क याने होर्मुझ बेट आपल्या ताब्यात घेतले. होर्मुझ बेट इराणच्या आखाताला आणि ओमानच्या आखाताला जोडणाऱ्या एका अरुंद सामुद्रधुनी जवळ स्थित आहे. यालाच होर्मुझची सामुद्रधुनी असेही म्हणतात. होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हे महत्वाचे आणि मोक्याचे ठिकाण पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी अरबी लोकांच्या अधिपत्याखालील असणारी अनेक महत्वाची ठिकाणे काबीज केली. त्यात मस्कत, सोहार, खोरफंक्कन, अल बिदीया, डिब्बा, खासाब, कतिफ आणि बहरीन यांचा समावेश होता. अल बिदीया आणि खोरफंक्कन या शहरांच्या नजीकच दक्षिणेला फुजैरा किल्ला स्थित आहे.

फुजैरा किल्ला हा स्थानिक शेख यांचे अधिकृत निवासस्थान आणि सत्तेचे मुख्य केंद्र होते. या किल्ल्यातील मोकळ्या अंगणाचा उपयोग विविध सण, उत्सव साजरे करण्यासाठी केला जात असे. वेळ प्रसंगी येथे कैद्यांना जाहीर मृत्युदंड देखील दिला जात असे. किल्ल्यात कैद्यांना ठेवण्यासाठी एक छोटे कारागृह देखील होते.

ऐतिहासिक नोंदीनुसार या किल्ल्यावर अनेक आक्रमणे झालेली दिसतात. सन १८०८ साली वहाबी योद्ध्यांनी या किल्ल्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. १८०८ ते १८१० असे जवळपास दोन वर्ष हा किल्ला वहाबी लोकांच्या ताब्यात होता. सन १८१० साली स्थानिक जमातीच्या फौजांनी यावर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर पुढे १९२५ साली गुलामगिरी विरोधात गस्तीवर असतांना राॅयल इंडियन नेव्हीच्या 'एच एम आय एस लाॅरेन्स' (HMIS Lawrence) या युद्ध नौकेने केलेल्या भडीमारात या किल्ल्याचे तीन बुरुंज हे उद्ध्वस्त झाले होते. यावेळी झालेल्या चकमकीत ब्रिटिशांनी तत्कालीन शेख यांच्याकडून १५०० रुपये खंडणी देखील वसूल केला होती. इंग्रजांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेला फुजैरा किल्ला पुढे अनेक वर्ष नादुरुस्त आणि पडक्या स्थिततीतच होता. युएईची स्थापना झाल्यानंतर मात्र या किल्ल्यावरील वावर कमी होऊन त्याची बरीचशी पडझड झाली. फुजैरा राज्याच्या पुरातन वारसा विभागामार्फत इ. स. १९९८ ते २००० दरम्यान या किल्ल्याचा जीर्णोद्धार करून त्याला पुर्वीचे ऐतिहासिक रुप देण्यात आले. हा किल्ला आता फुजैरा शहरातील महत्वाचे पर्यटन केंद्र बनले आहे.

सोमवार, २२ मे, २०२३

सहाम खोऱ्यातील कातळचित्रे (Petroglyphs of Wadi Saham, Fujairah)

 



वादी सहाम कातळचित्रे 

सहाम खोरे अथवा 'वादी सहाम' हे फुजैरा शहरापासून पश्चिमेला असलेल्या हाजार डोंगर रांगेत स्थित आहे. फुजैरा शहरापासून वादी सहामचे अंतर अंदाजे १७ किलोमीटर आहे. वादी सहाम हे आपल्या निसर्गरम्य आणि सोप्या चढाईसाठी युएईतील गिर्यारोहकांचे (Hikers) आवडते ठिकाण आहे. वादी सहामच्या डोंगरा मधून पावसाळ्यात वाहणारा झरा हे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्र असते. जवळपास ४५० मीटर चढाई केल्यानंतर आपल्याला डोंगर माथ्यावर पोहचता येते. मथ्यावरून पुर्वेला असलेल्या फुजैरा शहराचे आणि आरबी समुद्राचे विहंगम दृश्य बघायला मिळते.

वादी सहाम हे जरी निसर्गरम्य चढाईसाठी प्रसिद्ध असले, तरी ते अजुनही एका कारणासाठी अनेकांच्या आवडीचे ठिकाण आहे. आणि ते कारण म्हणजे वादी सहाम येथील प्राचीन कालखंडातील कातळचित्रे (पेट्रोग्लिफ्स/Petroglyphs). वादी सहामचा आजूबाजूच्या परिसरात इ.स. पुर्व १३०० ते इ.स. पुर्व ३०० दरम्यान मानवी वस्ती असल्याच्या खाणाखुणा बघायला मिळतात. वादी सहामच्या पायथ्यालगत एक प्राचीन मार्ग आहे. या मार्गच्या बाजूलाच एका भल्या मोठ्या उभट त्रिकोणी कातळावर अनेक चित्रं रेखाटलेली पाहायला मिळतात. युएईचा प्राचीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी या कातळचित्रांचे विषेश महत्त्व आहे. या कातळचित्रांवरून प्राचीन काळी येथे राहणाऱ्या लोकांविषयी बहुमोल माहिती मिळते. ही कातळचित्रे ताम्र युग आणि लोह युग कालखंडात साकारण्यात आली असावीत, असा संशोधकांचा दावा आहे. फुजैरा अमिरातच्या पुरातत्व विभागच्या माहितीनुसार, फुजैरा राज्यात आजगायत जवळपास ३१ ठिकाणी कातळशिल्पे/कातळचित्रे आढळून आलेली आहेत. त्यात वादी सहाम मधील कातळचित्रांचा समावेश आहे.

वादी सहाम येथील त्रिकोणी कातळाच्या चारही बाजूंनी जवळपास तीस वेगवेगळी चित्रं रेखाटलेली आहेत. काळाच्या ओघात अनेक चित्रं ही आता अस्पष्ट झालेली आहेत. या चित्रात साप, मानव, घोडेस्वार, विविध प्राणी आणि चिन्हे तसेच इंग्रजी टी (T) आकाराचा समावेश आहे.

वादी सहाम कातळचित्रे 
वादी सहाम

 

सोमवार, ८ मे, २०२३

हायस्कूलचे दिवस


नव्वदचे दशक नुकतेच सुरू झाले होते. जागतिकीकरण अजून भारतात दाखल झाले नसल्याने, त्याचे दुष्परिणाम समाजात कुठेच दिसत नव्हते. सामाजिक मूल्ये आणि आत्मीयता जपणारा तो काळ होता. मी तेव्हा अमरापूरच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होतो. शाळेत जातांना आम्ही अमरापूर हायस्कूलमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थी आणि एकूणच हायस्कूल विषयी अतिशय कुतूहल वाटायचे. कुतूहलाचे मुख्य कारण म्हणजे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बेंच असत, तर प्राथमिक शाळेत त्यावेळी शेणाने सारवलेल्या वर्गातच बसावे लागे. दुसरे कारण म्हणजे हायस्कूल गावाबाहेर असल्याने तिथे चालत जायला खूपच मज्जा वाटे. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला आम्ही प्राथमिक शाळेतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर हायस्कूलवर धावत जात असू. हायस्कूलवर त्यावेळी मिळणाऱ्या विविधरंगी गोळ्यांचे आम्हाला फार अप्रूप वाटे.

१९९२ साली मी अमरापूर हायस्कूलला इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यावेळी हायस्कूलला पश्चिमाभिमुखी पत्र्याच्या खोल्यांचे वर्ग आणि तीन उत्तराभिमुखी स्लॅबचे अपुर्ण बांधलेले वर्ग होते. शाळेला बोर्डिंग देखील होते. एका ग्रामीण भागातील शाळेत ज्या सुविधा असाव्यात त्या सगळ्या सुविधा आम्हाला हायस्कूलमध्ये मिळत असत. शाळेला प्रशस्त मैदान होते. प्रयोगशाळेचे साहित्य होते तसेच ग्रंथालय देखील होते. त्याकाळी शिक्षकांविषयी सगळ्यांनाच आदरयुक्त भीतीचे वातावरण असे. गृहपाठ न करणार्‍या विद्यार्थ्यांना छडीचा प्रसाद खावा लागत असे. लवांडे सर, गरड सर, पुजारी सर, खोले सर, बेहळे सर, भिसे सर, वावरे सर असे आदर्श शिक्षक आम्हाला लाभले. त्याच बरोबर वांद्रे सर आणि कांबळे सर यांच्यासारखे आदर्श आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापकही लाभले. तुपे सर क्लार्क म्हणून काम बघत असत. आराख मामा, औतडे मामा, लवांडे मामा आणि वांढेकर मामा या सारखे प्रेमळ शिपाई त्यावेळेस हायस्कूलवर कार्यरत होते.

सगळ्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी होती. पुजारी सर आणि बेहळे सर शिकवताना खूप विनोद करत आणि संपूर्ण वर्गाला नेहमीच हसवत असत. बेहळे सर आम्हाला विज्ञान विषय शिकवायचे. बेहळे सरांना आध्यात्माची खूप आवड होती. ते स्वतः एक उत्तम कीर्तनकार देखील होते. लवांडे सर आम्हाला समाज अभ्यास शिकवायचे. ते पाचवी ते सातवीपर्यंत माझे वर्गशिक्षक होते. आम्हाला खोले सरांची अतिशय भीती वाटत असे, कारण ते इंग्रजी विषय शिकवायचे. वावरे सर हिंदी आणि खेळाचे शिक्षक होते. वावरे सरांनी शाळेत अनेक खेळाडू घडवले. खो-खो आणि कबड्डी या मैदानी खेळाकडे आमचा फार ओढा असायचा. भिसे सर माझे आठवी ते दहावीपर्यंत वर्ग शिक्षक होते. ते आम्हाला गणित विषय शिकवायचे.
 

स्वर्गीय आबासाहेब काकडे यांचा एफ. डी. एल. संस्था स्थापन करण्या मागचा हेतू खूप व्यापक होता. गोरगरीब आणि सामान्य माणसांची मुलं शिक्षणापासून वंचित राहाता कामा नये, त्यांना रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी शेवगाव सारख्या मागास आणि दुष्काळी तालुक्यात शिक्षण संस्था चालू केली. अमरापूर हे अनेक खोट्या मोठ्या खेड्यांना जोडणारे गाव होते. तेथील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी शेवगावला जावे लागत असे. अमरापूरला हायस्कूल स्तरावरची शाळा चालू करणे खूप सोईचे होते, म्हणूनच आबासाहेबांनी अमरापूर गावाची हायस्कूल उभारण्यासाठी निवड केली असावी. हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारी सगळीच मुले ही शेतकरी आणि शेतमजूरांची होती. तेव्हा सगळेच विद्यार्थी गरीब आणि मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असणारे होते. शिक्षण घेण्यासाठी अनेकजण सुट्टीच्या दिवशी शेतात रोजंदारीवर कामाला जात असत. त्याकाळी फार काही आधुनिक शालेय साहित्य उपलब्ध नसे. खताच्या गोण्यांचा सर्रास दप्तराच्या पिशवीसाठी वापर केला जायचा तर उरलेल्या जुन्या वह्यांची पाने एकत्र शिवून नवी वही तयार करण्याची तेव्हा प्रथा होती. नवीन पुस्तकं विकत न घेता जुनीच पुस्तकं वापरली जात असत. एकच गणवेश धुवून वापरला जायचा.

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट व्यतिरिक्त शाळेत विविध सण आणि उत्सव साजरे केले जात असत, त्याच प्रमाणे विविध स्पर्धा आणि शैक्षणिक सहली देखील आयोजित केल्या जात. शाळेत दहा दिवसाचा गणपती बसवला जायचा. सकाळी प्रार्थनेच्या वेळी आरती केली जाई. रोज एक वर्ग आरतीसाठी प्रसाद म्हणून घरून मोदक बनवून आणायचे. रोज सकाळी मोदक खायला मिळायचे. काही विद्यार्थी मुद्दाम साखरे ऐवजी मोदकात मीठ किंवा मिरचीचा ठेचा घालत असत. हायस्कूलमध्ये रक्षाबंधन साजरा करण्याची देखील त्यावेळी प्रथा होती. प्रत्येक वर्गात त्यावेळी दत्ताचा फोटो असे. दर गुरूवारी पहिल्या तासाला दत्ताची आरती केली जात असे. क्रमाक्रमाने प्रत्येकाला आरतीसाठी प्रसाद आणावा लागे. याशिवाय विविध राष्ट्र पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जात असत. त्याच आमचा नेहमीच सक्रिय सहभाग असे.

आयुष्यातील यशात अमरापूर हायस्कूल मधील शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे. हायस्कूलमध्ये दाखल झालो तेव्हा बॅकबेंचर आणि ढ विद्यार्थी म्हणून माझी गणती होत असे. कालांतराने आमच्या आदर्श शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने मी १९९७ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झालो. त्यावर्षी मी शाळेत पहिला येण्याचा मान पटकावला. आज मागे वळून बघतांना ज्या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतले ती परिस्थितीच आमच्या यशासाठी कारणीभूत ठरली असे म्हणावे लागेल. आज शाळेला सुसज्ज इमारत आहे. शाळा ज्ञान दानाचे आणि विद्यार्थी घडवण्याचे काम अखंडपणे करते आहे याचे कौतुक वाटते. भविष्यातही अमरापूर हायस्कूलने खूप प्रगती करेल आणि येथून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करत राहतील.