गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

गाडीवाट




गाडीवाट म्हटलं तर मला अजूनही आमच्या शेतात जाणारी वाट आठवते. खाच खळग्यांची ही कच्ची वाट इतकी वर्षे झाली पण ती काही बदलली नाही. दगड-गोटे, काटे-सराटे जणूकाही या गाडीवाटेचे अलंकारच म्हणावे लागतील. पावसाळ्यात चिखलाने रापून जाणारी, उन्हाळ्यात फुफाट्याने माखून निघणारी ही वाट काळाच्या ओघात का बदलली नसावी? याचं कधी कधी मला नवल वाटतं. प्रत्येक गोष्टीत काळानुरुप थोडेफार बदल होत असतात. आलिकडच्या काळात वाटेच्या दुतर्फा दिसणाऱ्या वेड्या बाभळी आता बऱ्याचशा कमी झाल्या आहेत. पावसाळ्यात वाहणाऱ्या एका नाल्यावर सिमेंटची नळी बसवून तात्पुरता पुल सदृश्य केलेला उंचवटा हेच ते काय बदल या गाडीवाटेने अनुभवले आहेत. पण याला बदल म्हणावं का? हा प्रश्नही मला पडतो. कारण वाट शतकानुशतके कच्ची होती, आणि ती आजही आहे.

दररोज संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी माणसाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होत असते. मग ती गोष्ट सजीव असो वा निर्जीव. आपल्याला त्या गोष्टीचा स्वभाव आणि गुण अवगत होत असतात. गाडीवाटेचे देखील तसेच आहे. नियमीत वापरामुळे कुठे चढउतार आहे, कुठे खड्डा आहे, कुठे हळू चालायचे हे सगळे अंगवळणी पडते. म्हणूनच ही वाट बदलली किंवा अद्ययावत झाली नसली तरी ती आता जीवनाचा एक भाग बनून गेली आहे. ये जा करणाऱ्या प्रत्येकाने तिला स्विकारले आहे कारण या वाटेवरुन जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आमच्या पुर्वजांचा या वाटेवरुन खूप वावर असायचा आणि आमच्या आजच्या पिढीचाही तितकाच आहे. ही वाट आम्हाला शेतात घेऊन जाते; म्हणूनच कदाचित आमचं या वाटेशी इतकं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं असावं.

का कुणास ठाऊक? पण आजही मला या वाटेने आमच्या खाल्लाकडच्या शेतात चालत जायला खूप आवडते. सुट्टीवर गावी गेलो की मी बरेचदा या वाटेने एकटाच चालत जातो. गाडीबैल, सायकल, मोटारसायकल किंवा ट्रॅक्टर यावरून मी कित्येकदा या वाटेवरुन गेलो असेल पण पायी चालत जाण्याचा प्रत्येक अनुभव वेगळा वाटतो. शीळ घालत भिरभिरणारा वारा, अचानक हवेच्या वावटळीत झेपावणारा पाला पाचोळा जणूकाही आपल्याशी संवाद साधत आहेत असा भास होतो. वाटेकडेच्या झाडांवर पक्षांची चुळबुळ, त्यांचे वेगवेगळे आवाज, दूरवरुन बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घोगरमाळेचा आवाज, औत हकणाऱ्या गड्याने बैलाला ओरडल्याचा आवाज किंवा गुराख्यांनी जनावरांना दिलेली आरोळी यासारखे नानाविध आवाज मला वेगळ्याच विश्वास घेऊन जातात. चालता चालता कुठेतरी मधेच पाय थबकतात आणि एखाद्या पक्षाचा येणारा आवाज तसाच ऐकत रहावसं वाटतं. वेगवेगळ्या ऋतूमध्ये विविध किटक, पक्षी आणि प्राणी या वाटेवरुन नेहमीच दिसतात. कधीकधी अचानक काळ्याभोर मुंगळ्यांची रांग नजर चुकवत घाईघाईने आडवी येते. दुरवर उड्या मारत जाणारा हरणांचा कळप तर नियमीत दिसतो. आपल्या लक्षावर नजर केंद्रीत करून एकाच जागेवर पंख हलवत असलेल्या बहिरी ससाण्याला सूर मारतांना पाहाणे म्हणजे पर्वणीच असते. पानाफुलांवर उडणारी छोटी छोटी पिवळी आणि राखाडी रंगाची फुलपाखरं नजर वेधून घेत रहातात. पावसाळ्यात गाळामध्ये वळवळ करणारे पांढरे गुलाबी गांडूळ पाहायला गंमत वाटते. गवतात सळसळ करत जाणारे साप नेहमीच भिती दाखवतात. मोकळ्या वावरात घरटं करून फिरणाऱ्या टिटवीचा कर्णकर्कश आवाज तर कानात घुमत रहातो.

लहानपणी आजी आजोबा यांच्या कडून त्यांनी केलेल्या कष्टाच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. त्यांच्या बोलण्यात शेताचा आणि या वाटेचा नेहमी उल्लेख असायचा. आजी नेहमी सांगायची की, पहाटे शुक्राची चांदणी उगवली की, सगळा वाडा जागा व्हायचा. बाया माणसं दोन दोन पायलीची दळणं जात्यावर दळायच्या तर कुणी घागर घेऊन पाणी भरायच्या. घरातील कर्ती माणसं गाडीबैल जुंपून खाल्लाकडच्या शेतात जायचे. बैल अंधारातही या गाडीवाटेने बरोबर शेतात पोहचायचे. घरचं काम उरकल्यावर बाया शेतात गेलेल्या माणसांना न्याहारीच्या भाकरी घेऊन याच वाटेने चालत जायच्या. न्याहारीचे गाठोडे दिल्यावर घरच्या जनावरासाठी ओझंभर गवत कापायच्या आणि ते ओझं डोक्यावर घेऊन याच वाटेने माघारी यायच्या.