मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

अरबी वेशभूषा

एखाद्या देशाच्या वेशभूषेवर तेथील संस्कृती, चालीरीती, धर्म याच बरोबर हवामान यांचा प्रभाव पडलेला असतो. धर्म-संस्कृती हा दुय्यम घटक झाला पण स्थानिक हवामान हा वेशभूषा रचनेतील महत्वाचा घटक मनाला गेलेला आहे. धर्म एक असूनही वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांच्या वेशभूषा ह्या वेगवेगळ्या असू शकतात. भारताचेच उदाहरण घ्याचे झाले तर उत्तर भारतातील वेशभूषा हि पश्चिम भारत, मध्य भारत, पूर्व भारत, तसेच दक्षिण भारत यांच्यापेक्षा भिन्न आहे. थोडक्यात भारतातील वेगवेगळ्या प्रदेशाच्या वेशभूषा ह्या त्या त्या प्रदेशाच्या हवामानाशी निगडीत आहेत.

अरब खंडातील वेशभूषा हि येथील अतिउष्ण वातावरण, वाळवंट यापासून संरक्षण व्हावे अशी बनली आहे. अरब खंडातील सर्व देशात सारखीच वेशभूषा वापरली जाते. अलीकडच्या काळात ज्या त्या देशाच्या परंपरेची कमी अधिक प्रमाणात छाप वेशभूषेवर पडलेली आहे. अमिराती, ओमानी, सौदी, बहारेनी हे लोक त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या वेशभूषेवरून चटकन ओळखता येवू शकतात.

अरब खंडातील वेशभूषा हि बेडोईन संस्कृतीचा वारसा आहे. अरबी भाषेत बेडू म्हणजे उघड्या वाळवंटात वसती करून राहणारे समूह. बेडू लोकांच्या अनेक वेगवेगळ्या जमाती आहेत. बेडू शब्दाचा अपभ्रंश होऊन इंग्रजीत या संस्कृतीसाठी बेडोईन (Bedouin Culture) हा शब्द बनला आहे. जेंव्हा बेडू लोक वाळवंटात वसती करून राहायचे अर्थातच वाळवंटातील उष्णता, वाळूचे वादळ व धूळ यासून स्वतःचे संरक्षण व्हावे अशीच वेशभूषा ते परिधान करायचे. सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण व्हावे यासाठी पूर्ण भयाचे व सर्वांग झाकले जाईल असा पोशाख ते वापरत. तर वाळूच्या वादळापासून संरक्षण होण्यासाठी स्त्री व पुरुष हे विशिष्ट कापड डोक्यावर किंवा चेहऱ्या भोवती गुंडाळायचे. हि शेकडो वर्षाची परंपरा आजच्या अरब वेशभूषेतही पाहण्यास मिळते. जगात आधुनिकीकरण झाले. जुन्याच्या जागी अनेक आधुनिक वस्तू आल्या परंतु अरब खंडातील अरबी लोक अजूनही आपल्या संस्कृतीशी घट्ट बांधलेले आहेत हे त्यांच्या वेशभूषेवरून प्रकर्षाने जाणवते.

पुरषांची वेशभूषा :
अमिराती पुरुषांच्या वेशभूषेत मुख्यत्वे कंदुरा किंवा तोब, केफिया, टाकिया, इगाल, आणि इजार या गोष्टींचा समावेश असतो. कंदुरा (Kandura) किंवा तोब (Thobe) हे पायापर्यंत अंग झाकेल असे व लांब भायाचे वस्त्र आहे. या पेहरावाला वेगवेगळ्या अरबी बोलीभाषेत वेगवेगळी नावे आहेत. ओमानी लोक याला दिशदशा (Dishdasha), सिरियात याला जलाबिया (Jalabiyyah), मोरोक्कोत गन्दुरा (Gandora) तर अमिरात मध्ये याला कंदुरा म्हणतात. तोब हा शब्द सर्वाधिक प्रचलित असून सौदी लोक याच नावाचा जास्त वापर करतात. कंदुरा हे सर्वसाधारणपणे सुती कापडापासून बनवलेले असतात. थंडीच्या दिवसात वापण्यात येणारा कंदुरा हा मेंढीच्या लोकरीपासून बनवलेला असतात. मुख्यत्वे सिरीया, इराक व सौदी अरेबियाच्या काही भागात जेथे थंडी जास्त पडते त्या भागात हिवाळ्यात लोकरीचे कंदुरा वापरतात. अमिराती आणि ओमानी लोक शक्यतो उघड्या गळ्याचे कॉलर नसलेले कंदुरा वापरतात. त्यामानाने सौदी किंवा कतारी लोक जड कॉलर व भयाचे फॅशनेबल कंदुरा वापरतात.

कंदुऱ्याचा रंग बहुधा पांढरा असतो. सूर्य किरणे परावर्तीत व्हावीत असा यामागचा उद्देश असावा. उन्हाळ्यात पांढरा रंग सर्वाधिक वापरला जातो. जशी थंडीची चाहूल लागते तसे वेगवेगळ्या रंगाचे कंदुरा परिधान केलेले लोक पाहण्यास मिळतात. सोनेरी किंवा बदामी, ब्राऊन, आकाशी निळा व राखाडी रंगाचे कंदुरा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरेले जातात. अरबी माणूस दिवसातून कामाच्या स्वरूपानुसार अनेकवेळा कंदुरा बदलू शकतात. महत्वाच्या कामाला वेगळा, नामजा साठी वेगळा किंवा संध्याकाळी घालण्याचा वेगळा. एका अमिराती माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कंदुरे असतात.

अमिराती आणि ओमानी लोक गळ्याभोवती कापडाची सुंदर कलाकुसरीची वेणी परिधान करतात. हि वेणी पाश्चात्य टाय प्रमाणे गळ्यात लटकलेली असते. याला केरकुशा (Kerkusha) म्हणतात. केरकुशा असलेला कंदुरा अमिरातीत फार प्रसिध्द आहे.

कंदुऱ्याच्या आत अरबी लोक पायाच्या घोट्यापर्यंत पायजमा किंवा लुंगी नेसतात घालतात त्याला इजार (Izaar) म्हणतात. इजार कंदुऱ्यात झाकून केल्यामुळे दिसत नाही.

संपूर्ण कंदुऱ्याच्या मापाचा कोट किंवा जाकेट सारखा वापरण्यात येणाऱ्या पोशाखाला बिश्त (Bisht) म्हणतात. हा पोशाख फक्त महत्वाच्या कार्यक्रमाला, सणासुदीला, उत्सव वा विवाह समारंभास परिधान करतात. बिश्त जाकेट सारखे वापरले जात असल्याने याचे रंग फार उठावदार असतात. काळा, बदामी, राखाडी, ब्राउन रंगांचे बिश्त प्रसिद्ध आहेत. बिश्तचे काठ सोनेरी धाग्यांनी विणलेले असल्यामुळे ते फार आकर्षक दिसतात. सौदी अरेबियामध्ये काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने उंटाच्या केसापासून बनवलेली बिश्त वापरतात. बिश्त परिधान करणे हे समृद्धीचे प्रतिक मानले जाते. बिश्त केवळ राज परिवारातील सदस्य, मंत्री, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी, मशिदीचे इमाम, जमातीचे प्रमुख असे लोकच वापरतात.

पुरुष डोक्यात जाळीदार टोपी घालतात त्याला येथे टाकिया (Takiya) किंवा घाफिया (Ghafiya) म्हणतात. या टोपीच्या वर अरबी लोक एक प्रकारचा हेडस्कार्फ वापरतात त्याला केफिया (Keffiyeh) किंवा घीत्रा (Ghitra) म्हणतात. केफियाचे अरब खंडात अनन्यसाधारण महत्व आहे. येथील उष्णतेच्या तीव्रतेपासून, धूळ व वाळूपासून डोक्याचे व चेहऱ्याचे संरक्षण व्हावे यासाठी हा बेडोईन पोशाखाचा महत्वाचा भाग आहे. अमिराती मध्ये पांढऱ्या रंगाचा केफिया वापरतात. केफिया हे चौरसाकृती सुती कापड असते. त्याची त्रिकोणी घडी घालून डोक्यावर ठेवतात. केफियाला पकडून ठेवण्यासाठी काळ्या रंगाची गोलाकार नळी वापरतात. त्याला इगल (Egal / Igal) म्हणतात. डोक्यात घातलेली जाळीदार टोपी टाकिया व इगल यांच्यामध्ये केफिया घट्ट बसवण्यात येतो.

केफिया हा लोकरी पासूनही बनवतात. हिवाळ्यात लोकरीच्या केफियाचा वापर जास्त होतो. केफियाच्या रंगावरून त्या माणसाचा हुद्दा, राष्ट्रीयत्व ओळखता येवू शकते. लाल व पांढऱ्या रंगाचे केफिया अरब खंडात फार प्रचलित आहेत. लाल पांढऱ्या रंगाच्या चौकड्या असणाऱ्या केफियाला शिमाघ (Shimagh) असेही म्हणतात. शिमाघचा वापर सौदी अरेबिया आणि जॉर्डन याठिकाणी जास्त होतो. १९६० च्या दशकात पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफात यांनी काळ्या पांढऱ्या चौकड्या असलेल्या केफियाला पॅलेस्टाईनचे प्रतिक बनवून एक मोठी राष्ट्रीयत्वाची चळवळ उभी केली. यासर अराफात यांचा पेहराव हा नेहमी सैनिकी अथवा पाश्चात्य असायचा तरी ते केफिया व इगल परिधान करायचे. काळ्या पांढऱ्या रंगाचा केफिया आता पॅलेस्टाईनची ओळख बनला आहे. वेगवेगळ्या बेडोईन जमातीचे वेगवेगळे केफिया असू शकतात. त्यांच्या रंगावरून तो माणूस कोणत्या जमातीचा आहे हे समजते. ओमानी लोक डोक्यात भरतकाम केलेली टोपी घालतात तिला कुमा (Kuma) असे म्हणतात. ओमानी लोकांचा केफिया थोडासा भिन्न असून त्याला ते मस्सार (Massar) म्हणतात.

तरुण अमिराती युवा वर्ग आजकाल इगल न वापरता केफिया डोक्याभोवती गुंडाळतात. या विशिष्ट प्रकारच्या बांधलेल्या केफियाला हमदानिया (Hamadaniya) म्हणतात. केफिया हे कंदुऱ्याच्या रंगाशी मेळ खाणारे असतात. केफियाचे प्रकार हे प्रसंग, हवामान व माणसाचा हुद्द यावरून बदलत राहतात. केफिया बांधण्याच्या वेगवेगळ्या शैली आहेत. या शैली वेगवेगळ्या देश्याच्या वेगवेगळ्या आहेत.

अरबी लोक पायात नाआल (Na-aal) घालतात. नाआल एक प्रकारची चप्पल असून हि वेगवेगळ्या रंगत उपलब्ध असते. कंदुऱ्याच्या रंगाशी जुळणारी नाआलचा रंग असतो. आजकाल अरबी लोक नाआलच्या ऐवजी सामान्य बूटही वापरतात.
(क्रमशः)

बुधवार, १३ जानेवारी, २०१६

कविता : वाळवंटातील तुळस


कंपनी समोरच्या त्या ओट्यावर
एक हिरवीगार तुळस नियमित बहरते
पूर्वजांच्या देशातल्या आम्हा बांधवांना
ती रोज आपुलकीने निरखते

कोण कुठली मी आभागी म्हणत
आपली केविलवाणी पाने फडफडवते
स्वच्छंदी होऊन वार्‍या बरोबर झुलते
स्वतःशीच कधी हसते कधी रुसते

सणासुदीला ती फार एकटी पडते
कार्तिक द्वादशीला तिची नजर
चातका सारखी चहूकडे भिरभिरते
चिंचा सीताफळ बोरांची ती वाट पहाते

या ओसाड वाळवंटातील उन्हात
ती फार तळमळतेय घुटमळतेय
गटारीच्या पाझरात मुळं घट्ट करून
आपुलकीची आपली माणसं शोधतेय

तिची इवली इवलीशी हिरवी पाने
जांभळ्या फुलांच्या कोवळ्या मंजिऱ्या
वाळून उगवलेल्या बियांची टवटवीत रोपं
नियतीच्या तुरुंगात पडलीयेत दूर देशी

रोज जाता येता ती आमच्याकडे पहाते
पण जाणिवेच्या तप्त निखाऱ्यात
निरंतर जाळणाऱ्या स्वतःच्या मनाला
कवटाळून ती अबोल होऊन जाते

एक वाळवंटातील तुळस होऊन
ती म्हणत असेल मला नाही पण
माझ्या सावलीत वाढणाऱ्या रोपांना तरी
एखाद्या वृंदावनाची कुंडी मिळेल का?

रविवार, १० जानेवारी, २०१६

'शाळा' (लेखक : मिलिंद बोकील)



'शाळा' वाचताना अस वाटत होत की कादंबरीचा नायक लेखक नाही तर आपण स्वतःच आहोत. या कादंबरीतील बर्‍याच गोष्टी आपण आपल्या शाळेय जीवनात अनुभवलेल्या आहेत. कादंबरीची सुरुवात नववीच्या वर्षापासून होते. शाळा दुपारी बारा चाळीसला भरायची. पण लेखक (मुकुंद जोशी कादंबरीतील नाव) आकरा वाजताच घरातून निघायचा. लेखकाची बहिण काॅलेजला सकाळीच जायची त्यामुळे त्याला शाळेत लवकर का जातो म्हणून विचारणारे कोणी नव्हते. आईला स्काउट बॅण्डच्या प्रॅक्टीसला जातो म्हणून तो सांगायचा. पण आईला फारस कळायच नाही म्हणून ती जास्त विचारीत नसे. सुऱ्या, चित्र्या आणि फावड्या व लेखक ही चौघेजण शाळेच्या रस्त्यावर बांधकाम चालू असलेल्या सुऱ्याच्या बिल्डिंगवर जमायचे. सर्व मित्रांना काहीतरी टोपणनाव होते. अगदी आपण वापरायचो तशी.
ते रोज त्या बिल्डिंग मधून येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतील मुलींना व शिक्षकांना चिडवायचे.
     सुऱ्या आठवीच्या गुप्ते वर लाईन मारायचा. ती केवड्याच्या फुलांची वेणी घालून यायची म्हणून तिचे टोपणनाव केवडा पडले. सुऱ्या तिच्यावर फारच फिदा झाला होता. तो सारखा केवड्याचाच विचार करायचा. शाळेत कोण कोणावर लाईन मारतो याची सर्व माहिती मुलांना असायची. लेखकही वर्गात नवीन आलेल्या शिरोडकर  नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तो ही मग शिरोडकर वर लाईन गुपचूप लाईन मारू लागतो. यावर कोणी डाऊट खाऊ नये म्हणून तो बर्‍याच गोष्टींची काळजी घेतो. सुऱ्या सारखा तो उघड उघड बोलत नाही.
      लेखक आपल्या बहिणीला आंबाबाई म्हणायचा. ती सारखी प्रत्येक कामात लुडबुड करायची. वडील शांत होते. ते सचिवालयात नोकरीला होते. आई जरी शांत असली तरी ती चिडल्यावर लेखक तिला घाबरत असे. तो आईला आईसाहेब म्हणायचा. या कादंबरीत नरू मामा नावाचे एक महत्त्वाचे पात्र आहे. तो लेखकाचा सख्ख्या मामा असतो. आई पासुन तो वयाने लहान होता. तो शाळेत इंग्रजी शिकवायचा. तो जेव्हा जेव्हा मुंबईत यायचा तेव्हा तो लेखकाला इंग्रजी चित्रपट पहायला घेऊन जायचा. दोघांचे संबंध फार मैत्रीचे होते. लेखक आणि नरू मामा मुलींच्या विषयी गप्पा मारत. लेखक बर्‍याचदा मित्रांचे नाव सांगून त्याच्या कडून टिप्स मिळवायचा. ही कहाणी साधारणपणे 1975-77 दरम्यान आणीबाणीच्या काळात घडलेली आहे. आणीबाणीचा बराच उल्लेख यामध्ये येतो. शाळेतही इंदिरा गांधींच्या सर्मथनात गाणी गायला लावायचे. या वेळची दडपशाही याची माहिती लेखक देतो.
     शिरोडकर एक ठिकाणी क्लास लावते हे लेखकाला समजते. मग तोही तिथेच क्लास लावतो. तो सारखा शिरोडकरला भेटायचा प्रयत्न करतो. तिच्यावर पाळत ठेवून ती कुठल्या रस्त्याने येते जाते याची माहिती मिळवतो. शेवटी त्यांची भेट होते. शिरोडकरला कळते कि जोशी आपल्यावर लाईन मारत आहे. शाळेतल्या इंग्रजीच्या बेंद्रे बाई फारच कडक होत्या. त्यांच्या इंग्रजीच्या तासाच्या आधी तो फळ्यावर अनुशासनपर्व असे लिहीतो. तेव्हातर त्याला बेंद्रे बाई फार मारतात.
     कहाणीचा शेवट हा मोठा नाट्यमय होतो. सुऱ्या एकदा बिल्डिंगवरून केवड्याला एकटीच येताना पाहतो. सुऱ्या तिला लेखकाच्या मदतीने थेट जाऊन विचारतो. ये आपल्याला लाईन देते का? केवडा घरी आपल्या वडिलांना ही हकिकत सांगते. दुसर्‍या दिवशी त्याचे वडील शाळेत तक्रार घेऊन येतात. तेव्हा ते त्या दोघांना फार मारतात. त्याना पालकांना बोलवून घ्यायला सांगितले जाते. सुऱ्याच्या घरी जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्याचे वडील त्याला फार मारतात. लेखकालाही घरी बोलणे बसतात. दुसर्‍या दिवशी पालक येतात. पण तोपर्यंत याचा बोभाटा शाळाभर होतो. शिरोडकर लेखकाकडे पहायचे सोडून देते. शाळेची परीक्षा संपून सुट्टी लागते. सुट्टीत लेखक आजोळी नरू मामाच्या लग्नाला जातो. शाळेचा निकाल लागतो. लेखक पाचवा नंबर मिळवतो. सुऱ्या आणि फावड्या नापास होतात. शिरोडकर निकाल घ्यायला आलेली नसते. नंतर लेखकाला तिच्या वडिलांची बदली झाल्याचे कळते. त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो.
     शाळा कादंबरीत अनेक ठीकाणी गमतीदार विनोद आढळतात. कादंबरी वाचताना आपण भूतकाळात जातो. आपल्या शाळेय जीवनाची आठवण येते.