बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

कविता : सुपरनोव्हा



एकत्र येतात अणुरेणू तेंव्हा
या ब्रह्मांडात जन्मतात
सजीव आणि निर्जीव
जन्मतात ग्रह-तारे, उपग्रह, उल्का
माणसं, पशुपक्षी, झाडं-वेली
आणि दगडधोंडे सुद्धा!

जन्मतात म्हणजे एकदिवस मरतातही
कारण
प्रत्येकजण जन्मतो तो मरण्यासाठीच.....

नारायणा!
काही अब्ज वर्षांपूर्वी
तुही असाच जन्मलास या आकाशगंगेच्या उदरात
याच अणुरेणूंच्या पुंजक्यातून
आणि
तुझ्या भोवताली परिक्रमा करणाऱ्या
धुळ-वायूंच्या शिल्लक ढगांतून
तू जन्माला घातलीस
ही सृष्टी आणि हे सौरमंडळ

नारायणा!
तूच निर्मिलीस पंचमहाभूते,
जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी
तूच काठोकाठ भरलेस हे सप्त सागर
तूच हिमाच्छादित केलीस ही उंच गिरीशिखरे
अरे!
हे संपूर्ण चराचर म्हणजे तुझाच तर अंश आहे.....
नाही का?

नारायणा!
आम्ही जेंव्हा आईच्या उदरातून
अणुरेणूंचे गोळे होऊन बाहेर आलो
तेंव्हा तूच कोंबलास आमच्या नाकातून श्वास
आणि तेवत ठेवलेस हे प्राण
तुझ्याच प्रकाश संश्लेषणात बनलेल्या अन्नातून
आम्ही मिळविली जगण्यासाठी लागणारी जीवनसत्वे

नारायणा!
लहानाचे मोठे होत असताना
खेळलो याच अणुरेणूंच्या दगड मातीत
पुढे शिकलो मोठे झालो
तेव्हा वाढत गेली आमची महत्वाकांक्षा
म्हणून
जमा करत बसलो तुझीच मुलद्रव्ये
साठवले अमाप कागदी गठ्ठे
आणि आता म्हणतोयस की,
तुझं आयुष्य संपत चाललंय
अरे!
मग या आमच्या सगळ्या संचयाचे ढिगारे
आम्ही कुणाच्या हवाली करायचे?

नारायणा!
तू म्हणे, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात
फुगत जाशील राक्षसा सारखा
गिळत सुटशील तुझ्या चिल्या-पिल्याना
आणि
तुला जन्म देणारेच अणुरेणू करतील उठाव
तेंव्हा तू क्षणार्धात फुटशील फुग्यासारखा
तुझ्या सुपरनोव्हा मधून निघणाऱ्या ज्वाळातून
तू बेचिराख करशील ह्या सृष्टीतले सगळे अणुरेणू,
त्यात असतील आमच्या संचयाचे ढिगारे देखील
मग आमचा हा मुलद्रव्यांचा अट्टाहास कशासाठी?
.....
(फोटो सौजन्य : नासा)

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

शरद पवार : राजकारणातील तेल लावलेला पैलवान



शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेले एक अजब रसायन म्हणावे लागेल. गेल्या जवळपास पन्नास वर्षापासून शरद पवार यांचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात वावर आणि दबदबा राहिलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रात विविध खात्याचे मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास. पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा झाली पण संख्याबळाच्या अभावी त्यांना हे पद भुषविता आले नाही. शरद पवार यांचे राजकारण मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत असल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शैक्षणिक संस्था, विविध क्रीडा संस्था तसेच सहकारी संस्था यामध्येही शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे. असा हा अष्टपैलू नेता २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खरा महानायक ठरला.

ऐन निवडणूकीच्या तोंडावर शिखर बँकेतील अयोग्य कर्जवाटपाप्रकरणी शरद पवारांसह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाने आदेश दिला. संबंध नसतानाही शरद पवारांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात आल्याने केंद्र सरकार सुडाचे राजकारण करते की काय? असा प्रश्न उपस्थित केला गेला. ईडी कडून गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर राज्यभरात शरद पवार यांच्या समर्थनात ठिकठिकाणी मोर्चे निघाले. केंद्र सरकार दबावतंत्राचे राजकारण करण्यासाठी ईडी आणि सीबीआय चा दुरुपयोग करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. आपण स्वतः चौकशीला सामोरे जाण्यासाठी ईडी कार्यालयात जाणार असल्याची घोषणा करून पवारांनी एकच खळबळ उडवून दिली. २७ सप्टेंबरला राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत जमू लागले. अनेक ठिकाणी मोर्चे निघू लागले. राज्यात विषेशतः मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उद्भवू नये म्हणून पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचा आपला निर्णय शेवटच्या क्षणी मागे घेतला. शेवटी व्हायचे तेच झाले या साऱ्या घटनाक्रमाचा शरद पवारांनी फायदा उचलून स्वतःविषयी सहानुभूतीचे वातावरण निर्माण केले. ईडी सारखे संकट डोळ्यासमोर असतांनाही शरद पवार यांनी आपल्या राजकीय चातुर्याने त्याला संधीत रुपांतरीत केले.



निवडणुका लागायच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मधुकरराव पिचड, विजयसिंह मोहीते पाटील, उदयनराजे भोसले यासारखे पवारांच्या तालमित वाढलेले दिग्गज नेते त्यांना सोडून गेले. ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आमदार, खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सोयीनुसार भाजप अथवा शिवसेनेत डेरे दाखल होत होते. एव्हढी पक्षाला गळती लागूनही शरद पवार खचले नाहीत. ८० वर्षाचे वय, कर्करोगासारखा झालेला गंभीर आजार यांच्यापुढे हात न टेकता शरद पवारांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या हातात घेतली आणि पायाला भिंगरी लागल्यागत त्यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करून चाळीसहून अधिक प्रचारसभा घेतल्या. एखाद्या तरुण नेत्याला लाजवेल या उत्साहात शरद पवार ठिकठिकाणी सभांना संबोधित करत होते. काँग्रेस हायकमांडने तर महाराष्ट्राच्या निवडणूकीकडे संपूर्णपणे पाठ फिरवल्याचे याठिकाणी नमूद करावे लागेल. जणूकाही निवडणुकीच्या आधीच त्यांनी हार पत्करली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, स्टार प्रचारक प्रियंका गांधी या महाराष्ट्रात फिरकल्या देखील नाहीत. राहूल गांधी यांच्या जेमतेम पाच सभा या निवडणूकी दरम्यान महाराष्ट्रात झाल्या. याचा फायदा काँग्रेसला कीतपत झाला असेल हे सांगणे कठीणच आहे. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे स्वतःच्याच मतदार संघात अडकवून पडल्याने आघाडीच्या वतीने एकटे शरद पवारच प्रचाराचा किल्ला लढवत असल्याचे जाणवले.

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

गाडीवाट




गाडीवाट म्हटलं तर मला अजूनही आमच्या शेतात जाणारी वाट आठवते. खाच खळग्यांची ही कच्ची वाट इतकी वर्षे झाली पण ती काही बदलली नाही. दगड-गोटे, काटे-सराटे जणूकाही या गाडीवाटेचे अलंकारच म्हणावे लागतील. पावसाळ्यात चिखलाने रापून जाणारी, उन्हाळ्यात फुफाट्याने माखून निघणारी ही वाट काळाच्या ओघात का बदलली नसावी? याचं कधी कधी मला नवल वाटतं. प्रत्येक गोष्टीत काळानुरुप थोडेफार बदल होत असतात. आलिकडच्या काळात वाटेच्या दुतर्फा दिसणाऱ्या वेड्या बाभळी आता बऱ्याचशा कमी झाल्या आहेत. पावसाळ्यात वाहणाऱ्या एका नाल्यावर सिमेंटची नळी बसवून तात्पुरता पुल सदृश्य केलेला उंचवटा हेच ते काय बदल या गाडीवाटेने अनुभवले आहेत. पण याला बदल म्हणावं का? हा प्रश्नही मला पडतो. कारण वाट शतकानुशतके कच्ची होती, आणि ती आजही आहे.

दररोज संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी माणसाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होत असते. मग ती गोष्ट सजीव असो वा निर्जीव. आपल्याला त्या गोष्टीचा स्वभाव आणि गुण अवगत होत असतात. गाडीवाटेचे देखील तसेच आहे. नियमीत वापरामुळे कुठे चढउतार आहे, कुठे खड्डा आहे, कुठे हळू चालायचे हे सगळे अंगवळणी पडते. म्हणूनच ही वाट बदलली किंवा अद्ययावत झाली नसली तरी ती आता जीवनाचा एक भाग बनून गेली आहे. ये जा करणाऱ्या प्रत्येकाने तिला स्विकारले आहे कारण या वाटेवरुन जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आमच्या पुर्वजांचा या वाटेवरुन खूप वावर असायचा आणि आमच्या आजच्या पिढीचाही तितकाच आहे. ही वाट आम्हाला शेतात घेऊन जाते; म्हणूनच कदाचित आमचं या वाटेशी इतकं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं असावं.

का कुणास ठाऊक? पण आजही मला या वाटेने आमच्या खाल्लाकडच्या शेतात चालत जायला खूप आवडते. सुट्टीवर गावी गेलो की मी बरेचदा या वाटेने एकटाच चालत जातो. गाडीबैल, सायकल, मोटारसायकल किंवा ट्रॅक्टर यावरून मी कित्येकदा या वाटेवरुन गेलो असेल पण पायी चालत जाण्याचा प्रत्येक अनुभव वेगळा वाटतो. शीळ घालत भिरभिरणारा वारा, अचानक हवेच्या वावटळीत झेपावणारा पाला पाचोळा जणूकाही आपल्याशी संवाद साधत आहेत असा भास होतो. वाटेकडेच्या झाडांवर पक्षांची चुळबुळ, त्यांचे वेगवेगळे आवाज, दूरवरुन बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घोगरमाळेचा आवाज, औत हकणाऱ्या गड्याने बैलाला ओरडल्याचा आवाज किंवा गुराख्यांनी जनावरांना दिलेली आरोळी यासारखे नानाविध आवाज मला वेगळ्याच विश्वास घेऊन जातात. चालता चालता कुठेतरी मधेच पाय थबकतात आणि एखाद्या पक्षाचा येणारा आवाज तसाच ऐकत रहावसं वाटतं. वेगवेगळ्या ऋतूमध्ये विविध किटक, पक्षी आणि प्राणी या वाटेवरुन नेहमीच दिसतात. कधीकधी अचानक काळ्याभोर मुंगळ्यांची रांग नजर चुकवत घाईघाईने आडवी येते. दुरवर उड्या मारत जाणारा हरणांचा कळप तर नियमीत दिसतो. आपल्या लक्षावर नजर केंद्रीत करून एकाच जागेवर पंख हलवत असलेल्या बहिरी ससाण्याला सूर मारतांना पाहाणे म्हणजे पर्वणीच असते. पानाफुलांवर उडणारी छोटी छोटी पिवळी आणि राखाडी रंगाची फुलपाखरं नजर वेधून घेत रहातात. पावसाळ्यात गाळामध्ये वळवळ करणारे पांढरे गुलाबी गांडूळ पाहायला गंमत वाटते. गवतात सळसळ करत जाणारे साप नेहमीच भिती दाखवतात. मोकळ्या वावरात घरटं करून फिरणाऱ्या टिटवीचा कर्णकर्कश आवाज तर कानात घुमत रहातो.

लहानपणी आजी आजोबा यांच्या कडून त्यांनी केलेल्या कष्टाच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. त्यांच्या बोलण्यात शेताचा आणि या वाटेचा नेहमी उल्लेख असायचा. आजी नेहमी सांगायची की, पहाटे शुक्राची चांदणी उगवली की, सगळा वाडा जागा व्हायचा. बाया माणसं दोन दोन पायलीची दळणं जात्यावर दळायच्या तर कुणी घागर घेऊन पाणी भरायच्या. घरातील कर्ती माणसं गाडीबैल जुंपून खाल्लाकडच्या शेतात जायचे. बैल अंधारातही या गाडीवाटेने बरोबर शेतात पोहचायचे. घरचं काम उरकल्यावर बाया शेतात गेलेल्या माणसांना न्याहारीच्या भाकरी घेऊन याच वाटेने चालत जायच्या. न्याहारीचे गाठोडे दिल्यावर घरच्या जनावरासाठी ओझंभर गवत कापायच्या आणि ते ओझं डोक्यावर घेऊन याच वाटेने माघारी यायच्या.

शनिवार, २० जुलै, २०१९

कविता : रोज तू स्वप्नात येतोस



रोज तू स्वप्नात येतोस
म्हणून कधी जाणवत नाही
आपल्या दोघांतील काळाच्या पडद्याचं अंतर...

हे अंतर
म्हटलं तर अगदीच जवळ
फक्त एका क्षणाचं
म्हटलं तर खूपच लांब
अनेक वर्षांचं

तू
चुकता, कंटाळता येतोस
आणि अजूनही माझ्यासोबत खेळत रहातोस
तेच बालपणीचे खेळ
रंगीत गोट्यांचे रिंगण,
सूरपारंब्या,
धप्पाकुटी आणि
विटी दांडूचा डाव,

पण खरं सांगू का?
स्वप्नाबाहेरील दुनियेत
मी आता खेळत नाही असले खेळ
कारण
मी तेव्हाच सोडून दिलंय खेळणं
तू पडद्याआड गेल्यापासून

तुला नवल वाटेल
पण सांगतो
मी या बाजूला आता मोठा झालोय
मोठा म्हणजे बघ, म्हातारा होईल काही वर्षात
केस पांढरे झालेत, डोक्यावर टक्कल पडलंय
तू मात्र आहे तसाच आहेस
अगदी लहानपणी होतास ना, तसा....
काय रे!
पडद्याआड तुझं वय वाढत नाही का?

रोज तू स्वप्नात येतोस
तेव्हा आपण दोघे मिळून अजूनही हिंडत असतो
रानातील ओढ्याकाठी
कधी मधाचे पोळे काढत
तर
कधी सापाची कात शोधत
तुला ती संग्रही ठेवायला खूप आवडायची
पण आता मी फार घाबरतो
सापाची कात बघीतली की
काळीज धडधडतं , हात थरथरतात

स्वप्नात तू अजूनही हट्ट धरतोस पोहण्याचा
पोहणे हा तुझा आवडता छंद
पोहायला जाता यावं म्हणून
कधी कधी तू शाळेला दांडी मारायचास
तू नेहमीच हट्ट करायचास
मी देखील पोहायला शिकावं म्हणून
पण
मला अजूनही पोहता येत नाही
तुझ्यानंतर कुणी मला पोहणे शिकवलेच नाही

तू रोज स्वप्नात नसता आलास
तर
माझ्या संसाराचा गाडा ओढता ओढता
कदाचित मला विसर पडला असता तूझा
तुझ्या बरोबर घालवलेल्या क्षणांचा
म्हणूनच
तू रोज स्वप्नात येतोस
आणि
मला जाणीव करून देतोस
अतूट आहे आपल्यातील मैत्रीचा धागा
कळाचे पडदे तोडू शकत नाहीत नातीगोती
नाती अमर असतात
आपल्या मैत्री सारखी

सोमवार, २५ मार्च, २०१९

सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित?


मार्च २०१९ चा महिना नगरच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या महिन्यात नगर जिल्ह्यात खूप राजकीय उलथापालथ झाली. विधान सभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डाॅ सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. नगर लोकसभेच्या जागेसाठी हट्ट करून बसलेल्या सुजय विखे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली होती. शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला सोडली अशी बातमी आली होती परंतू नंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सावरासावर करून ही जागा राष्ट्रवादीच लढवणार हे स्पष्ट केले. पडद्याआड राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यासाठी देखील विखे पाटील यांनी प्रयत्न केले परंतू पवार - विखे यांच्यातील राजकीय वैमनस्यामुळे हे देखील अशक्‍यच होते. तेंव्हा सुजय विखे पाटील यांनी भाजपाशी संधान साधन्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सुजय विखे पाटील यांची मुंबईला गुप्त बैठक झाल्यानंतर महाजन यांनी नगरचा अचानक दौरा केला. या दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते पण विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना जाणीवपूर्वक या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. खरंतर या बैठकीतच सुजय विखे यांना भाजपाकडून उमेदवारी निश्चित झाली होती पण राहीली होती ती फक्त त्यांच्या भाजपात प्रवेशाची औपचारिकता. गिरीश महाजन यांच्या या खासगी दौऱ्यामुळे गांधी संमर्थकात अस्वस्थता पसरली. डाॅ सुजय विखे पाटील यांच्या भाजपाप्रवेशाने दिलीप गांधी यांची तिकीट मिळण्याची शक्यता मावळली होती कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे हे भाजपाचे उमेदवारी असतील अशी घोषणा केली. 

भाजपा तर्फे डाॅ सुजय विखे पाटील यांना उमेदवारी नक्की झाल्यानंतर त्याच्या विरोधात तुल्यबळ असा उमेदवार शोधणे राष्ट्रवादी काँग्रेसपूढील मोठे आव्हानच होते. राष्ट्रवादी तर्फे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले गेले. अलीकडच्या काळात गडाख कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आपला स्वतःचा नवीन पक्ष उभारला आहे. त्यामुळे गडाख कुटुंबातील कुणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार होईल हे दुरापास्तच होते.

प्रशांत गडाख यांनी उमेदवारीस नकार दिल्यानंतर नगर शहरातील विद्यमान आमदार आणि माजी महापौर संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. खरंतर यामगे शरद पवार यांचे फार मोठे राजकारण होते. एक तर त्यांना संग्राम जगताप यांच्यारूपाने तुल्यबळ उमेदवार मिळाला होता तसेच जगताप हे युवा असल्याने दोन युवकांमध्ये ही निवडणूक रंगणार होती. महत्वाचा मुद्दा म्हणजे संग्राम जगताप हे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई असल्याने कर्डिले यांना कैचीत पकडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली. आता यंदाची निवडणूक म्हणजे शिवाजी कर्डिले यांची सत्वपरीक्षा ठरणार आहे. कर्डिले जरी भाजपात असले तरी ते शेवटपर्यंत सुजय विखे पाटील यांचे काम करतील की जवायाला छुपी मदत करतील?? हा ही मोठा प्रश्न आहे. 

भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी हे भाजपाकडून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. वडीलांना तिकीट नाकारल्याने दुखावल्या गेल्याने ते अपक्ष लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली. असं झाल्यास त्याचा फटका नक्कीच सुजय विखे पाटील यांना बसणार आहे. गांधी हे जैन समाजाचे आहेत आणि नगरदक्षिण मतदारसंघात जैन समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष अर्ज भरल्यास यंदा तीन तरूणांमध्ये ऐतिहासिक लढत होईल यात शंकाच नाही.

शेवटी नगर दक्षिणमध्ये भाजपाला पोषक वातावरण आहे. त्यात विखे पाटील यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. डाॅ सुजय विखे पाटील यांनी गेल्या तीन वर्षांत सर्व मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे डाॅ सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

शनिवार, २ मार्च, २०१९

नगरमध्ये विखे पाटील बाजी मारणार?


गेल्या काही महिन्यापासून नगर दक्षिणच्या लोकसभा जागेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील तिढा सुटला आहे. ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला म्हणजेच युवा नेते डाॅ सुजय विखे पाटील यांना सोडल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यामुळे विखे पाटीलांनी विजयाची पहीली पायरी सर केली आहे. गेल्या काही काळापासून विखे पाटील हे वेगवेगळ्या मार्गाने राष्ट्रवादीवर दबाव बनवत होते. कधी पक्षांतर करून भाजपमध्ये जाऊ अन्यथा गरज पडल्यास अपक्ष लढण्याची तयारी असल्याचे सूतोवाच विखे पाटलांनी दिले होते. शेवटी मोठ्या दबावाला राष्ट्रवादी काँग्रेसला झुकावे लागले आणि नगर दक्षिणची जागा पदरात पाडून घेण्यात विखे पाटील यांना यश आले.

डाॅ सुजय विखे पाटील यांनी गेल्या जवळपास दोन वर्षांपासून नगर दक्षिणमध्ये खूप जनसंपर्क वाढवला आहे. ठिकठिकाणी आयोग्य शिबिर आयोजित करून जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांपर्यत पोहचण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षापासून ते रोज मतदारसंघात नियमाने प्रचार करत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी नगर दक्षिणची जागा दोनदा लढवली आहे. १९९८ साली बाळासाहेब विखे पाटील यांनी नगर दक्षिणच्या जागेवर शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांचा वाजपेयी मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून देखील वर्णी लागली होती. अहमदनगर जिल्हा परिषद सध्या विखे यांच्याच ताब्यात आहे. सौ शालिनीताई विखे पाटील या वर्तमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यांनी दुसऱ्यांना हे पद मिळवले आहे.

विखे पाटील यांची यंत्रणा खूप मोठी आहे. विविध शिक्षण संस्था, साखर कारखान्याचे सभासद, यामुळे नगर दक्षिणेत मोठा कर्मचारी व कार्यकर्त्यांचा ताफा त्यांच्या दिमतीला आहे. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांना मानणारे मतदार संघात अजूनही खूप लोक आहेत. त्यामुळे डाॅ सुजय विखे पाटील यांना त्याचा मोठा फायदाच होणार आहे.

२०१४ च्या मोदी लाटेनंतर मतदार संघात लोकांच्या विचारात खूप मोठे बदल झाले आहेत. वर्तमान खासदार दिलीप गांधी हे तीनवेळा नगर दक्षिणेत निवडून आलेले आहेत. गेल्यावेळीची निवडणूक त्यांनी मोदी लाटेवर मोठ्या फरकाने जिंकली होती. पण आता २०१९ ची निवडणूक खासदार गांधीसाठी सोपी राहिलेली नाही कारण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे. हा मतदार संघ दुष्काळी असून शेतकऱ्याच्या विविध समस्यांनी हा मतदारसंघ घेरलेला आहे. यंदातर दक्षिणेतील तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गात खूप नाराजी आहे. कर्जमाफीत शेतकरी वर्गाला झालेला त्रास सर्वत्रूत आहे. तसेच कांद्याला गेल्या वर्षभरात भाव नसल्याने येथील शेतकऱ्यांचे अक्षरशः वाटोळे झाले आहे. दक्षिणेतील शेतकरीवर्ग सध्या खूप असंतोषात आहे. याचा फायदा नक्कीच विखे पाटील घेतील अशी शक्यता आहे.

गेल्या अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेनेच्या हातून सत्तेचा घास भाजपने हिसकावून घेतला. त्यामुळे यंदा सेना भाजप युती होऊनही नगर शहरातील आणि एकूणच मतदार संघातील शिवसैनिक भाजपला किती मदत करतील हे सांगणे कठीण आहे. शिवसैनिकांना महानगरपालिकेतील वचपा काढण्याची आयती संधी चालून आली आहे. याचा फायदा विखे पाटील नक्कीच उचलतील यात शंका नाही.

डाॅ सुजय विखे पाटील हे तरुण असल्याने दक्षिणेतील तरुण वर्गात त्यांच्या विषयी आदर आणि खूप कुतुहल आहे. ठिकठिकाणच्या सभेत तरुणवर्ग मोठी गर्दी करत आहे. गेल्या दोन वर्षापासून डाॅ सुजय विखे पाटील करत असलेल्या प्रचाराचे रूपांतर नक्कीच मतदानात होईल अशी आशा आहे. तेंव्हा विखे पाटलांनी यंदाची नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची केली आहे. त्यात वर्तमान खासदार दिलीप गांधी यांची वाढलेली मुजोरी आणि गुंडगिरी ही नक्कीच वर्तमान खासदारांना त्रासदायक ठरणार आहे यात शंकाच नाही. तेंव्हा डाॅ सुजय विखे पाटील यांच्यारुपाने नगरला नक्कीच तरुण खासदार मिळणार असे भाकीत वर्तवण्यात येत आहे.

~ @gbp125 ( गणेश भाऊसाहेब पोटफोडे )

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

जाॅर्जिया भ्रमंती : भाग २

२६ डिसेंबर २०१८ : तिब्लिसी शहर भ्रमंती
सकाळी साडेनऊ वाजता आम्ही नाश्ता करून हाॅटेलच्या लाॅबीत येऊन बसलो. हाॅटेलमधील इतर पर्यटक पाहुण्यांची फिरायला जाण्याची लगबग चालू होती. वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांचे गाईड त्यांच्या पाहुण्यांना फिरायला घेऊन जात होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घातले होते. आम्ही देखील जॅकेट, टोप्या, मफलरी घालून तयार होतो. बरोबर दहा वाजता आमची टूर गाईड ऐका आम्हाला घेऊन जाण्यासाठी आली. हाॅटेलच्या बाहेर पाउल ठेवताच वारा आणि थंडीने आमचे स्वागत केले. तापमान जवळपास ४ अंश सेल्सिअस होते. ऐका आणि डेव्हिड हे दोघे पुढील सर्व प्रवासात आमच्या बरोबर असणार होते. गाडी चालू झाली आणि जाॅर्जिया पाहण्याचा आमचा कार्यक्रम अधिकृतपणे सुरू झाला.

पंधरा मिनिटांनी आम्ही शहरातील एका उंच टेकडीवर आलो. आजही रस्त्याच्या दुतर्फा सुंदर मॅपलची झाडं दिसली. कुरा नदीवर ठिकठिकाणी अनेक पुल बांधलेले होते. काही पुल जुण्या बांधणीचे तर काही पुल नवीन होते. आम्ही ज्या टेकडीवर आलो होतो तिथं पहिल्या वख्तांग गोर्गासाली राजाचा भव्य अश्वारूड पुतळा होता. या टेकडीवरून कुरा नदी आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येवू शकत होती म्हणून पहिल्या वख्तांग राजाने येथे भव्य किल्ला आणि चर्च बांधले. आजही तिथं एक चर्च मोठ्या डौलाने उभे आहे. त्या चर्चला मेटेखी चर्च असे संबोधले जाते. स्थानिक भाषेत मेटेखीचा अर्थ म्हणजे 'राजवाड्याच्या आजूबाजूची जागा' असा होतो. मेटेखी चर्च खूप भव्य आहे आणि त्याची बांधणी देखील खूप मजबूत आहे. आम्ही चर्च पाहण्यासाठी आत गेलोत. जाॅर्जियातील जवळपास ९० टक्के ख्रिश्चन हे ऑर्थोडॉक्स आहेत. ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समजूतीनुसार महिलांना खूप नियम असतात. याची प्रचिती आम्हाला चर्चमध्ये प्रवेश करतांना झाली. चर्चमध्ये प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट पेहराव (ड्रेस कोड) असणे आवश्यक होते. शरीरभर कपडे, पायात बूट, महिलांचे डोके झाकलेले असावे वगैरे. चर्चमध्ये गेल्यावर महिला एका ठराविक ठिकाणानंतर पुढे जावू शकत नाहीत. सोव्हिएत राजवटीच्या काळात जेव्हा कुठलाही धर्म मानण्यास व धार्मिक कार्य करण्यास बंदी होती त्यावेळी या जागेचा उपयोग कैदखाना म्हणून व्हायचा.

मेटेखी चर्च पाहिल्यानंतर आम्ही टेकडीच्या खाली चालत गेलोत. काही अंतरावर युरोप स्केअर नावाचा चौक होता. येथून आम्ही केबल कारमध्ये बसून नारीकाला किल्यावर जाण्यासाठी निघालो. केबल कारमधून तिब्लिसी शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडत होते. जुनी तिब्लिसी, नवी तिब्लिसी, त्याच बरोबर कुरा नदीचे हिरवेगार पाणी, नदीवरचे विविध पुल, हे सर्व खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य होते. जुन्या तिब्लिसीतील घरं पाहुन कोकणातील घरांची आठवण झाली. कौलारू घराप्रमाणे दोन्ही बाजूला निमूळती घरं जुन्या तिब्लिसीत दिसत होती. केबल कारमधून उतरल्यावर संपूर्ण तिब्लिसी शहराचे दर्शन नारीकाला किल्ल्यावरून झाले. हा किल्ला प्राचीन असून त्याची तटबंदी अजूनही टिकून आहे. तटबंदीच्या आत एक चर्च आहे. या चर्चचे नाव सेंट निकोलस चर्च असून तेराव्या शतकातील जुने चर्च आगीत भस्मसात झाल्यानंतर त्याजागी हे नवीन चर्च उभारण्यात आले आहे. त्याच डोंगरावर एका बाजूला मदर ऑफ जाॅर्जिया चा भव्य पुतळा आहे. तिब्लिसी शहराच्या स्थापनेस १५०० वर्ष पुर्ण झाल्या प्रित्यर्थ सन १९५८ साली या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. किल्याच्या पाठीमागच्या बाजूस नॅशनल बोटॅनिकल गार्डन ऑफ जाॅर्जिया आहे. पुर्वी हे शाही परिवारासाठी बनवलेले एक सुंदर उद्यान होते. कालांतराने या उद्यानाच्या संवर्धनासाठी जाॅर्जिया सरकारने तेथे वनस्पती शास्त्राचे विद्यापीठ स्थापन करून हे उद्यान त्याच्या अखत्यारीत दिले असावे.

किल्ला पाहिल्यानंतर आम्ही मागच्या बाजूने डोंगर उतरू लागलो. थोड्यावेळतच आम्ही रहीवाशी भागात आलोत. निमुळत्या गल्ली बोळातून खाली उतरण्यासाठी वाट होती. किल्ल्याच्या डोंगरामागून एक ओढा वाहतो. त्या ओढ्यावर एक सुंदर पुल बनवला असून त्या पुलास 'प्रेम सेतू' (लव्ह ब्रीज) असे म्हणतात. या छोट्या पुलाच्या दोन्ही कठड्यावर प्रेमीयुगुलांनी छोटछोटी कुलपं लावली आहेत. प्रेमाचं प्रतिक म्हणून प्रियकर किंवा प्रेयसी या पुलावर येवून कुलुप लावतात आणि चावी वाहत्या पाण्यात फेकून देतात. प्रेमीयुगुलांनी आपल्या प्रियकर वा प्रेयसीचे नावे कुलपांवर आवर्जून लिहीलेली होती. त्या पुलाचे दोन्ही कठडे सोनेरी कुलपांनी भरून गेले होते. असे पूल पॅरिस आणि एमस्टरडॅम येथे देखील आहेत. गंमत म्हणून कुणीतरी सुरू केलेली ही संकल्पना जगभर प्रसिद्ध पावत आहे.

प्रेम सेतू ओलांडून आम्ही उताराने जुन्या तिब्लिसीकडे मार्गक्रमण करू लागलो. काही अंतरावर गेल्यावर उजव्या हाताला तिब्लिसीतील प्रसिद्ध जुमा मस्जिद दिसली. पारंपारिक लाल विटांच्या बांधकामातील ती मस्जिद जाॅर्जियातील मुस्लिमांचे मुख्य प्रार्थनास्थळ आहे. जाॅर्जियाचा राष्ट्रीय धर्म जरी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन असला तरी तिथं धार्मिक स्वातंत्र्य आहे असं आमची गाईड ऐका म्हणाली.

थोडंसं पुढे आल्यावर रस्त्यावर कला सादर करणाऱ्या काही स्थानिक कलाकारांनी आम्हाला आडवलं. बहुधा त्यांना भारतीय लोक बरोबर ओळखता येत असावेत. आम्हाला त्यांनी विचारले "इंडियन?" आम्ही मान डोलावलताच त्यांनी राज कपूरचे प्रसिद्ध गाणे गायला सुरूवात केली.

"मेरा जूता है जपानी
ये पतलून इंग्लिशतानी
सर पे लाल टोपी रुसी
फिर भी दिल हैं हिंदुस्थानी"

भारतीय सिनेमा येथे फार लोकप्रिय आहे असं समजले. विषेशतः राज कपूरचे जाॅर्जियामध्ये खूप फॅन आहेत. जुन्या पिढीतील लोक अजूनही त्यांचे नाव घेतात. या आधी मी कुठेतरी याबाबत वाचले होते पण आज ते प्रत्यक्ष अनुभवत होतो.

प्रेम सेतू वरून आम्ही जो ओढा ओलांडून पलिकडे गेलो होतो त्याच ओढ्याच्या कडेने आम्ही जात होतो. थोडंसं पुढे आल्यावर आम्ही परत ओढ्यावरला एक पादचारी पुल ओलांडला. या पुलावर देखील काही कुलपं लावलेली आढळली. कदाचित भविष्यात हा देखील तिब्लिसीचा प्रेस सेतू नंबर दोन होईल. ओढा ओलांडताच तिब्लिसीतील प्रसिद्ध सल्फर बाथ (गरम पाण्याचे झरे) लागले. हे गरम पाण्याचे झरे छोट्या छोट्या इमरती बनवून त्यात बंदिस्त केले आहेत. आत अंघोळ करण्यासाठी पंचतारांकित हाॅटेलप्रमाणे सुविधा करण्यात आल्या आहेत. यात अंघोळ करण्यासाठी अर्थातच पैसे मोजावे लागतात. आम्ही फक्त बाहेरूनच त्याची माहीती घेतली. पूर्वीच्या काळी येथे वर्षातील ठराविक कालावधीत यात्रा भरायची. बाया आपल्या मुलांसाठी योग्य वधू निवडण्यासाठी येथे येत असत. आणि सल्फर बाथ मध्ये अंघोळ केल्यावर अनेक प्रकारचे त्वचा रोग बरे होतात ही देखील मान्यता आहे. त्यामुळे अनेक पर्यटक आवर्जून येथे अंघोळ करतात.

जुनी तिब्लिसी खरोखरच फार सुंदर होती. रस्ते दगडी विटांनी बनवलेले (पेव्हींग ब्लॅक्स) होते. यावून चालतांना वेगळीच मजा येत होती. सल्फर बाथ नंतर आम्ही सायओनी चर्चमध्ये आलोत. आत्तापर्यंत बघीतलेली सगळी चर्च याच बांधनीची होती. आणि खरोखरच जाॅर्जियातील चर्चच्या इमारती खूपच सुंदर होत्या. पिवळसर रंगातील दगडांनी या चर्चची बांधणी केलेली आहे. काही अंतरावरून पाहिल्यास ही सगळी चर्च सोनेरी रंगाची वाटतात.
आम्ही ज्या रस्त्याने जात होते बहुधा तो जुना बाजार असावा. रस्त्याच्या दोन्ही बाजून असंख्य दुकाणं होती. गालीचे, स्थानिक पदार्थ, भेटवस्तू, सोव्हिनियर्स, पेंटींग त्याच बरोबर काही रेस्टॉरंट देखील होते. विशेष म्हणजे जाॅर्जियात शाकाहारी जेवन मिळते याचं मला नवल वाटलं. मी ऐकाला याविषयी विचारले असता ती म्हणाली की, जाॅर्जियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन वर्षातील ठराविक काळ फक्त शाकाहारी जेवण घेतात. त्यामुळे येथे शाकाहारी जेवण मिळते. येथे शेपूची भाजी आणि वांग्याची भाजी फार प्रसिद्ध आहे.

काही अंतरावर आल्यानंतर आम्ही एका छान सोव्हिनियरच्या दुकानात गेलोत. तसं मलाही सोव्हिनियर्स जमा करण्याचा खूप छंद आहे. चलनी नोटा, नाणी, पोस्टाची तिकीटे, पोस्ट कार्ड या गोष्टी मी मोठ्या प्रमाणात जमवलेल्या आहेत. माझ्याकडे जवळपास सव्वाशे देशांच्या नोटा आहेत. तसेच वेगवेगळ्या देशांची खूप पोस्टकार्ड देखील आहेत. मी युनेस्को जागतिक वारसास्थळांची पोस्टकार्ड जमवत असतो. या दुकानात गेल्या बरोबर मी माझ्या आवडीची पोस्टकार्ड विकत घेतली. ओवीने एक जाॅर्जियाचा झेंडा आणि एक किचैन विकत घेतले.

तिब्लिसी शहर फिरण्याचा आमचा महत्वाचा टप्पा आता पूर्ण झाला होता. यानंतर कुरा नदीवर बनवलेल्या शांती सेतू (ब्रीज ऑफ पीस) याला आम्ही भेट दिली. हा कुरा नदीवर बांधलेला एक पादचारी पुल आहे. यांचे बांधकाम हे लोखंडी असून त्याच्या छताची सजावट हिरवट रंगाच्या काचांनी केली आहे. संध्याकाळी यावर खूप आकर्षक रोषणाई करण्यात येते. शांती सेतू आता तिब्लिसी शहरातील एक आकर्षण बनले आहे. तिब्लिसीला भेट देणारे पर्यटक नक्की या पुलास भेट देतात. या पुला शेजारीच कुरा नदीत नौकाविहार करण्याची सुविधा आहे. आम्ही या शांती सेतूवर मनसोक्त फोटो काढले.

शेवटच्या टप्प्यात आम्ही तिब्लिसी शहरातील सर्वात उंच डोंगरावर आलो. येथे एक मनोरंजक पार्क बनवला आहे. यात मुंबईतील एस्सेल वर्ल्ड सारख्या गोष्टी आहेत. डोंगराच्या एका बाजूला तिब्लिसी दुरदर्शनचा उंच मनोरा आहे. याच डोंगरावर जाण्यासाठी सुप्रसिद्ध फनिक्युलर ट्रेन आहे. ही ट्रेन डोंगराच्या उतारावरून जवळपास साठ ते सत्तर अंशाच्या कोनात वर खाली जाते. आम्ही डोंगर कारमधून चढून गेलो होतो तर खाली उतरताना फनिक्युलर ट्रेनमध्ये बसून आलोत. इतक्या उतारावर ट्रेनमध्ये बसून येणे खूपच मजेशीर अनूभव होता.

फनिक्युलर ट्रेनमधून खाली उतरल्यानंतर आजचा तिब्लिसी पाहण्याचा कार्यक्रम संपला. आम्हाला ड्रायव्हरने हाॅटेलवर आणून सोडले. सकाळी गेलो होतो त्याच मार्गाने परत आलो. तिब्लिसी शहरात वाहतूकची कुठे कोंडी झालेली आढळली नाही. सगळे जण वाहतूकीचे नियम पाळतांना दिसत होते. शहरात सार्वजनिक वाहतूक चांगली होती. सरकारी पिवळ्या रंगाच्या खूप बस रस्त्याने ये जा करत होत्या. तिब्लिसी शहरात मेट्रो देखील आहे. तिब्लिसी हे इतर कुठल्याही युरोपियन शहरासारखे सुंदर होते.
□□□