बुधवार, २६ मार्च, २०१४

भूतनाथ

किर्र अंधार
एक पायवाट
गडद सावली
करी पाठलाग
 
कोण बोलतय
कसला आवाज
झरझर चाले
माझ्या मागोमाग 

कुत्री विव्हळी
राना वनात
पाला पाचोळा
करी खळखळाट 

अवसेची रात
वडाचे झाड
माझ्यात उरले
नाही त्राण

मला बोलावी
जरा थांब
मी इथला
आहे भूतनाथ 

घाम फुटला
गार वाऱ्यात
थरकापले अंग
माझे आपोआप 

जोर जोरात
पळत सुटलो
ठेच लागून
कितीदा आपटलो 

मग गावकुसाची
पांदी आली
हनुमान चालिसा
चालू केली 

गडद सावली
मागे फिरली
माझ्या जीवाची
सुटका झाली 

- ©गणेश पोटफोडे

सोमवार, २४ मार्च, २०१४

सौदी अरेबिया डायरी : भाग ३ माझा मित्र परिवार


 सौदीमध्ये पहिल्यांदाच पाउल ठेवले होते. माझ्या मनात शंका होती की मला कोणी मराठी बोलणारा मित्र भेटेल की नाही. आमच्या नवीन १४ लोकांच्या ग्रुप मध्ये मी एकटाच मराठी भाषक होतो तर इतर बहुतेक दक्षिणात्य होते. येथे आल्यावर जवळपास दोन आठवडे मला मराठी बोलायला मिळालेच नाही. काही दिवसांनी येथे दोन-तीन मराठी माणसं आहेत असं समजल्यावर मला फार आनंद झाला.
   संजय माने हे कल्याण (मुंबई) मधील सद्ग्रहस्थ आमच्या कंपनी मध्ये मागील तीन वर्षांपासून कामाला होते. त्यांना जेंव्हा एक नवीन मराठी माणूस कंपनी मध्ये आलाय असे कळाल्यावर ते माझी भेट घेण्यासाठी आवर्जून आले. त्यांच्याकडून मला कंपनीतील रत्नाकर हिरे आणि कमलेश बुजाडे या इतर दोन मराठी माणसां विषयी माहिती मिळाली. त्यावेळी रत्नाकर हे कंपनीच्या कामानिमित्त जर्मनीला गेलेले होते. या तिघांनी एक मराठी माणूस या नात्याने मला फार मदत केली. नवीन देशात आणि त्यातल्या त्यात जगावेगळे नियम असणाऱ्या सौदीमध्ये त्यांचे मार्गदर्शन मोलाचे होते.
  संजय माने दिसायला उंच, गोरा वर्ण, मध्यम बांधा, हसरा चेहरा, फ्रेंच कट दाढी असे त्यांचे वर्णन करता येईल. स्मित भाषी आणि मन मिळावू स्वभावामुळे ते संपूर्ण कंपनीमध्ये प्रसिद्ध होते. तसं त्यांच्या आणि माझ्या वयात २०-२१ वर्षांचा फरक असूनही आमच्या देघांची खूप गट्टी जमली. काही महिन्यांच्या काळानंतर कमलेश बुजाडे याच्या प्रयत्नाने आम्हा दोघांना कंपनी अकॉमोडेशन मध्ये सेम रूम मिळाली. मी शाकाहारी असल्यामुळे आम्ही दोघे एकत्र स्वयंपाक बनवायचो. माने हे कोकणातील असल्यामुळे ते मांस मच्छी खायचे पण माझ्या शाकाहारीपाना मुळे त्यांनी कधी घरी मांस मच्छी वगैरे बनवले नाही. थोड्याच दिवसामध्ये मी जेवण बनवण्यात पटाईत झालो. शाकाहारी भाज्या, कांदा पोहे, शिरा, वाडा पाव, मिसळ, रव्याचे व बेसनाचे लाडू, थालपीठ हे अस्सल मराठमोळे पदार्थ मी बनवू लागलो. मी बनवलेला शिरा आणि कांदा पोहे हे सर्वांना फार आवडायचे. एका वेगळ्या प्रकारची फोडणीचे वरण मी बनवायचो ते माझ्या इतर दक्षिणात्य मित्रांना फार आवडायचे, मी गमतीने त्या डिशचे नामकरण "दाल पूना" असे केले होते.
   रत्नाकर हिरे हे कुशाग्र बुद्धीचे धनी होते. सौदी अरेबियातील महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ किंवा मराठी माणसाचा बुलंद आवाज अशा भाषेत मी त्यांचे वर्णन करेल. मराठी भाषा आणि मराठी लोक यांच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. मराठी लोकांची निंदा त्यांना अजिबात सहन व्हायची नाही. त्यांचा स्वभाव भयंकर तापड होता, कामगार लोक त्यांच्यापुढे जाण्यास घाबरत असत. त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन कंपनीला प्रगती पथावर नेले.  
   या मराठी मित्रां व्यतिरिक्त विविध देशातील आणि भारताच्या इतर राज्यातील मित्र मला येथे आल्यावर मिळाले. यामुळे वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती यांचा परिचय अगदी जवळून अनुभवता आला.

गुरुवार, २० मार्च, २०१४

चिऊताई

चिऊताई चिऊताई थांब जरा
तान्हुलीला पाहूदे तुला
तान्हुली आमची फार हट्टी
तुझ्याशी झाली तिची गट्टी
 
वाट रोज तुझी ती पाहाते
दारापाशी येवून उभी राहाते
खाऊ आणते पाणी आणते
तुझ्यासाठी गाणं म्हणते
 
चिऊताई चिऊताई रुसलीस का
झाडावर जावून तू बसलीस का
ये ग ये ग चिऊताई
खाऊ पाणी घेऊन जाई
 
भूर भूर येई चिऊताई
खाऊ पाणी पोटभर खाई
चिऊताई माझी फार हुश्शार
रोज तान्हुलीला भेटणार  
- ©गणेश पोटफोडे

बुधवार, १९ मार्च, २०१४

सौदी अरेबिया डायरी : भाग २ छोटे केरळ

कुठल्याही नवीन प्रदेशात जाण्या अगोदर आपल्या मनात अनेक शंका येतात जसे की, त्या देशाची भाषा आपल्याला येत नाही मग कसे होणार? वगैरे. पण माझ्या बाबतीत हा अनुभव थोडा भिन्न होता. मी सौदी मध्ये येण्या अगोदर अरबी भाषेचे थोडे ज्ञान संपादन केले होते. माझ्या गावातील एक टेलर काम करणारा मित्र पाच वर्ष सौदीत काम करून परतला होता त्यामुळे तो खूपच छान अरबी बोलत असे. मी त्याच्याकडून अरबी भाषेचे थोडे शब्द आणि वाक्य शिकून घेतले त्यामुळे येथे आल्यावर मी नवीन असून सुध्दा भाषेचा फारसा त्रास झाला नाही. माझ्या एका मुस्लिम मित्राकडून उर्दू अक्षरे शिकलो होतो. अरबी आणि उर्दू लिपीत बरेच साधर्म्य असल्यामुळे मला अरबी लिहिण्यास व वाचण्यास काहीच अडचण आली नाही. अरबी भाषा चांगली शिकण्यासाठी मी जोमाने प्रयत्न केले. कंपनी मध्ये जुन्या सहकाऱ्याकडून मी वेगवेगळे नवीन शब्द आणि वाक्य शिकून ते एका वहीत व्यवस्थित लिहून घेतले. अरबी भाषेचा अभ्यास करताना मला आढळून आले की अरबी मधील कित्येक शब्द आपण मराठी मध्ये जाशेच्या तशे वापरतो. नंतर मी माझ्या वहीत अरबी आणि मराठीत वापरत येणाऱ्या सारख्या शब्दांची यादीहीच करून ठेवली. सौदी मध्ये दाखल झाल्यानंतर काही महिन्यातच मी अरबी छान बोलू लागलो होतो. 

   सौदी अरेबियाची राष्ट्रभाषा ही अरबी असल्यामुळे इथले जवळपास सर्वच व्यवहार अरबी भाषेतून होतात. स्थानिक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स,आणि इतर अनेक गोष्टी अरबी भाषेतच असतात. अरबी भाषेनंतर येथे हिंदी प्रामुख्याने बोलली जाते. बहुतेक कामगार हे भारतीय उपखंडातील असल्यामुळे येथे हिंदी भाषेचा खूप प्रभाव आहे. आफगाणिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका या उपखंडातील लोक चांगले हिंदी बोलतात. उर्दू आणि हिंदी भाषेमध्ये जरी साम्यता असली, आणि उर्दू भाषक जरीही या भाषेला उर्दू मालत असले तरीही सौदी मध्ये बोलली जाणारी हिंदी - उर्दू या मिश्रित भाषेला 'हिंदी' या नावानेच ओळखले जाते. अरबीमध्ये भारतीय लोकांना हिंदी असेच संबोधतात तर भारताला अलहिंद म्हणतात. अरबी व हिंदी या भाषानंतर येथे बोलली जाणारी तिसरी महत्वाची भाषा म्हणजे मल्याळम. त्यानंतर बंगाली, तगालूक, तमिळ आणि इंग्रजी या भाषांचा क्रम लागतो. सरकारी कार्यालये, बँका, मनी एक्सचेंग या ठिकाणी विविध भाषामधून सूचना फलक पाहण्यास मिळतात.
   सौदी मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे केरळी लोकांची संख्या आणि त्यांनी येथे प्रत्येक व्यवसायात घेतलेली गरुड झेप. केरळी लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांचा येथे प्रत्येक व्यवसायात बोलबाला आहे. मुंबईमध्ये जसे भैय्या लोक कुठलाही व्यवसाय करतात त्याप्रमाणे येथेही केरळी लोक सर्व प्रकारच्या व्यवसायात दिसतात. किराणा दुकान, खानावळी, चहाची दुकानं, शॉपिंग सेन्टर्स, नाव्ही, टेलर, गाडी चालक, लौंड्री वाले, भाजीपाला विक्रेते असे जवळपास सर्व व्यवसाय केरळी लोकांचेच आहेत. येथे असलेले बहुतेक डॉक्टर आणि नर्स हे पण केरळीच आहेत.
   मी काम करत असलेल्या कंपनीत एकूण कामगारांच्या संखेच्या पन्नास टक्क्याहून अधिक पण फक्त केरळीच आहेत. केरळची बहुतेक लोक हे बहुभाषक असल्यामुळे त्यांच्याशी बोलण्यास भाषेची आडचन जाणवत नाही. केरळी लोकांना त्यांची भाषा सोडून किमान हिंदी, तमिळ, इंग्लिश आणि अरबी या भाषा बोलता येतात. केरळी लोकांना त्यांच्या मातृभाषेचा खुपच आभिमान आहे, कुठल्याही धर्माचा केरळी माणूस संकटात असतांना सर्वजण त्याच्या मदतीला धावून जातात ही गोष्ट येथे आवर्जून निदर्शनास येते.
    सर्व धर्मीय केरळी लोक 'ओनाम' हा त्यांचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात. या दिवशी सर्व केरळी हॉटेल्स मध्ये केळीच्या पानावर वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. माझ्या माहिती प्रमाणे या एकाच दिवशी येथे शुद्ध शाकाहारी जेवण मळत असावे.
   मल्याळम भाषेत येथून अनेक दैनिके प्रसिद्ध होतात. भारता बाहेर राहून ह्या केरळी लोकांनी आपली मातृभाषा आणि संस्कृती किती प्रेमाने जपली आहे हे पाहून एखाद्या मराठी भाषाकाचे डोळे दिपून जावेत. मराठी माणसांना नवल वाटणारी हि गोष्ट आहे. क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्र कितीतरी मोठा असला तरी भाषेच्या बाबतीत आपण मराठी लोक किती भरकटलो आहोत याची खंत प्रत्येक मराठी माणसाला येथे जाणवते. एखाद्या शुष्क वाळवंटात हिरवेगार झाड क्वचितच किंवा पाहण्यासच भेटू नये तशीच गत येथे मराठी भाषकांची आहे. हाजारात एखादा मराठी बोलणारा कधीतरी भेटतो.

सोमवार, १७ मार्च, २०१४

सौदी अरेबिया डायरी : भाग १ नव्या देशात


खेड्यातला माणूस मुंबई - पुण्यात जावा आणि परत खेड्यात परतल्यावर तो ज्याप्रमाणे आपले अनुभव नातेवाईक आणि मित्रांना सांगतो तसेच काहीतरी माझ्या बाबतीतही झाले आहे. मीही खेड्यातलाच होतो. खेड्यातून  जाऊन नोकरीसाठी मुंबईपुण्यात राहिलो आणि पुढे मला परदेशात जाण्याची संधी मिळाली. मी माझ्या पहिल्या विदेश प्रवासात आलेल्या काही कडूगोड आठवणी सांगणार आहे.
    प्रत्येक मराठी माणसाने विमानातून प्रवास करणे , विदेशात जाणे अशी अनेक स्वप्ने उराशी बाळगलेली असतात परंतु त्यातील काही जनच प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. मी ही त्यामाधालाच होतो. विदेशात नोकरी मिळावी यासाठी मी फार प्रयत्न केले. माझ्या अथक परिश्रमानंतर मला शेवटी ऑक्टोबर २००६ मध्ये यश मिळाले आणि आयुष्यात पहिल्यांदाच विदेशात काम करण्याची संधी मिळाली.
   सौदी अरेबिया! हे नाव लहानपणा पासून ऐकले होते आणि दूरदर्शनवर या देशाविषयी बरेच काही पहिलेल होते. इथली धार्मिक कट्टरता, नियम याबाबत मला थोडी पुसटशी कल्पना आधीपासूनच होती. हा देश आपल्या धर्माबाबत किती कट्टरता पाळतो याची प्रचीती मला दम्माम विमानतळावर उतरल्या बरोबर आली. सौदी अरेबियन एरलाइन्सच्या मुंबई दम्माम फ्लाईटने मी सौदी अरेबियात दाखल झालो. माझा हा पहिला विमान प्रवास सुरक्षित आणि आनंदात झाला. सकाळी १० वाजता (भारतीय वेळेप्रमाणे) विमानाने मुंबईहून उड्डाण केले आणि साडेतीन तासात स्थानिक वेळेप्रमाणे ११ वाजता दम्मामला पोहचले. (सौदी अरेबियाची प्रमाण वेळ आणि भारताची प्रमाण वेळ यामध्ये अडीच तासांचा फरक आहे. सौदी अरेबियाची प्रमाण वेळ +३.०० GMT आहे तर भारताची प्रमाण वेळ +५.३० GMT आहे)
   जेंव्हा आपण एखाद्या नवीन देशात प्रवेश करतो तेंव्हा आपल्याला तिथल्या इमिग्रेशनच्या प्राथमिकता पूर्ण कराव्या लगतात. जसे आपण कुठल्या देशातून आलो, कश्यासाठी आलो, किती दिवस राहणार आणि पासपोर्टची माहिती वगैरे. परंतू इथल्या इमिग्रेशन फॉर्मवर तुमचा धर्म कोणता आहे हा प्रश्न ठळक अक्षरात लिहिलेला होता हे पाहून मला जरा नवलच वाटले. इमिग्रेशन संपून मी कस्टमसाठी रांगेत उभा रहिलो. रांगेत उभा असताना मी जे काही पाहत होतो ते तर खूपच भयंकर वाटत होते. सौदी कस्टम अधिकारी गैरमुस्लिम लोकांच्या गळ्यात मनगटावर काय काय बांधलेले आहे, काही धार्मिक माळा, चिन्हे आहेत का? हे तपासात होता. माझ्या गळ्यात वारकरी संप्रदायाची तुळशीची माळ आणि उजव्या हाताच्या मनगटावर मढी येथील कानिफनाथाचा नाडा बांधलेला होता. दुर्दैवाने त्या अधिकाऱ्याच्या नजरेत त्या गोष्टी आल्या. त्याने मला ती माळ व हातात बांधलेला नाडा तोडून फेकण्यास सांगितला. त्या अधिकाऱ्याच्या पुढे अनेक माळा आणि  हिंदू देवी देवतांच्या फोटो यांचा खच पडला होता. नवीन जाणाऱ्या माणसांना याची कल्पना नसल्यामुळे अश्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. मला आधी याची माहिती होती पण सौदी अधिकारी एव्हढी कसून तपासणी करतील असे वाटले नव्हते. सौदीतील माझा प्रवेशच अश्या वाईट प्रसंगा पासून चालू झाला होता. हा देश १००% मुस्लिम असल्यामुळे येथे दुसऱ्या धर्माला अजिबात थारा नाही. देव पूजा, धार्मिक ग्रंथ बाळगणे, धार्मिक फोटो किंवा मूर्ती पूजा यांना कायद्याने सक्त मनाई आहे. तसे काही आढळल्यास शिक्षा पात्र गुन्हा ठरू शकतो. माझ्या सारख्या धार्मिक माणसाचे काय होणार असा विचार करत मी विमानतळाच्या बाहेर पडलो. विमानतळावर आम्हाला घेण्यासाठी कंपनीची गाडी आली होती. त्या कंपनी मध्ये आमचा १४ जणांचा ग्रुप मुंबईहून एकाच विमानाने गेला होता.
   किंग फाहद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शहराच्या खूपच बाहेर आहे. विमानतळाहून मुख्य शहरात पोहचण्यासाठी दिडतास लागला. रस्ते सुंदर आणि दुतर्फा खजुरांच्या झाडाच्या रंगा होत्या. विमानतळाचा परिसर अत्यंत सुंदर वाटला. थोडे बाहेर पडल्यावर चहूकडून वाळ्वंट आणि मधेच रस्ता होता. गाडीतून  वाळवंटात दूरवर चरणारी उंट नजरेत येत होती.
    एकदाच सौदी अरेबिया मध्ये पोहचलो होतो, आता येथील वातावरणाशी एकरूप होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार होते. सौदी मध्ये वाळवंटच आहे म्हणजे फक्त कडक उन्हाळा! एव्हढच समीकरण माझ्या मनात पक्क होत. येथे आल्यावर कळाले की इकडे भयंकर थंडी पडते. सोसाट्याचा वारा, रात्रीचे तापमान शुन्य अंश असे वातावरण डिसेंबर ते फेब्रूवारी दरम्यान असते. थंडीसाठी लागणारे गरम कपडे मी आणले नव्हते त्यामुळे माझी चांगलीच पंचाईत झाली. सुरुवातीचे दोन महिने खूप वाईट गेले. मी जन्मापासून शुद्ध शाकाहारी माणूस असल्यामुळे माझे खाण्यापिण्याचे थोडे हालच झाले. सौदी मध्ये शुद्ध शाकाहारी अश्या खानावळीच नाहीत. हॉटेल मध्ये फक्त मौंसाहारी पदार्थ मिळायचे. क्वचितच एखाद्या हॉटेलमध्ये शाकाहारी जेवण मिळायचे. दक्षिण भारतीय हॉटेल्स मध्ये इडली, डोसा आणि परोठा खाऊन थोडे दिवस काढले. स्वयंपाकाचे माझे ज्ञान शुन्य होते तरीही काही दिवसांनी कसेतरी जेवण बनवायला लागलो.
   असे अनुभव मला नवीन देशात गेल्यावर आले. माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी परदेशात कामाला आलो होतो त्यामुळे मोठ्या हिमतीने प्रत्येक खडतर प्रसंगाचा सामना करत राहिलो.

शनिवार, ८ मार्च, २०१४

कळी उमलली

कळी उमलली 

कळी उमलली कळी उमलली
आनंदाची पहाट झाली
अंगणात सुगंध दरवळाया
एक नाजूक परी अवतरली

हसरी लाजरी गोड बाहुली
दुडू दुडू धावून करेन मस्ती
घरभर धिंगाणा अन गप्पा गाणी
प्रेमाची ती खान भारी

रुसेल रडेल ती खाऊसाठी
हट्टासाठी टाकेल कट्टी
होईल घोडा तिच्यासाठी
पाठीवर घेऊन मरेन फेरी

सर्वांची ती होईल लाडकी
जीवनात माझ्या लक्ष्मि आली
समाधानाची आज दिवाळी
आमच्या घरी तान्हुली जन्मली  
 
गणेश पोटफोडे

शुक्रवार, ७ मार्च, २०१४

एक सुरुवात

ll श्री गणेशाय नमः II 

     लहानपणापासून अनेक छंद जपले. लेखन, नाण्याचा संग्रह, टपाल तिकिटांचा संग्रह, कात्रणे, भ्रमंती. कालांतराने आवडी प्रमाणे व वेळे प्रमाणे छंद बदलत गेले तरीही मी सगळ्या छंदांना जपण्याचा प्रयत्न केला. तसा मला लेखनाचा छंद अगदी माध्यमिक शाळेपासूनच लागलेला . त्या वेळी काही छान कविता कराव्यात किंवा चांगले निबंध लिहवेत आणि मराठीच्या शिक्षका कडून शाब्बासकी घ्यावी . पण माझी हि साहित्याची लागलेली गोडी फार काळ टिकली नाही. व्यावासाहिक शिक्षणाकडे वळल्यामुळे वाचन व लेखन करणे कमी होत गेले. आज कित्येक वर्षांनी बहिणाबाई च्या 'मन ओढाय ओढाय' कविते प्रंमाणे माझे मन मला परत लेखनाकडे घेऊन आले आहे.
     या ब्लॉगच्या माध्यमातून मी माझ्या कविता, आठवणी, अनुभव आणि निबंध लिहिणार आहे. माझ्या मनातल्या या विचारांना एक स्वतःचे आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. हा माझा प्रामाणिक प्रयत्न आपल्यांना नाक्कीच आवडेल. आपल्या सूचना व प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे.

आसुसलेल्या मनाची धडपड हि न्यारी l पाहिलेल्या स्वप्नांना पंख नवे देणारी ll       

वृन्दावून बाहू आलिंगन देण्यास आला l "शब्दगंध" माझ्या अंतरंगात अवतरला ll