शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

इमानदारी की भिती??

वेळ मध्यान्हाची, स्थळ एक दक्षिण भारतीय नामांकित सोन्याचे दालन, मीना बाजार, बर दुबई.

दुबईतील सोने हा आता भारतीयांच्या जीवनातील एक मायावी घटक बनला आहे. दुबईत कुठल्याही कामासाठी आलेला भारतीय सोने खरेदी केल्या खेरीज आभावानेच जात असावा. माझे काही ओळखीचे लोक पर्यटनाला म्हणून दुबईत आले होते. त्यांना सोने खरेदी करण्याची फार इच्छा. म्हणून मी त्यांना घेऊन मीना बाजार आलो होतो.

"या" दालनात आल्यावर साखळी घेण्याचे ठरले. ही डिझाईन, ती डिझाईन, दुबई मेक, सिंगापूर मेक. मेकिंग चार्जेस मध्ये किती कमी करतो? हे ते अशी बरीच घासाघीस. मग ही साखळी घालून पाहा, ती घालून पाहा वगैरे अक्षरशः दोन तास चालू होते. तो सेल्समन पूरा वैतागला होता. साखळी घेणार्‍या पाहुण्यांचे प्रश्न संपत नव्हते. तेच तेच प्रश्न 10 वेळेस विचारले जात होते. शेवटी एक सिंगापूर डिझाईन पसंत पडली. 11 दिरहम प्रति ग्रॅम मेकिंग चार्जेस सह. बील झाले. मी मनात 'सुटलो बुवा एकदाचे' म्हणत बाहेर पडलो.

आता एकाची खरेदी झाली. दुसर्‍याची बाकी होती म्हणून परत एका वेगळ्या दालनात गेलोत. मीना बाजार मध्ये सोन्याची दालने उदंड. या दालनातही परत तिच घासाघीस. एकाने साखळी घालण्यासाठी गळ्या भोवती नेली. तर काय एक साखळी गळ्यात अगोदरच होती. म्हणजे आधीच्या दुकानात साखळी घालून पाहतांना ती तशीच राहिली होती. आमच्या दोघांची नजरा नजर झाली. ते म्हणाले आता काय करायचे? माझ्या पाया खालचा वाळवंटच सरकला होता. हा प्रकार तोही हायटेक दुबईत? बापरे. माझ्या काळजाचे ठोके आता वाढत होते. जरी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नसली तरी आम्हाला पकडने म्हणजे चूटकीचा खेळ.

क्षणार्धात आम्ही ते दालन गाठले. त्या सेल्समनला बाजूला घेऊन घडला प्रकार सांगितला. दोन तोळे वजनाची साखळी आम्ही परत केली. तो सेल्समन आमच्या कडे अवाक होऊन पाहात राहिला. त्यालाही त्याची चूक समजली होती.

आम्ही मोकळ्या मनाने दालना बाहेर पडलो. ही आमची इमानदारी होती का भिती देव जाणे (?)

-गणेश

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

जयंती की ऊरूस???

"दिवाणजी!"....
"कहा मर गये सबके सब"

दिवाणजी आपल दाटूनच पळत आल्यासारखा बोलला

"गुस्ताखी ला क्षमा असावी पातशाहा"
"मी आलंमपन्हा साठी वीडा बनवत होतो"

"हमे अभी इन काफिरोंकी धरती का पाणी पण नाही प्यायचय"
"आम्ही बहोत उदास झालो अहोत" पृथ्वीपती खिन्न होऊन म्हणाला.

आता दिवाणजीच्या कपाळात गेल्या होत्या. हा थेरडा आपल्याला उकळत्या कढाईत टाकेल नाही तर करवातीने डोक्यापासून ढुंगनापर्यंत दोन फांगळ्या करवेल.

"चुकीला माफी, आम्हाला अभय द्या"
दिवाणजी घाबरत म्हणाला.

"हम आपल्यावर नाही ये दख्खनके वजीर-ए-आला वर नाराज आहोत"
"ये मै काय सून रहा हूं?"

आलंमपन्हाची दख्खनी मराठी ऐकून दिवाणजी फार खूष झाला
"आलमगीर पातशाहा दख्खन ची जूबान छान बोलतायत आता" 
दिवाणाने हळूच टोला हनला.

"का नाही बोलणार?"
"अब हमे यहा मराठोंकी सरजमीन पर गढे हुये पूरे तीन अलफ साल झालेत"
"तो हमे बेशक यायला पाहिजे ही जूबान"
"आमच्यानंतर ही जुबान अटकेपार जावून आलिये. हे विसरलात काय दिवाणजी?"
"खू खू !!!"
पातशहाचा रागाच्या भरात बोलता बोलता उबाळी येवून थांबला

"पण आलंमपन्हा आपणास काय झालय आज?"
दंतहीन बोळक्याचा आवंढा गिळत दिवाण म्हणाला.

"हे पेपरात काय छापलय आज?"
आपल्या मोगली रुबाबदार भाषेत पातशाहा गरजला.

"कोणसी आखबार की बात कर रहे है आप? अभी हिंदुस्थान मे बहोत जुबान के अखबार निकते है हुजूर"
"बस निकलता नही तो सिर्फ फारसी का....
साहेबेआलम"

"खामोश....."
"तुमची ती मोगले आझमची नौटंकी बंद करा"
"कुठल्याही भाषेचा पेपर घ्या"
"आमच्या मोबाईलमध्ये हर जुबान के अखबार के अॅप है"
आपल्या कडचा iPhone 6s दाखवत बादशहा खूशीने म्हणाला.

"क्षमा असावी आलंमपन्हा मी अजून Nokia 1100 वापरतोय. माझ्याकडे नाहीत ते अॅप की काय"

"दिवाणजी तो नमक हराम सीधा राम्मेया त्या दो टकेच्या टिपूची जयंती साजरी करणार म्हणे"
"आमचा ऊरूस साजरा करायचे सोडून हे काय चाळे चाललेत या वजिरांचे"

"हमने भी सुना है ये...आलंमपन्हा...."

"तो फिर फरमान निकालके रोका क्यू नही आपने उनको"
"यहा सिर्फ हमारा ऊर्स होणा चाहिये"
पातशहाने आज्ञा सोडली

"अब हिंदुस्थान मे जम्हुरैत है आलमगीर साहेबेआलम"
"या अब सब अपणी मर्जीके मालिक है"
"हमारा फतवा अब लागू नही होता यहा" दिवाणजी म्हणाला

"तो ठीक है वजीरे आलम म्होतरमा को हमारा पैगाम दो. की हमने उन्हे तलब किया है. नही तो ओ.... बुखारी को म्होतरमा के पास भेजो.... साला दिल्ली मे हमारी दैलत का मालिक हो बैठा है वह नाचीज"
"और हा! हमरी किलत भी लेके जाव साथमे मॅडमको...
100 सोने कि अशरफिया, दो उंट, दो हाथी, चार गाय"

म्हातार्‍याच्या भ्रष्ट बुद्धीला भानावर आणण्याचा दिवाणजी प्रयत्न करू लागला.

"साहेबेआलम मॅडम म्होतरमा का तख्ता पलट हो गया है. अब यहा मोदी की हूकूमत चलती है. और दस जणपथ पर उंट, हाथी रखने की जगह नही है. वहा गाय पालन नही होता...."

"क्या??"
"फिर ये मराठे कुच करते क्यू नही?"
"अभी पेशवा रावसाहेब को sms करके बूला लो"

"आलंमपन्हा पेशवाई पण बुडालीय आता..
आता सिर्फ मोदी की सरकार...."

"तो मोदी को संदेशा दो और कहो ये जयंती होणी नही चाहिये" धाप्या टाकत आलमगीर पातशाहा बोलला.

"जी .."
"सरकार बरतानियाला गेलेत आता.... "
"आल्यावर कळवतो"
अस म्हणत दिवाणजीने खाली मान घालून तीनदा मुजरा केरून आपली पाठ न दाखवता खुलताबादच्या दर्ग्यातून बाहेर पडला.

नाराज बादशहा आपला किमाॅश डोक्यात घालून तुळशीच्या सावलीत परत झोपी गेला.

माझी दिवाळी

आज दिवाळी सण होता. मी सकाळी उठून कामावर जाण्यासाठी स्नान (अभ्यंग नव्हे) केले. मेट्रोत बसण्याआधी मल्लूच्या हाटलीत दाबून फराळ खाल्ले (तीन इडल्या, वाटीभर सांभर, तीन चार पळ्या चटणी वरून कपभर चहा) मग मेट्रो पकडून कामावर गेलो. चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव चालू होता. पाकिस्तान पासून ते फिलिपिन्स पर्यंतची जनता शुभेच्छा देत होती पण आम्ही जसा काय राष्ट्रीय दुखवटा असल्या प्रमाने स्तब्ध होतो. चेहर्‍यावर कसलाच हावभाव नव्हते. व्हाट्सअप तर आज पार गळूनच गेला होता.

दूपारी छान चपाती कोंबोचा फडशा पाडला. देह ऑफिसात म्हणजे दुबईत होता पण आत्मा न जाने आरबी समुद्राच्या पैलतीरावर कोठेतरी घुटमळत होता.

संध्याकाळी घरी आलो. फुटपाथ वरून चलताना अनेक ईमारतीवर रोषणाई दिसत होती. घरी आल्यावर अंघोळ करून ग्रंथ पुजा उरकून घेतली. (ग्रंथ म्हणजेच आपली हक्काची दौलत. त्यात कोणी वाटेकरी नाही) दिवा पेटवायला पंती नव्हती तर वातीला कापूस (तीन वर्षे झाली गावी कापूसच पिकत नाही त्यामुळे वातीच्या पंचाती) मग जेवणाची लहानशी वाटी घेतली त्यात कान कोरण्यासाठी असलेल्या काड्याच्या कापसापासून वात बनवली. दिवा पेटवून पूजा पूर्ण केली (मनोभावे हात जोडले, ग्रंथासमोर डोके आपटले)

मग मोर्चा पोटोबा कडे वळला. वाटीभर भात शिजवला त्याला कशीबशी फोडणी देवीली. लालजरात चिली साॅस बरोबर खिचडी हा हा म्हणता कधी संपली कळालेच नाही.

भांडी आज घालावीत की उद्या यावर विचार मंथन चालू होते पण म्हणोलो सणासुदीचा घरात उगी र्हाडा नको. भांडी घासली चूळ भरली. खिडकीतून दूरवर कोठेतरी फटाके फोडल्याचा आवाज येत होता. तस माझ्या फोटात भात असूनही तोडीत होतं.

अंगावर गावाकडून आणलेली गोधडी कानावर कचकन आवळून झोपलो. त्याआधी दिवा विझल्याची खात्री केली. उगाच फायर अलार्म वाजयला नको. फटाक्यांचा अवाज अधूनमधून येतच होता. मी मात्र झोपण्याचा प्रयत्न करत होतो.

शुभ दिवाळी....
गूड नाईट

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

वाडा

पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात

आजोबांनी कष्टाने उभारलेला
एक एक दगड निखळून पडतोय
आजीच्या फडताळाची भिंत
कधीच खचून गेलीय
पावसात क्वचित गळनारे खण
आता पावसाळाभर गळतायेत

पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात.....

बैठकीची उखणलेली ओसरी
आता कोण सारवत नाय
तो भला मोठा उंबरा
ते अभेद्य सागाचे दार
चौकातला हपश्या, दगडी चौरंग
सर्व काही ओस पडलेय
दिवाळीचा माळदावरला झगमगाट
आता कधीच दिसणार नाय

पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात.....

चार पिढ्यांचा साक्षीदार
पाचव्या पिढीस दिसणार नाय
आजोबा आजीने देह ठेवलेल्या
खोलीत आता दिवे पेटणार नाय
आलिशान घरामध्ये राहूनही
वाड्याच सुख लाभायच नाय

पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात.....