बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

बाल कविता : चिमणीला आला फोन

एक दिवस सकाळी
चिमणीला आला फोन
छान छान आवाजात
सांगा बोलत होते कोन ?

कोकीळा ताई तिकडून
बोलू लागल्या गोड
म्हणाल्या चिमणीला
ऊठ बिछाना सोड

आज बाई आपल्याला
जायचे आहे गावाला
कावळे दादाच्या लग्नाचा
बस्ता बाई बांधायला

मोराच्या दुकानातून
नवरीला घेऊ साडी
सुतार पक्षाची लावू
वरातीला गाडी

टिटवी कडून घेऊ
छान छान अलंकार
लग्नाला बोलवू
बदक पोपट आणि घार

सुगरणीला सांगू छान
विणायला कोट
बगळेराव आचारी भरेल
सगळ्या पाहुण्यांचे पोट

ऊठ बाई चिमणे
दिवस राहिले थोडे
कसे सोडवायचे बाई
आता वेळेचे कोडे?

चिमणी आणि कोकीळा
घाईत उडाल्या भूर
कावळे दादाच्या घरी
आला पाहुण्यांचा पूर

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

सौदी अरेबिया - रब-अल्-खाली वाळवंट

 आखाती देश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी उभा रहातो, तो म्हणजे वाळवंट किंवा तेलाच्या विहीरी, इथली अरब संस्कृती, नाही तर मग या देशांतील आर्थिक संपन्नता. आखाती देशांचा बराचसा भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे. आखाती देश हे आर्थिक दृष्ट्या खूप संपन्न आहेत, परंतु खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वी इथले लोकजीवन अतिशय खडतर होते. मासेमारी किंवा समुद्रातून मोती शोधून त्यांचा व्यापार हेच इथल्या लोकांचे महत्त्वाचे व्यवसाय होते. खनिज तेलाच्या शोधानंतर मात्र या देशात मोठी आर्थिक संपन्नता आली. रोजगार निर्मितीमुळे इथले जीवनमान बदलून गेले. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यानी येथे कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक केली. आर्थिक क्रांतीमुळे स्थानिकांबरोबरच परदेशी लोकांनाही या देशांत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाल्या.


आखाती देशांची अर्थव्यवस्था ही अजूनही खनिज तेलावर अवलंबून आहे. खनिज तेलाच्या विहीरी या समुद्रात किंवा वाळवंटी प्रदेशात विखुरलेल्या आहेत. यातील बहुतांश विहीरी 'रब अल खाली' या वाळवंटात आहेत. रब अल खाली चा अर्थ 'रिक्त भाग' (Empty Quarter) असा होतो. हा अरब खंडातील सर्वात मोठा वाळवंटी प्रदेश आहे. सौदी अरेबिया, युएई, ओमान आणि येमेन या चार देशांचा बराचसा भूगभाग या वाळवंटाने वेढलेला आहे. साधारणपणे साडे सहा लाख वर्ग किलोमीटर (महाराष्ट्र राज्याच्या दुप्पट) एवढे याचे एकूण क्षेत्रफळ आहे. सौदी अरेबिया, ओमान आणि युएई या देशांच्या त्रिसीमा जिथे एकत्र येतात तो भाग तर खनिज तेलानी खूप समृद्ध मानला जातो. सौदी अरेबियाच्या एकुण क्षेत्रफळाच्या एक चर्तुथांश भाग या वाळवंटाने व्यापलेला असून हा संपूर्ण प्रदेश एकदम निर्जन आहे.
 
वाळवंटाने वेढलेले शेबा 

रब अल खालीचा हा प्रदेश पर्यटकांसाठी खुला नसला तरी अधिकृत कामानिमित्त कंपनी मार्फत येथे जाता येते. सुदैवाने मला तिन्ही देशातील या भूभागात जाण्याची संधी मिळाली. त्यात सौदी अरेबियातील शेबा (शायबाह किंवा इंग्रजी मध्ये Shaybah) येथील अनुभव तर खरोखरच रोमांचित करणारे होते. शेबा ऑईल फिल्ड ही सौदी अरेबियातील महत्वाचे खनिज तेल भांडार आहे. इथले तेल चांगल्या प्रतीचे गणले जाते. १९९८ सालापासून येथे तेल उत्पादनास सुरूवात झाली. येथे उत्पादित तेलाला पाईपलाईन मार्गे अबकैक या रिफायनरीत नेले जाते. या पाईपलाईनची लांबी सुमारे ६३८ किमी इतकी आहे. शेबातील तेलाच्या विहीरी युएईच्या सीमेपासून फक्त १० किलोमीटर अंतरावर आहेत. शेबा येथील वातावरण खूपच शुष्क आहे. उन्हाळ्यात दिवसाचे तापमान ५५ अंश सेल्सिअस पर्यंत जाते तर हिवाळ्यात रात्रीचे तापमान शून्य अंशापर्यत घसरते. येथे पाऊस जेमतेच पडतो. वर्षाकाठी सरासरी ३० मिलीमीटर किंवा त्यापेक्षा कमी पर्जन्यवृष्टी होते. मी ज्यावेळी शेबाला गेलो, तो डिसेंबर महिना होता. डिसेंबर महिन्यात इथले वातावरण थंड आणि आल्हाददायक असते. 

शेबातीळ वाळूच्या टेकड्या 

शेबामध्ये जाण्यासाठी हवाईमार्ग हाच एकमेव पर्याय आहे. शेबा हे ठिकाण अल-हफूफ (किंवा अल-हास्सा) आणि रियाध शहरांशी रस्त्याने जोडलेले असले तरी हा रस्तेमार्ग फक्त मालवाहतूकीसाठी वापरला जातो. सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामको शेबासाठी विशेष विमानसेवा राबवते. अरामकोची स्वतःची एअरलाईन्स असून, महत्वाच्या सर्व प्लॅन्टवर कामगारांची ने-आण करण्याचे काम ही एअरलाईन्स करते. त्यासाठी ठिकठिकाणी अरामकोची स्वतःची विमानतळं आहेत. मी दम्मामच्या अरामको विमानतळाहून शेबाला हवाईमार्गे गेलो. दम्मामहून शेबाला जाण्यासाठी अंदाजे दोन तास लागतात. हे विमान अल-हफूफ मार्गे जाते. एकदा का विमानाने दम्माम सोडले तर आकाशातून दिसते ती चहूकडे शुष्कता आणि ओसाड जमिन. दम्माम आणि अल-हफूफ दरम्यान विमानातून तुरळक ठिकाणी मानवी वस्त्या नजरेस पडतात, परंतु अल-हफूफ ते शेबा या प्रवेसा दरम्यान रुक्ष वाळवंटाशिवाय काहीच नजरेस पडत नाही. या भागात तांबड्या वाळवंटाच्या उंचच उंच टेकड्या आहेत (Desert Dunes). रब अल खालीच्या काही भागात या वाळूच्या टेकड्यांची उंची २०० मीटरपर्यंत आहे. या वाळूच्या टेकड्यांदरम्यान ठिकठिकाणी तळ्यासारखी मोकळी जागा दिसते. हजारो वर्षांपूर्वी पावसाचे पाणी साचून ही तळी तयार झाली होती. आज फक्त या तळ्यांच्या खाणाखुणा तेव्हढ्या आकाशातून दिसतात. 

शेबातील तात्पुरती कामगार वसाहत 

शेबा हे एक छोटेसे विमानतळ आहे. दम्माम, जेद्धा, रियाध आणि अल-हफूफ या शहरांतून येथे रोज अनेक उड्डाणे संचलित केली जातात. वाळवंटाच्या टेकड्या चारही बाजूना सारुन निर्माण केलेल्या सपाट जागेत शेबा विमानतळासह कामगारांची निवास व्यवस्था, क्रीडांगण, खाणावळ, अग्नीशमन केंद्र आणि रूग्णालय यासारख्या इमारती बनवलेल्या आहेत. विमानतळाच्या बाहेर पडल्यावर चारही बाजूना वाळूचे डोंगर दिसतात. वाळूच्या या डोंगरामुळे आपण एखाद्या खड्ड्यात आहेत की काय असा भास होतो. या एवढ्या ओसाड भागात अरामकोने नियोजनपूर्वक सर्व इमारती बांधलेल्या आहेत. या बांधलेल्या पक्क्या इमारती बघून नवल वाटल्याशिवाय रहात नाही. विमानतळा लागूनच कामगारांची निवास व्यवस्था आहे. शेबामध्ये येणाऱ्या सर्व कामगारांची अरामको मार्फत राहण्याची व तीन वेळ जेवणाची सोय केली जाते. शेबामध्ये राहण्याची व जेवणाची उत्तम सुविधा आहे. सर्व स्तरातील कामगार व अधिकारी वर्गासाठी एकच खाणावळ आहे. अरामकोने कामगारांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी येथे खेळाची मैदाने बनवली आहेत. त्यात फुटबॉल, जाॅगिंग ट्रॅक, बास्केटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, स्विमींगपुल आणि जीमचा समावेश आहे. शेबा कॅम्पच्या परिसरात झाडं लावल्यामुळे येथे पक्षांचे वास्तव्य जाणवते. या कॅम्पमध्ये अनेक मांजरी आणून सोडलेल्या आहेत. 

शेबातील तात्पुरती कामगार वसाहत 


शेबामध्ये अनेक वायू आणि खनिजतेल निर्मिती केंद्रे आहेत. ती कॅम्पपासून साधारणपणे दहा किमी च्या त्रिज्येत विविध दिशांना पसरलेली आहेत. याठिकाणी जाण्यासाठी देखील वाळूच्या टेकड्या बाजुला सारुन रस्ता बनवलेला आहे. या रस्त्यावरून जाताना आपण एखाद्या खिंडीतून प्रवास करत असल्याचा भास होतो. येथे वाहनांची गतीला मर्यादा घालून दिलेली आहे आणि त्या गतीच्या पुढे वाहन चालवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वाहनांची गती मोजण्यासाठी ठिकठिकाणी रेडार बसवलेले आहेत. संपूर्ण परिसराला सौदी अरेबियाच्या सैन्य दलाचे कडक सुरक्षा कवच असते. 

शेबातील तात्पुरती कामगार वसाहत 

शेबातील तेल-वायू निर्मिती प्रकल्प आणि इथल्या सुविधा म्हणजे रब अल खाली या सारख्या निर्जन वाळवंटात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मानवाने निसर्गावर मात करण्याचा जणू प्रयत्न केल्याचे दर्शविते. इथला वाळूच्या टेकड्या जरी उष्णतेने लालेलाल होत असतील, परंतु त्यातही एकप्रकारचे सौंदर्य दडलेले आहे. चहूकडे पसरलेली तांबडी वाळू आपण इतर जगापासून खूप लांब असल्याची जाणीव करून देते. रब अल खाली वाळवंट खरोखरच बघायला सुंदर आहे पण उन्हाळ्यात इथे काम करणे म्हणजे कदाचित नरकयातनाच असतील! 

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

वाकाटक राजा पृथ्वीसेन द्वितीयच्या राजमुद्रेचा शोध


महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक राजवंशापैकी वाकाटक हे महत्त्वाचे राजघराने आहे. आजही या घराण्याचा इतिहास तितकासा परिचित नाही. ज्या काही ठोस पुराव्याच्या आधारावर वाकाटक राजघराण्याचा इतिहास परिचित आहे ती साधने म्हणजे काही ताम्रपट, शिलालेख, नाणी आणि धार्मिक ग्रंथातील उल्लेख इत्यादी. नवीन सापडलेल्या पुराव्यांच्या आधारावर या राजघराण्यावर सखोल संशोधन, अभ्यास आणि इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची आवश्यकता आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अलिकडेच वाकाटक राजघराण्यातील शेवटचा राजा "पृथ्वीसेन द्वितीय" ची तांब्याची राजमुद्रा सापडली आहे. ही राजमुद्रा गोजोली गावातील प्रकाश उराडे यांनी व्यवस्थित जतन करून ठेवली होती. प्रकाश उराडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रंजित उराडे याने वडीलांची जुनी पेटी उघडली असता, त्यांना त्यात काही नाणी व तांब्याची नाण्यासारखी दिसणारी वस्तू आढळली. या तांब्याच्या गोल वस्तूवर काहीतरी लिहीलेले होते. रंजित यांनी कुतूहलापोटी याची अधिक माहीती घेतली असता इतिहास अभ्यासकांना ही वस्तू म्हणजे दुसरी तिसरी काही नसून ती वाकाटक राजा पृथ्वीसेन द्वितीय याची राजमुद्रा असल्याचे समजले. या राजमुद्रेमुळे वाकाटक राजघराण्याचा खूप मोठा इतिहासावर उजेड पडला आहे.

तांब्याच्या धातूपासून बनवलेली ही राजमुद्रा गोलाकार असून ती साधारण ६० ग्रॅम वजनाची आहे. या राजमुद्रेच्या सर्वात वरच्या भागावर बौद्ध देवता तारा (किंवा राज्यलक्ष्मी) हिचे चित्र आणि त्याखाली ब्रह्मी लिपीत (मध्यप्रदेशी लिपीत) आणि संस्कृत भाषेतील चार ओळींचा लेख कोरलेला आहे. लेख आणि देवतेची प्रतिमा ही उलटी कोरलेली आहे (Mirror Image). याचाच अर्थ या राजमुद्रेचा उपयोग राजआज्ञा, महत्त्वाचे आदेश साक्षांकित करण्यासाठी केला जात असे. या राजमुद्रेच्या मधोमध छिद्र असून तिथे कदाचित या राजमुद्रेला पकडण्यासाठी मुठ बसवण्याची व्यवस्था केलेली असण्याची शक्यता आहे. आणि कालांतराने ती मुठ विलग झाली असावी. या राजमुद्रेवरील लेखाचे देवनागरी लीप्यंतर पुढील प्रमाणे

"नरेन्द्रसेन - सत्सुनौ:
भुर्तरव्वाकाटक श्रीयः
प्रिथिविषेननृपते
जिगिशौर्ज्जयशासनं"


अर्थ : "नरेंद्रसेण याचा पुत्र पृथ्वीसेन याची ही राजमुद्रा"

या मुद्रेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या विनंतीवरून रंजित उराडे यांनी उदार मनाने ही राजमुद्रा नागपूर मध्यवर्ती संग्रहालयास दान केली आहे. लवकरच हा ठेवा इतिहास प्रेमी अभ्यासकांसाठी उपलब्ध होईल.

पृथ्वीसेन द्वितीय चा कालखंड हा इ. स. ४७५ ते इ. स. ४९५ असा होता. अलिकडच्या काळात सापडलेली ही वाकाटक राजघराण्यातील दुसरी राजमुद्रा आहे. याआधी नंदीवर्धन येथील उत्खननात राणी प्रभावतीगुप्त हिची राजमुद्रा सापडली होती.

सोमवार, २० जुलै, २०२०

कविता : मी ॲलन कुर्दी बोलतोय



 
आठवतोय का तुम्हाला
भल्या सकाळी तुर्कस्तानातील एका समुद्रकिना-यावर 
पालथा पडलेला तो एक बालक... 
निळी चड्डी आणि लाल शर्ट घातलेला 
होय तोच मी!  
मी ॲलन कुर्दी बोलतोय... 
वय जेमतेम तीन वर्ष 
आता त्याची वाढ कायमची खुंटली आहे 
कारण माझं वय कधीच "सुपूर्द खाक" झालंय 
 
सुरूवात कशी करू?  
हेच कळत नाहीये 
माझा भूतकाळ आठवण्याचा तरी मला हक्क आहे ना
की तोही हिरावून घ्याल माझ्यापासून
जसा माझा कोवळा जीव घेतला तसा
 
माझ्या देशवासीयांना ठार मारण्यात येत होते 
त्यांच्या मृत्यूचा तमाशा पहाण्याशिवाय 
या जगाला काहीच करता आलं नाही 
जगानेही शेवटी पाठ फिरवली आमच्याकडे 
कारण त्यांना आमचे निर्दयी अंत पहावेसे वाटेनात  
 
आमच्याच बापजाद्यांच्या मायभूमीतून 
आम्हाला बेदखल करण्यात आलं 
आमच्याच देशात आम्ही जगण्याचा हक्क गमावून बसलो 
कारण......
कारण आम्ही कुर्दी होतो.....कुर्दी 
"त्यांच्या" नियमानुसार 
कुर्दी लोकांना आता इथं जगण्याचा मुळीच अधिकार नव्हता 
पण मलामाझ्या कुटुंबियांना जगायचं होतं  
मला मोठं व्हायचं होतं 
एक फुल बनून उमलायचं होतं 
म्हणूनच 
आम्ही धावत होतो या शहरातून त्या शहरात 
कधी वेश बदलूनकधी जीव मुठीत धरून 
कारण सतत बाँब कोसळत होते 
सू सू गेळ्या सुटत होत्या 
फक्त आमच्या सारख्यांचाच वेध घेण्यासाठी 
 
आमच्या घराचागावाचा कधीच ढिगारा झाला होता 
आमच्या भूईसपाट झालेल्या घरांचा शहरांचा  
शकडो वर्षांनी शोधही लागेल संशोधकांना 
याठिकाणी ऐके काळी मानवी संस्कृती नांदत होती 
यावर त्यांना विश्वासच बसणार नाही 
आणि ते हर्षभरित होतील मातीखाली गाडलेली घरं पाहुन 
त्यांना सापडतील थोरा मोठ्यांचे सांगाडे 
मस्तकाची चाळनी झालेल्या कवट्या पाहुन तर ते कदाचित निष्कर्ष काढतील  
या काळातील आधुनिक शस्त्रांचा 
पण रासायनिक आणि विषारी वायुने कित्येक ठार झाले 
याचा शोध लागेल का त्यांना
इतिहासाची पानं तोपर्यंत टिकलीतर कदाचित लागेलही 
 
असो... 
आकाश हेच आता आमच्या डोक्यावरलं छप्पर होतं 
स्वतःच्याच देशात निर्वासित होणे फारच वेदनादायी असतं 
माझ्या बाबाला लोक म्हणात होते 
युरोपात चल तिथं चांगलं जगता येईल
तिथलं सरकार मदत करेल 
गोळीची किंवा बाँब कोसळण्याची तिथं भितीतरी नसेल 
माझ्या बाबानं होता नव्हता तो पैसा जमवला 
आणि कसंतरी तुर्कस्तान गाठलं आम्हाला घेऊन  
मीगालीब आणि मामा 
 
तस्कराला पैसा देऊन आम्ही जाणार होतो युरोप खंडात  
तुर्कस्तान म्हणजे युरोपचे प्रवेशद्वार 
फक्त समुद्र ओलांडला की झालं 
मग आम्हाला कुणी निर्दयीपणे ठार करू शकत नव्हतं 
आम्ही निर्वासित म्हणून तिथं जगू शकणार होतो 
किती स्वप्न होती आमची जीवन जगण्याची 
 
अनेक प्रयत्नानंतर आम्हाला युरोपात घेऊन जाण्यास एक तस्कर तयार झाला 
बाबाने जीवन भराची कमाई त्याला दिली 
बोटीने आम्हाला ग्रीसच्या हद्दीत सोडण्यासाठी 
बोटी वाल्याला हवा होता फक्त पैसा 
आम्ही जगावं की मरावं याच्याशी त्याला देणं घेणं नव्हतं 
म्हणूनच तर बोटीत बसल्यावर आम्हाला 
दिखाव्यासाठी का होईना  
परिधान करण्यासाठी दिली गेली 
नकली लाईफ जाकेट  
आठ माणसांच्या बोटीत आम्ही होतो बहुधा दुप्पट 
समुद्र खवळलेला होता 
आणि आम्ही जगायचं की मरायचं याचा सौदा बोटी वाल्याशी करून बसलो होतो 
बोटीने किनारा सोडला 
पाच मिनिटातच बोट पाण्यात बुडायला लागली 
बोटीवाला जीव वाचवून पळला 
आता काय
आम्ही सगळे सैरभैर झालो 
शेवटी आमच्या जगण्याच्या स्वप्नाला घेऊन बोट बुडालीच 
 
माझा बाप धावत होतापोहत होता 
इकडून तिकडे... 
पालथ्या बोटीखाली आम्हाला शोधत होता 
कुणाला वाचवूमामालागालिबलाकी मला
माझा बाप ओक्साबोक्सी रडत होता 
पाण्यात सूर मारत होता 
आम्हाला हाक देत होता 
आम्हा मुलांना छातीजवळ कवटाळून धरण्याचा प्रयत्न करत होता 
उपरवाल्याला भिक मागत होता 
पण त्या काळ्या निर्दयी पाण्याने शेवटी घात केला 
मामा बुडालीगालीबही दिसेनासा झाला 
सर्वात शेवटी माझाही हात निसटला 
आणि मी ही खूप खूप दूर निघून गेलो... 
मामापासूनबाबापासूनमाझ्या मातृभूमीपासून 
 
बहुतेक आमचं मरण आगीच्या भडक्यात लिहीलेलं नसावं 
म्हणूनच आम्हाला थंड पाण्यात नियतीने बुडून मारलं 
माझी मामा किती भाग्यवान निघाली 
त्या क्रूर वासनांध श्वापदांच्या हातातून ती वाचली 
मीगालिब किती भाग्यवान 
गळे कापताही आम्हाला सुखाचं मरण आलं 
पण बाबाचं काय
आयुष्यभर साथ देण्याचे वचन माझ्या मामाने दिले असेल बाबाला 
तिने तो शब्द मोडल्यावर काय वाटलं असेल माझ्या बाबाला
गालिबला बुडतांना पाहुन किती इंगळ्या डसल्याच्या वेदना झाल्या असतील माझ्या बाबाला
माझा हात निसटल्यावर काय परिस्थिती झाली असेल माझ्या बाबाची
बाबा बाबा काय होईल तुझं
 
दुस-या दिवशी मी किना-याला लागलो नसतो तर
मी देखील त्या हजारो सिरीयन मुलांसारखा बेवारशी गणला गेलो असतो 
सिरीयस मुलांचे दुःखवेदना सांगण्यासाठीच 
मला परत देवाने किना-याला पाठवले असावे 
 
मनुष्य प्राण्यांनो  
मी ॲलन कुर्दी बोलतोय 
किडामुंगींसारखं मरत असलेल्या 
सिरीयन मुलांचा प्रतिनिधी म्हणून.... 

●●●