बुधवार, १४ जून, २०१७

सम्राट अशोक चरित्र (लेखक: वासुदेव गोविंद आपटे)


सम्राट अशोक चरित्र
लेखक: वासुदेव गोविंद आपटे
विस्तार : प्र. रा. अहिरराव
सुधारीत आवृत्ती : डिसेंबर २००२
प्रकाशक : वरदा बुक्स
किंमत : २५० रु

भारताच्या राजमुद्रेवर, नाण्यांवर किंवा चलणी नोटांवर आपण अशोकस्तंभ रोज पाहतो. भारताच्या राष्ट्रध्वजावरही अशोक चक्र उमटलेले आपण पाहतो. पण ही जी प्रतिकं ज्या राजाची आहेत तो सम्राट अशोक राजा नक्की कोण होता?

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी या भारतभूमीवर आपले अधिपत्य निर्माण करणारा इतिहासात अतिउच्च स्थान असलेला असा "सम्राट अशोक" नावाचा राजा होऊन गेला. त्याने न केवळ सर्व भारतखंडावर राज्य केले, तर येथील जनतेला धर्मज्ञान, सदाचार व भूतदया यांची शिवकण दिली. प्रजेने त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा धरून तसा प्रयत्न आयुष्यभर केला. अशा या महान सम्राट अशोकाची माहिती आपल्याला वासुदेव गोविंद आपटे लिखीत "सम्राट अशोक चरित्र" हा ग्रंथातून सविस्तरपणे मिळते. लेखकाने पुराणे किंवा दंतकथा यावर विसंबून न राहता आत्तापर्यंत मिळालेल्या अशोकाच्या शिलालेखांचा योग्यप्रकारे अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीने हे चरित्र लिहिले आहे.

पार्श्वभूमी :

वासुदेव गोविंद आपटे यांनी इ स १८९८ मध्ये सम्राट अशोक याच्या चरित्राची रूपरेखा लिहून 'ग्रंथमाला' मासिकाद्वारे प्रकाशित केली होती. त्याकाळी सम्राट अशोकाच्या चरित्राबाबत फार कमी साधने उपलब्ध होती. इंग्रजी भाषेतही तेंव्हा अशोकाचे एकही चरित्र लिहीले गेले नव्हते. आपटे यांनी सुरूवातीला लिहीलेल्या या चरित्रात अशोकाच्या काही दंतकथा, अशोकाच्या काही लेखांचा सारांश, व त्यावरून अशोकाचा स्वभाव, वर्तन, राज्यव्यवस्था, धर्मपरायणता, तत्कालीन समाजस्थिती इत्यादी गोष्टींच्या संबंधाने काढलेली अनुमाने याचाच समावेश होता. परंतु अशा तर्हेचा मराठीत केलेला सामान्य प्रयत्न सुद्धा अपूर्व वाटावा असा तो काळ होता. त्यावेळच्या ग्रेटप्रायमर टाइपाचें ८८ पृष्ठांचा हा चरित्र ग्रंथ तयार झाला. तत्कालीन अनेक प्रख्यात मराठी वृत्तपत्रांतून व मासिकांतून या चरित्र ग्रंथाविषयी प्रशंसापर लेख प्रसिद्ध झाले होते. या ग्रंथाचा तेंव्हा हिंदी, उर्दू आणि गुजराती भाषांत अनुवादही करण्यात आला होता.

कालांतराने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अशोकासंबंधाचे कितीतरी नवीन शोध लागले. अशोकाच्या स्तंभ व गिरीलेखांची पाश्चात्य व भारतीय पंडितांनी केलेली चिकित्सा ग्रंथाच्या रूपाने वाचकांना उपलब्ध झाली. विन्सेंट स्मित या जगप्रसिध्द इतिहासकाराचे इंग्रजी भाषेत अशोकाचे चरित्र लिहील्याने अनेकांना याचा फायदा झाला. वासुदेव गोविंद आपटे यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहीलेल्या मराठीतील पहिल्या सम्राट अशोक चरित्राला श्री प्र. रा. अहिरराव यांनी आधुनिक संशोधनाच्या माध्यमातून परिपूर्ण विकसित केले. त्याची सुधारीत आवृत्ती डिसेंबर २००२ ला वरदा बुक्सच्या माध्यमातून प्रसारित केली.

अशोक पुर्वीचा काळ :
अशोककालीन काही स्थळांचा उल्लेख वायुपुराण, विष्णूपुराण आणि भिष्मपुराण यामध्ये आढळतो. पुराणकारांनी अशोकाच्या मौर्य घराण्याची वंशावळ दिली आहे पण त्यात एकवाक्यता नाही. मौर्य घराण्याचा उदय होण्यापूर्वी मगधावर अनेक घराण्यांनी राज्य केले. मौर्यांची मगधवर सत्ता स्थापन होण्याच्या आधी महापद्मनंद हा नंद वंशाचा राजा राज्य करत होता. याच्याच कारकिर्दीत इतिहास प्रसिध्द जगज्जेता अलेक्झांडर ऊर्फ सिंकदर याची भारतावर स्वारी आली होती. पण अलेक्झांडर पंजाबची हद्द ओलांडून खाली न आल्याने त्याचा व महापद्मनंद याचा मुकाबला झालाच नाही. महापद्मनंद हा मोठा शूर व पराक्रमी, पण तितकाच लोभी व निर्दय राजा होता. नंदवंशाचा उच्छेद चंद्रगुप्त मौर्य याने ब्राह्मण मुत्सद्दी कौटिल्य अथवा चाणक्य याच्या साह्याने करून मगधावर इ.स. पुर्व ३३२ साली आपली सत्ता स्थापण केली. पुराण कथेप्रमाने चंद्रगुप्त हा मुरा नावाच्या दासीचा पुत्र होता म्हणून त्याच्या वंशास मौर्य हे नाव पडले. मौर्य सत्तेचा संस्थापक चंद्रगुप्त हा अशोकाचा अजोबा होता.

चंद्रगुप्त मौर्य चा काळ :
ग्रीक राजा अलेक्झांडर याच्या मृत्यूनंतर त्याच्या सम्राज्याचे विभाजन होऊन मध्य अशिया, अफगाणिस्तान येथे ग्रीकांची सत्ता कायम राहीली. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचा सेनापती सेल्सूकस निकेटर हा मध्य अशियातील बॅक्ट्रियाचा सम्राट बनला. त्याने आपला राज्यविस्तार करण्यासाठी भारतावर आक्रमण केले. त्याचा चंद्रगुप्त मौर्य ने दारून पराभव केला. त्याला चंद्रगुप्तशी तह करावा लागला. या तहानुसार त्याला पाचशे हत्ती, काबूल, हिराम व कंदाहर हे तीन प्रांत आणि आपली कन्या चंद्रगुप्तला द्यावे असे ठरले. या तहानंतर सेल्युकस ने मेगॅस्थनीजला पाटलीपुत्र येथे वकील म्हणून पाठवले. मेगॅस्थनीजने आपल्या सहा वर्षांच्या काळात भारताची भौगोलिक, सामाजिक व धार्मिक स्थिती यावर बरीच माहिती आपल्या "इंडिका" या ग्रंथात लिहून ठेवल्याने त्याचा उपयोग इतिहासकारांना झाला आहे.
  चंद्रगुप्तने आपल्या २४ वर्षांच्या शासन काळात मगध राज्याला फार वैभवशाली बनवले. अनेक परदेशी राज्यांपर्यंत मगधाच्या ऐश्वर्याची चर्चा होत असे. विविध देशातील राजांनी आपले वकिल मधग राज्यात ठेवले होते. मगधची राजधानी पाटलिपुत्र ही एक संपन्न आणि वैभवशाली अशी नगरी होती. हिची लांबी ५ कोस व रूंदी सुमारे २ कोस होती. तिच्या भोवती मजबूत तट व तटाभोवती खंदक होते. तटाची भिंत ४०० हात रूंद व ३०० हात उंच होती. तटात ५७० बुरूंज व ६४ दरवाजे होते. पाटलिपुत्र शहराची लोकसंख्या ४ लाख होती. राज्याच्या रक्षणासाठी ६० हजार पायदळ, ३० हजार घोडेस्वार व ८ हजार हत्ती होते. याशिवाय युद्धाच्या कामी उपयुक्त अशी ६ लाख खडी फौज होती.

चंद्रगुप्ताने मोठ्या हुशारीने सर्वांवर दबदबा ठेऊन राज्य केले. जैन ग्रंथातील उल्लेखानुसार चंद्रगुप्तने शेवटी जैन धर्माचा स्वीकार केला. आपला पुत्र बिंदुसार याच्याकडे सत्ता सोपवून तो जैन साधु होऊन दक्षीणेकडे निघून गेला.

सम्राट बिंदुसारचा कालखंड :
सम्राट बिंदुसारचे इतिहासात फारसे उल्लेख सापडत नाहीत. ग्रीक इतिहास ग्रंथात बिंदुसारचा उल्लेख अमित्रघात असा आढळतो. परंतु हिंदुचे विष्णूपुराण, बोद्धांचा महावंश ग्रंथ आणि जैनांचा परिशिष्टपर्व ग्रंथ यातून चंद्रगुप्तच्या मुलाचे नाव बिंदुसार हेच आढळते.

बिंदुसारने चंद्रगुप्तच्या वेळेचे राज्यकारभाराचे धोरण चालू ठेऊन देशात शांतता राहील असे प्रयत्न केले. चंद्रगुप्ताने जो ग्रीक राजांशी स्नेहसंबंध जोडला तो बिंदुसारनेही चालू ठेवला.  बिंदुसारच्या पदरी खल्लटक आणि राधागुप्त नावाचे दोन हुशार मंत्री होते. २५ वर्षे राज्य केल्यानंतर इ.स. पुर्व २७३ साली त्याचा मृत्यु झाला.

अशोकाचे राज्यारोहन :
बौद्ध धर्म ग्रंथातून अशोकाच्या संबंधी अनेक दंतकथा रूढ आहेत. त्यानुसार तो स्वभावाने अत्यंत क्रूर व दुष्ट होता. राज्य मिळवण्यासाठी त्याने आपल्या ९९ भावंडांना ठार मारले व क्षुल्लक कारणांवरून आपल्या राण्यांचा शिरच्छेद केला असा उल्लेख आढळतो. परंतु विन्सेंट स्मित व इतर मान्यवर इतिहासकारांनी हे विधान चुकीचे ठरवले आहे. अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याचे जे साधुत्वाचे वर्तन त्याच्या चरित्रातून दिसून येते ते बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे घडलेले परिवर्तन होय आणि असे परिवर्तन घडवून आणण्याची अलौकिक शक्ती त्या धर्माच्या ठायी आहे हे लोकांच्या डोळ्यात भरावे म्हणून अशोकाच्या पुर्वायुष्यावर बौद्ध ग्रंथकारांनी काजळ फासले असावे.

अशोकने संम्राट होण्यापूर्वी तक्षशिला व उज्जेन येथे राजप्रतिनिधी म्हणून खूप चांगले काम केले होते. तेथिल बंड त्याने कुठलाच रक्तपात न करता मोडून काढले होते. त्या मानाने त्याचा मोठा भाऊ सुशीम हा फार क्रुर व दुष्ट होता. या दोघांत सम्राट बिंदुसारच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी युद्ध झाले असणार आणि त्यात सुशीमचा मृत्यू होऊन अशोक मगधचा सम्राट झाला ही शक्यता अनेक इतिहासकारांनी मान्य केली आहे.

कलिंग विजय :
कलिंग विजय ही प्राचीन भारताच्या इतिहासातली फार मोठी घटना आहे. या युद्धामुळे प्राचीन भारतीय इतिहासात फार दूरगामी परीणाम झाल्याचे दिसतात. कलिंग राज्य भारताच्या पूर्वेला ओरीसा राज्याच्या जवळपास होते. या युद्धामुळे अशोकाच्या चरित्राचा प्रवाह बदलून तो एक विस्तारवादी राजा ते धर्मिक व मानवतावादी राजा बनला. कलिंग सारखे प्रचंड राज्य काबीज केले म्हणजे आपल्या पुर्वजांनी आरंभिलेला भारतदिग्विजय पुर्ण होईल या लालसेने त्याने या देशावर आक्रमण केले असावे. कलिंग युद्ध अशोकाच्या राज्यारोहणापासून १३ व्या वर्षी म्हणजे इ. स. पुर्व २६१ ला घडले.

अशोकाने स्वतःच या प्रसंगाचा उल्लेख आपल्या १३ व्या गिरीलेखात विस्ताराने केला आहे. त्यात म्हटले आहे की देवांचा प्रिय राजा याने राज्याभिषेकाला आठ वर्षे होऊन गेल्यावर कलिंग देश जिंकला. तेंव्हा दीड लक्ष लोक कैद करण्यात आले, एक लक्ष लोकांना मारण्यात आले, आणि या संख्येच्या अनेक पट लोक युद्धामुळे धान्यचंटाई, महामारी किंवा साथीच्या रोगांनी बळी पडले. इतकी प्राणहानी आपली विजयप्राप्तीची आकांक्षा व साम्राज्यविस्ताराची हाव यांच्यामुळे घडून आली. हे पाहुन अशोकाच्या मनाला घोर पश्चात्ताप झाला आणि तेंव्हापासून त्याने निश्चय केला की हिंसाचाराचा मार्ग यानंतर कधीच अवलंबायचा नाही.

बौद्ध धर्माचा स्वीकार :
कलिंगविजयाच्या वेळी झालेल्या भयंकर प्राणहानीमुळे झालेल्या पापापासून प्रायश्चित्त घेण्यासाठी व अंतःकरणाला शांती देण्यासाठी भूतदयाप्रधान बौद्ध धर्म योग्य असल्याने तो अशोकाने स्वीकारला असावा. अशोकाच्या वेळी बौद्धधर्म त्याच्या शुद्ध स्वरूपात होता. आणि निरनिराळ्या धर्मप्रचारकांकडून तो उपदेशिला जात होता. मगध राज्यात असा कुठलाच प्रदेश नव्हता तिथे बौद्धभिक्षूंचा व धर्मप्रचारकांचा प्रवेश झाला नव्हता. बौद्धधर्म स्विकारल्यानंतर अशोकाने अनेक ठिकाणी तर्थयात्रा केली.
अशोकाचे शिलालेख :

सम्राट अशोकाच्या संबंधीत जी विश्वसनीय इतिहास सामग्री उपलब्ध झाली आहे ती मुख्यत्वे त्याचे विशाल गिरीलेख, लघु गिरीलेख, विशाल स्तंभलेख, लघु स्तंभलेख आणि गुंफा लेख  अशा पाच प्रकारच्या शिलालेखतून मिळते.

शिलालेखांची भाषा आणि लिपी :
सम्राट अशोकाने सगळे लेख रस्त्याने जाणा-या येणा-या लोकांना कळावेत म्हणून मुद्दामहून महत्वाच्या मार्गांवर कोरले आहे. सर्व लेखांची भाषा सुटसुटीत व सोपी असून ते प्रादेशिक लिपीत लिहीले गेले आहेत. अशोकाचे लेख हे सामान्यपणे प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत कोरलेले आढळतात परंतु भारताच्या वायव्य भागात आढळलेले लेख आरमाइक भाषेत व खरोष्ठी लिपीत आढळतात. अफगाणिस्तानात ते आरमाइक व ग्रीक भाषांमध्ये कोरलेले आहेत. ब्राह्मी लिपी ही देवनागरी लिपीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहीली जाते. तर खरोष्ठी लिपी पारशी-अरबी लिपीप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते.

या लेखांवरून असा अंदाज लावता येतो की त्या काळी प्राकृत भाषा ही भारतात मोठ्या प्रमाणावर बोलली जात होती व भारत खंडातील सर्व भाषा या ब्राह्मी लिपीतून लिहीण्याचा प्रघात होता. 

अशोकाचे चौदा गिरीलेख ऊर्फ आदेश :

अशोकाच्या सर्व लेखात त्याच्या चौदा गिरीलेख किंवा आदेशांचे विशेष महत्त्व आहे. हे चौदा आदेश आठ वेगवेगळ्या ठिकाणी विखूरलेले आहेत. त्यात धौली, शाहबाजगढी, मानसेहरा, कालसी, जौगढ, सोपरा, एरागुडी आणि गिरनार या ठिकाणांचा समावेश होतो. प्रत्येक लेखात काही ना काही महत्वाचा विषय आला आहे व त्यावरून अशोकाचा स्वभाव, त्याची धर्ममते, राज्यव्यवस्था, तत्कालीन समाजस्थिती इत्यादी गोष्टींवर महत्वाचा प्रकाश पडला आहे.

अशोकाच्या सर्व शिलालेखांचे मराठीत भाषांतर लेखकाने या ग्रंथात दिल्याने हा ग्रंथ इतिहास अभ्यासकांसाठी फार मोल्यवान ठरला आहे.

अशोकाचे चौदा आदेश व त्यांचे विषय

आदेश १ : प्राण्यांच्या बळी देण्याच्या प्रथेला विरोध
आदेश २ : मनुष्य व प्राणी यांच्या चिकीत्सालयाची निर्मिती
आदेश ३ : राज्यातील सर्व वरिष्ठ राजुक अधिका-यांना प्रत्येक पाच पाच वर्षांनी धर्म प्रचारासाठी दौरे काढण्याचा आदेश.
आदेश ४ : लोकांत धर्माचरण वाढल्याचे समाधान व ते आणखी वाढण्यासाठी राजाची वचनबद्धता व्यक्त
आदेश ५ : राज्यात धर्ममहामात्रांची नियुक्ती. या पाचव्या आदेशात राष्ट्रीक व प्रतिष्ठानिक असे शब्द आले असून ते अनुक्रमे महाराष्ट्र व प्रतिष्ठान किंवा पैठण यांचा उल्लेख आहे.
आदेश ६ : राजा म्हणून प्रजेची कामे सर्व ठिकाणी करत राहीन. या आदेशात अशोकाची प्रजेच्या हिताची तळमळ व स्वतःच्या सुखाचा त्याग करण्याची तयारी यागोष्टी दर्शविल्या आहेत.
आदेश ७ : सर्व संप्रदायांनी एकत्र राहावे
आदेश ८ : तिर्थ यात्रेचे वर्णन
आदेश ९ : धर्मकृत्ये आणि मंगलकृत्ये याचे वर्णन
आदेश १० : राजा व उच्च अधिकारी नेहमी प्रजेच्या हितासाठी दक्ष राहतील
आदेश ११: धम्म आणि धर्म याची व्याख्या
आदेश १२ : स्रीधर्ममहामात्रांची नियुक्ती. सर्व संप्रदायांनी परस्परांशी मित्रत्वाने वागावे
आदेश १३ : कलिंग युद्धाचे व झालेल्या हाणीचे वर्णन. अशोकाचे मन परिवर्तन घडवून आल्याचे या आदेशावरून स्पष्ट होते.
आदेश १४ : धार्मिक जीवन जगण्याची प्रेरणा. हा शेवटचा आदेश उपसंहाराच्या स्वरूपाचा आहे.

अशोकाचे स्तंभलेख :
अशोकाचे स्तंभलेख दिल्ली - तोपरा, मीरत, अलाहाबाद, सारनाथ, सांंची, कंधार अफगाणिस्तान, अमरावती या ठिकाणी मिळून एकंदर सात आहेत. हे लेख नुसत्या अधिका-यांनाच उद्देशून लिहिलेले नसून एकंदरीत प्रजेला उद्देशून आहेत, व त्यात राज्यशासनाची तत्वे, धर्माचरण, आत्मपरीक्षण, हितसंबंधाचे नियम, धर्मानुराग, धर्मप्रचार्थ योजना इत्यादी भिन्न भिन्न विषय आलेले आहेत.

शिलालेखांचे ऐतिहासिक महत्त्व :
अशोकाचे शिलालेख हे अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची अशी साधने आहेत. ज्या ज्या ठिकाणी हे आलेख सापडले त्यावरुन मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे शक्य होते. अशोकाच्या कारकिर्दीत झालेल्या कलिंगच्या युद्धाची माहिती त्याच्याच कलिंग आलेखातून मिळते. अशोकाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम निश्चित करण्यासाठी या आलेखांची मदत झाली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचा पुरावा यामधून मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी, अशोक कर्मठ नव्हता तसेच आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा अशोकाने कधीच प्रयत्न केला नसल्याचेही या आलेखांतून स्पष्ट होते. परदेशात बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी अशोकाने बौद्ध भिक्षूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखांतून मिळतो.

अशोक कालीन राज्यव्यवस्था व समाजस्थिती :
मगध हे भव्य राज्य होते. त्यावेळच्या मगध राज्यात आत्ताचा बहुतांश भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या यांचा समावेश होता. २५०० वर्षापूर्वी एवढ्या मोठ्या साम्राजाची व्यवस्था ठेवणे किती कठीण काम असेल याची कल्पनाच न केलेली बरी. मगध राज्याचे पाच वेगवेगळ्या प्रांतात विभाजन करण्यात आले होते. हे प्रांत म्हणजे मगध, तक्षशिला, सुवर्णगिरी, उज्जेन आणि तोसली. मगध प्रांताचा कारभार राजा स्वतः पाही तर इतर प्रांतावर राजकुमारांची प्रांतपाल किंवा सुभेदार म्हणून नेमणूक करण्यात येई. चंद्रगुप्त मौर्यचा पंतप्रधान चाणक्याने घालून दिलेल्या नियमानुसारच अशोकाची राज्य पद्धती होती. राज्यकारभार पाहण्यासाठी वेगवेगळे विभाग व आधिकारी होते. अशोकाने नवीन आधिका-यांच्या नियुक्त्या केल्याचा उल्लेख त्याच्या लेखात आला आहे. अशोकाच्या कारकिर्दीत कुठे त्याच्या राज्यात उठाव व बंड झाल्याने आढळून येत नाही. यावरून त्याची संपूर्ण मगध राज्यावर मजबूत पकड होती असे दिसते. एकुणच अशोकाच्या काळी समाजात सुबत्ता होती. उत्कृष्ट न्यायदान अधिकारी तत्पर आधिकारीवर्ग यामुळे राज्यकारभारही चांगल्याप्रकारे होत होता.

त्याकाळी मगध राज्य हे शिक्षण व्यवस्थेसाठी फार प्रसिद्ध होते. तक्षशिला आणि नालंदा या विद्यापीठातून उत्कृष्ट शिक्षण दिले जात होते. या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी विदेशातून विद्यार्थी येत होते, असे उल्लेख सापडतात. संस्कृत भाषा, पाली भाषा, तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि धर्मशास्र यासारख्या विविध विषयात शिक्षण दिले जात होते.

या ग्रंथात तिस-या धर्मपरीषदेची ही सविस्तर माहीती देण्यात आली आहे. त्याच बरोबर अशोक कालिक स्थापत्यकला यांचीही माहिती विस्ताराने दिली आहे. सम्राट अशोकासंबंधी प्रचलित असलेल्या विविध धर्म ग्रंथातील दंतकथाही देण्यात आल्या आहेत. अशोकाचा मृत्यू व त्यानंतरच्या कालखंडावर लेखकाने बरीच माहीती दिली आहे.

एकूणच हा ग्रंथ प्राचीन इतिहास अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त व संग्राह्य असा बहुमोल ग्रंथ आहे.

~ © गणेश भाऊसाहेब पोटफोडे

बुधवार, ७ जून, २०१७

शेतक-यांचा पहिला संप आणि सदाशिव पेठेतील टोमणे

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शेतक-यांनी १ जून २०१७ ला संप पुकारला. न भूतो न भविष्यती असा हा संप म्हणजे वर्षानुवर्षे शेतक-यांच्या मनात खदखदणारा ज्वालामुखीच होता; त्याचा उद्रेक हेऊन संपाच्या रूपाने असंतोषाचा जणू लाव्हारसच बाहेर पडला. या संपाची कारण मीमांसा करतांना असे प्रकर्षाने जानवते की, राज्यकर्त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नाकडे केलेली डोळेझाक, घाम गाळून आणि कष्ट करून पिकवलेल्या मालाला मिळणारा कवडी रेवडीचा भाव. दुष्काळ-गारपीटीमुळे होणारे नुकसान, नुकसानभरपाईच्या नावाने होणारी बोळवन, अर्थात कधी आस्मानी तर कधी सुलतानीत भरडल्यामुळे शेतकरी आता पूरा वैतागला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्या एवढाही बाजार भाव त्याला मिळत नाही. शेतक-यांची एकच किमान अपेक्षा असते की, त्याने पिकवलेल्या मालाला पिकवण्यासाठी केलेल्या खर्चापेक्षा अधिक दाम मिळावा. व्यापारी रक्तपिपासू आणि बाजार समित्यातील पुढारी यामुळे ते अद्यापही शक्य होत नाही. तेंव्हा घेतलेल्या कर्जाचे हप्ते कशाच्या जीवावर फेडायचे या विवंचनेत त्यांला जगण्यापेक्षा आत्महत्या करणे सोईचे वाटत आहे. शेतक-यांच्या आत्महत्या आणि त्यांचे केलेले राजकारण यापेक्षा राज्यकर्त्यांनी वा विरोधकांनी त्या रोखण्यासाठी काहीच ठोस उपाययोजना केलेली नाही. तेव्हा आत्महत्यांचे सत्र आजगायत चालूच आहे आणि भविष्यातही चालूच राहील.

सत्ता मिळल्यावर राज्यकर्त्यांना चढणारी मस्ती आणि विरोधकांचे मते मिळवण्यासाठी शेतकरी प्रश्नाला दाखवलेली सहानुभूती यापलीकडे काहीच होत नाही. निवडणुका आल्या म्हणजे शेतक-यांना काहीतरी योजनेचे गाजर दाखवले जाते. कर्जमाफी, शेतीमालाला भाव, अनुदान वगैरे. परंतु निवडणूका झाल्या म्हणजे हेच शेतकु-यांच्या जीवावर निवडून आलेले  राज्यकर्ते गेंड्याचे कातडे परीधान करतात.

विविध पक्षांचे सरकारे आली गेली. पक्ष व नेते मालामाल झाले पण शेतक-यांचे प्रश्न जसेच्या तसे आ वासून उभे राहिले. कुणीच ते सोडवण्याचा कधीही प्रामाणिक प्रयत्न केला नाही. शेतक-यांच्या हातात नेहमी कसा कटोरा राहील व तो भिका-यासारखा आपल्या दारात कसा उभा राहील यासाठीच राजकारण्यांनी पडद्याआडून नेहमीच प्रयत्न केले आहेत. सहकारी साखर कारखाने व त्यांच्या मार्फत चालणा-या सहकारी संस्था ही त्याची जिवंत उदाहरणे आहेत. वर्तमानात कुठलाच पक्ष वा नेता याला आता अपवाद राहीला नाही. या वर्षानुवर्षे खदखदीचा १ जून २०१७ ला उद्रेक होऊन महाराष्ट्रातील शेतक-यांनी संप पुकारला.

शेतक-यांनी कुठलाच भाजीपाला, फळे, अन्नधान्य आणि दुध बाजारात विकायचे नाही असा शेतकरी संघटनांनी निर्णय घेतला. आंदोलनकारी शेतक-यांनी रस्त्यावर येत शेतीमालाची वाहतुक करणा-या वाहणांना आडवून त्यातील भाजीपाला, दुध यांची नासधूस करण्यास सुरूवात केली. ज्या मालाला असाही काही भाव भेटत नाही तेंव्हा त्याची नासधुस झाल्याचे कसले दुःख शेतक-यांना वाटणार होते? शेतकरी आंदोलनाचे लोन नाशिक, नगरहून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले गेले. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर आडवून ते रस्त्यावर रिचवले गेले. या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी भाजीपाला व दुध शहरांकडे वा बाजार समित्यांकडे घेऊन जाणरी वाहतूक मंदावली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. व्यापा-यांना गंगेत हात धुवून घेण्यासाठी आयती संधी मिळाली. शहरात दुध व भाजीपाला महागला.

शासनाच्या वतीने सुरूवातीला या संपाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना वाटले असावे की कुठेतरी शेतकरी काहीवेळ रस्ते आडवून लाक्षणिक संप करतील आणि मोकळे होतील. पण शेतक-यांच्या संपाने संपुर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहुण फडणविस सरकार हादरले.

संपाला विरोध करण्यासाठी भाजप समर्थक मोठ्या प्रमाणात सरसावले. त्यात एका जाती विशिष्ट शहरी बांडगूळांचा समावेश लक्षणीय होता. कधीही शेतीचा बांध न ओलांडलेले, कांदा जमिनीच्या वर येतो की खाली हे ही ज्ञान नसणारे फेसबुकी व सोशल मिडीयावर लिहीत असणारे तथाकथित बुद्धिजीवी शेतक-यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करत होते. जणू अर्जुनाने श्रीकृष्णाला गीता शिकवावी असे ते सल्ले होते. संपाची थेरं बंद करा, आम्ही उपाशी मरणार नाही, शेतकरी म्हणजे करबुडवे, भिकारडे अशा शेलक्या सदाशिव पेठेतील भाषेत या जमातीने अन्नदात्या शेतक-यांना नावे ठेवून संपाचा विरोध केला. ही जमात कुठली हे न सांगताही लक्षात येण्यासारखे आहे.

महाराष्ट्रात फक्त ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून लोक ही असली संपाची थेरं, मोर्चे काढत असून मुख्यमंत्री बदलला तर सगळे पुर्वीसारखे सुरळीत होईल असे आरोपही करण्यात आले. मग यापूर्वीच्या सरकारच्या काळातही शेतक-यांची आंदोलने झाली त्यावेळेस ते ब्राह्मण समाजाला विरोध करण्यासाठीच होती का? स्वजातीच्या मुख्यमंत्र्याचे समर्थन करण्यासाठी काही लोक शेतक-यांना किती खालच्या पातळीला जावून हिणवत आहेत, त्यांच्या समस्येवर हसू करत आहेत हे पाहून फार वेदना होतात.

जरी शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी नाही दिली तरी चालेल परंतु त्याने कष्टाने कमवलेल्या मालाला पिकवण्यासाठी केलेल्या खर्चापेक्षा जास्त "हमीभाव" मिळावा ही महत्वाची मागणी आहे. आणि ती पुर्ण व्हायलाच हवी.

दुष्काळ, अवकाळी, गारपीट यातून वाचून कधीतरीच एखाद्या वर्षी चांगले उत्पन्न होते तेंव्हा शेक-याचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकत नाही. पुढारी (सत्ताधारी व विरोधक सर्वच) आणि व्यापारी त्यांना भावात लुटून देशोधडीला लावतात. हा अन्याय कुठवर सोसायचा? शेतक-यांच्या हिताचा विचार करणारे सरकार कधी येणार आहे का?

© गणेश भाऊसाहेब पोटफोडे
(पुर्व परवानगी शिवाय कुठेही शेअर करू नये)

शनिवार, ३ जून, २०१७

पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हर

ओवीची शाळा फार दूर आहे. सकाळी तिला शाळेत जाण्यासाठी पहाटे पाचलाच उठवावे लागते कारण पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी तिची बस येते. आम्हाला तिच्या शाळेत जायचं म्हटलं तरी मेट्रो स्टेशनवर उतरून टॅक्सीने जावे लागते. मेट्रोपासून तिची शाळा फार लांब आहे आणि तिथं बसही जात नाही. त्यामुळे तिथं पोहचवण्यासाठी गाडी नसल्याने टॅक्सी हा एकमेव पर्याय आमच्याकडे आहे. मेट्रो स्टेशनच्या बाहेर टॅक्सी ब-याचवेळा पटकन मिळते पण येतांना टॅक्सी मिळत नाही. काॅल टॅक्सी बोलावून घ्यावी लागते.

असच एकदा काही कामानिमित्त मला तिच्या शाळेत जावे लागले. कडक उन्हाळ्यामुळे सकाळी सकाळीच तापमानाचा पारा चढायला लागतो. मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर मला पटकन टॅक्सी मिळाली. या ड्रायव्हरला शाळा कुठे आहे हे सुदैवाने माहिती होते. नाहीतर ब-याचवेळा टॅक्सी ड्रायव्हरनाही रस्ता दाखवत तेथे न्यावे लागते अशी ही शाळा आडवळणी आहे. त्याने मला बरोबर ठीकाणावर पोहचवले. पण मला परत कसं जायचं याची काळजी वाटत होती. मी टॅक्सीच्या बाहेर पडतांना टॅक्सी ड्रायव्हरला म्हणलो की,
"तुम्ही कृपया दहा पंधरा मिनीटं माझ्यासाठी थांबाल का? जर तुम्हाला भाडं मिळाले तर तुम्ही जा."
तो बिचारा थोडावेळ थांबण्यास तयार झाला.

मी शाळेच्या कार्यालयात जावून माझे काम मी करून आलो. पण माझ्या कामाला मला अर्धा तास लागला. मी विचार केला की टॅक्सीवाला तो माणूस गेला असेल. आता उगाचच उन्हात उभा राहुण काॅल टॅक्सी येईल पर्यंत थांबावे लागेल. मी शाळेच्या गेटबाहेर पडलो. शाळा अगदी वाळवंटात बांधली आहे. इकडचा भाग आता विकसीत होत आहे पण तरीही तापलेल्या वाळवंटाचा दाह अंगाची लाही लाही करत होता. घड्याळात पाहिलं तर जेमतेम सकाळचे दहाच वाजलेले होते. भर दुपारी बारा नंतर इथं काय परीस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा.

बाहेर मोघाची पिवळ्या रंगाची नॅशनल टॅक्सी पाहून माझ्या जीवात जीव आला. मी टॅक्सीत बसलो. त्या ड्रायव्हरचे मी धन्यवाद मानले. तो ही मला म्हणाला की "तुम्ही मला थांबवले नसते तर मलाही परत रिकामेच जावे लागले असते. तेंव्हा मी ही तुमचा आभारी आहे."
टॅक्सीवाला बोलता झालेला पाहुण मी ही त्याच्याशी गप्पा मारण्यास सुरूवात केली. त्याचे उर्दूचे अस्खलित उच्चार ऐकून हा पाकिस्तानी आहे, असा मला अंदाज लावायला वेळ लागला नाही. नाहीतरी बहुतांश टॅक्सी ड्रायव्हर हे पाकिस्तानीच असतात.
"तुम्ही जर इथं रोज येत असाल तर माझा नंबर घेऊन ठेवा, मी येत जाईन तुमच्यासाठी" तो फार प्रेमाने म्हणाला.
"मी काय रोज येत नाही, परंतू कधीतरी यावे लागते. तरीही मी तुमचा नंबर ठेवतो."
त्याच्याकडून नंबर घेतल्यानंतर मी तो माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करतांना ड्रायव्हरला त्याचे नाव विचारले. त्याने एजाज असे नाव सांगितले.
मी माझे नाव गणेश सांगितल्यावर तो लगेच म्हणाला "तुमच्या नावाचा मला अर्थ माहित आहे, हत्ती..... बरोबर ना"
मी हो म्हटल्यावर तो पुढे बोलू लागला.
"मी सौदीत पुर्वी कामाला होतो. तिथं माझ्या बरोबर गणेश नावाचा मित्र होता. मी सौदीत जेद्दाला एका चांगल्या कंपनीत परचेस काॅर्डीनेटर या पोस्टवर होतो. साडेनऊ वर्षे मी तिथं काम केलं. पण काही कारणांमुळे मला राजीनामा देऊन परत जावे लागले. नंतर मला चांगला व्हिजा मिळाला नाही. ब-याच प्रयत्नानंतर दुबईत टॅक्सी ड्रायव्हर म्हणून व्हिजा मिळाला. माझी मजबूरी होती म्हणून मला आता टॅक्सी चालवावी लागते. मी अजून नवीनच आहे येथे. मला जास्त दुबईतील ठिकाणेही माहीत नाहीत. एक महिनादेखील झाला नाही मला येऊन." तो सांगत होता.

मी विचारले "मग पगार पाणी कसं असते तुमचे?"
"आम्हाला असा ठरावीक पगार नसतो. दोन ड्रायव्हरमध्ये मिळून एक टॅक्सी असते. बारा बारा तासाच्या अंतराने आमची ड्यूटी बदलते. आम्ही जेवढे बारा तासात कमवू त्याच्यावर ठराविक प्रमाणात आम्हाला पैसा मिळतो. कधी दिवसाला ८० ते १०० दिरहम्स होतात. जर काम नाही केले तर काहीच मिळत नाही. तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर कधी सुट्टीच घेत नाहीत. अगदी आजारी असला तरीही नाही." मला त्यांच ते बोलणं ऐकून फार कसंतरी वाटलं. टॅक्सी ड्रायव्हरला किती कष्ट करावे लागत असतील याचा मला जरा अंदाज आला.

"मग आर टी ए (दुबईतील पब्लिक ट्रान्स्पोर्ट चालणारी सरकारी संस्था) काय मिळते यातून?" मी सहजच विचारले
"आर टी ए ची फार दादागिरी आहे. त्यांच्या नावाने सा-या कंपन्या काम करतात. त्यांना वर्षाचे ठरावीक आणि रोजच्या एकून भाड्याची ठरलेली टक्केवारी आयती द्यावी लागते. जर कंपनीने काही नियम मोडल्यास कंपनी दंड भरते नाही तर ड्रायव्हरने काही अपघात केल्यास ड्रायव्हरच्या डोक्यावर तो खर्च येतो. आता मला अजून पहिला पगार झाला नाहीपण माझ्या नावावर पंधराशे दिरहम्स अलरेडी दंड जमा झालाय. ट्रॅफिक अॅक्सिडेंटमध्ये आमची चुक जरी नसली तरी कंपनी आम्हाला दंड करते. तेंव्हा आम्हाला फार काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते. टॅक्सी ड्रायव्हर हमेशा असल्या दंडाच्या कर्जातच जगतो."

"तुम्ही दिवसाला ८०० ते १००० भाडे जमवत असाल ना?" मी प्रश्न केला.
"नाही आमचे जास्तीत जास्त फक्त २०० ते २५० होतात. जे सिनीयर ड्रायव्हर आहेत त्यांचे होतात ८०० ते १०००"

एवढ्या गप्पा मारल्यानंतर माझं मेट्रो स्टेशन आले.  येतांनाचे साडे वीस दिरहम भाडे झाले. मी त्या ड्रायव्हरला पंचवीस दिसहम दिले, तो मला उरलेले पैसे देत होता. मी त्याला वरचे साडेचार दिरहम टिप म्हणून देऊन टाकले. मला त्याची फार दया आली. आभार मानून मी मेट्रोच्या दिशेने चालत निघालो.

दुबईत प्रत्येकाला किती जीव तोडून मेहनत करावी लाजते ना? पण आपल्या देशाततील लोकांना का वाटते की दुबईत गेल्यावर फार पैसा आहे. का तो झाडाचा लागतो काय? हा टॅक्सीवाला किती मेहनत घेतोय बिचारा. असच इतर क्षेत्रातील कामगारही पोटाला चिमटे घेत आपल्या परिवारासाठी जगत असतील. त्यांचीही या टॅक्सी ड्रायव्हर सारखी काही मजबुरी असेल?

~ गणेश