रविवार, २५ एप्रिल, २०२१

कोरोना योद्धा : बाळू डाॅक्टर


कोरोना विषाणूच्या जागतिक रोग साथीमुळे सध्या भारतभर हाहाकार माजला आहे. रोज आपल्या समोर मित्र परिवारातील किंवा आप्तस्वकीयांमधील कुणीतरी कोरोनामुळे गेल्याच्या बातम्या येऊन धडकत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच दवाखाने कोरोना रुग्णांनी भरून गेले असून औषधे, ऑक्सिजन आणि बेडचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. दवाखान्यात जागा नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपार मिळत नाहीत. आपल्या माणसांना वाचवण्यासाठी नातेवाईकांची सगळीकडे धावाधाव चालू आहे. खासगी दवाखाने तर अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहेत. ग्रामीण भागातही तीस ते पन्नास हजार रूपये डिपाॅझिट दिल्याखेरीज दवाखान्यात प्रवेशच मिळत नाही. या संकट काळात अनेक ठिकाणी औषधांचा काळाबाजार होताना आपण पहातोय. बऱ्या होणाऱ्या रुग्णांना दवाखाने लाखोंची बिलं हातात देत आहेत. सामान्य लोकांना तर खासगी दवाखान्यातील उपचार परवडत नाहीत आणि सरकारी दवाखान्यात बेड मिळत नाही. या कोंडीत सामान्य लोकं मात्र भरडत आहेत.


या भीषण परिस्थितीत अमरापूर ता. शेवगाव येथे डाॅक्टर अरविंद पोटफोडे ऊर्फ "बाळू डाॅक्टर" कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कोरोना रुग्णांना बाळू डाॅक्टर अगदी नाममात्र दरात योग्य उपचार देत आहेत. विशेष म्हणजे ते अमरापूर गावातील रुग्णांना मोफत सेवा देतात. गेल्या महिन्याभरात त्यांनी हजारो रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. माणसावर आलेल्या या संकटाला अनेक जण संधी समजून पैशाची लटू करत असताना एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मात्र सामाजिक बांधिलकी जपत आहे. बाळू डाॅक्टर यांच्या या सेवेची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. नगर सारख्या दुष्काळी भागातील गरीब, कष्टकरी, शेतकरी यांची अखंड सेवा करून बाळू डाॅक्टर यांनी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या निरपेक्ष सेवेसाठी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनता सदैव त्यांची ॠणी राहील. भारतात कोरोनावर सर्वात स्वस्त इलाज करणाऱ्या डाॅक्टरांमध्ये बाळू डाॅक्टर यांचा नक्कीच समावेश करावा लागेल.

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

बाल कविता : पक्षांची भरली शाळा

 

(Photo Credit : FLICKR USER SOROUSH JAVADI // CC BY-SA 2.0)

पक्षांची भरली शाळा

वीजेच्या खांबाजवळ
पक्षांची भरली शाळा
तारेचाच केला वर्ग
आकाशाचा झाला फळा

खंडोजी धीवर गुरूजी
आले निळा कोट घालून
कावळेराव मुख्याध्यापक
उभे चोचीत छडी घेऊन

टिटवीने जोरात केली
शाळा भरायची गर्जना
कोकिळा ताईने गायली
मग सकाळीची प्रार्थना

साळुंखी आणि पोपटाचे
नव्हते पाढे पाठ
बगळ्यांनी गिरवले मग
फळ्यावर पाढे आठ

चिमण्यांनी गायली
कविता एक छान
पारव्यांनी डोलावली
ताला सुरात मान

मोराने घातला होता
छान छान गणवेश
बदक आणि कोंबडीला
नव्हता वर्गात प्रवेश

होला आणि कोतवाल
आज होते गैरहजर
वेड्या राघुची नुसती
घड्याळाकडे नजर

चातक बघु लागला
शाळा सुटायची वाट
पिंगळ्याने वाजवली घंटा
पक्षी उडाले एकसाथ