आत्मकथन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आत्मकथन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ८ मे, २०२३

हायस्कूलचे दिवस


नव्वदचे दशक नुकतेच सुरू झाले होते. जागतिकीकरण अजून भारतात दाखल झाले नसल्याने, त्याचे दुष्परिणाम समाजात कुठेच दिसत नव्हते. सामाजिक मूल्ये आणि आत्मीयता जपणारा तो काळ होता. मी तेव्हा अमरापूरच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होतो. शाळेत जातांना आम्ही अमरापूर हायस्कूलमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थी आणि एकूणच हायस्कूल विषयी अतिशय कुतूहल वाटायचे. कुतूहलाचे मुख्य कारण म्हणजे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बेंच असत, तर प्राथमिक शाळेत त्यावेळी शेणाने सारवलेल्या वर्गातच बसावे लागे. दुसरे कारण म्हणजे हायस्कूल गावाबाहेर असल्याने तिथे चालत जायला खूपच मज्जा वाटे. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला आम्ही प्राथमिक शाळेतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर हायस्कूलवर धावत जात असू. हायस्कूलवर त्यावेळी मिळणाऱ्या विविधरंगी गोळ्यांचे आम्हाला फार अप्रूप वाटे.

१९९२ साली मी अमरापूर हायस्कूलला इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यावेळी हायस्कूलला पश्चिमाभिमुखी पत्र्याच्या खोल्यांचे वर्ग आणि तीन उत्तराभिमुखी स्लॅबचे अपुर्ण बांधलेले वर्ग होते. शाळेला बोर्डिंग देखील होते. एका ग्रामीण भागातील शाळेत ज्या सुविधा असाव्यात त्या सगळ्या सुविधा आम्हाला हायस्कूलमध्ये मिळत असत. शाळेला प्रशस्त मैदान होते. प्रयोगशाळेचे साहित्य होते तसेच ग्रंथालय देखील होते. त्याकाळी शिक्षकांविषयी सगळ्यांनाच आदरयुक्त भीतीचे वातावरण असे. गृहपाठ न करणार्‍या विद्यार्थ्यांना छडीचा प्रसाद खावा लागत असे. लवांडे सर, गरड सर, पुजारी सर, खोले सर, बेहळे सर, भिसे सर, वावरे सर असे आदर्श शिक्षक आम्हाला लाभले. त्याच बरोबर वांद्रे सर आणि कांबळे सर यांच्यासारखे आदर्श आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापकही लाभले. तुपे सर क्लार्क म्हणून काम बघत असत. आराख मामा, औतडे मामा, लवांडे मामा आणि वांढेकर मामा या सारखे प्रेमळ शिपाई त्यावेळेस हायस्कूलवर कार्यरत होते.

सगळ्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी होती. पुजारी सर आणि बेहळे सर शिकवताना खूप विनोद करत आणि संपूर्ण वर्गाला नेहमीच हसवत असत. बेहळे सर आम्हाला विज्ञान विषय शिकवायचे. बेहळे सरांना आध्यात्माची खूप आवड होती. ते स्वतः एक उत्तम कीर्तनकार देखील होते. लवांडे सर आम्हाला समाज अभ्यास शिकवायचे. ते पाचवी ते सातवीपर्यंत माझे वर्गशिक्षक होते. आम्हाला खोले सरांची अतिशय भीती वाटत असे, कारण ते इंग्रजी विषय शिकवायचे. वावरे सर हिंदी आणि खेळाचे शिक्षक होते. वावरे सरांनी शाळेत अनेक खेळाडू घडवले. खो-खो आणि कबड्डी या मैदानी खेळाकडे आमचा फार ओढा असायचा. भिसे सर माझे आठवी ते दहावीपर्यंत वर्ग शिक्षक होते. ते आम्हाला गणित विषय शिकवायचे.
 

स्वर्गीय आबासाहेब काकडे यांचा एफ. डी. एल. संस्था स्थापन करण्या मागचा हेतू खूप व्यापक होता. गोरगरीब आणि सामान्य माणसांची मुलं शिक्षणापासून वंचित राहाता कामा नये, त्यांना रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी शेवगाव सारख्या मागास आणि दुष्काळी तालुक्यात शिक्षण संस्था चालू केली. अमरापूर हे अनेक खोट्या मोठ्या खेड्यांना जोडणारे गाव होते. तेथील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी शेवगावला जावे लागत असे. अमरापूरला हायस्कूल स्तरावरची शाळा चालू करणे खूप सोईचे होते, म्हणूनच आबासाहेबांनी अमरापूर गावाची हायस्कूल उभारण्यासाठी निवड केली असावी. हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारी सगळीच मुले ही शेतकरी आणि शेतमजूरांची होती. तेव्हा सगळेच विद्यार्थी गरीब आणि मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असणारे होते. शिक्षण घेण्यासाठी अनेकजण सुट्टीच्या दिवशी शेतात रोजंदारीवर कामाला जात असत. त्याकाळी फार काही आधुनिक शालेय साहित्य उपलब्ध नसे. खताच्या गोण्यांचा सर्रास दप्तराच्या पिशवीसाठी वापर केला जायचा तर उरलेल्या जुन्या वह्यांची पाने एकत्र शिवून नवी वही तयार करण्याची तेव्हा प्रथा होती. नवीन पुस्तकं विकत न घेता जुनीच पुस्तकं वापरली जात असत. एकच गणवेश धुवून वापरला जायचा.

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट व्यतिरिक्त शाळेत विविध सण आणि उत्सव साजरे केले जात असत, त्याच प्रमाणे विविध स्पर्धा आणि शैक्षणिक सहली देखील आयोजित केल्या जात. शाळेत दहा दिवसाचा गणपती बसवला जायचा. सकाळी प्रार्थनेच्या वेळी आरती केली जाई. रोज एक वर्ग आरतीसाठी प्रसाद म्हणून घरून मोदक बनवून आणायचे. रोज सकाळी मोदक खायला मिळायचे. काही विद्यार्थी मुद्दाम साखरे ऐवजी मोदकात मीठ किंवा मिरचीचा ठेचा घालत असत. हायस्कूलमध्ये रक्षाबंधन साजरा करण्याची देखील त्यावेळी प्रथा होती. प्रत्येक वर्गात त्यावेळी दत्ताचा फोटो असे. दर गुरूवारी पहिल्या तासाला दत्ताची आरती केली जात असे. क्रमाक्रमाने प्रत्येकाला आरतीसाठी प्रसाद आणावा लागे. याशिवाय विविध राष्ट्र पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जात असत. त्याच आमचा नेहमीच सक्रिय सहभाग असे.

आयुष्यातील यशात अमरापूर हायस्कूल मधील शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे. हायस्कूलमध्ये दाखल झालो तेव्हा बॅकबेंचर आणि ढ विद्यार्थी म्हणून माझी गणती होत असे. कालांतराने आमच्या आदर्श शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने मी १९९७ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झालो. त्यावर्षी मी शाळेत पहिला येण्याचा मान पटकावला. आज मागे वळून बघतांना ज्या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतले ती परिस्थितीच आमच्या यशासाठी कारणीभूत ठरली असे म्हणावे लागेल. आज शाळेला सुसज्ज इमारत आहे. शाळा ज्ञान दानाचे आणि विद्यार्थी घडवण्याचे काम अखंडपणे करते आहे याचे कौतुक वाटते. भविष्यातही अमरापूर हायस्कूलने खूप प्रगती करेल आणि येथून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करत राहतील. 

शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

दुबईतील अनुभव

२०११ साली मला दुबई, युएई येथे नोकरीची संधी मिळाली आणि मी दुस-यांदा नोकरीसाठी आखातात आलो. सौदीच्या अनुभवाचा मला दुबईत रूळण्यास खूप फायदा झाला. आज मी दुबईत इंजिनिअर या पदावर काम करत आहे.

दुबईतील आणि सौदी अरेबियातील हवामान यात फारसा फरक नव्हता. सात महीने कडक उन्हाळा. पावसाळा हा ॠतूच येथे नाही. हिवाळ्यात म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान थोडाफार पाऊस पडतो. परंतु या दोन देशात महत्वाचा फरक होतो आणि तो म्हणजे दुबईतील मोकळे वातावरण . या देशात लोक आपले उत्सव, सण हे मुक्तपणे साजरे करू शकतात. त्यामुळेच बहुधा येथे मोठ्या संख्येने भारतीय लोक कुटुंबासोबत राहातात. दुबईत भारतीयांची संख्या जवळपास चाळीस टक्के आहे. त्यात मराठी माणसांचा वाटा देखील खूप आहे. एक सामान्य कामगारापासून ते थेट मोठ्या उद्योजकापर्यत येथे मराठी माणसांची वर्गवारी होवू शकते. मराठी उद्योजकांनी दुबईत महाराष्ट्रचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे.

[दुबई म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशातील एक राज्य आणि शहर. आबूधाबी, शारजा, दुबई, रास अल खैमा, अजमान, ऊम अल कुवैन आणि फुजैरा हे राज्य १९७१ पुर्वी वेगवेगळे देश होते. त्यांच्या राज्यप्रमुखांनी आबू धाबीचे शेख झायद यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन युएई ची स्थापना केली. खनिज तेल, नैसर्गिक वायू, पर्यटन, व्यापार याच्या जोरावर युएई ने गेल्या दोन दशकात खूप प्रगती केली आहे.]

दुबईत आल्यावर मी ब-याच सांस्कृतिक समूहांशी जोडला गेलो. मराठी माणूस एकत्र येवून येथे खूप वेगवेगळे उत्सव साजरे करत असतात. जवळपास सगळे सण दुबईत साजरे होतात. होळी वा रंगपंचमीला रंगाची उधळण असो, आषाढी वारीची किंवा तुकाराम बिजेची दिंडी असो, गणेश उत्सव असो, नवरात्रीतला गरभा असो, एकत्र मिळून खाल्लेले दिवाळीचे फराळ असो हे असले सगळे सण आणि उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे होतात. दिवाळीला दुबईतील बर दुबई, करामा या भागात फिरताना आपण भारतात तर नाही ना? असा भास होतो. सगळी घरं, इमारती या रोषणाईने सजलेल्या असतात. दुबईत मराठमोळे "त्रिविक्रम ढोलताशा पथक" देखील आहे. अशा प्रकारचे हे आखातातील पहिले ढोलताशा पथक आहे. वर्षभरात या पथकाच्या माध्यमातून दुबईत ढोलताशाचा आवाज घुमत असतो.

दुबईतील मराठी माणूस हा खूप वाचनवेडा आहे. मराठी वाचकांसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक संचलित "ग्रंथ तुमच्या दारी" या योजनेमुळे शोकडो वाचकांना दर्जेदार मराठी पुस्तकं मोफत वाचनासाठी उपलब्ध झाली आहेत. माझ्यासारख्या वाचनाची आवड असणा-या व्यक्तीला दुबईत पुस्तकं घेऊन जाण्यास खूप मर्यादा होत्या. सुट्टीवरून परत जातांना दोन-चार पुस्तकांपेक्षा जास्त नेता येऊ शकत नव्हती. आणि नेलेली पुस्तकं वर्षभर वाचण्यासाठी पुरेशी नसायची. पण जेंव्हापासून मी ग्रंथ तुमच्या दारी या योजनेशी जोडलो गेलो तेंव्हा पासून अनेक दर्जेदार ग्रंथ मला वाचण्यास मिळू लागले. आज ग्रंथ तुमच्या दारी या योजनेच्या अंतर्गत दुबईसह संपूर्ण युएई विविध ठिकाणी २७ ग्रंथ पेट्या आहेत. एक ग्रंथ पेटी म्हणजे त्या भागातील छोटं ग्रंथालयच असतं. या ग्रंथ पेट्या दर तीन महिन्यांनी समन्वयक आपआपसात बदलत असतात. त्यामुळे वाचकांसाठी नेहमीच नवनवीन ग्रंथ उपलब्ध होतात. ग्रंथ तुमच्या दारी च्या माध्यमातून मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृती यावर वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात; यात वाचक मेळावा, मराठी भाषा दिवस, वाचन प्रेरणा दिन, अक्षरबाग, अभिवाचन आणि काव्यसंमेलन आदींचा समावेश असतो.

दुबईत आणि खासकरून परदेशस्थ भारतीयांसाठी (एन आर आय) "विश्व पांथस्थ" नावाचं मासिक देखील सुरू झालं आहे. अशा प्रकारचे हे मराठी भाषेतील पहिलेच मासिक आहे. या मासिकाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोप-यात राहणा-या लोकांचे अनूभव वाचण्यास मिळत आहेत. या मासिकाचे वितरण भारतासह जगाच्या विविध देशात होत आहे.

दुबईत सगळ्या शाळा या इंग्रजी माध्यमातून आहेत. मराठी पालकांच्या लहान मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी, त्यांना मराठी लिहीता व वाचता यावी म्हणून विविध संस्था आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून दुबईत आणि आबूधाबी येथे मराठी शाळा सुरू झाल्या आहेत. तसेच बाल वयात मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दर आठवड्याला बालसंस्कार वर्गाचे देखील आयोजन करण्यात येते. ग्रंथ तुमच्या दारीच्या माध्यमातून बालवाचकांसाठी खास गोष्टींच्या पुस्तकांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

आमी परिवार नावाचा एक मराठी माणसांसाठी एक आगळावेगळा समूह देखील येथे सक्रिय आहे. हा समूहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो युएई मध्ये राहणा-या मराठी माणसांना विविध प्रकारची मदत करतो. व्हाट्सअपचा उपयोग फक्त विनोद, हाय-हॅलो न करता एका सामाजिक हेतूने हा समूह कार्य करत आहे. या समूहाच्या माध्यमातून अनेक दुबईकर मराठी लोकांना अडचणीच्या काळात मदत मिळाली आहे.

मराठी माणसांना दुबईचं खूप आकर्षक आहे. इथल्या उंच इमारती, वाळवंट या जगभरातील पर्यटकांना खुणावत असतात. दरवर्षी येथे खूप पर्यटक येतात त्यात मराठी पर्यटकांचाही खूप मोठा वाटा आहे. इथे स्थायिक झालेला मराठी माणूस इथलं वातावरण आपलंस करून आपली भाषा आणि संस्कृती यांना टिकवून ठेवत आहे. दुबई खरोखरच मराठमोळी झाली आहे.

बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

मला आखातात नोकरी मिळाली!

आखातात येऊन आता एका दशकाहून अधिक काळ लोटला आहे. माझं बालपण, शिक्षण हे भारतात जरी गेलं असलं तरी अख्खं तरूणपण आखातात गेलं. वयाच्या अगदी चोवीसाव्या वर्षात हातात मुठभर स्वप्न घेऊन मी इथं आलो होतो. इथल्या वाळूने कधी आपलंसं केलं हे कळले देखील नाही. सुरुवातीचा काळ वगळता नंतर मी देखील इथल्या वातावरणात रमून गेलो. एका दशकानंतर मी आज जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा मला जाणीव होते की ज्या स्वप्नासाठी एवढा खटाटोप केलो होता त्याचं फळ मला मिळाले आहे. पाहिलेली स्वप्न सत्यात उतरली आहेत. माझ्या कष्टाला आणि त्यागाला आखाताने भरभरून दिले.

परिस्थिती माणसाला विचार करण्यास आणि त्यागास प्रवृत्त करत असते. माझ्यासारख्या दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तरूणापुढं भविष्याची चिंता होती. परिस्थितीमुळे शिक्षण पुर्ण होऊ शकलं नाही. केवळ आयटीआय आरेखक यांत्रिकी एवढीच पात्रता मिळवून मी बाहेर पडलो. आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतरचा काळ माझ्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप कठीण होता. सतत काही वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील उत्पन्न फक्त खाण्यापूरतं व्हायचे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे हाच एकमेव पर्याय मला दिसत होता. कधी कधी वाटायचं की आरेखक यांत्रिकी हा ट्रेड करून चूक केलीये का? कारण या ट्रेडला नोकरी शिवाय दुसरा पर्याय नव्हता. शिक्षण घेत असतांना याची मला सतत जाणीव होत होती. माझ्या आधीच्या काही बॅचमधील ठराविक दोनचार मुलांनाच नोकरी मिळाली होती. आपल्याला नोकरी मिळते की नाही याबाबत माझ्या मनात खूप भिती वाटायची. उत्तीर्ण झाल्यावर नोकरीसाठी संघर्ष करावाच लागणार होता हे उघड होते. 'शिक्षण कधीच वाया जात नाही!' या म्हणीने मला नेहमी प्रेरणा दिली. जेंव्हा मी उत्तीर्ण झालो त्यावेळी नोकरी मिळवण्यासाठी अनेक पुढारी व ओळखीच्या नातेवाइकांकडे गेलो पण अश्वासनाशिवाय दुसरं काहीच मिळालं नाही. मग मी स्वतःहून नोकरी शोधायला लागलो. त्याकाळी सकाळ पेपरात नोकरीच्या संदर्भात एक पुरवणी यायची, त्यातूनच मी एल अॅण्ड टी मुंबई येथे अॅप्रेंटीससाठी अर्ज केला आणि योगायोगाने माझी निवड देखील झाली. अॅप्रेंटीस पूर्ण झाल्यानंतर मी मुंबई-पुण्यात काही काळ नोकरी केली. नोकरी मिळाली तरी घरातील परिस्थिती सुधारत नव्हती कारण मला मिळणारा पगार पुरेसा नव्हता.

२००५ ला मी एका कंपनीत कामाला असतांना तेथील माझे काही मित्र हे आखातात नोकरी करून आलेले होते. त्यांचे राहणीमान हे खूप सुधारलेले होते. मला वाटायला लागले की, आपणही आखातात घाऊन नशीब का आजमावू नये? त्यावेळी मी मनाशी पक्के केले की आपणही आखातात जायचेच. त्यानंतर मला आखातात नोकरी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आखातात नोकरी मिळवणं सोपी गोष्ट नव्हती. पासपोर्ट कसा असतो? तो कसा मिळवायचा? कुठे अर्ज करायचा? हे देखील मला माहीत नव्हते. माझ्या बरोबर काम करणा-या मित्रांनी यासाठी मला खूप मदत केली. त्यानंतर जवळपास एक वर्ष मला पुणे मुंबई इंटरव्ह्यूसाठी फे-या मारव्या लागल्या. मुंबईतील काही एजंट नोकरी मिळवून देतो म्हणून फसवणूक देखील करतात. ब-याच ठिकाणी मला याचे खूप वाईट अनुभव आले. आखातात आधी जाऊन आलेल्या माझ्या मित्रांनी मला एजंटच्या हातात पासपोर्ट कधीच द्यायचा नाही असा सल्ला दिला होता आणि तो मी पाळला. कामगारांना घेऊन जाण्याचा सगळा खर्च ही तेथील कंपनी करत असते तरीही हे एजंट आपल्याकडून खर्चाच्या नावाखाली खूप पैसे मागायचे म्हणून पैसे मागणा-या कंपनी वा एजंटकडे मी जाणे टाळले.

एजंटला एक पैसाही न देता २००६ साली मला पहील्यांदा सौदी अरेबिया येथे नोकरी मिळाली. नोकरी मिळाली पण पगार होता जेमतेम १७०० रियाल (त्यावेळचे २०,००० रूपये). भारतात मिळत होता त्यापेक्षा काही हजार जास्त. तरीही एक नवीन संधी आणि अनूभवासाठी मी ही नोकरी पत्करली आणि आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात झाली.

नवीन देशात चाललो होतो त्यामुळे मनात एक भिती होती. मी या अधी कधीच विमानात प्रवास केला नव्हता. पहिला विमान प्रवास हा माझ्या अविस्मरणीय अनुभव होता. सौदीमध्ये पहिल्यांदाच पाउल ठेवल्यानंतर माझ्या मनात शंका होती की मला कोणी मराठी बोलणारा मित्र भेटेल की नाही. आमच्या कंपनीतील नवीन १४ लोकांच्या ग्रुप मध्ये मी एकटाच मराठी भाषक होतो तर इतर बहुतेक दक्षिणात्य होते. येथे आल्यावर जवळपास दोन आठवडे मला मराठी बोलायला मिळालेच नाही. काही दिवसांनी येथे दोन-तीन मराठी माणसं आहेत असं समजल्यावर मला फार आनंद झाला.

सौदी मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे केरळी लोकांची संख्या आणि त्यांनी येथे प्रत्येक व्यवसायात घेतलेली गरुड झेप. येथे केरळी लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांचा प्रत्येक व्यवसायात बोलबाला आहे. मुंबईमध्ये जसे भैय्या लोक कुठलाही व्यवसाय करतात त्याप्रमाणे येथेही केरळी लोक सर्व प्रकारच्या व्यवसायात दिसतात. किराणा दुकान, खानावळी, चहाची दुकानं, शॉपिंग सेन्टर्स, नाव्ही, टेलर, गाडी चालक, लाँड्री वाले, भाजीपाला विक्रेते असे जवळपास सर्व व्यवसाय केरळी लोकांचेच आहेत. येथे असलेले बहुतेक डॉक्टर आणि नर्स हे देखील केरळीच आहेत.

सौदी अरेबियातील नियम हे भारतापेक्षा खूपच वेगळे होते. तिथे राजेशाही राज्यपद्धती चालते. इस्लाम धर्म आणि इस्लामीक कायदे तिथे काटेकोरपणे पाळले जातात. याचा अनूभव तिथं गेल्यागेल्या आला. रमजानच्या महीन्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा उघडपणे काही खाता-पिता मनायी असते. गुन्हेगारांना सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शिक्षा दिली जाते मग ते चाबकाने फटके मारणे असो नाहीतर फाशी किंवा शिरच्छेद असो.

माझी कंपनी ही सौदी अरेबियाच्या दम्माम या शहरात होती. आमची राहण्याची व्यवस्था कंपनीने जरी केली असली तरी खाण्यापिण्याचा खर्च ज्याला त्यालाच करावा लागणार होता. म्हणजे १७०० रियाल पगारामधून जवळपास २०० रियाल खर्च व्हायचा आणि उरलेले पैसे घरी पाठवावे लागचे. सुरुवातीचे दोन महिने खूप वाईट गेले. मी जन्मापासून शुद्ध शाकाहारी माणूस असल्यामुळे माझे खाण्यापिण्याचे थोडे हालच झाले. सौदी मध्ये शुद्ध शाकाहारी अश्या खानावळीच नाहीत. रेस्टॉरंटमध्ये फक्त मौंसाहारी पदार्थ मिळायचे. क्वचितच एखाद्या ठिकाणी शाकाहारी जेवण मिळायचे. दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये इडली, डोसा आणि परोठा खाऊन थोडे दिवस काढले. स्वयंपाकाचे माझे ज्ञान शुन्य होते तरीही काही दिवसांनी कसेतरी जेवण बनवायला लागलो.

कुठल्याही नवीन प्रदेशात जाण्या अगोदर आपल्या मनात अनेक शंका येतात जसे की, त्या देशाची भाषा आपल्याला येत नाही मग कसे होणार? वगैरे, पण माझ्या बाबतीत हा अनुभव थोडा भिन्न होता. मी सौदी मध्ये येण्या अगोदर अरबी भाषेचे थोडे ज्ञान संपादन केले होते. माझ्या गावातील एक टेलर काम करणारा मित्र पाच वर्ष सौदीत काम करून परतला होता त्यामुळे तो खूपच छान अरबी बोलत असे. मी त्याच्याकडून अरबी भाषेचे थोडे शब्द आणि वाक्य शिकून घेतले त्यामुळे येथे आल्यावर मी नवीन असून सुध्दा भाषेचा फारसा त्रास झाला नाही. माझ्या एका मुस्लिम मित्राकडून उर्दू अक्षरे शिकलो होतो. अरबी आणि उर्दू लिपीत बरेच साधर्म्य असल्यामुळे मला अरबी लिहिण्यास व वाचण्यास काहीच अडचण आली नाही. अरबी भाषा चांगली शिकण्यासाठी मी जोमाने प्रयत्न केले. कंपनी मध्ये जुन्या सहकाऱ्याकडून मी वेगवेगळे नवीन शब्द आणि वाक्य शिकून ते एका वहीत व्यवस्थित लिहून घेतले. अरबी भाषेचा अभ्यास करताना मला आढळून आले की अरबी मधील कित्येक शब्द आपण मराठी मध्ये जाशेच्या तशे वापरतो. नंतर मी माझ्या वहीत अरबी आणि मराठीत वापरत येणाऱ्या सारख्या शब्दांची यादीहीच करून ठेवली. सौदी मध्ये दाखल झाल्यानंतर काही महिन्यातच मी अरबी छान बोलू लागलो होतो.

मिळणारा पगार खरोखरच तुटपुंजा होता. गावाकडच्या लोकांना आणि मित्रांना असे वाटायचे की मी लाखात कमावतो आहे. अजूनही गावाकडच्या लोकांची हीच धारणा असते की दुबईत काम करणा-या व्यक्तीस लोखो रूपये पगार असतो आणि तो सहजासहजी मिळतो. एक प्रकारे गावी गेल्यावर त्यांची नेहमी याबाबत कुचेष्टा केली जाते. पण आखाती देशात ज्या परिस्थितीत कामगारांना काम करावे लागते त्याची विचारपूस किंवा चर्चा कोणी करत नाही. मी आरेखक असल्यामुळे मला बाहेर (आऊट डोअर) काम नसायचे. पण बाहेर काम करणा-या लोकांचे काम खरोखरच फार कठीण होते हे मी पाहिले आहे. सौदी अरेबिया म्हणजे वाळवंटी देश. इथला उन्हाळा खूपच कडक असतो. उन्हाळ्यात तापमान जवळपास ५५° सेल्सिअस पर्यंत जाते. त्यात भयंकर आर्द्रता, वाळूचे वादळ असल्या गोष्टींचा सामना करावा लागतो. कंस्ट्रक्शन साईटवर काम करणा-या लोकांचे खूप हाल होतात. तरीही आपली स्वप्न आणि घरच्यांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी हा कामगार एवढ्या उष्ण परिस्थितीतही काम करत रहातो. आखातात काम करणा-या कामगारांचे जीवन मी जवळून अनूभवले आहे. काही ठिकाणी लेबर कॅम्पमध्ये कामगारांना खूप वाईट परिस्थितीत रहावे लागते. आखातात बराच काळ राहिल्या नंतर त्यांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. एवढं सगळं होऊनही भारतात त्यांची नातेवाईक आणि सरकारकडून उपेक्षाच होते. सरकार अनिवासी भारतीयांना केवळ विदेशी मुद्रा कमावून देणारी मशीनच समजते. या अनिवासी भारतीय कामगारांसाठी सरकारकडे काही ठोस उपाययोजनाच नाही. त्यांना साधे आधार कार्ड देखील काढता येत नाही. मतदानासारखा घटनेने दिलेला अधिकार निभावता येत नाही.

२००६-२००९ या तीन वर्षाच्या कालखंडात मी सौदी अरेबियामध्ये नोकरी केली. सौदी अरेबियात अनेक निर्बंधामुळे विदेशी नागरिकांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर खूप मर्यादा होत्या. त्यामुळे सौदी अरेबियात विदेशी लोक आपले उत्सव, सण मोकळेपणाने साजरे करू शकत नाहीत. अनेक निर्बंध असूनही मी या देशात मनाने काम केले. पुढे माझी कामगिरी पाहून कंपनीने पगार एका चांगल्या पातळीवर नेला. सौदीत खूप वेगवेगळे अनूभव मिळाले त्यात विविध देशातील लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतीशी ओळख झाली.

२००९ साली मी नोकरीचा राजीनामा देऊन भारतात परतलो.

मंगळवार, २ जून, २०१५

परत आखातात

घरासाठी मला परत दुसऱ्यांदा आखाती देशात नोकरीसाठी यावे लागले. पहिल्यांदा गावी राहायला घर नव्हते आणि मी स्वतःशीच हट्ट करून बसलो होतो कि जोपर्यंत गावी घर होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. माझ्या घराच्या स्वप्नाला साकार कण्यासाठी मी २००६ साली सौदी अरेबिया मध्ये पहिल्यांदा नोकरीसाठी आलो होतो. २००६ ते २००९ या तीन वर्ष्यात शक्य तेव्हढे पोटाला चिमटे काढत कसे तरी गावी डोक्यावर छप्पर बनवण्यासाठी मी घरच्यांना मदत केली. २००९ ला मी भारतात परतलो ते सौदीत फिरून कधीच न येण्यासाठी. कारण इथल्या धार्मिक कट्टरतेला मी वैतागलो होतो. सौदीत स्थायिक झालेला भारतीय मुस्लीम समाजच आम्हाला पाण्यात पहात होता. बरेच जन त्यांच्या मनातील द्वेष ते उघडपणे व्यक्त करत होते. २००९ ला दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात परतलो आणि सौदी अरेबियाच्या मोहिमेवर पडदा पडला.
२०१० ला मला मुंबईत नोकरी मिळाली. गावाकडच्या घराची सोय झाली होती. आता मी शहरात घर घेण्याचे दिवसा स्वप्न पाहू लागलो होतो. याचे कारणही तसेच होते. माझ्या जवळच्या मित्रांपैकी बऱ्याच जणांनी मुंबईत हक्काचे घर घेतले होते. अर्थात ते जरी गृहकर्ज काढून विकत घेतलेले असले तरी ‘मुंबईत घर’ या शब्दाला फारच किंमत होती. मुंबईला नोकरीसाठी गेलो तेंव्हा मला अमोल कार्ले या माझ्या L&T मध्ये असतांनाच्या मित्राने फार सहकार्य केले. त्याची स्वतःची कल्याणला सदनिका होती. मला तेथे त्याने राहायला जागा दिली. त्यावेळी तोही अविवाहित होता. नितीन पाटील व अमोल कार्ले हे दोघे आधीपासूनच तेथे राहत होते. या दोघांच्या सदनिका याच इमारतीमध्ये होत्या. लग्न होईपर्यंत मी अमोल कडेच राहिलो. मे २०१० ला लग्न झाल्यानंतर मी अमोल शेजारीच घर भाड्याने घेवून राहू लागलो. या दरम्यान मी नवीन घराच्या शोधात होतो.
मुंबईत माझी नोकरी चांगल्या पगाराची होती तरी नोकरीवर कायम तलवार लटकलेली असायची. कंपनीचा मालक सुहास चव्हाण हा फार लहरी आणि क्रूर स्वभावाचा होता. त्याने सुहास हायड्रो सिस्टम्स नावाची कंपनी विक्रोळीत चालू केली होती. तो एकटाच सगळ्या कंपनीचा कर्ता धर्ता होता. त्यामुळे त्याचा कोणावरच विश्वास नव्हता. कंपनीत ज्या प्राथमिक गरजा मिळायला हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या. पिण्यासाठी स्वच्छ पाणी नसायचे. तेही घरूनच न्यावे लागे. शौचालय एव्हढे घाणेरडे होते कि त्यात जाने म्हणजे एक मोठी शिक्षा होती. प्रत्येक आठवड्याला कोणाच्या ना कोणाच्या नोकरीवर तलवार पडायची. सुहासच्या स्वभावामुळे मी पहिल्या पाच-सहा महिन्यातच दहा-बारा कर्मचारी बदललेले पाहिले. काही जन सुहासच्या स्वभावाला भिवून पळाले तर काहींना सुहासने पळवले. एक दिवस यात माझाही नंबर लागणार हे नक्की होते. तरीही मी येथे एक वर्ष काढले. पहिल्या महिन्यापासूनच मी दुसरीकडे नोकरी शोधण्याचा फार प्रयत्न करत होतो. अनेक ठिकाणी मुलाखती देवूनही काहीच उपयोग झाला नाही.
नवीन नोकरी शोधणे आणि नवीन घर शोधणे या दोन्ही गोष्टी समांतरपणे चालू होत्या. अश्यातच कल्याण मध्ये आधारवाडीला रोनक कॉर्पोरेशनचा सदनिकेचा प्रकल्प चालू झाला आणि मी त्यामध्ये सदनिका घेण्याचे ठरवले. बरोबर त्याच काळात मला L&T मधील माझे जुने सहकारी दीपक पांचाळ यांचा दुबई मधून फोन आला. दीपक हे L&T ची नोकरी सोडून दुबईत नोकरीला लागले होते. त्यांच्या कंपनीत ड्राफ्टसमनसाठी जागा होती. खरेतर माझा दुबईत जाण्यात होकार देणेच म्हणजे माझी त्या कंपनीत निवड होती. हि घटना एव्हढी अनपेक्षित घडली कि मला विचार करायला संधीच मिळाली नाही. मी ज्या दिवशी हो म्हणालो त्याच्या दहा दिवसाच्या आतच मला दुबईला जायचे होते. व्हिजासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जमवाजमव आणि त्यात नवीन घर खरेदीची प्रक्रिया यात माझे फार हाल झाले. या सर्वावर मत करून मी २० फेब्रुवारी २०११ ला दुबईला आलो.
माझे दुबईला येणे याला सुहास मधील नोकरी जशी कारणीभूत होती तशी नवीन घरासाठी लागणारा पैसा कसा गोळा करायचा हि काळजी सुध्दा तितकीच. म्हणूनच दुबईची नोकरी माझ्यासाठी मोठी स्वर्णसंधीच होती. मी या संधीचा फायदा घेतला आणि माझ्या स्वप्नातील दुसऱ्या घराला गवसणी घातली. दुबईस जाण्यापूर्वी मी माझ्या मोठ्या भावाच्या नवे मुखत्यारपत्र करून ठेवले होते त्यामुळे माझ्या मागे त्याने सर्व कामे व्यवस्थित व चोखपणे केली.
२००४-०५ साली घरच्यांकडे भाजीपाला व किरणा समान आणण्यासाठी सुद्धा पैश्याची आडचन होती. या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी पहिल्यांदा मी आखातात आलो होतो. पण दुसऱ्यांदा आखातात आलो ते भावी आयुष्यास आर्थिक स्थैर्य येण्यासाठी.
- ©गणेश पोटफोडे


मंगळवार, १५ एप्रिल, २०१४

चार आणे

काही माणसं विलक्षण सामर्थ्य घेवूनच जन्माला येतात. आपल्या प्रामाणिक पणामुळे ते समाजामध्ये एखाद्या तेजस्वी ताऱ्याप्रमाणे भासतात. अश्याच माणसाच्या हातात लक्ष्मिचाहि वास असतो. त्यांनी एखादे काम हाती घ्यावे आणि ते तडीस नेल्याशिवाय स्वस्त बसू नये. प्रत्येकवेळी यश जणू त्यांची वाटच पाहत बसलेले असावे. याच प्रकारातील आमचे अण्णा होते. त्यांच्या पुण्याईने आम्हाला कशाचीच कमतरता नव्हती. उसाचे मळे, दुभत्या गायी यामुळे घरात विपुल संपदा होती. अण्णा अचानक अपघातात आम्हाला सोडून गेले आणि आमच्या धनसंपदेलाही ओहोटी लगली. त्यांनी पाळलेल्या गायी काही वर्षाच्या अंतराने एक एक करत मरण पावल्या. जणू त्या मुक्या जनावरांनाही मालक गेल्याचे अतीव दुःख झाले असावे.
     अण्णा गेले आणि आमचे भविष्य पार बदलून गेले. या अवघड प्रसंगी अण्णांच्या धाकट्या भावाने संसाराचा गाडा चालायला घेतला. आम्ही त्यांना तात्या म्हणत असु. तात्या कारभारात नवीन होते. आधीच एक ना अनेक संकटे येत होती अशात अर्थकारणाची चाके मंदावतही गेली आणि आमच्या तंगीचा काळ सुरु झाला. त्यावेळी माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण होऊन मी गावातीलाच हायस्कुलमध्ये पाचवीत जाऊ लागलो होतो.
     त्या काळात आम्हाला एखाद्या गोष्टीसाठी फार त्रास घ्यावा लागे. मी लहानपाणी फारच हट्टी वगैरे नव्हतो तरीही एखाद दुसऱ्या वेळी मी काही गोष्टीसाठी हट्ट धरून बसायचो. आई मला नेहमी हट्टांपासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करे. अश्यात तात्यांचा स्वभाव फार चिकट होता. सहजा सहजी त्यांनी कुठल्याही गोष्टीसाठी पैसे देऊ नयेत असा त्यांचा स्वभाव होता. शाळेच्या सुट्टीच्या दिवशी मी आई बरोबर शेतात जाई. गावातील बऱ्याच बायका आमच्या कडे खुरपणीसाठी येत, आई त्यांच्याकडून व्यवस्तीत काम करून घेण्यासाठी त्या बायकांबरोबर शेतात जायची. त्या बायकांबरोबर त्यांची मुलेही खुरपणीसाठी शेतात येत असत. यातील काही मुले माझे वर्ग मित्र असल्यामुळे मी पण त्यांच्या सोबतीने आमच्याच शेतात खुरपणी करयचो. आई माझेही नाव कामाच्या बायकांच्या नोंद वहीत लिही, त्यामुळे मलाही रोजंदारी मिळे. एका रोजाचे त्यावेळी ५ रुपये मिळायचे. या खुरपणीच्या साचलेल्या पैश्यातून मग मी शाळेतील सहलीला वगैरे जयचो.
     शाळेत असतांना बरेचदा माझी चड्डी फाटलेली असयची. फाटलेल्या चड्डीमुळे शाळेत शर्ट ईन करण्यास फार लाज वाटायची. प्रार्थनेच्या वेळी शर्ट ईन करावीच लागायची, माझी फाटलेली चड्डी पाहून मुलांनी हसुनये म्हणून मी रांगेत अगदी शेवटी उभा राहायचो. अनेकदा मी शर्ट ईन न करताच प्रार्थनेला उभा असायचो या कारणासाठी कित्येकदा मार खावा लागे.
      माझ्या पायात स्लिपर चप्पल असायची तीपण घासून घासून तिच्या टाचा नाहीश्या झालेल्या असायच्या तर त्यांचे पट्टे खिळे किंवा वेड्या बाभळीचे काटे लाऊन पकडून ठेवलेली असायचे. तात्यांना चप्पल आणायला सांगितलेले अजिबात आवडायचे नाही. त्यांना जर कोणी चप्पल आणायला सांगितले तर त्या दिवशी काहीच काम होणार नाही असा त्यांचा समाज होता. चप्पल विकत घेणे म्हणजे अपशकुनच असे त्यांना वाटे त्यामुळे मला बिन टाचांच्या चप्पला घालून शाळेत जावे लागायचे. कधी कधी तर त्या चप्पल दोन पावले चालल्यावर त्यांचा खिळा निघून पडायचा. मी अनेकदा शेजाऱ्यांच्या चप्पला शाळेत घालून जायचो. तात्यांच्या असल्या स्वभावामुळे त्यांच्याकडून एखादी वस्तू हवी असल्यास रडून रडून घ्यावी लागायची. रडल्यामुळे तरी कधी कधी त्यांना दया येई. 
      असेच एकदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मला गारीगार खाण्याची फार इच्छा झाली. गावातील मोमीन गल्लीत गरीगारीचा कारखाना होता, तेथूनच आम्ही गारीगार विकत आणून खात आसू. मी तात्यांकडे अतिशय हट्ट धरला तरी तात्या काही पैसे देईनात. तेंव्हा गारीगार चार आण्याला होती. मी चार आण्यासाठी कितीतरी वेळ रडलो. रडून रडून माझ्या घश्याला कोरड पडली तेंव्हा कुठ तात्यांनी रागानं मला चार आणे दिले. मी तश्याच अवस्थेत आनंदाच्या भरात गारीगार विकत घेण्यासाठी धावलो. माझ्या आनंदाला काही पारावार राहिला नव्हता. तो कारखाना काही पाऊले राहिला होता तेव्हड्यात मोमीन गल्लीच्या एका चिंचोळ्या बोळीत माझ्या हातून ते चार आणे खाली पडले. ते एका दगडावर आदळून तेथील गटारीत पडले. इतका वेळ मी त्या गोष्टीसाठी घसा कोरडा होई पर्यंत रडलो आणि एव्हढे करून मला जे चार आणे मिळाले होते ते त्या गटारीत पडले होते. मी त्या गटारीत हात घालून ते चार आणे शोधण्याचा प्रयत्न केला पण मला ते मिळाले नाहीत. शेवटी मला निराश होऊन परतावे लागले