सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

तू भ्रमत आहासी वाया (वपु काळे)


प्रेमभंगा नंतर काय? आत्महत्या की आयुष्य निराशेच्या गर्द अंधारात ढकलून द्यायचे? की प्रेमभंग करणाऱ्या प्रियकर/प्रेयसीला गुरू मानून एक नवीन आयुष्य सुरू करायचे.

तैसी हे जाण माया|
तू भ्रमत आहासी वाया|
शस्त्री हाणीतलीया छाया|
जैसी अंगी न रूपे||

या संत ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने प्रेरित होऊन वपुंनी आपल्या आध्यात्मिक चिंतनाला लेखनीची ऐश्वर्यजोड देऊन जगण्याचे तत्वज्ञान सांगणारी ही लघु कादंबरी निर्माण करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

सायरा आपल्या प्रेमभंगा नंतर सावरते. नवीन आयुष्य जगते. जगत असतांना आपल्या सहकारी व बाॅसचेही आयुष्य पार बदलून टाकते. धर्माने मुस्लिम असणाऱ्या पण स्वतःला निधर्मी समजणारी सायरा शिक्षणासाठी आपले घर सोडते. प्रा. मंडलिकांच्या मदतीने आपले शिक्षक पूर्ण करते. या शैक्षणिक जीवनात तिच्या आयुष्यात समीर नावाचा प्रियकर येतो. पैशाच्या मागे धावणारा हा प्रियकर तिला सोडुन जातो आणि येथूनच सायरा बदलून जाते. कायमची. आपल्या बरोबर ती ओंकारनाथलाही बदलून टाकते.

नातरीं येथिचा दिवा|
नेलिया सेजिया गांवा|
तो तेथें तरी पाडवा|
दीपचि की||

या गावात तेवत असलेला दिवा जरी दुसर्‍या गावाकडे नेला तरी तो दिवाच असतो. प्रकाश हा त्याचा धर्म असतो. तसेच सायरासारखी काही उत्तुंग व्यक्तिमत्व असतात. त्या दिव्यासारखी ती सहवासात येणाऱ्या आपल्या अहंकारी बाॅस ओंकारनाथचे आयुष्य उजळून टाकते.
ही वाचकांना अंतर्मुख करणारी कादंबरी आहे त्यामुळे एकदातरी ही नक्की वाचावी.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं (पान १)
२. सांत्वन म्हणजे दुःखाचे मूल. मूल आईपेक्षा मोठे कसे होईल (पान १)
३. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे, तोच खरं प्रेम करू शकतो. (पान ३)
४. प्रचिती आली की ती तुमची तत्वं होतात आणि तुमची तत्वं  इतरांसाठी थेअरी होतात. (पान ४)
५. प्रवाहाला साथ देणारी व्यक्ती फक्त सागराशी एकरूप झाल्यावर तृप्त होते. पण समर्पणाचं धाडस नसलं म्हणजे जात-पात, समाज, आर्थिक परिस्थिती, तारतम्य, विवेक असे किनारे सापडतात. (पान ११)
६. स्वतःच्या विचारांप्रमाणे जगता येण्याचं स्वातंत्र्य म्हणजे क्रांती (पान ४६)
७. वस्तूंचा संग्रह जितका वाढवत न्यावा तितका अहंकार वाढत जातो. (पान ४६)
८. जगातला सर्वोच्च आनंद निर्भयतेत आहे आणि माणसाला निर्भय करण्याचं सामर्थ्य फक्त प्रेमात आहे. (पान ५५)


प्रकाशन : मेहता पब्लिकेशन हाऊस
प्रथमावृत्ती : २५ डिसेंबर १९९२
पाने : ८४
किंमत : ९०

~ गणेश

1 टिप्पणी: