सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

अपॉइंटमेंट (वि. वा. शिरवाडकर)


वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हे एक अभिजात कवी, कल्पनारम्य नाटककार, कादंबरीकार आणि शैलीदार ललित लेखक म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. तरी एक कथालेखक म्हणून त्यांचा परिचय आपल्याला फारसा नाही. पण शिरवाडकरांची प्रतिभा कथालेखन क्षेत्रातही त्याच तोलामोलाची आहे, हे अपॉइंटमेंट कथासंग्रह वाचल्यावर जानवते.

एकूण तेरा कथा असलेल्या या संग्रहात वेगवेगळे भाव लेखकाने व्यक्त केले असून आपल्या नानाविध लेखन शैलीने या संग्रहाला सजवले आहे. कर्णाच्या जीवनावर थोडक्यात दृष्टिक्षेप टाकणारी 'रथचक्र' ही कथा विशेष असून रस, सीतेचे चित्र, आघात आणि पाहुणे या कथा फार भावस्पर्शी आहेत.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. आगगाडी डोळ्यांसमोरून निघून जाते. नंतर तिचा आवाजमात्र कानांवर येतो, आणि पुढे तोही नाहीसा होऊन आगगाडी कुठं गेली हे दर्शविणार काळे लोखंडी रूळ मात्र दृष्टीला पडतात! (पान ९)
२. परंतु स्टेशनवरचे बिघडलेले नळ, चावी मागेपुढे कितीही फिवरली तरी सारखे वाहत राहतात त्याप्रमाणे त्याचं प्रदीर्घ भाषण आमच्या उद्गारांनी  खंडित होऊ शकले नाही (पान ३०)
३. कर्तव्याकर्तव्याच्या भयानक संघर्षातून अंतःकरणाला जाळणाऱ्या विविध यातनांतून सुटण्याचा हा एकच उपाय आहे. मित्रासाठी लढायचे आणि भावासाठी मरायचे. त्यामुळे भावांचा मार्ग मोकळा होईल आणि मित्रासंबंधीचे आपले कर्तव्यही पार पडल्यासारखे होईल : कर्ण (पान ५०)

बहुत काय लिहीणे.


प्रकाशन : काॅन्टिनेन्टल
प्रथमावृत्ती : जानेवारी १९७८
पाने : १७५
किंमत : १५०

~ गणेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा