२०२१ ची बखर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
२०२१ ची बखर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

२०२१/ बखर

२०२१/ बखर १२ : सध्याचे प्रचलित मोबाईल फोन
१ फेब्रुवारी २०२१
स्मार्ट फोन ही माणसाची नवीन गरज बनली आहे. त्यामुळे स्मार्ट फोन निर्माण करणाऱ्या कंपन्यामध्ये सध्या खूप स्पर्धा आहे. नवनवीन सुविधा असलेले स्मार्ट फोन एका पाठोपाठ बाजारात येत आहेत. सध्या आय-फोन खूप चर्चेत आहे. आय-फोन असणे हे मोठे प्रतिष्ठेचे समजले जाते.

Apple कंपनीने २३ ऑक्टोबरला आयफोन-१२ हे नवे माॅडेल बाजारात आणले. त्याला टक्कर देण्यासाठी आता सॅमसंग या कोरीयन कंपनीने त्यांचे Samsung Galaxy S21 हे नवे माॅडेल बाजारात आणले आहे.

बाजारात सध्या उपलब्ध असलेली काही माॅडेल आणि किंमती :
१. आयफोन (Apple iPhone)
iPhone 12 Pro Max
iPhone 12
iPhone 12 mini

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

२०२१/ बखर

२०२१/ बखर ४ : कॅपिटाॅल वर हल्ला
७ जानेवारी २०२१
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसऱ्या कार्यकाळासाठी अध्यक्षीय निवडणूकीत झाला. हा झालेला पराभव स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी आज राजधानी वाॅशिंग्टन येथील कॅपिटाॅल इमारतीवर (अमेरिकेचे संसद भवन) ताबा मिळवून तोडफोड केली. यावेळी प्रदर्शन करणाऱ्या ट्रम्प समर्थक व पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला. जगाला लोकशाहीचे धडे देणाऱ्या अमेरिकेसारख्या विकसित देशात लोकशाही अशाप्रकारे पायदळी तुडवली गेल्यामुळे या देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. ३ नोव्हेंबर २०२० ला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी विद्यमान अध्यक्ष व रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता.
●●●

२०२१/बखर ५ : भंडारा अग्नितांडव
१० जानेवारी २०२१
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बालकांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागाला रात्री शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली. या विभागात भरती असलेल्या १७ नवजात बालकांपैकी १० बालकांचा यात गुदमरून मृत्यू झाला तर ७ बालकांना वाचवण्यात आले.
●●●

२०२१/ बखर ६ : कोरोना लसीकरण
१७ जानेवारी २०२१
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ची 'कोव्हिशिल्ड' आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक ची 'कोव्हॅक्सिन' या लसींना केद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर देशभर कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. लसीकरण मोहिमेची औपचारिक सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलिस व सरकारी कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.

जगभरात कोरोना विषाणू विरूद्ध रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण मोहिमेने जोर धरला आहे. जगभरातील विविध देशात वेगवेगळ्या लसी देण्यात येत आहेत. काही महत्त्वाच्या लसींची यादी
१. माॅडर्ना व्हॅक्सिन (अमेरिकेत वापर)
२. फायझर-बायोटेक व्हॅक्सिन (विविध देशात वापर)
३. स्पुटनिक पाच (रशियात वापर)
४. ऑक्सफर्ड एस्ट्राझेनिका (विविध देशात वापर)
५. सायनोफार्म (चीनसह विविध देशात वापर)
६. कोरोनाव्हॅक (ब्राझीलमध्ये वापर)

यात फारझर-बायोटेक ची लस खूप लोकप्रिय झाली आहे.
●●●

२०२१/ बखर ७ : नवे राष्ट्राध्यक्ष
२० जानेवारी २०२१
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन यांचा मोठ्या थाटात शपथविधी संपन्न झाला. उपाध्यक्ष म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी शपथ घेतली. विषेश म्हणजे ज्या कॅपिटाॅल इमारतीवर काही दिवसांपूर्वी गोंधळ घातला होता तिथेच हा सोहळा संपन्न झाला. दोघांना अमेरिकेचे सर न्यायाधीश जाॅन जी. राॅबर्ट ज्युनिअर यांनी शपथ दिली. जगभरात दुरदर्शनवर लाखो नागरिकांनी हा शपथविधी सोहळा बघितला.

कमला हॅरिस यांच्या तमिळनाडूतील तुलासेंतीरापूरम पेन्गनाडू या मुळ गावी यावेळी उत्साहाचे वातावरण होते. या गावातील लोकांनी फटाके वाजवून आणि मिठाई भरवून आपला आनंद साजरा केला. कमला हॅरिस यांच्या आई श्यामला गोपलन यांचे हे मुळ गाव. अजूनही त्यांचे अनेक नातेवाईक या गावात राहातात.
●●●

२०२१/ बखर ८ : सेन्सेक्सची पन्नास हजारी
२१ जानेवारी २०२१
मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकाने आज पहिल्यांदाच ५०,००० ची पातळी ओलांडली. गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात हाच निर्देशांक तीस हजारा खाली गेला होता. कोरोनाचे कमी होत जाणारे रुग्ण, उठवलेले टाळेबंदी आणि बाजारात आलेल्या विविध कोरोना लसींमुळे गुंतवणूकदार जोमाने शेअर खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे.
●●●
२०२१/ बखर ९ : शेतकरी आंदोलन आणि ट्रॅक्टर मोर्चा
२६ जानेवारी २०२१ 
गेल्या दोन महिन्यांपासून पंजाब, हरियाणा येथील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या आंदोलन करत आहेत. ते केंद्र सकारने दिनांक २० सप्टेंबर २०२० रोजी मंजूर झालेल्या  वेगवेगळ्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात या आंदोलनाने आक्रमक रूप घेतले. विविध शेतकरी संघटनांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला. ऑक्टोबरपासून अनेक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. केंद्र सरकारने शेतकरी संघटनांशी अनेकवेळा चर्चा केल्या परंतु सर्व संघटना हे कायदे रद्द करण्याचा हट्ट धरत आहेत. 

या तीन कायद्यांची नावे
१. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा २०२०
२. शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा २०२०
३. अत्यावश्यक वस्तू (दुरूस्ती) कायदा २०२०

शेतकरी या कायद्यांना विरोध करत असणारी कारणे
१. हे कायदे खासगी कंपन्यांना फायद्याचे आहेत
२. शेतकऱ्याचे नुकसान होईल
३. कृषी उत्पन्न बाजार समित्या हद्दपार होतील
४. उत्पन्नाला किमान आधारभूत किंमत मिळणार नाहीत
५. कंत्राटी शेतीमुळे कंपन्या शेतकऱ्यांची पिळवणूक करतील वगैरे

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यानी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत मोठा ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसाचाराचे गालबोट लागले.
●●●

२०२१/ बखर १० : बर्ड फ्लू
कोरोना विषाणूची साथ अजून ओसरली नसताना देशातील काही भागात बर्ड फ्लू पसरला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे पक्षी मरत असल्याचे आढळून येत आहे. बर्ड फ्लू आल्याचे कळताच चिकनची मागणी घटली असून मटनाचे भाव वधारले आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात बाधित कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. कोंबड्यांसह या विषाणूमळे इतर पक्षी, उदाहरणार्थ कावळा, पारवा, मोर वगैरे मरत असल्याचे नोंदवले गेले आहे.
●●●

२०२१/ बखर ११ : डाॅक्टर रवी गोडसे, पेनसिल्व्हेनिया
"नमस्कार मी डाॅक्टर रवी गोडसे, पेनसिल्व्हेनिया, लोकमत करता लाईव्ह!" असं म्हणत गेली वर्षभर एक मराठी अमेरिकन डाॅक्टर समाज माध्यमावर धुमाकूळ घालत आहे. डाॅ. रवी गोडसे कोरोना विषाणू आणि लसी संबंधी फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून मराठी भाषेत महत्वाचे मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या बोलण्याच्या विनोदी शैलीमुळे ते महाराष्ट्रबर खूप लोकप्रिय झाले आहेत.
●●●

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

२०२१/बखर २ : कोरोनाची ओळख

२०२१/बखर २ : कोरोनाची ओळख

३ जानेवारी २०२१

कोरोना विषाणू अर्थात कोव्हिड-१९ हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. हा विषाणू नाक, तोंड किंवा डोळ्यातून मानवी शरीरात प्रवेश करतो. एखाद्या बाधित व्यक्तीच्या खोकल्यामुळे, शिंकल्यामुळे किंवा बोलल्यामुळे तो जवळपास असलेल्या इतर व्यक्तींना बाधित करू शकतो. त्याचबरोबर बाधित व्यक्ती शिंकल्यावर किंवा खोकल्यावर थुंकीचे जे तुषार बाहेर पडून आजूबाजूचा पृष्ठभाग किंवा वस्तू ते दुषित करतात. अशा पृष्ठभागावर किंवा वस्तूला जर स्पर्श करून तोच हात नाकातोंडाला किंवा चेहऱ्याला लावल्यास या विषाणूची बाधा होऊ शकते. हा विषाणू पृष्ठभागावर जवळपास ७२ तासांपर्यंत जीवंत राहू शकतो.

कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर ताप, खोकला, सर्दी, दम लागणे अशी लक्षणे दिसतात. इतर लक्षणांमध्ये थकवा, अंगदुखी, घशात खवखव, जुलाब, वास न येणे, चव ओळखता न येणे किंवा पोटदुखी यांचा समावेश आहे. बाधित झाल्यानंतर ते लक्षण दिसेपर्यंतचा कालावधी हा दोन ते चौदा दिवसांचा असू शकतो. लक्षणे दिसेपर्यंत बाधित व्यक्ती अनेकांना संक्रमित करू शकतो. कोरोनाची बाधा झाल्यानंतर सौम्य लक्षणे दिसतात आणि बरेचदा तो साध्या औषधोपचाराने बरा देखील होतो. परंतु वृद्ध, आगोदरच व्याधी असलेले रुग्ण, जाड व्यक्ती, मधमेह, उच्च रक्तदाब  किंवा कमी रोग प्रतिकार शक्ती असणाऱ्यांनाच्या जीवावर हा आजार बेतू शकतो. शरीरात ऑक्सिजनची कमतरता, श्वासोच्छ्वासास अडचणी, न्यूमोनिया किंवा इतर अवयव निकामी होणे असल्या कारणामुळे रुग्णांचा मृत्यू होतो. बाधित अनेक रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची आवश्यकता पडते.

हा आजार होवू नये म्हणून खालील काही उपाय आहेत.
१. इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे (Social Distancing)
२. चेहऱ्यावर मास्क लावून तोंड व नाक झाकणे
३. नियमित साबणाने किमान २० सेकंद हात धुणे
४. एखाद्या पृष्ठभागाला किंवा वस्तूला हात लावल्यावर ते न धुतलेले हात चेहऱ्यावर न लावणे
●●●

२०२१/ बखर ३ : २०२० चा कोरोना कालखंड

५ जानेवारी २०२१
इ.स. २०२० हे वर्ष मानवी इतिहासात दीर्घकाळ स्मरणात राहील. यावर्षी कोरोना विषाणू "कोव्हिड-१९ (Covid19)" ची साथ जगभर पसरली. २०१९ च्या अखेरीस चीनच्या वूहान शहरात हा विषाणू सगळ्यात आधी सापडला. त्यानंतर काही महिन्यातच प्रवाशांमार्फत तो जगभर पसरला. फेब्रुवारी-मार्च महिन्यात तर त्याने संपूर्ण जगभर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. जागतिक आरोग्य संघटनेने याला साथीचा रोग ( Pandemic) म्हणून घोषित केले. या साथीच्या रोगाने लाखो लोकांचे प्राण घेण्यास सुरुवात केली. चीन पाठोपाठ इटली, फ्रान्स, स्पेन, ब्रिटन, अमेरीका, ब्राझील, भारत आणि इराण या देशात तर या विषाणूने हाहाकार माजवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च २०२० पासून पुढील २१ दिवस भारतभर संपूर्ण टाळेबंदीची घोषणी केली. टाळेबंदी म्हणजे एकप्रकारची संचारबंदी होती. या टाळेबंदीमुळे अनेक लोकांचे आतोनात हाल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडले. परप्रांतीय मजूरांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांनी आपल्या गावाकडचा रस्ता धरला. रेल्वेसेवा बंद झाल्याने अनेक जण अडकून पडले. यातील अनेकांनी पायी किंवा मिळेल त्या साधनांनी प्रवास सुरू केला. आर्थिक चक्र थांबल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचे दुरगामी परिणाम झाले. करसंकलन थंडावल्याने तिजोरीत खडखडाट झाला.

दुसरीकडे अपुऱ्या सुविधांमुळे आरोग्य सेवांवर कमालीचा ताण आला. ठिकठिकाणी दवाखाने भरून गेले. सरकारला तात्पुरते दवाखाने उभारावे लागले. पोलिस दल व आरोग्य कर्मचारी अपुरे पडू लागले. यातील अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले. दवाखान्यात गेलेले अनेक रुग्ण घरी परत आलेच नाहीत. कोरोनाने मृत्यू झालेल्यांना तर दवाखान्यातून थेट अत्यंतसंस्कार करण्यासाठी नेण्यात येत होते. त्यामुळे नातेवाईकांना आप्तस्वकीयांचे अंत्यदर्शन देखील घेता आले नाही. कोरोना विषाणूचा काळ खरोखरच माणसासाठी खूप कसोटीचा काळ होता. या भीषण साथीचा प्रभाव आता भारतात तरी कमी होतांना दिसत आहे.

रविवार, ४ एप्रिल, २०२१

२०२१/बखर १ : दशकाची बखर

१ जानेवारी २०२१

एकविसाव्या शतकातील दोन दशके बोलता बोलता कधी संपून गेली हे समजले देखील नाही. २००१ ते २०२० या वीस वर्षांत खूप महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. ज्याची मानवी इतिहासात नोंद होईलच. या शतकातील हे सुरू झालेले तिसरे दशक देखील मला तितकेच महत्वाचे वाटते. मागच्या दोन दशकात मोबाईल युगाने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडवून आणली. सामान्य माणसाच्या हातात आलेले मोबाईल फोन हे या क्रांतीचे मोठे यश मानावे लागेल. मोबाईल क्रांतीमुळे एक नवे क्षेत्र तयार झाले. नव्या क्षेत्रामुळे नवनव्या नोकऱ्या निर्माण झाल्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतही महत्वाचे बदल होत गेले. आणि असे काही होणे हे अपेक्षितच होते. जनसामान्यांच्या हातात मोबाईल फोन आल्यामुळे अवघे जगच त्यांच्या मुठीत आले. त्यात फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप किंवा इंस्टाग्राम वगैरे समाज माध्यमांच्या उदयामुळे या क्रांतीला विविध पैलू पडत गेले. मोबाईल, इंटरनेट या गोष्टी आता मानवी जीवनाच्या गरजा बनू लागल्या आहेत.

गेल्या शंभर वर्षांत माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर उतुंग भरारी घेतलेली आहे. संगणक, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा, उद्योगधंदे, अवकाश संशोधन, आणि शिक्षण यासारख्या सगळ्याच क्षेत्रातील माणसाची प्रगती अचंबित करणारी आहे. शतकापूर्वीची आणि आजच्या परिस्थितीची तुलना केल्यास आपल्याला यातील जमिन अस्मानाचा फरक प्रकर्षाने जाणवेल. विसाव्या शतकात उपलब्ध असलेल्या कृष्णधवल फोटो किंवा चलचित्रफितीतून तेव्हाची आणि आजची परिस्थिती यात तुलना करता येवू शकते.

२०२१ ते २०३० या दशकाच्या नोंदी कुठेतरी लिहुन ठेवाव्यात असं मला वाटतं. जेणेकरून याचा कदाचित एखाद्या अभ्यासकाला येणाऱ्या कालखंडत फायदा होईल. आपण भारतीय आपल्या आजूबाजूचा इतिहास लिहून ठेवण्यात कुठेतरी कमी पडतो आहोत. जर घडलेल्या समकालीन घटनांची व्यवस्थित नोंद ठेवल्यास भविष्यात अनेकांचा या घटनांचे संदर्भ शोधण्यात मुळीच वेळ वाया घालावा लागणार नाही. तसं पाहिलं गेलं तर चालू घडामोडींचा नि:पक्षपणे नोंदी होणे खूप महत्वाचे आहे. मनात कुठलाच पुर्वग्रह न ठेवता असल्या नोंदीमुळे याला इतिहासाचे साधन म्हणून बघितले तर वावगे ठरू नये. मराठी भाषेत अशाप्रकारच्या नोंदी अलिकडच्या काळात कुणी करत असेल तर याची मला कल्पना नाही. मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी समकालीन नोंदी किंवा आधुनिक बखरी मराठी भाषेत लिहून ठेवणे माझ्यासाठी महत्त्वाचे वाटते.