बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

कविता : यजीदी संभोग

काळ्या श्वापदांच्या कळपाने घेरून ठेवलेल्या खंडरातील
अतृप्त संभोग गृहात बंदिवान झाल्या कित्येक नाजूक पर्‍या
होत्या त्यात चिमुकल्या आणि किशोरवयीन उमलत्या कळ्या

विवस्त्र करून करकचून आवळलेल्या त्यांच्या देहाचा
आस्वाद घेण्यासाठी लागलेल्या लांबलचक बारीत
लिंग ताठर करून उभी होती पिसाळलेली श्वापदे

अविरत चालणार्‍या बलात्कारामुळे गतप्राण झाल्यात सर्व
त्यांच्या फुटलेल्या हंबरड्याने भिंतीनांही तडे गेलेत
आणि ओरडून ओरडून देह चेतना हरवून बसलाय
मरणाच्या उंबरठ्यावर असलेले त्यांचे आत्मे
मोठ्याने किंचाळत आहेत......

मयुरेश्वरा! मयुरेश्वरा!
हे मयुरेश्वरा!.......

मृत्यूवर आमचा हक्क असतानाही
त्याने का पाठ फिरवली आहे रे?
आम्हाला मृत्युच्या कवेत घेऊन झेपवण्यास  
तुझे पंख आज कसे शक्तीहीन झाले आहेत?
अजून किती लिंगाचा मारा भोगावा लागेल?
म्हणजे कठोर बनलेल्या मृत्यूचे मन वितळेल
आणि आम्हाला घेऊन उडशील या रेताडातून दूर कुठेतरी.....

आणि जाताना फक्त तुझा मुलायम मोरपीस
एकदाच अंगावरून फिरवत तुझी तरी माया लाभूदे आम्हाला

आम्ही यातना भोगताना त्या यातनांनाही यातना झाल्या असतील रे!
आमच्या सहनशीलतेने एवढी उंची गाठलीय की
आता इच्छा असूनदेखील यातनेच्या खोल डोहात बुडताही येत नाही
वासनेच्या बिछायतीवर आमच्या देहाच्या मखमली झालरी
लोंबकळत आहेत किती दिवसापासून (?)

वस्रहीन आमच्या योनी सताड उघड्या आहेत
सर्वांनाच उपभोगण्यासाठी ........
त्यातून त्यांच्या वीर्याचा झरा अखंड वाहत आहे
स्तनं, गाल, ओठ, कान, मान अशा सर्व सर्व अंगावर
त्यांनी दाताने असे चावे घेतलेत की ते कधीही मिटणार नाहीत  
आमच्या अंगाची चाळणी करून ठेवलीय या धर्मवीरांनी (?)

विधात्या मयुरेश्वरा!
आम्हा यजीदी कळ्यांनी काय रे असा अपराध केला होता?
वाळवंटात फुलायचे होते, हा काय अपराध झाला?
यजीदी म्हणून जन्माला आलो, हा काय अपराध झाला?

श्वापदांच्या मगर मिठीतून आम्हाला आता सुटायचे आहे
आणि मृत्यूच्या गुलाबी आलिंगनात घुसायचे आहे


सोडव रे! आम्हाला सोडव....
या यजीदी संभोगातून सोडव......

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

तू भ्रमत आहासी वाया (वपु काळे)


प्रेमभंगा नंतर काय? आत्महत्या की आयुष्य निराशेच्या गर्द अंधारात ढकलून द्यायचे? की प्रेमभंग करणाऱ्या प्रियकर/प्रेयसीला गुरू मानून एक नवीन आयुष्य सुरू करायचे.

तैसी हे जाण माया|
तू भ्रमत आहासी वाया|
शस्त्री हाणीतलीया छाया|
जैसी अंगी न रूपे||

या संत ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने प्रेरित होऊन वपुंनी आपल्या आध्यात्मिक चिंतनाला लेखनीची ऐश्वर्यजोड देऊन जगण्याचे तत्वज्ञान सांगणारी ही लघु कादंबरी निर्माण करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

सायरा आपल्या प्रेमभंगा नंतर सावरते. नवीन आयुष्य जगते. जगत असतांना आपल्या सहकारी व बाॅसचेही आयुष्य पार बदलून टाकते. धर्माने मुस्लिम असणाऱ्या पण स्वतःला निधर्मी समजणारी सायरा शिक्षणासाठी आपले घर सोडते. प्रा. मंडलिकांच्या मदतीने आपले शिक्षक पूर्ण करते. या शैक्षणिक जीवनात तिच्या आयुष्यात समीर नावाचा प्रियकर येतो. पैशाच्या मागे धावणारा हा प्रियकर तिला सोडुन जातो आणि येथूनच सायरा बदलून जाते. कायमची. आपल्या बरोबर ती ओंकारनाथलाही बदलून टाकते.

नातरीं येथिचा दिवा|
नेलिया सेजिया गांवा|
तो तेथें तरी पाडवा|
दीपचि की||

या गावात तेवत असलेला दिवा जरी दुसर्‍या गावाकडे नेला तरी तो दिवाच असतो. प्रकाश हा त्याचा धर्म असतो. तसेच सायरासारखी काही उत्तुंग व्यक्तिमत्व असतात. त्या दिव्यासारखी ती सहवासात येणाऱ्या आपल्या अहंकारी बाॅस ओंकारनाथचे आयुष्य उजळून टाकते.
ही वाचकांना अंतर्मुख करणारी कादंबरी आहे त्यामुळे एकदातरी ही नक्की वाचावी.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं (पान १)
२. सांत्वन म्हणजे दुःखाचे मूल. मूल आईपेक्षा मोठे कसे होईल (पान १)
३. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे, तोच खरं प्रेम करू शकतो. (पान ३)
४. प्रचिती आली की ती तुमची तत्वं होतात आणि तुमची तत्वं  इतरांसाठी थेअरी होतात. (पान ४)
५. प्रवाहाला साथ देणारी व्यक्ती फक्त सागराशी एकरूप झाल्यावर तृप्त होते. पण समर्पणाचं धाडस नसलं म्हणजे जात-पात, समाज, आर्थिक परिस्थिती, तारतम्य, विवेक असे किनारे सापडतात. (पान ११)
६. स्वतःच्या विचारांप्रमाणे जगता येण्याचं स्वातंत्र्य म्हणजे क्रांती (पान ४६)
७. वस्तूंचा संग्रह जितका वाढवत न्यावा तितका अहंकार वाढत जातो. (पान ४६)
८. जगातला सर्वोच्च आनंद निर्भयतेत आहे आणि माणसाला निर्भय करण्याचं सामर्थ्य फक्त प्रेमात आहे. (पान ५५)


प्रकाशन : मेहता पब्लिकेशन हाऊस
प्रथमावृत्ती : २५ डिसेंबर १९९२
पाने : ८४
किंमत : ९०

~ गणेश

सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

अपॉइंटमेंट (वि. वा. शिरवाडकर)


वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हे एक अभिजात कवी, कल्पनारम्य नाटककार, कादंबरीकार आणि शैलीदार ललित लेखक म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. तरी एक कथालेखक म्हणून त्यांचा परिचय आपल्याला फारसा नाही. पण शिरवाडकरांची प्रतिभा कथालेखन क्षेत्रातही त्याच तोलामोलाची आहे, हे अपॉइंटमेंट कथासंग्रह वाचल्यावर जानवते.

एकूण तेरा कथा असलेल्या या संग्रहात वेगवेगळे भाव लेखकाने व्यक्त केले असून आपल्या नानाविध लेखन शैलीने या संग्रहाला सजवले आहे. कर्णाच्या जीवनावर थोडक्यात दृष्टिक्षेप टाकणारी 'रथचक्र' ही कथा विशेष असून रस, सीतेचे चित्र, आघात आणि पाहुणे या कथा फार भावस्पर्शी आहेत.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. आगगाडी डोळ्यांसमोरून निघून जाते. नंतर तिचा आवाजमात्र कानांवर येतो, आणि पुढे तोही नाहीसा होऊन आगगाडी कुठं गेली हे दर्शविणार काळे लोखंडी रूळ मात्र दृष्टीला पडतात! (पान ९)
२. परंतु स्टेशनवरचे बिघडलेले नळ, चावी मागेपुढे कितीही फिवरली तरी सारखे वाहत राहतात त्याप्रमाणे त्याचं प्रदीर्घ भाषण आमच्या उद्गारांनी  खंडित होऊ शकले नाही (पान ३०)
३. कर्तव्याकर्तव्याच्या भयानक संघर्षातून अंतःकरणाला जाळणाऱ्या विविध यातनांतून सुटण्याचा हा एकच उपाय आहे. मित्रासाठी लढायचे आणि भावासाठी मरायचे. त्यामुळे भावांचा मार्ग मोकळा होईल आणि मित्रासंबंधीचे आपले कर्तव्यही पार पडल्यासारखे होईल : कर्ण (पान ५०)

बहुत काय लिहीणे.


प्रकाशन : काॅन्टिनेन्टल
प्रथमावृत्ती : जानेवारी १९७८
पाने : १७५
किंमत : १५०

~ गणेश

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

आपुलकी (पु. ल. देशपांडे)



शाळेत असतांना (बहुतेक इयत्ता नववीत) अभ्यासक्रमात संत नामदेवांचा फार सुंदर अभंग होता.

परिसाचेनी संगे लोह होय सुवर्ण|
तैसा भेटे नारायण संतसंगे ||

अर्थात परीसासोबत राहिल्याने लोखंडाचे पण सोने होते. तसेच संतांबरोबर राहिल्याने देवाची प्राप्ती होते. असा या अभंगाचा मतितार्थ आहे. मी या अभंगाचा उल्लेख यासाठी करत आहे कारण असेच अनेक परीस पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यात येऊन गेले आणि त्याच्या आयुष्याचे खरोखरच सोनं झाले. हा ग्रंथ वाचल्यावर पु. ल. देशपांडे किती समृद्ध आयुष्य जगले असतील याची कल्पना येते. पु. ल. देशपांडे यांनी लिहलेला प्रत्येक ग्रंथ आणि त्या ग्रंथाची प्रत्येक ओळ म्हणजे वाचकांसाठी अद्वितीय अनुभव आहे. त्यासाठी कुठल्याच समीक्षेची गरजच नाही. मला त्यांच्या साहित्याची समीक्षा करण्याचा अजिबात अधिकार नाही पण ही माझी समीक्षा नसून असला विलक्षण ग्रंथ हातात पडल्यावर निघालेले आनंदाचे उद्गार आहेत.

पु. ल. देशपांडे यांना आपल्या जीवनात भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आठवणीचा शब्दबद्ध केलेला ठेवा म्हणजेच 'आपुलकी' होय. या ग्रंथात भाईंनी पंधरा व्यक्तिमत्त्वाचा उलगडा केला आहे. यात इतिहास संशोधक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, कवी गिरीश ऊर्फ प्रा. शंकर केशव कानिटकर, श्री. रा. टिकेकर, माधव आचवल, शरद तळवलकर, आवाबेन देशपांडे, वसंतराव देशपांडे, अनंत काणेकर, शिक्षण तज्ञ जे. पी. नाईक, शंकर घाणेकर, कवी सदाशिव अनंत शुक्ल, माधवराव वालावलकर, मटा संपादक गोविंदराव तळवलकर, नाटक प्रेमी मदनमोहन लोहिया आदींचा समावेश यात आहे.

प्रत्येक व्यक्ती बरोबर आपली ओळख कशी झाली यापासून ते थेट त्या व्यक्तीचा त्या त्या क्षेत्रातील कार्याचा आवाका, सहवासातील गमती जमती ह्या पुलंनी आपल्या अद्वितीय शब्दात वर्णन केल्या आहेत. आयुष्यात एकदातरी नक्की वाचावे असला हा ग्रंथ आहे. यातील बहुतेक व्यक्ती आता कोणाच्याही स्मरणात नसतील. हेच त्या व्यक्तींचे मोठेपण आहे. कारण यातील एकही जण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काम करत नव्हता. ध्येय वेडाने झपाटलेली ही माणसे शेवटपर्यंत साहित्य, कला, संगीत, नाटक, शिक्षण, समाजकार्य असल्या क्षेत्राच्या उन्नतीसाठी झगडत राहिली. काळाच्या ओघात आपणही त्याचे कार्य विसरत चाललो आहेत ही नक्कीच शोकांतिका आहे.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. प्रतिभासंपन्न कलावंताला सर्वसामान्यांपेक्षा अधिक दिसत असते, अधिक ऐकू येत असते, किंबहुना त्याच्या साऱ्या इंद्रियांना सारेच काही अधिक जाणवत असते. (पान ४३)

२. आणि पायांनी कुणीतरी रांगोळी विस्कटावी तसे ते गाणे कानांवर येता येता विस्कटले जाते. त्याच्या नसण्याच्या वेदनेवर ते सूर मात करू शकत तर नाहीच, पण तिची तीव्रता वाढवतात. (पान ७२)

प्रकाशक :मौज प्रकाशन गृह
प्रथमावृत्ती : ८ नोव्हेंबर १९९८
पाने : १४०
किंमत : १२५

~ गणेश