शनिवार, २३ मे, २०२०

आजोबा

आमच्या आजोबांना आम्ही दादा म्हणत असू. जुन्या पिढीतील करारी स्वभावाच्या माणसांपैकी ते एक होते. स्वतः पुरता विचार न करता भविष्यातील आपल्या कित्येक पिढ्यांच्या उद्धारासाठी विचार करणारे ही माणसं होती. दादांचे शेतीवर विशेष प्रेम होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक व्यवसाय करून शेती वाढवली. दादा खूप कष्टाळू व प्रामाणिक होते. कुठलेही काम कमी दर्जाचे नसते असे ते नेहमी म्हणायचे. त्यांना जाऊन आता खूप वर्षे झाली आहेत पण त्यांच्या अनेक आठवणी आजही स्मरणात आहेत.

दादांचा आवाज खूप कणखर होता. त्यांचा आवाज अजूनही कानात घुमत असल्याचा भास होता. सुगीचे दिवस सुरू झाले कि दादांचा मुक्काम वाडग्यातून खळ्यात सुरू व्हायचा. काढणी केलेले गहू, हरभरा, तूर किंवा ज्वारी या पिकांचे जनावरांपासून रक्षण करण्यासाठी ते दिवसरात्र खळ्यातच असायचे. मग त्यांना जेवण पाणी सगळं काही तिथेच नेऊन द्यावे लागे. पाणी संपले कि त्यांनी जोराने आवाज द्यावा,
"ये बाळ जग भरून पाणी आण रे!"
दादांचा आवाज खळ्यातून थेट वाड्यात अगदी स्पष्ट ऐकू येत असे. इतरवेळी देखील दादांचे जेवण हे वाडग्यात नेऊन द्यावे लागे. उतारवयात दादांना वाड्याच्या पायऱ्या चढता येत नसत. वाडग्यात कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीत किंवा मग गोठ्यात त्यांना झोपण्यासाठी केलेला ओट्यावर ते जेवण करत. भाकरी किंवा कालवण पाहिजे असल्यास दादा नेहमीप्रमाणे हाक मारत.
"ये बाळ वाटीभर कालवण आण रे!"
"ये बाळ दोन कोरा भाकर आण रे!"
दादा सगळ्यांना बाळ म्हणूनच हाक मारायचे. जेवण करतांना दादांना भाकरीचे पापुद्रे चावत नसत. सगळे पापुद्रे काढुन ते बाजूला ठेवीत. जेवण झाल्यावर ते सर्व पापुद्रे कुत्र्यांना टाकीत असत. कुत्र्यांनाही हाक मारण्याची त्यांची वेगळीच पद्धत होती. यु यु असं न म्हणता दादा ऊ स्वराचा आलाप घेऊन "ऊsक" असा मोठा आवाज काढायचे. आवाज दिल्यावर गल्लीतले आणि वाडग्यातले कुत्रे आवाजाचा माग घेत पापुद्रे खाण्यासाठी जोराने धावत येत. दादा आलेल्या सगळ्या कुत्र्यांना पापुद्रे विभागून टाकत.

वाडग्यातील चिंच म्हणजे दादांची संपत्ती होती. तिच्या चिंचावर दादा सोडून कुणाचाच हक्क नव्हता. चिंचा विकुन येणारे पैसे ते वर्षभर पुरवून पुरवून वापरत. ज्यावर्षी चिंच चांगली बहरेल त्यावर्षी दादा लगेच त्या चिंचेचा सौदा करून टाकायचे. गावात अनेक मुस्लिम व्यापारी चिंचा विकत घेत असत. एकदा का चिंचेचा सौदा झाला मग कुणालाही चिंचेच्या सावलीला उभे रहाण्याचाही हक्क नसायचा. व्यापारी जोपर्यंत चिंच झोडून नेत नाही तोपर्यंत दादा दिवसभर चिंचेला राखण बसायचे. घरातील माणसांना देखील ते चिंचा तोडू देत नसत. दादा जेव्हा केव्हा फेरफटका मारण्यासाठी जात, त्यावेळी आम्ही चिंचेच्या झाडावर चढून गाभोळ्या चिंचा खात असू. एकदा असेच दादा वाडग्यात नव्हते. मी गुपचूप चिंचेच्या झाडावर चढून चिंचा तोडत होतो. त्यावेळी अचानक दादा वाडग्यात परत आले व त्यांनी मला झाडवर पाहीले. गडबडीत उतरण्याच्या नादात माझा पाय एका फांदीत अडकला. मी घाबरून ओरडू लागलो. दादा आता आपल्याला काठीने मारणार असे वाटत असतानाच कशीबशी पायाची सुटका करून मी पळ काढला. त्यांनतर मी दादांच्या हयातीत परत कधी त्या झाडावर चढलो नाही.

शेणखत आणि शेती हे गणित दादांच्या मनात पक्के होते. शेणखता शिवाय शेतीला दुसरा पर्यायच नाही असे ते नेहमी म्हणायचे. या त्यांच्या स्वभावामुळे ते गावातील अनेकांकडून शेणखत विकत घेत. पुर्वी प्रत्येकाच्या वाडग्यात किंवा खळ्यात उकीरडे असायचे. या उकीरड्या मध्ये जनावरांचे शेण, मुत्र किंवा न खाल्लेला चारा टाकला जायचा. पावसाच्या पाण्यामुळे वर्षभर या उकीरड्यातील सगळे घटक कुजून त्याचे चांगले खत तयार व्हायचे. हे खत उन्हाळ्यात शेतात नेऊन टाकले जायचे. आमच्या घरचे शेणखत हे शेतीसाठी अपुरे पडायचे. त्यामुळे दादा गावातील इतर लोकांचे उकीरडे धान्याच्या किंवा पैशाच्या मोबदल्यात विकत घ्यायचे. अशा उकीरड्यातून शेणखत वाहून नेण्याचे संपल्यावर; ते गड्यांना उकीरड्याच्या तळाची चारबोटं खोल माती देखील खोदून न्यायला सांगायचे. पावसाळ्यात पाणी उकीरड्यात उतरते. पाण्यामुळे शेणखताचे बरेचशे अंश जमिनीत मुरतात त्यामुळे उकीरड्याच्या तळाची माती देखील शेणखता एवढीच गुणकारी होते असे ते म्हणायचे. शेणखत गोळा करण्याचा विलक्षण छंद दादांना होता. ते रोज गावात फेरफटका मारायला गेल्यावर; परत येताना आपल्या हातातील काठी बगलेत धरून रस्त्यावर पडलेले शेण गोळा करत यायचे. एखाद्या दिवशी रस्त्यावर जास्तच शेण मिळाल्यावर ते स्वतःच्या धोतराची झोळी करून शेण आणायचे व वाड्याच्या भिंतीला लागून असलेल्या उकीरड्यावर टाकायचे. हा दादांनी गोळा केलेल्या शेणाचा एक स्वतंत्र उकीरडा होता. वर्षाकाठी यातून एक दोन बैल गाड्या शेणखत निघायचे. शेतात फेरफटका मारायला जाताना देखील ते रस्त्याने पडलेले शेण गोळा करून वावरात नेऊन टाकायचे. जमिनीला अजून शेणखत मिळावे म्हणून ते वावरात मेंढ्या बसवत. मेंढ्या बसवणे हा देखील दादांचा एक छंदच होता. त्यामुळे कित्तेकदा उन्हाळ्यात धनगर लोक मेंढ्याचे कळप घेऊन बिनबोभाट आमच्या शेतात जावून बसायचे. दुसऱ्या दिवशी जेव्हा धनगर धान्य मागायला यायचे त्यावेळी घरच्यांना कळायचे कि रानात मेंढरे बसली आहेत. परिसरातील धनगर समाज दादांना फार मानायचा.

लहानपणी मी दादांना खाऊसाठी पैसे मागायचो. दुकानातील गोळ्या, बिस्किटे किंवा मग उन्हाळ्यात मिळणारी गारीगार यासाठी मी त्यांच्याकडे पैशाचा हट्ट धरत असे. पैसे मिळवण्यासाठी दादांचे खूप काम करावे लागत. वेळच्या वेळी त्यांना चहा, पाणी किंवा जेवण वाडग्यात नेऊन देणे वगैरे. त्यांच्याकडे पैसे असल्यावर ते देऊन टाकत. ते कधी नाही म्हणायचे नाहीत. पण जेव्हा त्यांच्याकडे पैसे नसायचे तेव्हा ते नेहमीच गमतीशीर उत्तर द्यायचे,
"पैशाचा टेम्पो भरून येवू राहीलाय, पण तो करंजीच्या घाटात पंग्चर झालाय. टेम्पो आल्यावर देतो तुला पैसे." कालांतराने त्यांच्या पैशांचा टेम्पो मला पैसे देण्यासाठी कधी भरून आलाच नाही. परंतू त्यांनी कमवलेल्या शेतीतून आणि शेतीसाठी घेतलेल्या कष्टातून आजही आम्हीला खूप काही मिळत आहे. त्यांच्या आशिर्वादाचा टेम्पो आम्हाला भरभरून देत आहे. 

सोमवार, १८ मे, २०२०

माझा जगप्रवास : श्रीलंका पिन्नावाला हत्ती अनाथालय


कोलंबोतील बंदारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळच्या बाहेर पडलो तेव्हा चांगलेच उजाडले होते. पाऊस आल्यावर ओल्या मातीचा गंध यावा तसाच काहीसा आणि आपलासा वाटणारा गंध विमानतळच्या बाहेर पडल्यावर आला. आल्हाददायक गारवा आणि ताजी हवा जणू स्वागतासाठी धावून आली होती. विमानतळ परिसरातील हिरव्यागर्द झाडीतून पक्षांचा किलबिलाट चालू होता. गाडीत बसे पर्यंत हा किलबिलाट पार्श्वसंगीतासारखा कानात घुमत राहिला. रणजित नावाच्या ड्रायव्हरने आमचे स्वागत केले. सामान व्यवस्थित ठेवून आम्ही गाडीत विराजमान झालोत आणि आमची गाडी कोलंबो विमानतळाहून पिन्नावालाच्या दिशेने धावायला लागली.


पिन्नावाला हत्ती अनाथालय हा आमच्या श्रीलंका भेटीचा पहिला थांबा होता.

हत्तींचे अनाथालय?

असाच काहीसा प्रश्न मला देखील पडला होता. जेव्हा याविषयी अधिक माहिती घेतली तेव्हा मला या प्रकल्पाविषयी थोडी कल्पना आली. पिन्नावाला हत्ती अनाथालयाच्या स्थापने मागचा उद्देश जंगलात जखमी झालेल्या, कळपा पासून भरकटलेल्या किंवा अनाथ झालेल्या हत्तीच्या पिल्लांचा सांभाळ करणे असा आहे. जंगलात भटकत असताना विविध कारणांमुळे हत्तीची पिल्लं जखमी होत असतात. काही कारणांमुळे माता हत्ती मरण पडल्यास तिच्या पिल्लांची जंगलात फरफट होते. म्हणून अशा हत्तींच्या पिल्लांना नवीन जीवन आणि संरक्षण मिळावे या उदात्त हेतूने हे अनाथालय सुरु करण्यात आले आहे. याची स्थापना १९७५ साली श्रीलंकेच्या जंगली प्राणी संवर्धन विभागामार्फत (DWC) करण्यात आली. पुर्वी हे अनाथालय विलपट्टू राष्ट्रीय उद्यानात होते. त्यानंतर ते श्रीलंकेच्या विविध ठिकाणी हलवण्यात आले. नंतर मात्र ते पिन्नावाला गावाजवळील २५ एकरांच्या मोकळ्या जागेत आणण्यात आले.


मार्गक्रमण करत असताना रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडी नजर वेधून घेत होती. श्रीलंकेतील प्रसिद्ध किंग कोकोनटची उंच झाडं आणि त्याच्यावर आलेले गर्द पिवळ्या रंगाच्या नारळाचे घस खूप आकर्षक वाटत होते. किंग कोकोनटची झाडं आपल्याकडील नारळाच्या झाडांपेक्षा थोडीसे वेगळे भासले. या झाडांची खोडं आकाराने खूपच छोटे तर त्यांची उंची खूप होती. या झाडांवर चढून नारळं तोडणाऱ्यांची कमालच म्हणावी लागेल. डिसेंबर महिना उजडला तरी परतीचा मान्सून अजून याठिकाणी घटमळत होता. रस्त्यात अनेकदा पावसाच्या सरींनी आमचे स्वागत केले. ड्रायव्हर आम्हाला मध्येच गाडी थांबवून विविध प्रकारची झाडं, फळं आणि पक्षी दाखवत होता आणि त्याविषयी माहिती देत होता.


तीन तासाच्या प्रवासानंतर सकाळी नऊ वाजता आमची गाडी पिन्नावाला अनाथालयाच्या पार्किंगमध्ये येऊन थांबली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. पिन्नावाला हे ओया नदीकाठी वसलेले छोटेसे गाव. ओया नदी किनाऱ्याच्या आसपासच्या प्रदेशावर नारळच्या बागा लावलेल्या आहेत. त्यामुळे हा परिसर खूपच निसर्गसंपन्न वाटतो. येथील हत्ती अनाथालयामुळे आज हे गाव जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे. पर्यटकांच्या तिकीटांतून मिळणाऱ्या निधीचा उपयोग या अनाथालयाचे व्यवस्थापन करण्यासाठी होतो.




तिकीट काढून आम्ही अनाथालयात प्रवेश केला. अनेक पर्यटकांची एव्हाना गर्दी व्हायला लागली होती. भारतीय पर्यटकांची संख्या देखील लक्षणीय होती. विदेशी पर्यटकांच्या तुलनेत सार्क देशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी तिकीटांचा दर कमी होता. अनाथालयाच्या आतमध्ये विविध प्रकारची झाडे लावून संपूर्ण परिसर बागेसारखा सजवलेला होता. आतील रस्ते सिमेंट आणि पेव्हिंग ब्लॉकने बनवलेले होते. दोन मिनिटं चालल्यानंतर आम्ही एका मैदानात पोहचलो. तिथे विविध वयोगटातील वीस पंचवीस हत्तींचा कळप मस्ती करताना दिसला. एवढे हत्ती एकत्र पाहण्याचा हा माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग. यापूर्वी मी फक्त सर्कसमध्ये एखाद दुसरा हत्ती प्रत्यक्ष पाहिला असेन. मोकळ्या वातावरणात मौजमजा करणारा हत्तींचा कळप पाहणे हा वेगळाच अनुभव होता. या मैदानात काही हत्ती एकमेकांना ढकलण्याचा खेळ खेळत होते. तर काही हत्ती पुढच्या पायाने माती उकरून सोंडेने पाठीवर शिंपत होते. 


अनाथालयाच्या आतमध्ये हत्तींच्या निवाऱ्यासाठी बरेचसे शेड बांधलेले आहेत. संध्याकाळी हत्तीना या शेडमध्ये बांधून ठेवण्यात येते. याठिकाणी पर्यटकांना हत्तींच्या पिल्लांना बाटलीने दूध पाजण्याची तसेच प्रौढ हत्तींना फळे भरवण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे; पण यासाठी वेगळे पैसे आकारले जातात. 



मोकळ्या मैदानात काही काळ हत्तींना सोडल्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने ओया नदीवर आंघोळीसाठी नेण्यात येते. असा दिवसातून दोनदा त्यांना आंघोळीसाठी वेळ देण्यात येतो. मुख्य प्रवेशद्वारासमोरचा रस्ता ओलांडला की पाच मिनीटावर ओया नदीवर एक घाट आहे. याठिकाणीच हत्तींना आंघोळीसाठी आणले जाते. आम्ही या घाटावर पोहचलो तेव्हा तिथे काही हत्ती पाण्यात आंघोळीचा आनंद घेत होते. नदीपात्राच्या खडकांवरून खळखळणारे, फेसाळणारे पाणी सुंदर नाद करत धावत होते. ओया नदीच्या किनारी जाण्यासाठी तिकीट दाखवावे लागते अन्यथा पुढे हत्ती जिथे आंघोळ करतात त्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही. ओया नदीच्या घाटाकडे जाणारा रस्ता म्हणजे पिन्नावालाची मुख्य बाजारपेठ आहे. येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूस भेटवस्तूंची दुकानं आहेत. परदेशी पर्यटक येथे मनसोक्त खरेदी करतात. पोस्ट कार्ड, फ्रिज मॅग्नेट, लाकडापासून बनवलेल्या विविध मुर्ती, चामड्याच्या वस्तू यासारख्या विविध वस्तूंनी ही सगळी दुकाने नेहमीच सजलेली असतात. या बाजारपेठेत एक कागदांचा छोटासा कारखाना आहे. या कारखान्यात हत्तीच्या शेणापासून कागद बनवण्यात येतो. आम्ही या कारखान्यास भेट दिली. तेथील एका कर्मचाऱ्याने आम्हाला शेणापासून कागद कसा बनवतात याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली. मी हत्तीच्या शेणापासून बनवलेले एक पोस्टकार्ड आठवण म्हणून विकत घेतले.







आमची पिन्नावाला हत्ती अनाथालयाची भेट खूपच अविस्मरणीय ठरली. परदेशातून येणाऱ्या अनेक पर्यटकांना हे ठिकाण खूप आवडते. पण नाण्याला जशी दुसरी बाजू असते तशीच याठिकाणाला विरोध करणारी दुसरी बाजू देखील आहे. जगभरातील अनेक प्राणीमित्र संघटनांकडून याठिकाणी हत्तींना डांबून ठेवण्यात येत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. हे ठिकाण म्हणजे हत्तींची छळ छावणी किंवा कैदखाना असून पर्यटकांनी पिन्नावाला हत्ती अनाथालया भेट देऊ नये असे आहवान विविध प्राणीमित्र संघटना करत असतात. मला येथे हत्तीवर अत्याचार होत असल्याचे काही जानवले नाही.


YouTube वर व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  :

https://www.youtube.com/watch?v=QdNTnYsA2BM&t=28s

गुरुवार, १४ मे, २०२०

पहाटेचा प्रवास



प्रवास हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मलाही प्रवास करणे, भटकंती करणे खूप आवडते. आपल्यातील प्रत्येकाला अनेक कारणांसाठी कधीना कधी प्रवास करावाच लागतो, परंतु एखाद्या प्रवासाची सुरूवात ही पहाटेच्या आल्हाददायक वातावरण व्हावी यासारख्या आनंदाची दुसरी गोष्ट नाही. पहाटेचा प्रवास आवडण्याची अनेक कारणं असू शकतात. सगळी माणसं पहाटेच्या साखर झोपेत असतांना नेहमीच वर्दळीने व्यापून जाणारे रस्ते हे मोकळे आणि शांत असतात. वातावरणात सुखद गारवा आणि हवा स्वच्छ असते. यामुळे पहाटेचा प्रवास सुसह्य आणि गतीमान होतो. माझ्या आयुष्यात खुपदा पहाटे प्रवास करण्याचा योग आला. गावाहून अनेकदा कामानिमित्त विविध ठिकाणी गेलो आहे. पुण्यामुंबईस जायचे म्हटलं तर पहाटे निघाल्यावाचून गत्यंतर नसते.

सकाळी उठल्यावर गडबड गोंधळ होऊ नये म्हणून मी आधल्या रात्रीच प्रवासाची सगळी तयारी करून ठेवतो. लागणारी कागदपत्रे, कपडे आणि इतर गरजेचे साहित्य बॅगेत व्यवस्थित ठेवले आहेत ना? प्रवासात घालण्यासाठीचे कपडे काढून ठेवले आहेत ना? मोबाईलवर अलार्म लावला आहे ना? याची खात्री केल्याशिवाय मी झोपी जात नाही. हल्ली सगळे जण मोबाईल वापरतात त्यामुळे अलार्म लावणे सापे झाले आहे. पण मी असाही काळ अनुभवला आहे जेव्हा सामान्य माणसं मोबाईल फोन वापरत नव्हते, त्यावेळी 'आई' हाच सगळ्यात मोठा अलार्म असायचा. दिवसभर शेतात काम करूनही आई बरोबर वेळेवर उठून सगळी तयारी करायची. मोबाईलच्या जमान्यात देखील कित्येकदा आई अलार्म वाजायच्या आधीच उठून कामाला लागलेली असते.

पहाटेच्या थंड वातावरणात गरम पाण्याने अंघोळ करण्याची वेगळीच मजा असते. गरम पाण्याने भरलेला तांब्या अंगावर घेताना बादलीतील पाणी कधी संपूच नये असे वाटत रहाते. ही अमृत प्रहरातील अंघोळ शरीराला हलकं आणि मनाला प्रसन्न करते. गाडी पकडण्याची घाई असल्याने कितीही वाटले तरी अंघोळ आवरती घ्यावी लागते. अंघोळ होईपर्यंत आईने गरमागरम चहा आणि नाष्टा बनवून ठेवलेला असतो. नाष्ट्याबरोबर वाफाळलेल्या चहाचे घोट शरीराला अजूनच तरतरीत करतात. चहा नाष्टा फस्त केल्यानंतर गाडीच्या आधी किमान दहा मिनिटे मी स्टँडवर पोहोचेल अशा बेताने घरातून निघतो. शेवटच्या क्षणी काही विसरायला नको म्हणून मी परत एकदा बॅग तपासून पहातो. प्रवासात पैसे मुद्दाम दोन तीन ठिकाणी विभागून ठेवणे कधीही चांगले. न करो पैसे हरवले किंवा पाकिट मारले गेले तर काही पैसे तरी शिल्लक रहातील. घराबाहेर पडण्यापुर्वी हात आईचे आशिर्वाद घेण्यासाठी आपोआप वळतात. बॅग पाठीवर घेऊन मग मी एसटी स्टँडकडे मार्गस्थ होतो. आई मला दुरवर जाईपर्यंत दारात उभी दिसते.

बाहेर सगळीकडे शांतता असते. थंड हवेची झुळूक हळूच अंगाला स्पर्शून जाते. रस्त्याने चालत जाताना इथे तिथे भटके कुत्रे आळं करून झोपलेली असतात. एखाद्या घरातील पाळलेले कुत्रे कधीकधी अंगावर धावूनही येतात. माणसांनी गजबजलेल्या स्टँडवर पहाटे सगळीकडे शुकशुकाट असतो पण चहाचे एक दुकान उघडलेले असते. भल्या पहाटे उद्योग धंद्याला जाणारे लोक या दुकानात चहा पिण्यासाठी थांबतात. गाडीची वेळ झाल्यावर मी सारखा गाडी येणाऱ्या रस्त्याकडे पहात रहातो. लांबून खडखड आवाज करत एसटी ही स्टँडच्या दिशेने धावत येताना दिसते. हात दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा केल्यानंतर ती थांबते. गाडी तालुक्याच्या ठिकाणाहून येत असल्याने त्यात अगोदरच अनेक प्रवासी बसलेले असतात. सामान्यतः विद्यार्थी, शिक्षण, कर्मचारी किंवा उपचारासाठी जाणारे रुग्ण असे प्रवासी नेहमी आढळतात. कंडक्टर टिंग टिंग अशी घंटी वाजवतो आणि थंडीत शांत झोपलेल्या गावाला मागे टाकत गाडी भरधाव वेगाने धावू लागते. तिकीट काढून आपल्या बाकावर स्थिरस्थावर होईपर्यंत एसटी गावच्या नदीचा पुल ओलांडून लांबवर आलेली असते. चंद्रास्थानंतरच्या काळ्याकुट्ट अंधाराने सगळ्या शिवाराला व्यापलेले असते. दुरवर एखाद्या वस्तीवर लुकलुकणारा दिवा, आकाशात उलटी झालेली सप्तर्षी, आणि पूर्वेकडे चमचमणारी शुक्राची चांदणी मात्र नजरेस पडते. काळ्या गर्द अंधाराला एसटीचे समोरील दिवे जणू चिरत जातात. रस्त्याच्या दुतर्फा झाडांवर पडणारा गाडीचा प्रकाशझोत एखाद्या गुहेसारखा भासतो. या अंधाऱ्या गुहेत आपण कुठेतरी गुढ प्रवासाला निघालो आहोत असे भासते. एसटीच्या इंजिनची घरघर आणि खिडक्यांची थरथर या गुढ प्रवासाची तंद्री मात्र भंग करत रहातात.

काहीवेळेने पुढचे थांबे येत रहातात, प्रवासी चढत जातात. गाव आल्यावर थांबने, नवीन प्रवाशांना आत घेणे हे चालक आणि वाहक यांचे लयबद्ध काम चालू रहाते. ही सकाळीची गाडी म्हणजे अनेक प्रवाशांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेली असते. रोज ह्याच गाडीने नियमीत प्रवास करणारे कदाचित अनेक जण असतील. आर्धा पाऊन तासाच्या प्रवासानंतर अंधार संपायला सुरूवात होते. अंधाराची जागा आता उजेड हळूहळू घेऊ लागतो. वाटेत अनेक ठिकाणी व्यायाम व फिरायला आलेले विविध वयोगटातील लोक दिसायला लागतात. जोर, बैठका मारणारे तरुण, झरझर चालत जाणारे स्त्री पुरुषांचे गट एसटीच्या समोरील काचेतून दिसत रहातात. रस्त्याकडेची गावं आता जागी झालेली असतात. माता भगिनी अंगणात झाडलोट आणि सडा टाकण्यात व्यग्र असतात. शेतकरी गायी म्हशींच्या धारा काढताना दिसतात. रात्रभर खुराड्यात बंदिस्त केलेल्या कोंबड्या आता मोळल्या होऊन इथे तिथे चोचीने दाणे टिपत असतात. सायकल, मोटारसायकल स्वार मोठ्या संख्येने रस्त्यावर धावू लागतात. रस्ते, गावातील चहाची दुकानं लोकांनी फुलू लागतात. भाजीपाला बाजारात घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याची घाई गडबड चाललेली असते. सकाळच्या शाळेसाठी गणवेषातील मुलंमुली शाळेकडे जाताना दिसू लागतात.

पांढरे आकाश केशरी छटांनी व्यापून जाते. अंधार हटून स्वच्छ प्रकाशाने सगळंकाही उजळून निघते. पक्षांचे थवे आकाशात भरारी घेताना दिसायला लागतात. गाडीत झोपी गेलेले प्रवासी जागे होऊन सावध व्हायला लागतात. दिड तासाच्या प्रवासानंतर काही प्रवाश्यांचे उतरण्याची ठिकाणं येऊ लागतात. सूर्योदय होऊन आकाशात केशरी किरणे सर्वदूर पसरतात. पहाट सरून आता सकाळचे हे कोवळे ऊन झाडांच्या फांद्यावर खेळू लागते. पहाटेचा प्रवास आता सरून गेलेला असतो मात्र गाडी अजूनही आपल्या अंतीम गंतव्याकडे धावत असते.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

कविता : बागेतील झाड



एकदा बागेतल्या सुंदर झाडाकडे पाहून
मी हसून म्हणालो,

"बागेत आहेस म्हणून खुजाच राहीलस तू
कारण
शोभेसाठी जाणीवपूर्वक छाटल्या जातात तुझ्या फांद्या
निबीड अरण्यात असतास तर
वाढला असतास हवे तसे, हवे तेवढे
फुलला असतास, बहरला असतास मनासारखे"

झाड शांतपणे उत्तरले

"मित्रा,
मी झाड आहे!
एकदा मुळं घट्ट केल्यावर
मी स्वतः बदलू शकत नाही माझी जागा
माझे स्वातंत्र्य मर्यादित आहे.
पण,
तू तर चालता बोलता माणूस
तरीही तू विचारांच्या काटेरी कुंपणात का घेरला गेलास?
तू देखील वाढत नाहीस का जाती, धर्मांच्या बागेत?
अंधानुकरणासाठी तुझ्या विचारांच्या फांद्या
नाही छाटत का कुणी?
अरे मित्रा!
या कुपंणातून बाहेर येऊन "माणूस" म्हणून जगून बघ
जगशील सुखाने मनासारखे
फुलशील, बहरशील विचाराने"

मी निरुत्तर झालो
बागेतून ताडकन उठून थेट निघालो
"त्या" कुंपणाच्या तारा कापण्यासाठी