सोमवार, २५ मार्च, २०१९

सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित?


मार्च २०१९ चा महिना नगरच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या महिन्यात नगर जिल्ह्यात खूप राजकीय उलथापालथ झाली. विधान सभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डाॅ सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. नगर लोकसभेच्या जागेसाठी हट्ट करून बसलेल्या सुजय विखे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली होती. शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला सोडली अशी बातमी आली होती परंतू नंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सावरासावर करून ही जागा राष्ट्रवादीच लढवणार हे स्पष्ट केले. पडद्याआड राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यासाठी देखील विखे पाटील यांनी प्रयत्न केले परंतू पवार - विखे यांच्यातील राजकीय वैमनस्यामुळे हे देखील अशक्‍यच होते. तेंव्हा सुजय विखे पाटील यांनी भाजपाशी संधान साधन्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सुजय विखे पाटील यांची मुंबईला गुप्त बैठक झाल्यानंतर महाजन यांनी नगरचा अचानक दौरा केला. या दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते पण विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना जाणीवपूर्वक या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. खरंतर या बैठकीतच सुजय विखे यांना भाजपाकडून उमेदवारी निश्चित झाली होती पण राहीली होती ती फक्त त्यांच्या भाजपात प्रवेशाची औपचारिकता. गिरीश महाजन यांच्या या खासगी दौऱ्यामुळे गांधी संमर्थकात अस्वस्थता पसरली. डाॅ सुजय विखे पाटील यांच्या भाजपाप्रवेशाने दिलीप गांधी यांची तिकीट मिळण्याची शक्यता मावळली होती कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे हे भाजपाचे उमेदवारी असतील अशी घोषणा केली. 

भाजपा तर्फे डाॅ सुजय विखे पाटील यांना उमेदवारी नक्की झाल्यानंतर त्याच्या विरोधात तुल्यबळ असा उमेदवार शोधणे राष्ट्रवादी काँग्रेसपूढील मोठे आव्हानच होते. राष्ट्रवादी तर्फे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले गेले. अलीकडच्या काळात गडाख कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आपला स्वतःचा नवीन पक्ष उभारला आहे. त्यामुळे गडाख कुटुंबातील कुणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार होईल हे दुरापास्तच होते.

प्रशांत गडाख यांनी उमेदवारीस नकार दिल्यानंतर नगर शहरातील विद्यमान आमदार आणि माजी महापौर संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. खरंतर यामगे शरद पवार यांचे फार मोठे राजकारण होते. एक तर त्यांना संग्राम जगताप यांच्यारूपाने तुल्यबळ उमेदवार मिळाला होता तसेच जगताप हे युवा असल्याने दोन युवकांमध्ये ही निवडणूक रंगणार होती. महत्वाचा मुद्दा म्हणजे संग्राम जगताप हे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई असल्याने कर्डिले यांना कैचीत पकडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली. आता यंदाची निवडणूक म्हणजे शिवाजी कर्डिले यांची सत्वपरीक्षा ठरणार आहे. कर्डिले जरी भाजपात असले तरी ते शेवटपर्यंत सुजय विखे पाटील यांचे काम करतील की जवायाला छुपी मदत करतील?? हा ही मोठा प्रश्न आहे. 

भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी हे भाजपाकडून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. वडीलांना तिकीट नाकारल्याने दुखावल्या गेल्याने ते अपक्ष लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली. असं झाल्यास त्याचा फटका नक्कीच सुजय विखे पाटील यांना बसणार आहे. गांधी हे जैन समाजाचे आहेत आणि नगरदक्षिण मतदारसंघात जैन समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष अर्ज भरल्यास यंदा तीन तरूणांमध्ये ऐतिहासिक लढत होईल यात शंकाच नाही.

शेवटी नगर दक्षिणमध्ये भाजपाला पोषक वातावरण आहे. त्यात विखे पाटील यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. डाॅ सुजय विखे पाटील यांनी गेल्या तीन वर्षांत सर्व मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे डाॅ सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा