शनिवार, २ मार्च, २०१९

नगरमध्ये विखे पाटील बाजी मारणार?


गेल्या काही महिन्यापासून नगर दक्षिणच्या लोकसभा जागेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील तिढा सुटला आहे. ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला म्हणजेच युवा नेते डाॅ सुजय विखे पाटील यांना सोडल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यामुळे विखे पाटीलांनी विजयाची पहीली पायरी सर केली आहे. गेल्या काही काळापासून विखे पाटील हे वेगवेगळ्या मार्गाने राष्ट्रवादीवर दबाव बनवत होते. कधी पक्षांतर करून भाजपमध्ये जाऊ अन्यथा गरज पडल्यास अपक्ष लढण्याची तयारी असल्याचे सूतोवाच विखे पाटलांनी दिले होते. शेवटी मोठ्या दबावाला राष्ट्रवादी काँग्रेसला झुकावे लागले आणि नगर दक्षिणची जागा पदरात पाडून घेण्यात विखे पाटील यांना यश आले.

डाॅ सुजय विखे पाटील यांनी गेल्या जवळपास दोन वर्षांपासून नगर दक्षिणमध्ये खूप जनसंपर्क वाढवला आहे. ठिकठिकाणी आयोग्य शिबिर आयोजित करून जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांपर्यत पोहचण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षापासून ते रोज मतदारसंघात नियमाने प्रचार करत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी नगर दक्षिणची जागा दोनदा लढवली आहे. १९९८ साली बाळासाहेब विखे पाटील यांनी नगर दक्षिणच्या जागेवर शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांचा वाजपेयी मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून देखील वर्णी लागली होती. अहमदनगर जिल्हा परिषद सध्या विखे यांच्याच ताब्यात आहे. सौ शालिनीताई विखे पाटील या वर्तमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यांनी दुसऱ्यांना हे पद मिळवले आहे.

विखे पाटील यांची यंत्रणा खूप मोठी आहे. विविध शिक्षण संस्था, साखर कारखान्याचे सभासद, यामुळे नगर दक्षिणेत मोठा कर्मचारी व कार्यकर्त्यांचा ताफा त्यांच्या दिमतीला आहे. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांना मानणारे मतदार संघात अजूनही खूप लोक आहेत. त्यामुळे डाॅ सुजय विखे पाटील यांना त्याचा मोठा फायदाच होणार आहे.

२०१४ च्या मोदी लाटेनंतर मतदार संघात लोकांच्या विचारात खूप मोठे बदल झाले आहेत. वर्तमान खासदार दिलीप गांधी हे तीनवेळा नगर दक्षिणेत निवडून आलेले आहेत. गेल्यावेळीची निवडणूक त्यांनी मोदी लाटेवर मोठ्या फरकाने जिंकली होती. पण आता २०१९ ची निवडणूक खासदार गांधीसाठी सोपी राहिलेली नाही कारण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे. हा मतदार संघ दुष्काळी असून शेतकऱ्याच्या विविध समस्यांनी हा मतदारसंघ घेरलेला आहे. यंदातर दक्षिणेतील तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गात खूप नाराजी आहे. कर्जमाफीत शेतकरी वर्गाला झालेला त्रास सर्वत्रूत आहे. तसेच कांद्याला गेल्या वर्षभरात भाव नसल्याने येथील शेतकऱ्यांचे अक्षरशः वाटोळे झाले आहे. दक्षिणेतील शेतकरीवर्ग सध्या खूप असंतोषात आहे. याचा फायदा नक्कीच विखे पाटील घेतील अशी शक्यता आहे.

गेल्या अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेनेच्या हातून सत्तेचा घास भाजपने हिसकावून घेतला. त्यामुळे यंदा सेना भाजप युती होऊनही नगर शहरातील आणि एकूणच मतदार संघातील शिवसैनिक भाजपला किती मदत करतील हे सांगणे कठीण आहे. शिवसैनिकांना महानगरपालिकेतील वचपा काढण्याची आयती संधी चालून आली आहे. याचा फायदा विखे पाटील नक्कीच उचलतील यात शंका नाही.

डाॅ सुजय विखे पाटील हे तरुण असल्याने दक्षिणेतील तरुण वर्गात त्यांच्या विषयी आदर आणि खूप कुतुहल आहे. ठिकठिकाणच्या सभेत तरुणवर्ग मोठी गर्दी करत आहे. गेल्या दोन वर्षापासून डाॅ सुजय विखे पाटील करत असलेल्या प्रचाराचे रूपांतर नक्कीच मतदानात होईल अशी आशा आहे. तेंव्हा विखे पाटलांनी यंदाची नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची केली आहे. त्यात वर्तमान खासदार दिलीप गांधी यांची वाढलेली मुजोरी आणि गुंडगिरी ही नक्कीच वर्तमान खासदारांना त्रासदायक ठरणार आहे यात शंकाच नाही. तेंव्हा डाॅ सुजय विखे पाटील यांच्यारुपाने नगरला नक्कीच तरुण खासदार मिळणार असे भाकीत वर्तवण्यात येत आहे.

~ @gbp125 ( गणेश भाऊसाहेब पोटफोडे )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा