मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

शरद पवार : राजकारणातील तेल लावलेला पैलवान



शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेले एक अजब रसायन म्हणावे लागेल. गेल्या जवळपास पन्नास वर्षापासून शरद पवार यांचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात वावर आणि दबदबा राहिलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रात विविध खात्याचे मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास. पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा झाली पण संख्याबळाच्या अभावी त्यांना हे पद भुषविता आले नाही. शरद पवार यांचे राजकारण मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत असल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शैक्षणिक संस्था, विविध क्रीडा संस्था तसेच सहकारी संस्था यामध्येही शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे. असा हा अष्टपैलू नेता २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खरा महानायक ठरला.

ऐन निवडणूकीच्या तोंडावर शिखर बँकेतील अयोग्य कर्जवाटपाप्रकरणी शरद पवारांसह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाने आदेश दिला. संबंध नसतानाही शरद पवारांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात आल्याने केंद्र सरकार सुडाचे राजकारण करते की काय? असा प्रश्न उपस्थित केला गेला. ईडी कडून गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर राज्यभरात शरद पवार यांच्या समर्थनात ठिकठिकाणी मोर्चे निघाले. केंद्र सरकार दबावतंत्राचे राजकारण करण्यासाठी ईडी आणि सीबीआय चा दुरुपयोग करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. आपण स्वतः चौकशीला सामोरे जाण्यासाठी ईडी कार्यालयात जाणार असल्याची घोषणा करून पवारांनी एकच खळबळ उडवून दिली. २७ सप्टेंबरला राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत जमू लागले. अनेक ठिकाणी मोर्चे निघू लागले. राज्यात विषेशतः मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उद्भवू नये म्हणून पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचा आपला निर्णय शेवटच्या क्षणी मागे घेतला. शेवटी व्हायचे तेच झाले या साऱ्या घटनाक्रमाचा शरद पवारांनी फायदा उचलून स्वतःविषयी सहानुभूतीचे वातावरण निर्माण केले. ईडी सारखे संकट डोळ्यासमोर असतांनाही शरद पवार यांनी आपल्या राजकीय चातुर्याने त्याला संधीत रुपांतरीत केले.



निवडणुका लागायच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मधुकरराव पिचड, विजयसिंह मोहीते पाटील, उदयनराजे भोसले यासारखे पवारांच्या तालमित वाढलेले दिग्गज नेते त्यांना सोडून गेले. ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आमदार, खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सोयीनुसार भाजप अथवा शिवसेनेत डेरे दाखल होत होते. एव्हढी पक्षाला गळती लागूनही शरद पवार खचले नाहीत. ८० वर्षाचे वय, कर्करोगासारखा झालेला गंभीर आजार यांच्यापुढे हात न टेकता शरद पवारांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या हातात घेतली आणि पायाला भिंगरी लागल्यागत त्यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करून चाळीसहून अधिक प्रचारसभा घेतल्या. एखाद्या तरुण नेत्याला लाजवेल या उत्साहात शरद पवार ठिकठिकाणी सभांना संबोधित करत होते. काँग्रेस हायकमांडने तर महाराष्ट्राच्या निवडणूकीकडे संपूर्णपणे पाठ फिरवल्याचे याठिकाणी नमूद करावे लागेल. जणूकाही निवडणुकीच्या आधीच त्यांनी हार पत्करली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, स्टार प्रचारक प्रियंका गांधी या महाराष्ट्रात फिरकल्या देखील नाहीत. राहूल गांधी यांच्या जेमतेम पाच सभा या निवडणूकी दरम्यान महाराष्ट्रात झाल्या. याचा फायदा काँग्रेसला कीतपत झाला असेल हे सांगणे कठीणच आहे. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे स्वतःच्याच मतदार संघात अडकवून पडल्याने आघाडीच्या वतीने एकटे शरद पवारच प्रचाराचा किल्ला लढवत असल्याचे जाणवले.

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

गाडीवाट




गाडीवाट म्हटलं तर मला अजूनही आमच्या शेतात जाणारी वाट आठवते. खाच खळग्यांची ही कच्ची वाट इतकी वर्षे झाली पण ती काही बदलली नाही. दगड-गोटे, काटे-सराटे जणूकाही या गाडीवाटेचे अलंकारच म्हणावे लागतील. पावसाळ्यात चिखलाने रापून जाणारी, उन्हाळ्यात फुफाट्याने माखून निघणारी ही वाट काळाच्या ओघात का बदलली नसावी? याचं कधी कधी मला नवल वाटतं. प्रत्येक गोष्टीत काळानुरुप थोडेफार बदल होत असतात. आलिकडच्या काळात वाटेच्या दुतर्फा दिसणाऱ्या वेड्या बाभळी आता बऱ्याचशा कमी झाल्या आहेत. पावसाळ्यात वाहणाऱ्या एका नाल्यावर सिमेंटची नळी बसवून तात्पुरता पुल सदृश्य केलेला उंचवटा हेच ते काय बदल या गाडीवाटेने अनुभवले आहेत. पण याला बदल म्हणावं का? हा प्रश्नही मला पडतो. कारण वाट शतकानुशतके कच्ची होती, आणि ती आजही आहे.

दररोज संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी माणसाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होत असते. मग ती गोष्ट सजीव असो वा निर्जीव. आपल्याला त्या गोष्टीचा स्वभाव आणि गुण अवगत होत असतात. गाडीवाटेचे देखील तसेच आहे. नियमीत वापरामुळे कुठे चढउतार आहे, कुठे खड्डा आहे, कुठे हळू चालायचे हे सगळे अंगवळणी पडते. म्हणूनच ही वाट बदलली किंवा अद्ययावत झाली नसली तरी ती आता जीवनाचा एक भाग बनून गेली आहे. ये जा करणाऱ्या प्रत्येकाने तिला स्विकारले आहे कारण या वाटेवरुन जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आमच्या पुर्वजांचा या वाटेवरुन खूप वावर असायचा आणि आमच्या आजच्या पिढीचाही तितकाच आहे. ही वाट आम्हाला शेतात घेऊन जाते; म्हणूनच कदाचित आमचं या वाटेशी इतकं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं असावं.

का कुणास ठाऊक? पण आजही मला या वाटेने आमच्या खाल्लाकडच्या शेतात चालत जायला खूप आवडते. सुट्टीवर गावी गेलो की मी बरेचदा या वाटेने एकटाच चालत जातो. गाडीबैल, सायकल, मोटारसायकल किंवा ट्रॅक्टर यावरून मी कित्येकदा या वाटेवरुन गेलो असेल पण पायी चालत जाण्याचा प्रत्येक अनुभव वेगळा वाटतो. शीळ घालत भिरभिरणारा वारा, अचानक हवेच्या वावटळीत झेपावणारा पाला पाचोळा जणूकाही आपल्याशी संवाद साधत आहेत असा भास होतो. वाटेकडेच्या झाडांवर पक्षांची चुळबुळ, त्यांचे वेगवेगळे आवाज, दूरवरुन बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घोगरमाळेचा आवाज, औत हकणाऱ्या गड्याने बैलाला ओरडल्याचा आवाज किंवा गुराख्यांनी जनावरांना दिलेली आरोळी यासारखे नानाविध आवाज मला वेगळ्याच विश्वास घेऊन जातात. चालता चालता कुठेतरी मधेच पाय थबकतात आणि एखाद्या पक्षाचा येणारा आवाज तसाच ऐकत रहावसं वाटतं. वेगवेगळ्या ऋतूमध्ये विविध किटक, पक्षी आणि प्राणी या वाटेवरुन नेहमीच दिसतात. कधीकधी अचानक काळ्याभोर मुंगळ्यांची रांग नजर चुकवत घाईघाईने आडवी येते. दुरवर उड्या मारत जाणारा हरणांचा कळप तर नियमीत दिसतो. आपल्या लक्षावर नजर केंद्रीत करून एकाच जागेवर पंख हलवत असलेल्या बहिरी ससाण्याला सूर मारतांना पाहाणे म्हणजे पर्वणीच असते. पानाफुलांवर उडणारी छोटी छोटी पिवळी आणि राखाडी रंगाची फुलपाखरं नजर वेधून घेत रहातात. पावसाळ्यात गाळामध्ये वळवळ करणारे पांढरे गुलाबी गांडूळ पाहायला गंमत वाटते. गवतात सळसळ करत जाणारे साप नेहमीच भिती दाखवतात. मोकळ्या वावरात घरटं करून फिरणाऱ्या टिटवीचा कर्णकर्कश आवाज तर कानात घुमत रहातो.

लहानपणी आजी आजोबा यांच्या कडून त्यांनी केलेल्या कष्टाच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. त्यांच्या बोलण्यात शेताचा आणि या वाटेचा नेहमी उल्लेख असायचा. आजी नेहमी सांगायची की, पहाटे शुक्राची चांदणी उगवली की, सगळा वाडा जागा व्हायचा. बाया माणसं दोन दोन पायलीची दळणं जात्यावर दळायच्या तर कुणी घागर घेऊन पाणी भरायच्या. घरातील कर्ती माणसं गाडीबैल जुंपून खाल्लाकडच्या शेतात जायचे. बैल अंधारातही या गाडीवाटेने बरोबर शेतात पोहचायचे. घरचं काम उरकल्यावर बाया शेतात गेलेल्या माणसांना न्याहारीच्या भाकरी घेऊन याच वाटेने चालत जायच्या. न्याहारीचे गाठोडे दिल्यावर घरच्या जनावरासाठी ओझंभर गवत कापायच्या आणि ते ओझं डोक्यावर घेऊन याच वाटेने माघारी यायच्या.

शनिवार, २० जुलै, २०१९

कविता : रोज तू स्वप्नात येतोस



रोज तू स्वप्नात येतोस
म्हणून कधी जाणवत नाही
आपल्या दोघांतील काळाच्या पडद्याचं अंतर...

हे अंतर
म्हटलं तर अगदीच जवळ
फक्त एका क्षणाचं
म्हटलं तर खूपच लांब
अनेक वर्षांचं

तू
चुकता, कंटाळता येतोस
आणि अजूनही माझ्यासोबत खेळत रहातोस
तेच बालपणीचे खेळ
रंगीत गोट्यांचे रिंगण,
सूरपारंब्या,
धप्पाकुटी आणि
विटी दांडूचा डाव,

पण खरं सांगू का?
स्वप्नाबाहेरील दुनियेत
मी आता खेळत नाही असले खेळ
कारण
मी तेव्हाच सोडून दिलंय खेळणं
तू पडद्याआड गेल्यापासून

तुला नवल वाटेल
पण सांगतो
मी या बाजूला आता मोठा झालोय
मोठा म्हणजे बघ, म्हातारा होईल काही वर्षात
केस पांढरे झालेत, डोक्यावर टक्कल पडलंय
तू मात्र आहे तसाच आहेस
अगदी लहानपणी होतास ना, तसा....
काय रे!
पडद्याआड तुझं वय वाढत नाही का?

रोज तू स्वप्नात येतोस
तेव्हा आपण दोघे मिळून अजूनही हिंडत असतो
रानातील ओढ्याकाठी
कधी मधाचे पोळे काढत
तर
कधी सापाची कात शोधत
तुला ती संग्रही ठेवायला खूप आवडायची
पण आता मी फार घाबरतो
सापाची कात बघीतली की
काळीज धडधडतं , हात थरथरतात

स्वप्नात तू अजूनही हट्ट धरतोस पोहण्याचा
पोहणे हा तुझा आवडता छंद
पोहायला जाता यावं म्हणून
कधी कधी तू शाळेला दांडी मारायचास
तू नेहमीच हट्ट करायचास
मी देखील पोहायला शिकावं म्हणून
पण
मला अजूनही पोहता येत नाही
तुझ्यानंतर कुणी मला पोहणे शिकवलेच नाही

तू रोज स्वप्नात नसता आलास
तर
माझ्या संसाराचा गाडा ओढता ओढता
कदाचित मला विसर पडला असता तूझा
तुझ्या बरोबर घालवलेल्या क्षणांचा
म्हणूनच
तू रोज स्वप्नात येतोस
आणि
मला जाणीव करून देतोस
अतूट आहे आपल्यातील मैत्रीचा धागा
कळाचे पडदे तोडू शकत नाहीत नातीगोती
नाती अमर असतात
आपल्या मैत्री सारखी

सोमवार, २५ मार्च, २०१९

सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित?


मार्च २०१९ चा महिना नगरच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या महिन्यात नगर जिल्ह्यात खूप राजकीय उलथापालथ झाली. विधान सभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डाॅ सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. नगर लोकसभेच्या जागेसाठी हट्ट करून बसलेल्या सुजय विखे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली होती. शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला सोडली अशी बातमी आली होती परंतू नंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सावरासावर करून ही जागा राष्ट्रवादीच लढवणार हे स्पष्ट केले. पडद्याआड राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यासाठी देखील विखे पाटील यांनी प्रयत्न केले परंतू पवार - विखे यांच्यातील राजकीय वैमनस्यामुळे हे देखील अशक्‍यच होते. तेंव्हा सुजय विखे पाटील यांनी भाजपाशी संधान साधन्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सुजय विखे पाटील यांची मुंबईला गुप्त बैठक झाल्यानंतर महाजन यांनी नगरचा अचानक दौरा केला. या दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते पण विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना जाणीवपूर्वक या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. खरंतर या बैठकीतच सुजय विखे यांना भाजपाकडून उमेदवारी निश्चित झाली होती पण राहीली होती ती फक्त त्यांच्या भाजपात प्रवेशाची औपचारिकता. गिरीश महाजन यांच्या या खासगी दौऱ्यामुळे गांधी संमर्थकात अस्वस्थता पसरली. डाॅ सुजय विखे पाटील यांच्या भाजपाप्रवेशाने दिलीप गांधी यांची तिकीट मिळण्याची शक्यता मावळली होती कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे हे भाजपाचे उमेदवारी असतील अशी घोषणा केली. 

भाजपा तर्फे डाॅ सुजय विखे पाटील यांना उमेदवारी नक्की झाल्यानंतर त्याच्या विरोधात तुल्यबळ असा उमेदवार शोधणे राष्ट्रवादी काँग्रेसपूढील मोठे आव्हानच होते. राष्ट्रवादी तर्फे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले गेले. अलीकडच्या काळात गडाख कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आपला स्वतःचा नवीन पक्ष उभारला आहे. त्यामुळे गडाख कुटुंबातील कुणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार होईल हे दुरापास्तच होते.

प्रशांत गडाख यांनी उमेदवारीस नकार दिल्यानंतर नगर शहरातील विद्यमान आमदार आणि माजी महापौर संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. खरंतर यामगे शरद पवार यांचे फार मोठे राजकारण होते. एक तर त्यांना संग्राम जगताप यांच्यारूपाने तुल्यबळ उमेदवार मिळाला होता तसेच जगताप हे युवा असल्याने दोन युवकांमध्ये ही निवडणूक रंगणार होती. महत्वाचा मुद्दा म्हणजे संग्राम जगताप हे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई असल्याने कर्डिले यांना कैचीत पकडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली. आता यंदाची निवडणूक म्हणजे शिवाजी कर्डिले यांची सत्वपरीक्षा ठरणार आहे. कर्डिले जरी भाजपात असले तरी ते शेवटपर्यंत सुजय विखे पाटील यांचे काम करतील की जवायाला छुपी मदत करतील?? हा ही मोठा प्रश्न आहे. 

भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी हे भाजपाकडून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. वडीलांना तिकीट नाकारल्याने दुखावल्या गेल्याने ते अपक्ष लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली. असं झाल्यास त्याचा फटका नक्कीच सुजय विखे पाटील यांना बसणार आहे. गांधी हे जैन समाजाचे आहेत आणि नगरदक्षिण मतदारसंघात जैन समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष अर्ज भरल्यास यंदा तीन तरूणांमध्ये ऐतिहासिक लढत होईल यात शंकाच नाही.

शेवटी नगर दक्षिणमध्ये भाजपाला पोषक वातावरण आहे. त्यात विखे पाटील यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. डाॅ सुजय विखे पाटील यांनी गेल्या तीन वर्षांत सर्व मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे डाॅ सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.