सोमवार, २५ मार्च, २०१९

सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित?


मार्च २०१९ चा महिना नगरच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या महिन्यात नगर जिल्ह्यात खूप राजकीय उलथापालथ झाली. विधान सभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डाॅ सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. नगर लोकसभेच्या जागेसाठी हट्ट करून बसलेल्या सुजय विखे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली होती. शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला सोडली अशी बातमी आली होती परंतू नंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सावरासावर करून ही जागा राष्ट्रवादीच लढवणार हे स्पष्ट केले. पडद्याआड राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यासाठी देखील विखे पाटील यांनी प्रयत्न केले परंतू पवार - विखे यांच्यातील राजकीय वैमनस्यामुळे हे देखील अशक्‍यच होते. तेंव्हा सुजय विखे पाटील यांनी भाजपाशी संधान साधन्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सुजय विखे पाटील यांची मुंबईला गुप्त बैठक झाल्यानंतर महाजन यांनी नगरचा अचानक दौरा केला. या दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते पण विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना जाणीवपूर्वक या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. खरंतर या बैठकीतच सुजय विखे यांना भाजपाकडून उमेदवारी निश्चित झाली होती पण राहीली होती ती फक्त त्यांच्या भाजपात प्रवेशाची औपचारिकता. गिरीश महाजन यांच्या या खासगी दौऱ्यामुळे गांधी संमर्थकात अस्वस्थता पसरली. डाॅ सुजय विखे पाटील यांच्या भाजपाप्रवेशाने दिलीप गांधी यांची तिकीट मिळण्याची शक्यता मावळली होती कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे हे भाजपाचे उमेदवारी असतील अशी घोषणा केली. 

भाजपा तर्फे डाॅ सुजय विखे पाटील यांना उमेदवारी नक्की झाल्यानंतर त्याच्या विरोधात तुल्यबळ असा उमेदवार शोधणे राष्ट्रवादी काँग्रेसपूढील मोठे आव्हानच होते. राष्ट्रवादी तर्फे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले गेले. अलीकडच्या काळात गडाख कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आपला स्वतःचा नवीन पक्ष उभारला आहे. त्यामुळे गडाख कुटुंबातील कुणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार होईल हे दुरापास्तच होते.

प्रशांत गडाख यांनी उमेदवारीस नकार दिल्यानंतर नगर शहरातील विद्यमान आमदार आणि माजी महापौर संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. खरंतर यामगे शरद पवार यांचे फार मोठे राजकारण होते. एक तर त्यांना संग्राम जगताप यांच्यारूपाने तुल्यबळ उमेदवार मिळाला होता तसेच जगताप हे युवा असल्याने दोन युवकांमध्ये ही निवडणूक रंगणार होती. महत्वाचा मुद्दा म्हणजे संग्राम जगताप हे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई असल्याने कर्डिले यांना कैचीत पकडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली. आता यंदाची निवडणूक म्हणजे शिवाजी कर्डिले यांची सत्वपरीक्षा ठरणार आहे. कर्डिले जरी भाजपात असले तरी ते शेवटपर्यंत सुजय विखे पाटील यांचे काम करतील की जवायाला छुपी मदत करतील?? हा ही मोठा प्रश्न आहे. 

भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी हे भाजपाकडून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. वडीलांना तिकीट नाकारल्याने दुखावल्या गेल्याने ते अपक्ष लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली. असं झाल्यास त्याचा फटका नक्कीच सुजय विखे पाटील यांना बसणार आहे. गांधी हे जैन समाजाचे आहेत आणि नगरदक्षिण मतदारसंघात जैन समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष अर्ज भरल्यास यंदा तीन तरूणांमध्ये ऐतिहासिक लढत होईल यात शंकाच नाही.

शेवटी नगर दक्षिणमध्ये भाजपाला पोषक वातावरण आहे. त्यात विखे पाटील यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. डाॅ सुजय विखे पाटील यांनी गेल्या तीन वर्षांत सर्व मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे डाॅ सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

शनिवार, २ मार्च, २०१९

नगरमध्ये विखे पाटील बाजी मारणार?


गेल्या काही महिन्यापासून नगर दक्षिणच्या लोकसभा जागेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील तिढा सुटला आहे. ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला म्हणजेच युवा नेते डाॅ सुजय विखे पाटील यांना सोडल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यामुळे विखे पाटीलांनी विजयाची पहीली पायरी सर केली आहे. गेल्या काही काळापासून विखे पाटील हे वेगवेगळ्या मार्गाने राष्ट्रवादीवर दबाव बनवत होते. कधी पक्षांतर करून भाजपमध्ये जाऊ अन्यथा गरज पडल्यास अपक्ष लढण्याची तयारी असल्याचे सूतोवाच विखे पाटलांनी दिले होते. शेवटी मोठ्या दबावाला राष्ट्रवादी काँग्रेसला झुकावे लागले आणि नगर दक्षिणची जागा पदरात पाडून घेण्यात विखे पाटील यांना यश आले.

डाॅ सुजय विखे पाटील यांनी गेल्या जवळपास दोन वर्षांपासून नगर दक्षिणमध्ये खूप जनसंपर्क वाढवला आहे. ठिकठिकाणी आयोग्य शिबिर आयोजित करून जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांपर्यत पोहचण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षापासून ते रोज मतदारसंघात नियमाने प्रचार करत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी नगर दक्षिणची जागा दोनदा लढवली आहे. १९९८ साली बाळासाहेब विखे पाटील यांनी नगर दक्षिणच्या जागेवर शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांचा वाजपेयी मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून देखील वर्णी लागली होती. अहमदनगर जिल्हा परिषद सध्या विखे यांच्याच ताब्यात आहे. सौ शालिनीताई विखे पाटील या वर्तमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यांनी दुसऱ्यांना हे पद मिळवले आहे.

विखे पाटील यांची यंत्रणा खूप मोठी आहे. विविध शिक्षण संस्था, साखर कारखान्याचे सभासद, यामुळे नगर दक्षिणेत मोठा कर्मचारी व कार्यकर्त्यांचा ताफा त्यांच्या दिमतीला आहे. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांना मानणारे मतदार संघात अजूनही खूप लोक आहेत. त्यामुळे डाॅ सुजय विखे पाटील यांना त्याचा मोठा फायदाच होणार आहे.

२०१४ च्या मोदी लाटेनंतर मतदार संघात लोकांच्या विचारात खूप मोठे बदल झाले आहेत. वर्तमान खासदार दिलीप गांधी हे तीनवेळा नगर दक्षिणेत निवडून आलेले आहेत. गेल्यावेळीची निवडणूक त्यांनी मोदी लाटेवर मोठ्या फरकाने जिंकली होती. पण आता २०१९ ची निवडणूक खासदार गांधीसाठी सोपी राहिलेली नाही कारण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे. हा मतदार संघ दुष्काळी असून शेतकऱ्याच्या विविध समस्यांनी हा मतदारसंघ घेरलेला आहे. यंदातर दक्षिणेतील तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गात खूप नाराजी आहे. कर्जमाफीत शेतकरी वर्गाला झालेला त्रास सर्वत्रूत आहे. तसेच कांद्याला गेल्या वर्षभरात भाव नसल्याने येथील शेतकऱ्यांचे अक्षरशः वाटोळे झाले आहे. दक्षिणेतील शेतकरीवर्ग सध्या खूप असंतोषात आहे. याचा फायदा नक्कीच विखे पाटील घेतील अशी शक्यता आहे.

गेल्या अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेनेच्या हातून सत्तेचा घास भाजपने हिसकावून घेतला. त्यामुळे यंदा सेना भाजप युती होऊनही नगर शहरातील आणि एकूणच मतदार संघातील शिवसैनिक भाजपला किती मदत करतील हे सांगणे कठीण आहे. शिवसैनिकांना महानगरपालिकेतील वचपा काढण्याची आयती संधी चालून आली आहे. याचा फायदा विखे पाटील नक्कीच उचलतील यात शंका नाही.

डाॅ सुजय विखे पाटील हे तरुण असल्याने दक्षिणेतील तरुण वर्गात त्यांच्या विषयी आदर आणि खूप कुतुहल आहे. ठिकठिकाणच्या सभेत तरुणवर्ग मोठी गर्दी करत आहे. गेल्या दोन वर्षापासून डाॅ सुजय विखे पाटील करत असलेल्या प्रचाराचे रूपांतर नक्कीच मतदानात होईल अशी आशा आहे. तेंव्हा विखे पाटलांनी यंदाची नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची केली आहे. त्यात वर्तमान खासदार दिलीप गांधी यांची वाढलेली मुजोरी आणि गुंडगिरी ही नक्कीच वर्तमान खासदारांना त्रासदायक ठरणार आहे यात शंकाच नाही. तेंव्हा डाॅ सुजय विखे पाटील यांच्यारुपाने नगरला नक्कीच तरुण खासदार मिळणार असे भाकीत वर्तवण्यात येत आहे.

~ @gbp125 ( गणेश भाऊसाहेब पोटफोडे )

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

जाॅर्जिया भ्रमंती : भाग २

२६ डिसेंबर २०१८ : तिब्लिसी शहर भ्रमंती
सकाळी साडेनऊ वाजता आम्ही नाश्ता करून हाॅटेलच्या लाॅबीत येऊन बसलो. हाॅटेलमधील इतर पर्यटक पाहुण्यांची फिरायला जाण्याची लगबग चालू होती. वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांचे गाईड त्यांच्या पाहुण्यांना फिरायला घेऊन जात होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घातले होते. आम्ही देखील जॅकेट, टोप्या, मफलरी घालून तयार होतो. बरोबर दहा वाजता आमची टूर गाईड ऐका आम्हाला घेऊन जाण्यासाठी आली. हाॅटेलच्या बाहेर पाउल ठेवताच वारा आणि थंडीने आमचे स्वागत केले. तापमान जवळपास ४ अंश सेल्सिअस होते. ऐका आणि डेव्हिड हे दोघे पुढील सर्व प्रवासात आमच्या बरोबर असणार होते. गाडी चालू झाली आणि जाॅर्जिया पाहण्याचा आमचा कार्यक्रम अधिकृतपणे सुरू झाला.

पंधरा मिनिटांनी आम्ही शहरातील एका उंच टेकडीवर आलो. आजही रस्त्याच्या दुतर्फा सुंदर मॅपलची झाडं दिसली. कुरा नदीवर ठिकठिकाणी अनेक पुल बांधलेले होते. काही पुल जुण्या बांधणीचे तर काही पुल नवीन होते. आम्ही ज्या टेकडीवर आलो होतो तिथं पहिल्या वख्तांग गोर्गासाली राजाचा भव्य अश्वारूड पुतळा होता. या टेकडीवरून कुरा नदी आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येवू शकत होती म्हणून पहिल्या वख्तांग राजाने येथे भव्य किल्ला आणि चर्च बांधले. आजही तिथं एक चर्च मोठ्या डौलाने उभे आहे. त्या चर्चला मेटेखी चर्च असे संबोधले जाते. स्थानिक भाषेत मेटेखीचा अर्थ म्हणजे 'राजवाड्याच्या आजूबाजूची जागा' असा होतो. मेटेखी चर्च खूप भव्य आहे आणि त्याची बांधणी देखील खूप मजबूत आहे. आम्ही चर्च पाहण्यासाठी आत गेलोत. जाॅर्जियातील जवळपास ९० टक्के ख्रिश्चन हे ऑर्थोडॉक्स आहेत. ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समजूतीनुसार महिलांना खूप नियम असतात. याची प्रचिती आम्हाला चर्चमध्ये प्रवेश करतांना झाली. चर्चमध्ये प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट पेहराव (ड्रेस कोड) असणे आवश्यक होते. शरीरभर कपडे, पायात बूट, महिलांचे डोके झाकलेले असावे वगैरे. चर्चमध्ये गेल्यावर महिला एका ठराविक ठिकाणानंतर पुढे जावू शकत नाहीत. सोव्हिएत राजवटीच्या काळात जेव्हा कुठलाही धर्म मानण्यास व धार्मिक कार्य करण्यास बंदी होती त्यावेळी या जागेचा उपयोग कैदखाना म्हणून व्हायचा.

मेटेखी चर्च पाहिल्यानंतर आम्ही टेकडीच्या खाली चालत गेलोत. काही अंतरावर युरोप स्केअर नावाचा चौक होता. येथून आम्ही केबल कारमध्ये बसून नारीकाला किल्यावर जाण्यासाठी निघालो. केबल कारमधून तिब्लिसी शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडत होते. जुनी तिब्लिसी, नवी तिब्लिसी, त्याच बरोबर कुरा नदीचे हिरवेगार पाणी, नदीवरचे विविध पुल, हे सर्व खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य होते. जुन्या तिब्लिसीतील घरं पाहुन कोकणातील घरांची आठवण झाली. कौलारू घराप्रमाणे दोन्ही बाजूला निमूळती घरं जुन्या तिब्लिसीत दिसत होती. केबल कारमधून उतरल्यावर संपूर्ण तिब्लिसी शहराचे दर्शन नारीकाला किल्ल्यावरून झाले. हा किल्ला प्राचीन असून त्याची तटबंदी अजूनही टिकून आहे. तटबंदीच्या आत एक चर्च आहे. या चर्चचे नाव सेंट निकोलस चर्च असून तेराव्या शतकातील जुने चर्च आगीत भस्मसात झाल्यानंतर त्याजागी हे नवीन चर्च उभारण्यात आले आहे. त्याच डोंगरावर एका बाजूला मदर ऑफ जाॅर्जिया चा भव्य पुतळा आहे. तिब्लिसी शहराच्या स्थापनेस १५०० वर्ष पुर्ण झाल्या प्रित्यर्थ सन १९५८ साली या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. किल्याच्या पाठीमागच्या बाजूस नॅशनल बोटॅनिकल गार्डन ऑफ जाॅर्जिया आहे. पुर्वी हे शाही परिवारासाठी बनवलेले एक सुंदर उद्यान होते. कालांतराने या उद्यानाच्या संवर्धनासाठी जाॅर्जिया सरकारने तेथे वनस्पती शास्त्राचे विद्यापीठ स्थापन करून हे उद्यान त्याच्या अखत्यारीत दिले असावे.

किल्ला पाहिल्यानंतर आम्ही मागच्या बाजूने डोंगर उतरू लागलो. थोड्यावेळतच आम्ही रहीवाशी भागात आलोत. निमुळत्या गल्ली बोळातून खाली उतरण्यासाठी वाट होती. किल्ल्याच्या डोंगरामागून एक ओढा वाहतो. त्या ओढ्यावर एक सुंदर पुल बनवला असून त्या पुलास 'प्रेम सेतू' (लव्ह ब्रीज) असे म्हणतात. या छोट्या पुलाच्या दोन्ही कठड्यावर प्रेमीयुगुलांनी छोटछोटी कुलपं लावली आहेत. प्रेमाचं प्रतिक म्हणून प्रियकर किंवा प्रेयसी या पुलावर येवून कुलुप लावतात आणि चावी वाहत्या पाण्यात फेकून देतात. प्रेमीयुगुलांनी आपल्या प्रियकर वा प्रेयसीचे नावे कुलपांवर आवर्जून लिहीलेली होती. त्या पुलाचे दोन्ही कठडे सोनेरी कुलपांनी भरून गेले होते. असे पूल पॅरिस आणि एमस्टरडॅम येथे देखील आहेत. गंमत म्हणून कुणीतरी सुरू केलेली ही संकल्पना जगभर प्रसिद्ध पावत आहे.

प्रेम सेतू ओलांडून आम्ही उताराने जुन्या तिब्लिसीकडे मार्गक्रमण करू लागलो. काही अंतरावर गेल्यावर उजव्या हाताला तिब्लिसीतील प्रसिद्ध जुमा मस्जिद दिसली. पारंपारिक लाल विटांच्या बांधकामातील ती मस्जिद जाॅर्जियातील मुस्लिमांचे मुख्य प्रार्थनास्थळ आहे. जाॅर्जियाचा राष्ट्रीय धर्म जरी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन असला तरी तिथं धार्मिक स्वातंत्र्य आहे असं आमची गाईड ऐका म्हणाली.

थोडंसं पुढे आल्यावर रस्त्यावर कला सादर करणाऱ्या काही स्थानिक कलाकारांनी आम्हाला आडवलं. बहुधा त्यांना भारतीय लोक बरोबर ओळखता येत असावेत. आम्हाला त्यांनी विचारले "इंडियन?" आम्ही मान डोलावलताच त्यांनी राज कपूरचे प्रसिद्ध गाणे गायला सुरूवात केली.

"मेरा जूता है जपानी
ये पतलून इंग्लिशतानी
सर पे लाल टोपी रुसी
फिर भी दिल हैं हिंदुस्थानी"

भारतीय सिनेमा येथे फार लोकप्रिय आहे असं समजले. विषेशतः राज कपूरचे जाॅर्जियामध्ये खूप फॅन आहेत. जुन्या पिढीतील लोक अजूनही त्यांचे नाव घेतात. या आधी मी कुठेतरी याबाबत वाचले होते पण आज ते प्रत्यक्ष अनुभवत होतो.

प्रेम सेतू वरून आम्ही जो ओढा ओलांडून पलिकडे गेलो होतो त्याच ओढ्याच्या कडेने आम्ही जात होतो. थोडंसं पुढे आल्यावर आम्ही परत ओढ्यावरला एक पादचारी पुल ओलांडला. या पुलावर देखील काही कुलपं लावलेली आढळली. कदाचित भविष्यात हा देखील तिब्लिसीचा प्रेस सेतू नंबर दोन होईल. ओढा ओलांडताच तिब्लिसीतील प्रसिद्ध सल्फर बाथ (गरम पाण्याचे झरे) लागले. हे गरम पाण्याचे झरे छोट्या छोट्या इमरती बनवून त्यात बंदिस्त केले आहेत. आत अंघोळ करण्यासाठी पंचतारांकित हाॅटेलप्रमाणे सुविधा करण्यात आल्या आहेत. यात अंघोळ करण्यासाठी अर्थातच पैसे मोजावे लागतात. आम्ही फक्त बाहेरूनच त्याची माहीती घेतली. पूर्वीच्या काळी येथे वर्षातील ठराविक कालावधीत यात्रा भरायची. बाया आपल्या मुलांसाठी योग्य वधू निवडण्यासाठी येथे येत असत. आणि सल्फर बाथ मध्ये अंघोळ केल्यावर अनेक प्रकारचे त्वचा रोग बरे होतात ही देखील मान्यता आहे. त्यामुळे अनेक पर्यटक आवर्जून येथे अंघोळ करतात.

जुनी तिब्लिसी खरोखरच फार सुंदर होती. रस्ते दगडी विटांनी बनवलेले (पेव्हींग ब्लॅक्स) होते. यावून चालतांना वेगळीच मजा येत होती. सल्फर बाथ नंतर आम्ही सायओनी चर्चमध्ये आलोत. आत्तापर्यंत बघीतलेली सगळी चर्च याच बांधनीची होती. आणि खरोखरच जाॅर्जियातील चर्चच्या इमारती खूपच सुंदर होत्या. पिवळसर रंगातील दगडांनी या चर्चची बांधणी केलेली आहे. काही अंतरावरून पाहिल्यास ही सगळी चर्च सोनेरी रंगाची वाटतात.
आम्ही ज्या रस्त्याने जात होते बहुधा तो जुना बाजार असावा. रस्त्याच्या दोन्ही बाजून असंख्य दुकाणं होती. गालीचे, स्थानिक पदार्थ, भेटवस्तू, सोव्हिनियर्स, पेंटींग त्याच बरोबर काही रेस्टॉरंट देखील होते. विशेष म्हणजे जाॅर्जियात शाकाहारी जेवन मिळते याचं मला नवल वाटलं. मी ऐकाला याविषयी विचारले असता ती म्हणाली की, जाॅर्जियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन वर्षातील ठराविक काळ फक्त शाकाहारी जेवण घेतात. त्यामुळे येथे शाकाहारी जेवण मिळते. येथे शेपूची भाजी आणि वांग्याची भाजी फार प्रसिद्ध आहे.

काही अंतरावर आल्यानंतर आम्ही एका छान सोव्हिनियरच्या दुकानात गेलोत. तसं मलाही सोव्हिनियर्स जमा करण्याचा खूप छंद आहे. चलनी नोटा, नाणी, पोस्टाची तिकीटे, पोस्ट कार्ड या गोष्टी मी मोठ्या प्रमाणात जमवलेल्या आहेत. माझ्याकडे जवळपास सव्वाशे देशांच्या नोटा आहेत. तसेच वेगवेगळ्या देशांची खूप पोस्टकार्ड देखील आहेत. मी युनेस्को जागतिक वारसास्थळांची पोस्टकार्ड जमवत असतो. या दुकानात गेल्या बरोबर मी माझ्या आवडीची पोस्टकार्ड विकत घेतली. ओवीने एक जाॅर्जियाचा झेंडा आणि एक किचैन विकत घेतले.

तिब्लिसी शहर फिरण्याचा आमचा महत्वाचा टप्पा आता पूर्ण झाला होता. यानंतर कुरा नदीवर बनवलेल्या शांती सेतू (ब्रीज ऑफ पीस) याला आम्ही भेट दिली. हा कुरा नदीवर बांधलेला एक पादचारी पुल आहे. यांचे बांधकाम हे लोखंडी असून त्याच्या छताची सजावट हिरवट रंगाच्या काचांनी केली आहे. संध्याकाळी यावर खूप आकर्षक रोषणाई करण्यात येते. शांती सेतू आता तिब्लिसी शहरातील एक आकर्षण बनले आहे. तिब्लिसीला भेट देणारे पर्यटक नक्की या पुलास भेट देतात. या पुला शेजारीच कुरा नदीत नौकाविहार करण्याची सुविधा आहे. आम्ही या शांती सेतूवर मनसोक्त फोटो काढले.

शेवटच्या टप्प्यात आम्ही तिब्लिसी शहरातील सर्वात उंच डोंगरावर आलो. येथे एक मनोरंजक पार्क बनवला आहे. यात मुंबईतील एस्सेल वर्ल्ड सारख्या गोष्टी आहेत. डोंगराच्या एका बाजूला तिब्लिसी दुरदर्शनचा उंच मनोरा आहे. याच डोंगरावर जाण्यासाठी सुप्रसिद्ध फनिक्युलर ट्रेन आहे. ही ट्रेन डोंगराच्या उतारावरून जवळपास साठ ते सत्तर अंशाच्या कोनात वर खाली जाते. आम्ही डोंगर कारमधून चढून गेलो होतो तर खाली उतरताना फनिक्युलर ट्रेनमध्ये बसून आलोत. इतक्या उतारावर ट्रेनमध्ये बसून येणे खूपच मजेशीर अनूभव होता.

फनिक्युलर ट्रेनमधून खाली उतरल्यानंतर आजचा तिब्लिसी पाहण्याचा कार्यक्रम संपला. आम्हाला ड्रायव्हरने हाॅटेलवर आणून सोडले. सकाळी गेलो होतो त्याच मार्गाने परत आलो. तिब्लिसी शहरात वाहतूकची कुठे कोंडी झालेली आढळली नाही. सगळे जण वाहतूकीचे नियम पाळतांना दिसत होते. शहरात सार्वजनिक वाहतूक चांगली होती. सरकारी पिवळ्या रंगाच्या खूप बस रस्त्याने ये जा करत होत्या. तिब्लिसी शहरात मेट्रो देखील आहे. तिब्लिसी हे इतर कुठल्याही युरोपियन शहरासारखे सुंदर होते.
□□□








गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

जाॅर्जिया भ्रमंती : भाग १

२५ डिसेंबर २०१८ : जाॅर्जियात आगमन
दुबईहून तीन तासांच्या प्रवासानंतर आमचे विमान तिब्लिसी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानाची उंची जशी कमी होऊ लागली तशी आम्हाला हिमाच्छादित पर्वतशिखरं दिसू लागली आणि माझी उत्सूकताही वाढू लागली. मी अजून हिमवृष्टी कधी अनूवली नव्हती म्हणूनच आम्ही हिवाळ्यात खास हिमवृष्टी अनूभवण्यासाठी जाॅर्जियात फिरायला येत होतो. तसे पाहिले तर जाॅर्जियामध्ये फिरण्यासाठी उन्हाळा हा योग्य ॠतू आहे (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर). या काळात जगभरातील असंख्य पर्यटक जाॅर्जियाचे निसर्गसौंदर्य अनूभवण्यासाठी येतात. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर हा छोटासा देश एखाद्या नवरीसारखा सौंदर्याने नटून जातो.
तिब्लिसी ही जाॅर्जियाची राजधानी आणि या देशातील सर्वात मोठे आणि महत्वाचे शहर आहे. तिब्लिसी चा स्थानिक भाषेत अर्थ 'उबदार शहर' असा होतो. हे शहर एका खोऱ्यात वसलेले आहे. दोन बाजूंनी डोंगर रांग आणि शहराच्या मधोमध वाहणारी कुरा नदी, शहरात असणारे गरम पाण्याचे झरे यामुळे या शहराची ओळख ही उबदार शहर म्हणून प्रसिद्ध असावी. या शहराची स्थापना पहिल्या वख्तांग राजाने इ. स. पचव्या शतकात केली होती. तेंव्हापासून तिब्लिसी हे जाॅर्जियाच्या विविध राजघराण्याची राजधानी राहीली होती.
विमानतळच्या बाहेर पडल्याबरोबर आम्ही बॅगेत इतक्यावेळ ठेवलेली स्वेटर मफलर बाहेर काढले. पारा चार अंशावर होता आणि वाऱ्यामुळे थंडी अंगाला झोंबत होती. मला तर हुडहुडीच भरली. थंडीने अंग लटलट कापू लागले. ज्याचा अनूभव घ्यायचा होता त्याची सुरुवात विमानतळावरूनच झाली.
स्थानिक लोक बऱ्यापैकी इंग्रजी बोलत होते त्यामुळे भाषेची काही अडचण येणार नव्हती. आम्हाला विमानतळावर घेण्यासाठी आलेला ड्रायव्हर डेव्हिड हा सुद्धा चांगल्याप्रकारे इंग्रजी बोलत होता. विमानतळ ते हाॅटेल हे अंतर अर्ध्या तासाचे होते. रस्त्याच्या दुतर्फा खरीखुरी ख्रिसमसट्री पाहुन ओवीला फार आनंद झाला. आम्ही हाॅटेलवर पोहचलो तेव्हा अंधार पडू लागला होता. हिवाळ्यात जाॅर्जियात सुर्योदय सकाळी साधारण साडेआठला तर सुर्यास्त संध्याकाळी पावणे सहाच्या आसपास होतो. आमचे हाॅटेल छोटेखानीच होते आणि ते कुरा नदीच्या शेजारीच असल्याने खूप आनंद झाला. हाॅटेलच्या बाल्कनीतून तिब्लिसी शहर आणि बारमाही वाहणाऱ्या कुरा नदीचे विहंगम दृश्य नजरेस पडले.
सामान ठेवून आम्ही बाहेर फेरफटका मारायला निघालो. बाहेर खरोखरच खूप थंडी होती. शहरात रस्त्याच्या दुतर्फा लावलेली मॅपलची झाडं शोभून दिसत होती. थंडीमुळे मॅपलची पानं पिवळी पडली होती. वाऱ्याने वाळलेली पानं रस्त्यावर पडत होती. चौका चौकात काही दुकाणे नजरेस पडली. बेकरी हा तिथला महत्वाचा व्यवसाय असावा कारण ठिकठिकाणी आम्हाला बेकरीची दुकाणे दिसली. हाॅटेलमध्ये आम्हाला पाणी विकत घ्यावे लागणार होते म्हणून आम्ही कॅरीफोर सुपरमार्केट मध्ये जाऊन स्वस्तातील पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या.
प्रवासाने आम्ही दमलो होतो त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही लवकरच झोपी गेलो. दुबई आणि जाॅर्जियाची प्रमाणवेळ सारखीच असल्याने काही त्रास झाला नाही.