बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

मला आखातात नोकरी मिळाली!

आखातात येऊन आता एका दशकाहून अधिक काळ लोटला आहे. माझं बालपण, शिक्षण हे भारतात जरी गेलं असलं तरी अख्खं तरूणपण आखातात गेलं. वयाच्या अगदी चोवीसाव्या वर्षात हातात मुठभर स्वप्न घेऊन मी इथं आलो होतो. इथल्या वाळूने कधी आपलंसं केलं हे कळले देखील नाही. सुरुवातीचा काळ वगळता नंतर मी देखील इथल्या वातावरणात रमून गेलो. एका दशकानंतर मी आज जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा मला जाणीव होते की ज्या स्वप्नासाठी एवढा खटाटोप केलो होता त्याचं फळ मला मिळाले आहे. पाहिलेली स्वप्न सत्यात उतरली आहेत. माझ्या कष्टाला आणि त्यागाला आखाताने भरभरून दिले.

परिस्थिती माणसाला विचार करण्यास आणि त्यागास प्रवृत्त करत असते. माझ्यासारख्या दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तरूणापुढं भविष्याची चिंता होती. परिस्थितीमुळे शिक्षण पुर्ण होऊ शकलं नाही. केवळ आयटीआय आरेखक यांत्रिकी एवढीच पात्रता मिळवून मी बाहेर पडलो. आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतरचा काळ माझ्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप कठीण होता. सतत काही वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील उत्पन्न फक्त खाण्यापूरतं व्हायचे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे हाच एकमेव पर्याय मला दिसत होता. कधी कधी वाटायचं की आरेखक यांत्रिकी हा ट्रेड करून चूक केलीये का? कारण या ट्रेडला नोकरी शिवाय दुसरा पर्याय नव्हता. शिक्षण घेत असतांना याची मला सतत जाणीव होत होती. माझ्या आधीच्या काही बॅचमधील ठराविक दोनचार मुलांनाच नोकरी मिळाली होती. आपल्याला नोकरी मिळते की नाही याबाबत माझ्या मनात खूप भिती वाटायची. उत्तीर्ण झाल्यावर नोकरीसाठी संघर्ष करावाच लागणार होता हे उघड होते. 'शिक्षण कधीच वाया जात नाही!' या म्हणीने मला नेहमी प्रेरणा दिली. जेंव्हा मी उत्तीर्ण झालो त्यावेळी नोकरी मिळवण्यासाठी अनेक पुढारी व ओळखीच्या नातेवाइकांकडे गेलो पण अश्वासनाशिवाय दुसरं काहीच मिळालं नाही. मग मी स्वतःहून नोकरी शोधायला लागलो. त्याकाळी सकाळ पेपरात नोकरीच्या संदर्भात एक पुरवणी यायची, त्यातूनच मी एल अॅण्ड टी मुंबई येथे अॅप्रेंटीससाठी अर्ज केला आणि योगायोगाने माझी निवड देखील झाली. अॅप्रेंटीस पूर्ण झाल्यानंतर मी मुंबई-पुण्यात काही काळ नोकरी केली. नोकरी मिळाली तरी घरातील परिस्थिती सुधारत नव्हती कारण मला मिळणारा पगार पुरेसा नव्हता.

२००५ ला मी एका कंपनीत कामाला असतांना तेथील माझे काही मित्र हे आखातात नोकरी करून आलेले होते. त्यांचे राहणीमान हे खूप सुधारलेले होते. मला वाटायला लागले की, आपणही आखातात घाऊन नशीब का आजमावू नये? त्यावेळी मी मनाशी पक्के केले की आपणही आखातात जायचेच. त्यानंतर मला आखातात नोकरी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आखातात नोकरी मिळवणं सोपी गोष्ट नव्हती. पासपोर्ट कसा असतो? तो कसा मिळवायचा? कुठे अर्ज करायचा? हे देखील मला माहीत नव्हते. माझ्या बरोबर काम करणा-या मित्रांनी यासाठी मला खूप मदत केली. त्यानंतर जवळपास एक वर्ष मला पुणे मुंबई इंटरव्ह्यूसाठी फे-या मारव्या लागल्या. मुंबईतील काही एजंट नोकरी मिळवून देतो म्हणून फसवणूक देखील करतात. ब-याच ठिकाणी मला याचे खूप वाईट अनुभव आले. आखातात आधी जाऊन आलेल्या माझ्या मित्रांनी मला एजंटच्या हातात पासपोर्ट कधीच द्यायचा नाही असा सल्ला दिला होता आणि तो मी पाळला. कामगारांना घेऊन जाण्याचा सगळा खर्च ही तेथील कंपनी करत असते तरीही हे एजंट आपल्याकडून खर्चाच्या नावाखाली खूप पैसे मागायचे म्हणून पैसे मागणा-या कंपनी वा एजंटकडे मी जाणे टाळले.

एजंटला एक पैसाही न देता २००६ साली मला पहील्यांदा सौदी अरेबिया येथे नोकरी मिळाली. नोकरी मिळाली पण पगार होता जेमतेम १७०० रियाल (त्यावेळचे २०,००० रूपये). भारतात मिळत होता त्यापेक्षा काही हजार जास्त. तरीही एक नवीन संधी आणि अनूभवासाठी मी ही नोकरी पत्करली आणि आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात झाली.

नवीन देशात चाललो होतो त्यामुळे मनात एक भिती होती. मी या अधी कधीच विमानात प्रवास केला नव्हता. पहिला विमान प्रवास हा माझ्या अविस्मरणीय अनुभव होता. सौदीमध्ये पहिल्यांदाच पाउल ठेवल्यानंतर माझ्या मनात शंका होती की मला कोणी मराठी बोलणारा मित्र भेटेल की नाही. आमच्या कंपनीतील नवीन १४ लोकांच्या ग्रुप मध्ये मी एकटाच मराठी भाषक होतो तर इतर बहुतेक दक्षिणात्य होते. येथे आल्यावर जवळपास दोन आठवडे मला मराठी बोलायला मिळालेच नाही. काही दिवसांनी येथे दोन-तीन मराठी माणसं आहेत असं समजल्यावर मला फार आनंद झाला.

सौदी मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे केरळी लोकांची संख्या आणि त्यांनी येथे प्रत्येक व्यवसायात घेतलेली गरुड झेप. येथे केरळी लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांचा प्रत्येक व्यवसायात बोलबाला आहे. मुंबईमध्ये जसे भैय्या लोक कुठलाही व्यवसाय करतात त्याप्रमाणे येथेही केरळी लोक सर्व प्रकारच्या व्यवसायात दिसतात. किराणा दुकान, खानावळी, चहाची दुकानं, शॉपिंग सेन्टर्स, नाव्ही, टेलर, गाडी चालक, लाँड्री वाले, भाजीपाला विक्रेते असे जवळपास सर्व व्यवसाय केरळी लोकांचेच आहेत. येथे असलेले बहुतेक डॉक्टर आणि नर्स हे देखील केरळीच आहेत.

सौदी अरेबियातील नियम हे भारतापेक्षा खूपच वेगळे होते. तिथे राजेशाही राज्यपद्धती चालते. इस्लाम धर्म आणि इस्लामीक कायदे तिथे काटेकोरपणे पाळले जातात. याचा अनूभव तिथं गेल्यागेल्या आला. रमजानच्या महीन्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा उघडपणे काही खाता-पिता मनायी असते. गुन्हेगारांना सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शिक्षा दिली जाते मग ते चाबकाने फटके मारणे असो नाहीतर फाशी किंवा शिरच्छेद असो.

माझी कंपनी ही सौदी अरेबियाच्या दम्माम या शहरात होती. आमची राहण्याची व्यवस्था कंपनीने जरी केली असली तरी खाण्यापिण्याचा खर्च ज्याला त्यालाच करावा लागणार होता. म्हणजे १७०० रियाल पगारामधून जवळपास २०० रियाल खर्च व्हायचा आणि उरलेले पैसे घरी पाठवावे लागचे. सुरुवातीचे दोन महिने खूप वाईट गेले. मी जन्मापासून शुद्ध शाकाहारी माणूस असल्यामुळे माझे खाण्यापिण्याचे थोडे हालच झाले. सौदी मध्ये शुद्ध शाकाहारी अश्या खानावळीच नाहीत. रेस्टॉरंटमध्ये फक्त मौंसाहारी पदार्थ मिळायचे. क्वचितच एखाद्या ठिकाणी शाकाहारी जेवण मिळायचे. दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये इडली, डोसा आणि परोठा खाऊन थोडे दिवस काढले. स्वयंपाकाचे माझे ज्ञान शुन्य होते तरीही काही दिवसांनी कसेतरी जेवण बनवायला लागलो.

कुठल्याही नवीन प्रदेशात जाण्या अगोदर आपल्या मनात अनेक शंका येतात जसे की, त्या देशाची भाषा आपल्याला येत नाही मग कसे होणार? वगैरे, पण माझ्या बाबतीत हा अनुभव थोडा भिन्न होता. मी सौदी मध्ये येण्या अगोदर अरबी भाषेचे थोडे ज्ञान संपादन केले होते. माझ्या गावातील एक टेलर काम करणारा मित्र पाच वर्ष सौदीत काम करून परतला होता त्यामुळे तो खूपच छान अरबी बोलत असे. मी त्याच्याकडून अरबी भाषेचे थोडे शब्द आणि वाक्य शिकून घेतले त्यामुळे येथे आल्यावर मी नवीन असून सुध्दा भाषेचा फारसा त्रास झाला नाही. माझ्या एका मुस्लिम मित्राकडून उर्दू अक्षरे शिकलो होतो. अरबी आणि उर्दू लिपीत बरेच साधर्म्य असल्यामुळे मला अरबी लिहिण्यास व वाचण्यास काहीच अडचण आली नाही. अरबी भाषा चांगली शिकण्यासाठी मी जोमाने प्रयत्न केले. कंपनी मध्ये जुन्या सहकाऱ्याकडून मी वेगवेगळे नवीन शब्द आणि वाक्य शिकून ते एका वहीत व्यवस्थित लिहून घेतले. अरबी भाषेचा अभ्यास करताना मला आढळून आले की अरबी मधील कित्येक शब्द आपण मराठी मध्ये जाशेच्या तशे वापरतो. नंतर मी माझ्या वहीत अरबी आणि मराठीत वापरत येणाऱ्या सारख्या शब्दांची यादीहीच करून ठेवली. सौदी मध्ये दाखल झाल्यानंतर काही महिन्यातच मी अरबी छान बोलू लागलो होतो.

मिळणारा पगार खरोखरच तुटपुंजा होता. गावाकडच्या लोकांना आणि मित्रांना असे वाटायचे की मी लाखात कमावतो आहे. अजूनही गावाकडच्या लोकांची हीच धारणा असते की दुबईत काम करणा-या व्यक्तीस लोखो रूपये पगार असतो आणि तो सहजासहजी मिळतो. एक प्रकारे गावी गेल्यावर त्यांची नेहमी याबाबत कुचेष्टा केली जाते. पण आखाती देशात ज्या परिस्थितीत कामगारांना काम करावे लागते त्याची विचारपूस किंवा चर्चा कोणी करत नाही. मी आरेखक असल्यामुळे मला बाहेर (आऊट डोअर) काम नसायचे. पण बाहेर काम करणा-या लोकांचे काम खरोखरच फार कठीण होते हे मी पाहिले आहे. सौदी अरेबिया म्हणजे वाळवंटी देश. इथला उन्हाळा खूपच कडक असतो. उन्हाळ्यात तापमान जवळपास ५५° सेल्सिअस पर्यंत जाते. त्यात भयंकर आर्द्रता, वाळूचे वादळ असल्या गोष्टींचा सामना करावा लागतो. कंस्ट्रक्शन साईटवर काम करणा-या लोकांचे खूप हाल होतात. तरीही आपली स्वप्न आणि घरच्यांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी हा कामगार एवढ्या उष्ण परिस्थितीतही काम करत रहातो. आखातात काम करणा-या कामगारांचे जीवन मी जवळून अनूभवले आहे. काही ठिकाणी लेबर कॅम्पमध्ये कामगारांना खूप वाईट परिस्थितीत रहावे लागते. आखातात बराच काळ राहिल्या नंतर त्यांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. एवढं सगळं होऊनही भारतात त्यांची नातेवाईक आणि सरकारकडून उपेक्षाच होते. सरकार अनिवासी भारतीयांना केवळ विदेशी मुद्रा कमावून देणारी मशीनच समजते. या अनिवासी भारतीय कामगारांसाठी सरकारकडे काही ठोस उपाययोजनाच नाही. त्यांना साधे आधार कार्ड देखील काढता येत नाही. मतदानासारखा घटनेने दिलेला अधिकार निभावता येत नाही.

२००६-२००९ या तीन वर्षाच्या कालखंडात मी सौदी अरेबियामध्ये नोकरी केली. सौदी अरेबियात अनेक निर्बंधामुळे विदेशी नागरिकांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर खूप मर्यादा होत्या. त्यामुळे सौदी अरेबियात विदेशी लोक आपले उत्सव, सण मोकळेपणाने साजरे करू शकत नाहीत. अनेक निर्बंध असूनही मी या देशात मनाने काम केले. पुढे माझी कामगिरी पाहून कंपनीने पगार एका चांगल्या पातळीवर नेला. सौदीत खूप वेगवेगळे अनूभव मिळाले त्यात विविध देशातील लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतीशी ओळख झाली.

२००९ साली मी नोकरीचा राजीनामा देऊन भारतात परतलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा