बुधवार, १३ जानेवारी, २०१६

कविता : वाळवंटातील तुळस


कंपनी समोरच्या त्या ओट्यावर
एक हिरवीगार तुळस नियमित बहरते
पूर्वजांच्या देशातल्या आम्हा बांधवांना
ती रोज आपुलकीने निरखते

कोण कुठली मी आभागी म्हणत
आपली केविलवाणी पाने फडफडवते
स्वच्छंदी होऊन वार्‍या बरोबर झुलते
स्वतःशीच कधी हसते कधी रुसते

सणासुदीला ती फार एकटी पडते
कार्तिक द्वादशीला तिची नजर
चातका सारखी चहूकडे भिरभिरते
चिंचा सीताफळ बोरांची ती वाट पहाते

या ओसाड वाळवंटातील उन्हात
ती फार तळमळतेय घुटमळतेय
गटारीच्या पाझरात मुळं घट्ट करून
आपुलकीची आपली माणसं शोधतेय

तिची इवली इवलीशी हिरवी पाने
जांभळ्या फुलांच्या कोवळ्या मंजिऱ्या
वाळून उगवलेल्या बियांची टवटवीत रोपं
नियतीच्या तुरुंगात पडलीयेत दूर देशी

रोज जाता येता ती आमच्याकडे पहाते
पण जाणिवेच्या तप्त निखाऱ्यात
निरंतर जाळणाऱ्या स्वतःच्या मनाला
कवटाळून ती अबोल होऊन जाते

एक वाळवंटातील तुळस होऊन
ती म्हणत असेल मला नाही पण
माझ्या सावलीत वाढणाऱ्या रोपांना तरी
एखाद्या वृंदावनाची कुंडी मिळेल का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा