रविवार, १० जानेवारी, २०१६

'शाळा' (लेखक : मिलिंद बोकील)



'शाळा' वाचताना अस वाटत होत की कादंबरीचा नायक लेखक नाही तर आपण स्वतःच आहोत. या कादंबरीतील बर्‍याच गोष्टी आपण आपल्या शाळेय जीवनात अनुभवलेल्या आहेत. कादंबरीची सुरुवात नववीच्या वर्षापासून होते. शाळा दुपारी बारा चाळीसला भरायची. पण लेखक (मुकुंद जोशी कादंबरीतील नाव) आकरा वाजताच घरातून निघायचा. लेखकाची बहिण काॅलेजला सकाळीच जायची त्यामुळे त्याला शाळेत लवकर का जातो म्हणून विचारणारे कोणी नव्हते. आईला स्काउट बॅण्डच्या प्रॅक्टीसला जातो म्हणून तो सांगायचा. पण आईला फारस कळायच नाही म्हणून ती जास्त विचारीत नसे. सुऱ्या, चित्र्या आणि फावड्या व लेखक ही चौघेजण शाळेच्या रस्त्यावर बांधकाम चालू असलेल्या सुऱ्याच्या बिल्डिंगवर जमायचे. सर्व मित्रांना काहीतरी टोपणनाव होते. अगदी आपण वापरायचो तशी.
ते रोज त्या बिल्डिंग मधून येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतील मुलींना व शिक्षकांना चिडवायचे.
     सुऱ्या आठवीच्या गुप्ते वर लाईन मारायचा. ती केवड्याच्या फुलांची वेणी घालून यायची म्हणून तिचे टोपणनाव केवडा पडले. सुऱ्या तिच्यावर फारच फिदा झाला होता. तो सारखा केवड्याचाच विचार करायचा. शाळेत कोण कोणावर लाईन मारतो याची सर्व माहिती मुलांना असायची. लेखकही वर्गात नवीन आलेल्या शिरोडकर  नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तो ही मग शिरोडकर वर लाईन गुपचूप लाईन मारू लागतो. यावर कोणी डाऊट खाऊ नये म्हणून तो बर्‍याच गोष्टींची काळजी घेतो. सुऱ्या सारखा तो उघड उघड बोलत नाही.
      लेखक आपल्या बहिणीला आंबाबाई म्हणायचा. ती सारखी प्रत्येक कामात लुडबुड करायची. वडील शांत होते. ते सचिवालयात नोकरीला होते. आई जरी शांत असली तरी ती चिडल्यावर लेखक तिला घाबरत असे. तो आईला आईसाहेब म्हणायचा. या कादंबरीत नरू मामा नावाचे एक महत्त्वाचे पात्र आहे. तो लेखकाचा सख्ख्या मामा असतो. आई पासुन तो वयाने लहान होता. तो शाळेत इंग्रजी शिकवायचा. तो जेव्हा जेव्हा मुंबईत यायचा तेव्हा तो लेखकाला इंग्रजी चित्रपट पहायला घेऊन जायचा. दोघांचे संबंध फार मैत्रीचे होते. लेखक आणि नरू मामा मुलींच्या विषयी गप्पा मारत. लेखक बर्‍याचदा मित्रांचे नाव सांगून त्याच्या कडून टिप्स मिळवायचा. ही कहाणी साधारणपणे 1975-77 दरम्यान आणीबाणीच्या काळात घडलेली आहे. आणीबाणीचा बराच उल्लेख यामध्ये येतो. शाळेतही इंदिरा गांधींच्या सर्मथनात गाणी गायला लावायचे. या वेळची दडपशाही याची माहिती लेखक देतो.
     शिरोडकर एक ठिकाणी क्लास लावते हे लेखकाला समजते. मग तोही तिथेच क्लास लावतो. तो सारखा शिरोडकरला भेटायचा प्रयत्न करतो. तिच्यावर पाळत ठेवून ती कुठल्या रस्त्याने येते जाते याची माहिती मिळवतो. शेवटी त्यांची भेट होते. शिरोडकरला कळते कि जोशी आपल्यावर लाईन मारत आहे. शाळेतल्या इंग्रजीच्या बेंद्रे बाई फारच कडक होत्या. त्यांच्या इंग्रजीच्या तासाच्या आधी तो फळ्यावर अनुशासनपर्व असे लिहीतो. तेव्हातर त्याला बेंद्रे बाई फार मारतात.
     कहाणीचा शेवट हा मोठा नाट्यमय होतो. सुऱ्या एकदा बिल्डिंगवरून केवड्याला एकटीच येताना पाहतो. सुऱ्या तिला लेखकाच्या मदतीने थेट जाऊन विचारतो. ये आपल्याला लाईन देते का? केवडा घरी आपल्या वडिलांना ही हकिकत सांगते. दुसर्‍या दिवशी त्याचे वडील शाळेत तक्रार घेऊन येतात. तेव्हा ते त्या दोघांना फार मारतात. त्याना पालकांना बोलवून घ्यायला सांगितले जाते. सुऱ्याच्या घरी जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्याचे वडील त्याला फार मारतात. लेखकालाही घरी बोलणे बसतात. दुसर्‍या दिवशी पालक येतात. पण तोपर्यंत याचा बोभाटा शाळाभर होतो. शिरोडकर लेखकाकडे पहायचे सोडून देते. शाळेची परीक्षा संपून सुट्टी लागते. सुट्टीत लेखक आजोळी नरू मामाच्या लग्नाला जातो. शाळेचा निकाल लागतो. लेखक पाचवा नंबर मिळवतो. सुऱ्या आणि फावड्या नापास होतात. शिरोडकर निकाल घ्यायला आलेली नसते. नंतर लेखकाला तिच्या वडिलांची बदली झाल्याचे कळते. त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो.
     शाळा कादंबरीत अनेक ठीकाणी गमतीदार विनोद आढळतात. कादंबरी वाचताना आपण भूतकाळात जातो. आपल्या शाळेय जीवनाची आठवण येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा