गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

कविता : बागेतील झाड



एकदा बागेतल्या सुंदर झाडाकडे पाहून
मी हसून म्हणालो,

"बागेत आहेस म्हणून खुजाच राहीलस तू
कारण
शोभेसाठी जाणीवपूर्वक छाटल्या जातात तुझ्या फांद्या
निबीड अरण्यात असतास तर
वाढला असतास हवे तसे, हवे तेवढे
फुलला असतास, बहरला असतास मनासारखे"

झाड शांतपणे उत्तरले

"मित्रा,
मी झाड आहे!
एकदा मुळं घट्ट केल्यावर
मी स्वतः बदलू शकत नाही माझी जागा
माझे स्वातंत्र्य मर्यादित आहे.
पण,
तू तर चालता बोलता माणूस
तरीही तू विचारांच्या काटेरी कुंपणात का घेरला गेलास?
तू देखील वाढत नाहीस का जाती, धर्मांच्या बागेत?
अंधानुकरणासाठी तुझ्या विचारांच्या फांद्या
नाही छाटत का कुणी?
अरे मित्रा!
या कुपंणातून बाहेर येऊन "माणूस" म्हणून जगून बघ
जगशील सुखाने मनासारखे
फुलशील, बहरशील विचाराने"

मी निरुत्तर झालो
बागेतून ताडकन उठून थेट निघालो
"त्या" कुंपणाच्या तारा कापण्यासाठी

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

कविता : सुपरनोव्हा



एकत्र येतात अणुरेणू तेंव्हा
या ब्रह्मांडात जन्मतात
सजीव आणि निर्जीव
जन्मतात ग्रह-तारे, उपग्रह, उल्का
माणसं, पशुपक्षी, झाडं-वेली
आणि दगडधोंडे सुद्धा!

जन्मतात म्हणजे एकदिवस मरतातही
कारण
प्रत्येकजण जन्मतो तो मरण्यासाठीच.....

नारायणा!
काही अब्ज वर्षांपूर्वी
तुही असाच जन्मलास या आकाशगंगेच्या उदरात
याच अणुरेणूंच्या पुंजक्यातून
आणि
तुझ्या भोवताली परिक्रमा करणाऱ्या
धुळ-वायूंच्या शिल्लक ढगांतून
तू जन्माला घातलीस
ही सृष्टी आणि हे सौरमंडळ

नारायणा!
तूच निर्मिलीस पंचमहाभूते,
जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी
तूच काठोकाठ भरलेस हे सप्त सागर
तूच हिमाच्छादित केलीस ही उंच गिरीशिखरे
अरे!
हे संपूर्ण चराचर म्हणजे तुझाच तर अंश आहे.....
नाही का?

नारायणा!
आम्ही जेंव्हा आईच्या उदरातून
अणुरेणूंचे गोळे होऊन बाहेर आलो
तेंव्हा तूच कोंबलास आमच्या नाकातून श्वास
आणि तेवत ठेवलेस हे प्राण
तुझ्याच प्रकाश संश्लेषणात बनलेल्या अन्नातून
आम्ही मिळविली जगण्यासाठी लागणारी जीवनसत्वे

नारायणा!
लहानाचे मोठे होत असताना
खेळलो याच अणुरेणूंच्या दगड मातीत
पुढे शिकलो मोठे झालो
तेव्हा वाढत गेली आमची महत्वाकांक्षा
म्हणून
जमा करत बसलो तुझीच मुलद्रव्ये
साठवले अमाप कागदी गठ्ठे
आणि आता म्हणतोयस की,
तुझं आयुष्य संपत चाललंय
अरे!
मग या आमच्या सगळ्या संचयाचे ढिगारे
आम्ही कुणाच्या हवाली करायचे?

नारायणा!
तू म्हणे, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात
फुगत जाशील राक्षसा सारखा
गिळत सुटशील तुझ्या चिल्या-पिल्याना
आणि
तुला जन्म देणारेच अणुरेणू करतील उठाव
तेंव्हा तू क्षणार्धात फुटशील फुग्यासारखा
तुझ्या सुपरनोव्हा मधून निघणाऱ्या ज्वाळातून
तू बेचिराख करशील ह्या सृष्टीतले सगळे अणुरेणू,
त्यात असतील आमच्या संचयाचे ढिगारे देखील
मग आमचा हा मुलद्रव्यांचा अट्टाहास कशासाठी?
.....
(फोटो सौजन्य : नासा)

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

शरद पवार : राजकारणातील तेल लावलेला पैलवान



शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेले एक अजब रसायन म्हणावे लागेल. गेल्या जवळपास पन्नास वर्षापासून शरद पवार यांचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात वावर आणि दबदबा राहिलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रात विविध खात्याचे मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास. पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा झाली पण संख्याबळाच्या अभावी त्यांना हे पद भुषविता आले नाही. शरद पवार यांचे राजकारण मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत असल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शैक्षणिक संस्था, विविध क्रीडा संस्था तसेच सहकारी संस्था यामध्येही शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे. असा हा अष्टपैलू नेता २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खरा महानायक ठरला.

ऐन निवडणूकीच्या तोंडावर शिखर बँकेतील अयोग्य कर्जवाटपाप्रकरणी शरद पवारांसह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाने आदेश दिला. संबंध नसतानाही शरद पवारांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात आल्याने केंद्र सरकार सुडाचे राजकारण करते की काय? असा प्रश्न उपस्थित केला गेला. ईडी कडून गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर राज्यभरात शरद पवार यांच्या समर्थनात ठिकठिकाणी मोर्चे निघाले. केंद्र सरकार दबावतंत्राचे राजकारण करण्यासाठी ईडी आणि सीबीआय चा दुरुपयोग करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. आपण स्वतः चौकशीला सामोरे जाण्यासाठी ईडी कार्यालयात जाणार असल्याची घोषणा करून पवारांनी एकच खळबळ उडवून दिली. २७ सप्टेंबरला राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत जमू लागले. अनेक ठिकाणी मोर्चे निघू लागले. राज्यात विषेशतः मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उद्भवू नये म्हणून पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचा आपला निर्णय शेवटच्या क्षणी मागे घेतला. शेवटी व्हायचे तेच झाले या साऱ्या घटनाक्रमाचा शरद पवारांनी फायदा उचलून स्वतःविषयी सहानुभूतीचे वातावरण निर्माण केले. ईडी सारखे संकट डोळ्यासमोर असतांनाही शरद पवार यांनी आपल्या राजकीय चातुर्याने त्याला संधीत रुपांतरीत केले.



निवडणुका लागायच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मधुकरराव पिचड, विजयसिंह मोहीते पाटील, उदयनराजे भोसले यासारखे पवारांच्या तालमित वाढलेले दिग्गज नेते त्यांना सोडून गेले. ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आमदार, खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सोयीनुसार भाजप अथवा शिवसेनेत डेरे दाखल होत होते. एव्हढी पक्षाला गळती लागूनही शरद पवार खचले नाहीत. ८० वर्षाचे वय, कर्करोगासारखा झालेला गंभीर आजार यांच्यापुढे हात न टेकता शरद पवारांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या हातात घेतली आणि पायाला भिंगरी लागल्यागत त्यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करून चाळीसहून अधिक प्रचारसभा घेतल्या. एखाद्या तरुण नेत्याला लाजवेल या उत्साहात शरद पवार ठिकठिकाणी सभांना संबोधित करत होते. काँग्रेस हायकमांडने तर महाराष्ट्राच्या निवडणूकीकडे संपूर्णपणे पाठ फिरवल्याचे याठिकाणी नमूद करावे लागेल. जणूकाही निवडणुकीच्या आधीच त्यांनी हार पत्करली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, स्टार प्रचारक प्रियंका गांधी या महाराष्ट्रात फिरकल्या देखील नाहीत. राहूल गांधी यांच्या जेमतेम पाच सभा या निवडणूकी दरम्यान महाराष्ट्रात झाल्या. याचा फायदा काँग्रेसला कीतपत झाला असेल हे सांगणे कठीणच आहे. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे स्वतःच्याच मतदार संघात अडकवून पडल्याने आघाडीच्या वतीने एकटे शरद पवारच प्रचाराचा किल्ला लढवत असल्याचे जाणवले.