मंगळवार, १६ जून, २०१५

पहिला पाऊस

प्रतीक्षा संपली मृगसरींची
वाफाळलेल्या धरणीवरची
गार वारा उडवी धुराळी
आसुसलेली नजर आभाळी

दिली ललकारी कृष्णमेघांनी
घाई सर्वांना मन आनंदी
थेंब टपोरे धावती खाली
सडा शिंपिती माझ्या अंगणी

गाड्या भिंगोऱ्या दारोदारी
शाळेतील मधली सुट्टी
मृदुगंध पोहचला रानोरानी
कागदाची पहिली होडी

रानातून ढोरे परतली
गुरख्यांची ओली डोकी
टपरी वरली भाऊगर्दी
चहा पिणाऱ्यांची हुल्लडबाजी

मृगसरींनी हार गुंफला
बळीराजाचा चेहरा फुलला
समाधानाचा वर्षाव झाला
पाऊस आला पाऊस आला

मंगळवार, २ जून, २०१५

परत आखातात

घरासाठी मला परत दुसऱ्यांदा आखाती देशात नोकरीसाठी यावे लागले. पहिल्यांदा गावी राहायला घर नव्हते आणि मी स्वतःशीच हट्ट करून बसलो होतो कि जोपर्यंत गावी घर होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. माझ्या घराच्या स्वप्नाला साकार कण्यासाठी मी २००६ साली सौदी अरेबिया मध्ये पहिल्यांदा नोकरीसाठी आलो होतो. २००६ ते २००९ या तीन वर्ष्यात शक्य तेव्हढे पोटाला चिमटे काढत कसे तरी गावी डोक्यावर छप्पर बनवण्यासाठी मी घरच्यांना मदत केली. २००९ ला मी भारतात परतलो ते सौदीत फिरून कधीच न येण्यासाठी. कारण इथल्या धार्मिक कट्टरतेला मी वैतागलो होतो. सौदीत स्थायिक झालेला भारतीय मुस्लीम समाजच आम्हाला पाण्यात पहात होता. बरेच जन त्यांच्या मनातील द्वेष ते उघडपणे व्यक्त करत होते. २००९ ला दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात परतलो आणि सौदी अरेबियाच्या मोहिमेवर पडदा पडला.
२०१० ला मला मुंबईत नोकरी मिळाली. गावाकडच्या घराची सोय झाली होती. आता मी शहरात घर घेण्याचे दिवसा स्वप्न पाहू लागलो होतो. याचे कारणही तसेच होते. माझ्या जवळच्या मित्रांपैकी बऱ्याच जणांनी मुंबईत हक्काचे घर घेतले होते. अर्थात ते जरी गृहकर्ज काढून विकत घेतलेले असले तरी ‘मुंबईत घर’ या शब्दाला फारच किंमत होती. मुंबईला नोकरीसाठी गेलो तेंव्हा मला अमोल कार्ले या माझ्या L&T मध्ये असतांनाच्या मित्राने फार सहकार्य केले. त्याची स्वतःची कल्याणला सदनिका होती. मला तेथे त्याने राहायला जागा दिली. त्यावेळी तोही अविवाहित होता. नितीन पाटील व अमोल कार्ले हे दोघे आधीपासूनच तेथे राहत होते. या दोघांच्या सदनिका याच इमारतीमध्ये होत्या. लग्न होईपर्यंत मी अमोल कडेच राहिलो. मे २०१० ला लग्न झाल्यानंतर मी अमोल शेजारीच घर भाड्याने घेवून राहू लागलो. या दरम्यान मी नवीन घराच्या शोधात होतो.
मुंबईत माझी नोकरी चांगल्या पगाराची होती तरी नोकरीवर कायम तलवार लटकलेली असायची. कंपनीचा मालक सुहास चव्हाण हा फार लहरी आणि क्रूर स्वभावाचा होता. त्याने सुहास हायड्रो सिस्टम्स नावाची कंपनी विक्रोळीत चालू केली होती. तो एकटाच सगळ्या कंपनीचा कर्ता धर्ता होता. त्यामुळे त्याचा कोणावरच विश्वास नव्हता. कंपनीत ज्या प्राथमिक गरजा मिळायला हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या. पिण्यासाठी स्वच्छ पाणी नसायचे. तेही घरूनच न्यावे लागे. शौचालय एव्हढे घाणेरडे होते कि त्यात जाने म्हणजे एक मोठी शिक्षा होती. प्रत्येक आठवड्याला कोणाच्या ना कोणाच्या नोकरीवर तलवार पडायची. सुहासच्या स्वभावामुळे मी पहिल्या पाच-सहा महिन्यातच दहा-बारा कर्मचारी बदललेले पाहिले. काही जन सुहासच्या स्वभावाला भिवून पळाले तर काहींना सुहासने पळवले. एक दिवस यात माझाही नंबर लागणार हे नक्की होते. तरीही मी येथे एक वर्ष काढले. पहिल्या महिन्यापासूनच मी दुसरीकडे नोकरी शोधण्याचा फार प्रयत्न करत होतो. अनेक ठिकाणी मुलाखती देवूनही काहीच उपयोग झाला नाही.
नवीन नोकरी शोधणे आणि नवीन घर शोधणे या दोन्ही गोष्टी समांतरपणे चालू होत्या. अश्यातच कल्याण मध्ये आधारवाडीला रोनक कॉर्पोरेशनचा सदनिकेचा प्रकल्प चालू झाला आणि मी त्यामध्ये सदनिका घेण्याचे ठरवले. बरोबर त्याच काळात मला L&T मधील माझे जुने सहकारी दीपक पांचाळ यांचा दुबई मधून फोन आला. दीपक हे L&T ची नोकरी सोडून दुबईत नोकरीला लागले होते. त्यांच्या कंपनीत ड्राफ्टसमनसाठी जागा होती. खरेतर माझा दुबईत जाण्यात होकार देणेच म्हणजे माझी त्या कंपनीत निवड होती. हि घटना एव्हढी अनपेक्षित घडली कि मला विचार करायला संधीच मिळाली नाही. मी ज्या दिवशी हो म्हणालो त्याच्या दहा दिवसाच्या आतच मला दुबईला जायचे होते. व्हिजासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जमवाजमव आणि त्यात नवीन घर खरेदीची प्रक्रिया यात माझे फार हाल झाले. या सर्वावर मत करून मी २० फेब्रुवारी २०११ ला दुबईला आलो.
माझे दुबईला येणे याला सुहास मधील नोकरी जशी कारणीभूत होती तशी नवीन घरासाठी लागणारा पैसा कसा गोळा करायचा हि काळजी सुध्दा तितकीच. म्हणूनच दुबईची नोकरी माझ्यासाठी मोठी स्वर्णसंधीच होती. मी या संधीचा फायदा घेतला आणि माझ्या स्वप्नातील दुसऱ्या घराला गवसणी घातली. दुबईस जाण्यापूर्वी मी माझ्या मोठ्या भावाच्या नवे मुखत्यारपत्र करून ठेवले होते त्यामुळे माझ्या मागे त्याने सर्व कामे व्यवस्थित व चोखपणे केली.
२००४-०५ साली घरच्यांकडे भाजीपाला व किरणा समान आणण्यासाठी सुद्धा पैश्याची आडचन होती. या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी पहिल्यांदा मी आखातात आलो होतो. पण दुसऱ्यांदा आखातात आलो ते भावी आयुष्यास आर्थिक स्थैर्य येण्यासाठी.
- ©गणेश पोटफोडे


शनिवार, १४ जून, २०१४

सौदी अरेबिया डायरी : भाग ४ धार्मिक वातावरण व नियम

सौदी अरेबिया हा १००% मुस्लिम देश आहे. येथील नियम जगापेक्षा खूपच वेगळे आणि कठोर आहेत. येथे राहणाऱ्या देशी - विदेशी लोकांना त्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सौदी मधील काही महत्वाच्या नियमां विषयी माहिती .
इकामा (IQAMA) : थोडक्यात अर्थ रहिवाशी ओळखपत्र. हे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्ही सौदी मध्ये नोकरी करण्यासाठी आला असाल तर तुम्हाला हे ओळखपत्र कंपनी कडून अथवा मालक कडून दिले जाते (आरबी मध्ये याला कफील म्हणतात) इकामा साठी आपला पासपोर्ट कफिलाच्या ताब्यात द्यावा लागतो. सौदी अरेबियाच्या नियमा प्रमाणे एक वेळी आपण इकामा किंवा पासपोर्ट यापैकी एकाच गोष्ट बाळगू शकतो. सौदी मध्ये गेल्यावर कफील आपला पासपोर्ट स्वतःच्या ताब्यात घेतो, त्यामुळे येथे फसवणूक होण्याची फार शक्यता असते. त्यासाठी येथे जाण्यापूर्वी सर्व गोष्टींची खातरजमा करावी.
 इकम्याचा उपयोग बँक खाते, टेलिफोन - मोबाईल कनेक्शन, घर भाड्याने घेणे, वीज बिल, ड्रायव्हिंग लायसेन्स अश्या अनेक महत्वाच्या कारणासाठी होतो. इकाम्याचा क्रमांक हा येथील सगळ्या सरकारी यंत्रणेशी जोडला गेलेला असतो. येथे मुस्लिम आणि अमुस्लिम यांना वेगवेगळ्या रंगांचे  इकामे दिले जातातइकाम्यावर तुमचे नाव, धर्म, राष्ट्रीयत्व, इकामा क्रमांक, कफिलाचे नाव, व्हिजा क्रमांक, व्हिजाचा प्रकार, तुमचा हुद्दा, पासपोर्ट क्रमांक आणि इकाम्याची मुदत या गोष्टींचा उल्लेख अरबी आणि इंग्रजी मध्ये असतो.
घराबाहेर पडतांना तुमचा इकामा नेहमी जवळ बाळगावा. जर आपण व्हिजीट व्हिजावर गेलो आसोल तर स्वतःचा पासपोर्ट जवळ ठेवावा. नवीन गेलेल्या कामगारांसाठी जर तुमचा पासपोर्ट इकामा बनवण्यासाठी कंपनीने घेतला असेल आणि तुमचा इकामा अजून बनला नसेल तर आपल्या पासपोर्टची छायांकित प्रत (Photo Copy) करून (उदारणार्थ : मुख्य पान, शेवटचे पान, व्हिजा लावलेले पान आणि दाखल (Entry) शिक्का विमानतळावर मारतात ते पान) यावर कंपनीचा शिक्का मारून घ्यावा. बऱ्याच वेळा या गोष्टी कंपनी स्वतःहून देतात.
                या बाबत माझा एक अनुभव आहे. त्यावेळी हज यात्रेचे दिवस होते. त्यामुळे सौदी मध्ये ठीक ठिकाणी पोलिस तुमचा इकामा तपासतात. मी सौदी मध्ये नवीन आलेलो होतो माझा पासपोर्ट कंपनीने इकामा बनवण्यासाठी घेतलेला होता. त्या दिवशी मी, रत्नाकर हिरे, कमलेश आणि संजय माने हे सुट्टी निम्मित रत्नाकर याच्या गाडीतून बाहेर शॉपिंगसाठी दम्माम शहरात गेलो होतो. तेथे अनेक ठिकाणी तपासणी चालू होती. गाडी सिग्नला थांबल्यावर पोलिसांनी आम्हाला इकामा दाखवण्यासाठी सांगितले. सर्वांनी आपआपले इकामे दाखवले पण माझ्याकडे फक्त कंपनीने दिलेला कागद होता. पोलिसांनी आम्हाला गाडी बाजूला लावायला सांगितली. त्यांनी माझ्या कडील कागदाची बरीकीने तपासणी केली, त्यावर कंपनीचा शिक्का आणि अरबी भाषेत मजकूर लिहिलेला होता, त्यामुळे माझी सुटका झाली अन्यथा मला सौदी मधील तुरुंगाची (कालाबुस) हवा खावी लागली असती. बाहेर गेल्यावर जर तुमच्याकडे इकामा नसेल आणि पोलिसांनी पकडले तर ते तुम्हाला तुरुंगात टाकतील आणि जो पर्यत कंपनीचा प्रतिनिधी (स्थानिक अरबी) येवून तुमची सुटका करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुरुंगातच राहावे लागते. इकामा बनवण्याची सर्व जबाबदारी आपल्या कफिलची किंवा कंपनीची असते. सौदी मध्ये आल्यावर इकामा बनवण्यासाठी तुम्हाला वैद्यकीय चाचणी (Medical Test) द्यावी लागते. यामध्ये सर्व आजारांची सखोल चाचणी करतात. जर तुम्ही वैद्यकीय तपासणीत नापास झालात तर तुम्हाला इकामा मिळत नाही आणि जेणेकरून तुम्हाला परत मायदेशी यावे लागते.

साप्ताहिक इतर सुट्ट्या : येथे प्रत्येक शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्याच बरोबर रमादान ईद साठी दिवस, हज यात्रा (बकरी ईद) साठी दिवस आणि राष्ट्रीय दिन २३ सप्टेंबर एक दिवस सुट्टी असते. या व्यतिरिक्त कुठलीच सुट्टी नसते.

रमजान महिना : रमजान हा मुस्लिमांचा पवित्र महिना आहे. या महिन्यात सौदी मध्ये फार कडक नियम पाळले जातात. उपवासाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी खाण्यास पिण्यास बंदी असते. रस्त्यावर तुम्ही पाणी पण पिवू शकत नाहीत. या काळात सर्व खानावळी बंद असतात. कंपनी मध्ये मुस्लिम कामगारांना अर्धा दिवसच काम असते. नियम मोडणाऱ्या अमुस्लीमांना कडक शिक्षा होवू शकते.

नमाजाच्या वेळा : नमाजाच्या वेळी सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, खानावळी, हे नमाज संपे पर्यंत बंद असतात. कंपनीचे मुस्लिम कामगार नमाजासाठी १५ ते २० मिनिटे सुट्टी घेवू शकतात. सर्व कंपन्या, शॉपिंग मॉल्स, जेथे कामगारांची संख्या जास्त आहे तेथे प्रार्थना स्थळ (मस्जिद) असणे सक्तीचे आहे.     

मृत्युदंड : सौदी अरेबिया मध्ये मुस्लिमांची शरीया कायदा लागू असल्यामुळे येथे मृत्युदंडाची शिक्षा मोठ्या प्रमाणात दिली जाते. मादक पदार्थांची तस्करी किंवा विक्री करणे, खून, बलात्कार, मुस्लिम धर्म सोडणे (मुस्लिम धर्मातून दुसऱ्या धर्मात जाने), लुटमार दरोडा टाकणे, विवाह बाह्य अनैतिक संबंध आणि समलिंगी संबंध या कारणांसाठी येथे मृतुदंड दिला जातो. त्याच प्रमाणे चोरी करणाऱ्याचे हात चाटले जातात

मृत्युदंडाची पध्दत : मुस्लिम धर्माच्या शरीया कायद्याप्रमाणे येथे सार्वजनिक ठिकाणी (शक्यतो शुक्रवारी दुपारची नमाज झाल्या नंतर मस्जिदिसमोर) आरोपीचे मुंडके धारदार  तलवारीने छाटण्यात येतो. जो आरोपीचे मुंडके  छाटतो त्याला अरबी भाषेत जल्लाद म्हणतात. सौदी मध्ये महिलांचेही शिरच्छेद झालेले आहेत. काहीवेळा आरोपींना सार्वजनिक ठिकाणी (शक्यतो शहराच्या मुख्या चौकात) फासावर दिले जाते. मृत्युदंडाची हि पध्दत सर्व देशी-विदेशी नागरिकांना लागू आहे

सौदीतील महिलामुस्लिम देश असल्यामुळे येथे महिलांवर अनेक बंधने आहेत. मुस्लिम आणि अमुस्लिम महिलांना बुरखा (अभाया) घालणे बंधनकारक आहे. परदेशातून आलेल्या सर्व महिलांना बुरखा परिधान करावा लागतो. येथे कुठल्याही धर्माच्या महिलांना वाहन चालवण्यास बंदी आहे

काही महत्वाचे नियम :
दारू पिणे विक्री करणे यावर बंदी त्यामुळे बिअर बर नाहीत.
सिनेमा थियटर नाही.
अमुस्लीमांना हज प्रांतात (मक्का आणि मदिना) येथे जाण्यास बंदी.
अमुस्लिमांना सौदीत अंत्यविधी करण्यास बंदी.

सौदी अरेबियाचा राजा, राजपुत्र,राजघराणे आणि इस्लाम, यांच्या विषयी उपशब्द केल्यास कडक शासन

बुधवार, ४ जून, २०१४

सूर्य मावळला


खिन्न झाल मन
चहूकडे अंधार दाटला
उगवतीचा सूर्य मध्यांनीच
मावळतीला गेला….
ओस पडले रान
कंठ दाटुनिया आला
पाहिलेल्या स्वप्नांचा
सगळा चुराडा झाला
स्वतःच्या तेजाने
उजवळीले आम्हाला
अविरत कष्टाने
दाविल्या वाटा भविष्याच्या
प्रकाशाविना तुझ्या रे !
कोमेजुनी आम्ही जाणार
तुझ्या आठवणी नेहमी
चटका काळजाला देणार
खिन्न झाल मन
चहूकडे अंधार दाटला
उगवतीचा सूर्य मध्यांनीच
मावळतीला गेला….