शुक्रवार, ३० मे, २०१४

हरवलेले बालपण

बालपण किती गमतीशीर असते नाही का? म्हणूनच कोणी तरी म्हटले आहे कि "बालपण देगा देवा ". आयुष्य हे वाहत्या नदी सारखे आहे, वाहत असतांना किनाऱ्यावर आलेली ठिकाणे परत आयुष्यात येत नाहीत तसेच गेलेला काळ आणि बालपण आपल्या जीवनात येणार नाही. बालपण तर आता निघून गेले आपण कधी मोठे झालो हे कळलेच नाही. आजही एखाद्या लहान मुलांना खेळतांना पहिले कि मनात बालपणाच्या आठवणी जाग्या होतात. भूतकाळातील गोष्टी आठवतात तेंव्हा ओठांवर अलगद हास्याची लकेर उमटते.

घरच्यांना सांगता पोहायला जाणे किंवा रात्री मित्रां बरोबर दुसऱ्याच्या बागेलीत फळे चोरून खाणे अश्या अनेक गोष्टी आपण केल्या. जी मजा तासंतास गावाच्या नदीत किंवा विहिरीत पोहण्याची होती ती मजा आजच्या नितळ पाण्याने भरलेल्या स्विमिंग पूल मध्ये मिळणार नाही. जी मजा दुसऱ्यांच्या चिंचा - बोरे चुरून खाण्यात होती ती आजच्या स्ट्रॉबेरी - सफरचंद खाण्यात नाही.

लहान असतांना आपण किती खोड्या केल्या हे आपल्याला माहित आहे तरीही आपण चांगले शिक्षण घेवून मोठे झालोत. आजच्या लहान मुलांनाही स्वातंत्र्य देवून त्यांना खूप खेळू दिले पाहिजे कारण अभ्यासाच्या धाकात ते कधी मोठे होतील हे त्यांनाही कळणार नाही आणि आपल्यालाही. त्यांचे बालपण आपण हिरावून तर घेत नाहीत ना? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.


शेवटी चांगले बालपण हाच चांगल्या आयुष्याचा पाया असतो म्हणून प्रमाणापेक्षा जास्त अभ्यासाचा धाक दाखवून मुलांचे बालपण हिरावून घेवू नका.

सोमवार, १९ मे, २०१४

चटके

उन्हाचे चटके
भेगाडले रान
पाण्याच्या आवाजाला
आतुरले कान

आटली विहीर
करपले पिक
पोटाला कोणी
घालेना भिक

लाचार नजर
आभाळी भिडली
कधी येईल
ढगांची सावली

थकले  सर्वांग
उपाशी पोट
कधी रे देशी
पाण्याचा घोट

गुरुवार, २४ एप्रिल, २०१४

कोयता (ऊस तोडणी कामगारांचे मनोगत)



भल्या पहाटे शुक्राची चांदणी उगवते
तांड्या वरल्या चुल्हीच्या धुराड्यात
परत ती लपून जाते
अन लगबग सुरु होते
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी! 

कोपीतल्या मंद कंदिलाच्या प्रकाशात
भाजतात भाकरी दिवसभराच्या
मळकटलेल्या गोधडीवर निजलेली लेकरं
उठतात तांड्यावरल्या कलम्ह्यानं
अन न सांगताच जावून झोपतात गाडीत
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी! 

जुंपल्या बैलगाड्या निघाल्या फडाकडे
सांगताच बैलही धावले रोजच्याच वाटानं
एका हातात 'कोयता' अन दुसऱ्या हातात?
'तान्ह लेकरू' गारठ्यानं कुडकुडनारं
उराशी बिलगलेलं अन शांत झोपलेलं 
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी! 

चालत्या गाडीतच होते सकाळची न्याहारी
भाकरीच्या सोबतीला असते मीठ मिरची
उजाडायच्या आधीच होते कामाला सुरुवात
लेकरं खेळती पाचरटात आम्ही असतो फडात
गारठ्यातही फुटतो आम्हाला दरादरा घाम
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी! 

सपासपा चालतो जीवलग आमचा 'कोयता'
मग जमवतो  मागे कष्टाच्या मोळ्या
दिवस चढताच भरायची असते गाडी
फॅक्टरीच्या प्रवासात उरलेली चटणी भाकरी
रोजच्या दिवसाचा असाच आमचा पाढा
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी!

मंगळवार, १५ एप्रिल, २०१४

चार आणे

काही माणसं विलक्षण सामर्थ्य घेवूनच जन्माला येतात. आपल्या प्रामाणिक पणामुळे ते समाजामध्ये एखाद्या तेजस्वी ताऱ्याप्रमाणे भासतात. अश्याच माणसाच्या हातात लक्ष्मिचाहि वास असतो. त्यांनी एखादे काम हाती घ्यावे आणि ते तडीस नेल्याशिवाय स्वस्त बसू नये. प्रत्येकवेळी यश जणू त्यांची वाटच पाहत बसलेले असावे. याच प्रकारातील आमचे अण्णा होते. त्यांच्या पुण्याईने आम्हाला कशाचीच कमतरता नव्हती. उसाचे मळे, दुभत्या गायी यामुळे घरात विपुल संपदा होती. अण्णा अचानक अपघातात आम्हाला सोडून गेले आणि आमच्या धनसंपदेलाही ओहोटी लगली. त्यांनी पाळलेल्या गायी काही वर्षाच्या अंतराने एक एक करत मरण पावल्या. जणू त्या मुक्या जनावरांनाही मालक गेल्याचे अतीव दुःख झाले असावे.
     अण्णा गेले आणि आमचे भविष्य पार बदलून गेले. या अवघड प्रसंगी अण्णांच्या धाकट्या भावाने संसाराचा गाडा चालायला घेतला. आम्ही त्यांना तात्या म्हणत असु. तात्या कारभारात नवीन होते. आधीच एक ना अनेक संकटे येत होती अशात अर्थकारणाची चाके मंदावतही गेली आणि आमच्या तंगीचा काळ सुरु झाला. त्यावेळी माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण होऊन मी गावातीलाच हायस्कुलमध्ये पाचवीत जाऊ लागलो होतो.
     त्या काळात आम्हाला एखाद्या गोष्टीसाठी फार त्रास घ्यावा लागे. मी लहानपाणी फारच हट्टी वगैरे नव्हतो तरीही एखाद दुसऱ्या वेळी मी काही गोष्टीसाठी हट्ट धरून बसायचो. आई मला नेहमी हट्टांपासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करे. अश्यात तात्यांचा स्वभाव फार चिकट होता. सहजा सहजी त्यांनी कुठल्याही गोष्टीसाठी पैसे देऊ नयेत असा त्यांचा स्वभाव होता. शाळेच्या सुट्टीच्या दिवशी मी आई बरोबर शेतात जाई. गावातील बऱ्याच बायका आमच्या कडे खुरपणीसाठी येत, आई त्यांच्याकडून व्यवस्तीत काम करून घेण्यासाठी त्या बायकांबरोबर शेतात जायची. त्या बायकांबरोबर त्यांची मुलेही खुरपणीसाठी शेतात येत असत. यातील काही मुले माझे वर्ग मित्र असल्यामुळे मी पण त्यांच्या सोबतीने आमच्याच शेतात खुरपणी करयचो. आई माझेही नाव कामाच्या बायकांच्या नोंद वहीत लिही, त्यामुळे मलाही रोजंदारी मिळे. एका रोजाचे त्यावेळी ५ रुपये मिळायचे. या खुरपणीच्या साचलेल्या पैश्यातून मग मी शाळेतील सहलीला वगैरे जयचो.
     शाळेत असतांना बरेचदा माझी चड्डी फाटलेली असयची. फाटलेल्या चड्डीमुळे शाळेत शर्ट ईन करण्यास फार लाज वाटायची. प्रार्थनेच्या वेळी शर्ट ईन करावीच लागायची, माझी फाटलेली चड्डी पाहून मुलांनी हसुनये म्हणून मी रांगेत अगदी शेवटी उभा राहायचो. अनेकदा मी शर्ट ईन न करताच प्रार्थनेला उभा असायचो या कारणासाठी कित्येकदा मार खावा लागे.
      माझ्या पायात स्लिपर चप्पल असायची तीपण घासून घासून तिच्या टाचा नाहीश्या झालेल्या असायच्या तर त्यांचे पट्टे खिळे किंवा वेड्या बाभळीचे काटे लाऊन पकडून ठेवलेली असायचे. तात्यांना चप्पल आणायला सांगितलेले अजिबात आवडायचे नाही. त्यांना जर कोणी चप्पल आणायला सांगितले तर त्या दिवशी काहीच काम होणार नाही असा त्यांचा समाज होता. चप्पल विकत घेणे म्हणजे अपशकुनच असे त्यांना वाटे त्यामुळे मला बिन टाचांच्या चप्पला घालून शाळेत जावे लागायचे. कधी कधी तर त्या चप्पल दोन पावले चालल्यावर त्यांचा खिळा निघून पडायचा. मी अनेकदा शेजाऱ्यांच्या चप्पला शाळेत घालून जायचो. तात्यांच्या असल्या स्वभावामुळे त्यांच्याकडून एखादी वस्तू हवी असल्यास रडून रडून घ्यावी लागायची. रडल्यामुळे तरी कधी कधी त्यांना दया येई. 
      असेच एकदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मला गारीगार खाण्याची फार इच्छा झाली. गावातील मोमीन गल्लीत गरीगारीचा कारखाना होता, तेथूनच आम्ही गारीगार विकत आणून खात आसू. मी तात्यांकडे अतिशय हट्ट धरला तरी तात्या काही पैसे देईनात. तेंव्हा गारीगार चार आण्याला होती. मी चार आण्यासाठी कितीतरी वेळ रडलो. रडून रडून माझ्या घश्याला कोरड पडली तेंव्हा कुठ तात्यांनी रागानं मला चार आणे दिले. मी तश्याच अवस्थेत आनंदाच्या भरात गारीगार विकत घेण्यासाठी धावलो. माझ्या आनंदाला काही पारावार राहिला नव्हता. तो कारखाना काही पाऊले राहिला होता तेव्हड्यात मोमीन गल्लीच्या एका चिंचोळ्या बोळीत माझ्या हातून ते चार आणे खाली पडले. ते एका दगडावर आदळून तेथील गटारीत पडले. इतका वेळ मी त्या गोष्टीसाठी घसा कोरडा होई पर्यंत रडलो आणि एव्हढे करून मला जे चार आणे मिळाले होते ते त्या गटारीत पडले होते. मी त्या गटारीत हात घालून ते चार आणे शोधण्याचा प्रयत्न केला पण मला ते मिळाले नाहीत. शेवटी मला निराश होऊन परतावे लागले