शुक्रवार, ३० मे, २०१४

हरवलेले बालपण

बालपण किती गमतीशीर असते नाही का? म्हणूनच कोणी तरी म्हटले आहे कि "बालपण देगा देवा ". आयुष्य हे वाहत्या नदी सारखे आहे, वाहत असतांना किनाऱ्यावर आलेली ठिकाणे परत आयुष्यात येत नाहीत तसेच गेलेला काळ आणि बालपण आपल्या जीवनात येणार नाही. बालपण तर आता निघून गेले आपण कधी मोठे झालो हे कळलेच नाही. आजही एखाद्या लहान मुलांना खेळतांना पहिले कि मनात बालपणाच्या आठवणी जाग्या होतात. भूतकाळातील गोष्टी आठवतात तेंव्हा ओठांवर अलगद हास्याची लकेर उमटते.

घरच्यांना सांगता पोहायला जाणे किंवा रात्री मित्रां बरोबर दुसऱ्याच्या बागेलीत फळे चोरून खाणे अश्या अनेक गोष्टी आपण केल्या. जी मजा तासंतास गावाच्या नदीत किंवा विहिरीत पोहण्याची होती ती मजा आजच्या नितळ पाण्याने भरलेल्या स्विमिंग पूल मध्ये मिळणार नाही. जी मजा दुसऱ्यांच्या चिंचा - बोरे चुरून खाण्यात होती ती आजच्या स्ट्रॉबेरी - सफरचंद खाण्यात नाही.

लहान असतांना आपण किती खोड्या केल्या हे आपल्याला माहित आहे तरीही आपण चांगले शिक्षण घेवून मोठे झालोत. आजच्या लहान मुलांनाही स्वातंत्र्य देवून त्यांना खूप खेळू दिले पाहिजे कारण अभ्यासाच्या धाकात ते कधी मोठे होतील हे त्यांनाही कळणार नाही आणि आपल्यालाही. त्यांचे बालपण आपण हिरावून तर घेत नाहीत ना? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.


शेवटी चांगले बालपण हाच चांगल्या आयुष्याचा पाया असतो म्हणून प्रमाणापेक्षा जास्त अभ्यासाचा धाक दाखवून मुलांचे बालपण हिरावून घेवू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा