रविवार, २९ मे, २०२२

यूएई चे नवे राष्ट्रपती MBZ (मोहम्मद बिन झायेद)

 



यूएई चे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अलनह्यान यांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद अलनह्यान यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. मोहम्मद बिन झायेद यांचा परिचय करण्यापूर्वी यूएईच्या राज्य पद्धतीची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे. यूएई हा एक संवैधानिक राजेशाही देश असून यात एकूण सात राजशाह्यांचा (अमिरात) अंतर्भाव होतो.  १९७१ साली अबू धाबीचे राजे शेख झायेद बिन सुलतान अलनह्यान यांच्या नेतृत्वाखाली अबू धाबी, दुबई, शारजा, अजमान, रास अलखैमा, उम अलकुवैन आणि फुजैरा या सात स्वतंत्र राज्यांचे राजे (म्हणजेच शेख ) एकत्र येऊन त्यांनी संयुक्त अरब अमिरात या संघराज्यची स्थापन केली.

यूएईच्या स्थापने पासून अबू धाबीच्या राज गादीवर असणारे शेख हे देशाचे राष्ट्रपती तर दुबईच्या राज गादीवर असणारे शेख हे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान असतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची अधिकृत निवड ही सर्वोच्च सांघिक समिती (Federal Supreme Council) करते. या समितीचे सदस्य हे यूएईच्या सात राज्यांचे शेख असतात. यूएईच्या उपराष्ट्रपती पदावर असणारी व्यक्ती हीच या देशाचे पंतप्रधान देखील असते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अधिकृत कार्यकाळ जरी पाच वर्षांचा असला तरी या पदांवरील व्यक्तींना तयहयात या पदांवर कायम ठेवण्याची इथली परंपरा आहे. शेख झायेद हे यूएईचे पहिले राष्ट्रपती होते. २००४ साली शेख झायेद यांच्या निधनानंतर त्यांचे थोरले पुत्र शेख खलिफा यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली होती. नवनिर्वाचित राष्ट्रपती शेख मोहम्मद हे यूएईचे तिसरे राष्ट्रपती आहेत.

यूएईचे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे राजे ६१ वर्षीय शेख मोहम्मद बिन झायेद यांचा जन्म ११ मार्च १९६१ रोजी अलऐन शहरात झाला. शेख मोहम्मद यांचे पूर्ण नाव 'शेख मोहम्मद बिन झायेद बिन सुलतान बिन झायेद बिन खलिफा बिन शाखबौत बिन तय्यब बिन इसा बिन नह्यान बिन फलाह बिन यास' असे आहे. शेख मोहम्मद हे शेख झायेद यांचे तृतीय चिरंजीव आहेत. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे वडलांच्या देखरेखी खाली अलऐन आणि अबू धाबी शहरात झाले. त्यांना १९७९ साली उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. इंग्लंच्या नामांकित सॅण्डहर्स्ट रॉयल मिलिटरी अकॅडेमी येथून त्यांनी सैन्य शिक्षणात पदवी संपादन केली. यूएई मध्ये परत आल्यानंतर त्यांनी देशाच्या सैन्य दलात अनेक वर्ष सेवा केली. ते हवाई दलाचे उत्तम वैमानिक देखील आहेत. १९९१ साली झालेल्या पहिल्या आखाती युद्धात त्यांनी कुवैतच्या बाजूने सहभाग घेतला होता. यूएई सैन्य दलाचे आधुनिकीकरण करण्याचे सगळे श्रेय हे शेख मोहम्मद यांनाच दिले जाते.

शेख मोहम्मद बिन झायेद यांची २००४ साली अबू धाबीच्या युवराज पदावर (Crown Prince) नियुक्ती झाली. २००५ साली त्यांना यूएई सैन्य दलाचे डेप्युटी सुप्रीम कमांडर करण्यात आले. शेख खलिफा यांच्या आजारपणात शेख मोहम्मद यांनी देशाची धुरा अगदी समर्थपणे सांभाळली. यूएईच्या जनमानसात शेख मोहम्मद बिन झायेद हे खूप लोकप्रिय नेते असून सामान्य जनतेत त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. अरब जगतातही शेख मोहम्मद बिन झायेद एक शक्तिशाली नेते म्हणून ओळखले जातात. आपल्या देशाची रुढिवादी ओळख मिटवून त्यांनी उदारमतवादी आणि सहिष्णू धोरण अवलंबवले. अनेक दाशकांपासून असलेले इस्त्राईल बरोबरचे शत्रुत्व त्यांना पुढाकार घेऊन मिटवले. यूएई-इस्त्राईल या देशांनी मैत्रीचा हात धरत पहिल्यांदाच राजनैतिक संबंध स्थापित केले. इस्त्राईल आणि यूएई यांच्यात झालेल्या शांतात कराराचे खरे शिल्पकार हे शेख मोहम्मद बिन झायेद होते. धार्मिक सहिष्णुतेचे नवे धोरण त्यांनी राबवले. याचाच भाग म्हणून त्यांनी २०१९ साली पोप फ्रान्सिस यांना यूएईच्या भेटीसाठी आमंत्रित केले. पोप पहिल्यांदाच अरब खंडात येत होते, त्यामुळे त्यांचा हा दौरा खूप ऐतिहासिक ठरला. शेख मोहम्मद बिन झायेद यांनी अबू धाबी येथे हिंदू मंदिर बांधण्यास परवाणगी देखील दिली. बीएपीएस स्वामीनारायण या संस्थेच्या माध्यमातून या मंदिराची निर्मिती करण्यात येत असून लवकरच याचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

सगळ्याच आघाड्यावर देशाला पुढे घुवून जाण्यासाठी शेख मोहम्मद बिन झायेद हे प्रयत्नशील आहेत. त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे आज यूएई हा देश आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, पर्यटन या सारख्या क्षेत्रात जगात आघाडीवर जात आहे. शेख मोहम्मद बिन झायेद हे देशाला याच्याही पुढे घेऊन जाण्यास समर्थ आहेत.


सोमवार, १७ जानेवारी, २०२२

दुबई आणि सायकल

 सायकलविषयी माझ्या मनात नेहमीच कुतूहल राहिले आहे. सायकल शिकण्यासाठी मी लहानपणी खूप धडपड केली होती. घरी सायकल नसल्यामुळे सायकल मार्ट मधून भाड्याने सायकल आणावी लागे. सुरुवातीला ती नुसती हातात घेऊन पळवत असे. नंतर मात्र ती चालवायला शिकलो. पूर्वी सायकल चालवणे ही गरज होती. आजकाल सायकल गरजेपेक्षा हौस म्हणून जास्त वापरली जात असावी. आज माझी ती गरज नाही पण हौस म्हणून सायकल चालवायला खूप आवडते. मी जिथे जाईल तिथे सायकल चालवायच्या संधीची वाट बघत असतो. गेल्या काही वर्षांपासून मी दुबईत वास्तव्याला आहे. इथल्या रस्त्यावरल्या आधुनिक सायकली पाहून माझ्या मनात अजूनच कुतूहल निर्माण झाले. दुबई म्हणजे पंचतारांकित शहर! इथे येण्यापूर्वी इतरांप्रमाणे मलाही या शहराची ओळख म्हणजे फक्त उंच इमारती, सोन्या-चांदीच्या पेठा, आलिशान गाड्या, चकचकीत रस्ते किंवा लक्झरी लाईफ अशी मर्यादितच होती. काही दिवसांनी याही पलीकडे मला दुबई शहराची नवी ओळख होत गेली. जगात जे काही अशक्य आहे ते येथे शक्य झालेले पहायला मिळते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये तर या शहराच्या नावे अनेक विक्रम नोंदवलेले आहेत. अद्भुत किंवा अशक्य ते शक्य हीच दुबईची खरी ओळख आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर इथल्या वाहतूक व्यवस्थेचे घेता येईल. दुबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जगातील सर्वोत्तम वाहतूक व्यवस्थेत गणली जाते. मेट्रो, ट्राम, बस आणि टॅक्सी यासह अत्याधुनिक बोटी या प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था येथे कार्यरत आहे. याच बरोबर इथले लोक सायकलचा वापर मोठ्या प्रमाणात करतात याचे मला नवल वाटते.

वर्षातले काही महिने सोडल्यास जवळपास संपूर्ण वर्षभर इथले हवामान खूप उष्ण असते. चक्क आठ महिने उन्हाळा तर उरलेले चार महिने हिवाळा असे दोनच ऋतू येथे अनुभवायला मिळतात. उन्हाळ्यात वाळवंटामुळे येथे दिवसाचे तापमान हे ५० अंशाच्या पुढे जाते. येथे आर्द्रता देखील खूप असते. घराबाहेर नुसते उभे राहिले तरी संपूर्ण अंग भिजून जाते. असल्या उष्णतेमुळे दुबई शहर सायकल चालवण्यासाठी अनुकूल नसावे अशी माझी अगोदर भावना होती. परंतू दुबईसह संपूर्ण यूएई मध्ये सायकल खूप लोकप्रिय आहे. अनेकांना आश्चर्य वाटावे एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे सायकल चालवण्यास उत्तेजन आणि सुविधा पुरवल्या जातात. दुबईचे सरकार हे 'सायकल चालवा' एवढी घोषणा करून थांबले नाही, तर त्यांनी सायकल सुरक्षितपणे चालवण्यासाठी लागण्यारे सर्व नियम आणि पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. दुबईचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अलमक्तूम हे स्वतः एक सायकल प्रेमी आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन दुबईत सायकलिंगसाठी अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. दुबईला सायकलिंगची वर्ल्ड कॅपिटल करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

हौशी सायकलप्रेमींसाठी इथल्या सरकारने खास सायकलिंग ट्रॅक बनवले आहेत. जगात जर कुठे सगळ्यात सुंदर सायकलिंग ट्रॅक असतील तर ते दुबई आहेत, असे मी म्हणेन. दुबईतील सायकलिंग ट्रॅक हे समुद्रकिनारे, वाळवंट, बगीचे आणि सुंदर रस्त्यांच्या बाजूने जातात. या ठिकाणच्या ट्रॅकवरून सायकलिंग करणे म्हणजे एक सुखद अनुभव असतो. तसं वर्षभर दुबईत सायकलिंगचा अस्वाद घेता येतो. कडक उन्हाळ्यातही अनेक सायकलप्रेमी दुबईच्या सायकलिंग ट्रॅकवरून फिरताना दिसतात. खासकरून हिवाळ्यात जेंव्हा इथले वातावरण आल्हादायक असते तेंव्हा अनेक जण आपली सायकल बाहेर काढून शहरभर सायकलिंगचा आनंद लुटतांना दिसतात. सायकलिंग ट्रॅकजवळ सायकल, हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट हे भाड्याने मिळते. त्यामुळे आपल्याकडे स्वतःची सायकल जरी नसली तरी सायकल चालवण्याची हौस भागवता येऊ शकते. हे ट्रॅक माझे सगळ्यात आवडते ठिकाण आहे. मला वेळ मिळेल तेंव्हा मी या ट्रॅकवरून सायकल चालवण्याचा आनंद लुटत असतो.

दुबईत प्रत्येक गोष्टीसाठी नियम आहेत. म्हणूनच या शहराला एक शिस्तप्रिय शहर म्हटले जाते. सायकल चालवायलाही कडक नियम असतात, हे मला इथे आल्यावर समजले. दुबईतील प्रत्येक सायकलस्वारांना या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. सायकलचा वापर येथे फक्त हौसेखातर होत नाही, तर दैनंदिन जीवनातही अनेक कामासाठी येथे सायकल वापरली जाते. देअरा, बरदुबई किंवा करामा यासारख्या भागातील अनेक सामान्य कामगार रोज सायकल वापरतात. छोट्यामोठ्या सामानाची ने आण, किराणा सामानाची डिलिव्हरी, जेवणाची डिलिव्हरी किंवा येण्या-जाण्यासाठी शक्यतो येथे सायकलच वापरली जाते. इथल्या कडक नियमांमुळेच सायकल चालवत असताना होणारऱ्या अपघातांची संख्या नगण्य आहे. कायद्यानुसार प्रत्येक सायकलस्वाराने हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घालणे बंधनकारक असते. सुरुवातीच्या काळात हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घालून जाणारे सायकलस्वार बघून मला खूप विशेष वाटायचे. नंतर या गोष्टीं किती महत्वाच्या आहेत हे समजले. सायकलिंग करतांना आपले ओळखपत्र म्हणजेच एमिरेट्स आयडी बाळगणे बंधनकारक आहे. सायकलस्वारांना पदपथ किंवा मुख्य रस्त्यावरून सायकल चालवण्यास बंदी आहे. सायकलस्वार फक्त सायकलिंग ट्रॅक किंवा ६० किमी प्रति तासपर्यंत वेग मर्यादा असलेल्या दुय्यम रस्त्याचा वापर करू शकतात. वाहतूक पोलीस विभागाने सुरक्षिततेच्या कारणामुळे मुख्य रस्त्यावरून सायकल चालवण्यास येथे बंदी घातलेली आहे. हे नियम मोडणाऱ्यास ६०० दिरहम (१२००० रु.) पर्यंत दंड वसूल केला जातो आणि त्याची सायकल जप्त केली जाते. रात्रीचे अपघात टाळण्यासाठी येथे इतर वाहनांप्रमाणे सायकलला पुढचा आणि मागचा लाईट असणे बंधनकारक आहे. झेब्रा क्रॉसिंग पार करताना सायकलवरून खाली उतरावे लागते. त्याचप्रमाणे सायकल चालवताना पादचाऱ्यांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची काळजी सायकल स्वाराने घायची आहे. सायकल चालवत असतांना कानात हेडफोन घालण्यासही येथे बंदी आहे. सायकलवर डबलसीट जाणे येथे दंडनीय आहे. यासाठी किमान २०० दिरहम (४०००रु.) दंड आकारला जातो. सायकल पार्क करण्यासाठी देखील महत्वाचे नियम वाहतूक विभागाने आखून दिलेले आहेत. सायकल फक्त ठिकठिकाणी बनवलेल्या सायकल पार्किंगमध्येच पार्क करावी लागते. शहरात अनेक ठिकाणी विशेषतः मेट्रो स्थानकाबाहेर सायकल पार्क करता येऊ शकते. विविध इमारतींबाहेर सायकल पार्क करण्यासाठी खास सुविधा करण्यात आलेल्या आहेत.

दुबईतील सायकलचा इतिहास फार काही जुना नाही. भारतापेक्षाही येथे सायकल उशिराने आली. १९६० च्या दशकात खनिजतेलाचा शोध लागल्यानंतर अनेक पाश्चिमात्य अभियंते आणि कामगार हे दुबईसह अबुधाबी सारख्या शहरात कामासाठी येऊ लागले. यातील बहुतांश कामगार हे ब्रिटिश होते. ब्रिटिश लोक सवयीप्रमाणे आपल्या बरोबर चैनीच्या अनेक गोष्टी घेऊन आले. त्यात सायकलचाही समावेश होता. त्याकाळी ब्रिटिश बनावटीच्या सायकल जगभर खूप लोकप्रिय होत्या. सुरुवातीच्या काळात सायकलचा उपयोग हा ब्रिटिश अधिकारी राहत असलेल्या कॅम्पमध्ये केला जात असे. कालांतराने ही सायकल तेलाच्या कारखान्यातील दूरवरच्या साईटवर किंवा कार्यालयात जाण्यासाठी वापरली जाऊ लागली. पुढे शहराचा जसजसा पायाभूत विकास होत गेला तशी दुबईत सामान्य माणसाकडे सायकल येऊ लागली. आज दुबईतील रस्त्यावरून शिस्तीत चालणारे सायकलस्वार आणि वेगवेगळ्या ढंगातील सायकल बघून प्रत्येकाचे मन हरकून जाते.

दुबई शहरातील सार्वजनिक वाहतूकीवरचा ताण कमी करण्याच्या उद्धेशाने येथील रस्ते आणि वाहतूक विभाग (आरटीए) हा सायकलचा वापर वाढवण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असे उपक्रम राबवत आहे. 'करीम बाईक' हा त्याच उपक्रमाचा एक भाग आहे. रस्ते आणि वाहतूक विभाग आणि करीम या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने करीम बाईक ही सेवा सुरु केली आहे. या सेवेच्या माध्यमातून भाडेतत्वावर सायकल मिळवता येऊ शकते. करीमने यासाठी दुबईभर जवळपास ३५० स्वयंचलित केंद्रे उभारली आहेत. सायकल भाड्याने घेण्यासाठी करीम बाईक या मोबाईल ऍप मध्ये खाते उघडावे लागते. करीमच्या स्वयंचलित केंद्रावर जाऊन तेथे पार्क केलेल्या सायकलचा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ऍपवर पाच अंकी कोड तयार होतो. हा कोड तेथील पार्किंग मशीनमध्ये टाकल्यानंतर सायकल अनलॉक होते. तुम्ही घेतलेली ही सायकल कुठल्याही केंद्रावर परत पार्क करू शकता. करीमची सर्व स्वयंचलित पार्कींग केंद्रे ही सौरऊर्जेवर चालतात. सगळ्या सायकल या आधुनिक बनावटीच्या असून त्या पेडल असिस्ट या तंत्रज्ञानावर चालतात. यामुळे कमी प्रयत्नात जास्त अंतर पार करता येऊ शकते. करीम बाईक या दुबईतील टॅक्सी पेक्षा फार स्वस्त असल्यामुळे त्या फार लोकप्रिय ठरत आहेत. करीमच्या सायकल वापरताना सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. या सायकल चालवताना स्वतःकडे हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट असणे गरजेचे आहे. करीम बाईकसारख्या इतर अनेक खासगी कंपन्या या क्षेत्रात उतरत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या सायकल प्रेमींसाठी अनेक सुविधा पुरवत आहेत. 

सामान्य माणसांना जसे येथे सायकल चालवण्यासाठी उत्तेजन दिले जाते, त्याच पद्धतीने जागतिक स्तरावरील रोड सायकलिंग स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना देखील एक जागतिक मंच उपलब्ध करून देण्याचे काम येथील सरकार करत आहे. यूएईमध्ये आयोजित होणारी 'यूएई टूर' ही रोड सायकलिंग स्पर्धा अल्पावधीतच जगातील सायकलिंग खेळाडूंसाठी आकर्षण ठरली आहे. या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात युसीआई वर्ल्ड टूर (UCI World Tour) च्या माध्यमातून केले जाते. यूएई टूर ही सात वेगवेगळ्या टप्प्यातील एक आव्हानात्मक स्पर्धा आहे. या स्पर्धेतील खेळाडूंना यूएईच्या विविध भौगोलिक परिस्थितीचा सामना करत अतिशय खडतर प्रवास करावा लागतो. जागतिक नामवंत खेळाडू आणि संघ या स्पर्धेत भाग घेत असतात. 

अँस्टरडॅम शहरानंतर आता दुबई हे 'सायकलिंग फ्रेंडली सिटी' म्हणून नावारूपाला येत आहे. सरकारने प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही. सायकलिंगसाठी अनुकूल वातावरण नसतांनाही केवळ सरकारी प्रयत्नांमुळे दुबईत सायकलिंग हा पर्यावरणपूरक क्रीडा प्रकार सामान्य माणसांमध्ये लोकप्रिय होत आहे. भविष्यातील इंधनाची अनिश्चितता ध्यानात घेऊन सरकारने योग्यवेळी उचललेले हे पाऊल नक्कीच महत्वाचे वाटते. दुबईत जगभरातील लोक जसे पर्यटनासाठी येतात तसेच ते वाळवंटातील सायकलिंगचा अनुभव घेण्यासाठी देखील येऊ लागले आहेत. सायकल उत्पादक कंपन्यांनी केलेल्या आकर्षक जाहिराती, सायकल चालवण्याचे आरोग्याला असलेले फायदे आणि पर्यावणपुरक वाहन म्हणून जगभरात सायकला परत सोनेरी दिवस आले आहेत. दुबईच्या अनुभवावरून तर मी हे ठामपणे म्हणू शकतो.

(पूर्व प्रसिद्धी : वाघूर २०२१)

■   

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

तालिबानी राजवटीमुळे बदलणारी आंतरराष्ट्रीय समीकरणे


 


'रोम जेव्हा जळत होते तेव्हा निरो बासरी वाजवत होता' इतिहासातील या प्रसिद्ध कथेची पुनरावृत्ती अफगाणिस्तानात झाली आहे असे म्हणावे लागेल. अफगाणिस्तान जळत होते तेंव्हा सगळे जग डोळे मिटून शांत बसले होते. निरोला त्याच्या पापाची शिक्षा तर मिळाली, आता संपूर्ण जगाला शांत बसण्याची काय शिक्षा मिळते हे येणारा काळच ठरवेल. बरोबर २० वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेन्टर वरील हल्ल्यानंतर अमेरिकेने ज्या घाईत अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उलथून टाकली होती, अगदी त्याच घाईत तेथून काढता पाय घेतला आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज ३ लाख अफगाणी सैनिकांना ७५ हजार तालिबानी हरवू शकणार नाहीत हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा आत्मविश्वास किती पोकळ होता हे तालिबानने दोनच महिन्यात संपूर्ण अफगाणिस्तानवर परत सत्ता प्रस्थापित करून दाखवून दिले. या सत्तांतराने येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरील समीकरणे पार बदलून जाणार आहेत.

अफगाणिस्तानातील सत्तांतराचा सर्वाधिक फायदा पाकिस्तान भारताविरोधात कसा घेता येईल या प्रयत्नात राहणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी चाल खेळायला सुरुवात देखील केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'तालिबानने अफगाणिस्तानला गुलामगिरीच्या साखळ्यातून मुक्त केले आहे' असे विधान करून अफगाणिस्तानातील सत्तांतराचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. सामरिकदृष्ट्या अफगाणिस्तानला लागून असेलेली सीमा पाकिस्तानला शांत ठेवायची आहे. जेणे करून जास्तीत जास्त सैनिक हे भारतीय सीमेवर तैनात राहतील. पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात तालिबानचा खूप प्रभाव आहे आणि हा प्रभाव पाकिस्तानसाठीही घातक ठरू शकतो. ज्या पद्धतीने तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला त्या पद्धतीने ते आपल्या वायव्य सरहद्द प्रांतात उपद्रव करू शकतात याची जाणीव पाकिस्तानला आहे. म्हणूनच पाकिस्तानने घुसखोरी टाळण्यासाठी अफगाणिस्तान सीमेवर तारेचे कुंपण घालण्याचे काम आधीच पूर्ण करून घेतले आहे. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानला भारताविरोधात थेट युद्ध लढणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात तालिबानचा उपयोग काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया वाढवण्यासाठी ते करतील यात शंका नाही. भारताला कोंडीत पकडण्यासाठी चीनचा देखील तालिबानला पाठिंबा राहील. एकीकडून पाकिस्तान आणि तालिबान तर दुसरीकडून चीन अशा कात्रीत भारत सापडणार आहे.

चीनने उघडपणे तालिबानसोबत मैत्री करण्यासाठी हाथ पुढे केला आहे. तालिबानसोबत मैत्रीकरुन चीन एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेला शह देण्याबरोबरच भारतालाही कोंडीत पकडण्याचा चीनचा मनसुबा आहे. तालिबानसोबत मैत्रीमुळे चीनला सामरिकदृष्ट्या मध्य आशियात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कुठलाच अडसर राहणार नाही. रेशीममार्ग बनवण्याच्या बहाण्याने चीन याभागात आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. भविष्यात नव्या अफगाणी सरकारला लागणारे माहिती आणि तंत्रज्ञान पुरवण्यासाठी चीन पुढाकार घेईल. अफगाणिस्तानच्या बाजारपेठेवर चीनचा डोळा नक्कीच असणार आहे. रशियाची भूमिका तालिबानसोबत मैत्रीचीच असेल. ज्या तालिबानचा जन्मच मुळी रशियाशी युद्ध करण्यासाठी झाला होता, ते दोघेही आता अमेरिकेविरोधात एक होतांना दिसतील. चीन आणि रशिया या दोघांसाठी तालिबान शासित अफगाणिस्तान ही शस्त्रास्त्रांसाठी मोठी बाजारपेठ ठरणार आहे. त्यादृष्टीने हे दोन्ही देश तालिबानसोबत सोईची भूमिका घेतील. 

शिया बहुल इराण आणि सुन्नी तालिबान यांच्यात यापूर्वी फार काही चांगले संबंध राहिलेले नाहीत. पूर्वीच्या राजवटीत १९९६-२००१ दरम्यान तालिबानने अनेक अल्पसंख्यांक शिया धर्मियांचे हत्याकांड घडवून आणले होते. १९९८ मझार-ए-शरीफ येथील दूतावासातील ८ इराणी अधिकाऱ्यांची तालिबानने हत्त्या केली होती. याची जखम इराणच्या मनात जरी असली तरी ते तालिबानशी यावेळी थेट संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे इराणचा कट्टर विरोधी सौदी अरेबिया मात्र तालिबानच्या मदतीने इराणवर अंकुश ठेवण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रयत्नशील राहील.  पूर्वीच्या तालिबान राजवटीला सौदी अरेबिया आणि यूएई या आखाती देशांनी मान्यता दिली होती. त्यावेळच्या राजवटीत तालिबानने केलेल्या क्रूर अत्याचारामुळे मान्यता देणाऱ्या या दोन्ही देशांची प्रतिमा एक प्रकारे मलिन झाली होती. परंतु यावेळी हे दोन्ही देश मात्र सावध पवित्रा घेतांना दिसत आहेत. तरीही हे दोन्ही देश तालिबानच्या बाजूनेच झुकलेले राहतील. यूरोपातील देश खास करून ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे कधीच तालिबान शासनाला मान्यता देणार नाहीत. 

इतर महत्वाचे मुस्लिम देश तुर्की आणि मलेशिया यांची नव्या तालिबान राजवटीविषयी काय भूमिका असेल हे महत्वाचे ठरणार आहे. तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्यापूर्वी तुर्कीने काबूल विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी उचलण्याचा प्रस्थाव ठेवला होता. तालिबानने तुर्कीच्या या हस्तक्षेपाला जोरदार विरोध केला आहे. तुर्की हा नाटोचा सदस्य देश आहे त्यामुळे तो तालिबान राजवटीला उघडपणे पाठिंबा देणार नाही. तुर्कीचे पाकिस्तान सोबत घनिष्ठ संबंध आहेत तर पाकिस्तानचे तालिबानशी. भविष्यात पाकिस्तानमुळे तुर्की आणि तालिबानची जवळीक वाढू शकते. अफगाणिस्तानचे इतर शेजारी देश तजाकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांची तालिबान आणि अफगाणिस्तानमधून येणारे निर्वासित भविष्यात डोकेदुःखी वाढवू शकतात. या तिन्ही पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत संघातील देशांना तालिबानशी जुळवून घेण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

अफगाणिस्तानात पायाभूत सुविधा उभारण्यात भारताचे फार मोठे योगदान आहे. रस्ते, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक संस्था या बरोबरच ऊर्जा क्षेत्रात भारताने फार मोठी गुंतवणूक केलेली आहे. अफगाणिस्तानचे संसद भवन आणि सलमा धरण हे महत्वाचे प्रकल्प भारताने पूर्ण केलेले आहेत. अफगाणिस्तानातील सत्तांतर हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. नवे तालिबानी शासन भारतासोबत कसे संबंध ठेवते हे महत्वाचे ठरणार आहे. जगाच्या व्यासपीठावर या नव्या शासनाला मान्यता मिळो अथवा ना मिळो, तालिबानच्या एक हाती सत्तेला आता भविष्यात तरी कुठलाच अडसर दिसत नाही. भारताने अजूनही या घटनाक्रमावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतू भारताला काश्मीरमध्ये तालिबानचा हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. रशिया, कतार आणि यूएईच्या माध्यमातून भारताचे तसे प्रयत्न चालूही झालेले असतील.

तालिबानच्या सरकारचे स्वरूप कसे असेल याबाबत अजून निश्चितपणे सांगता येत नसले तरी, अभ्यासकांच्या मते तालिबान आपला कट्टरतावाद सोडून काहीशी मावळ भूमिका घेऊ शकतो. त्याशिवाय त्यांना चीन आणि रशिया सह अमेरिकेच्या विरोधी गोटातील देश मान्यता देणार नाहीत.


दि. २२ ऑगस्ट २०२१ रोजी दैनिक पुण्यनगरीच्या सर्व आवृत्तीत हा लेख प्रसिद्ध झाला आहे. 

बुधवार, ७ जुलै, २०२१

वडिलांचा स्मृतिदिन

 


आज वडलांना जाऊन ३२ वर्षे झाली. मी जवळपास सहा वर्षांचा असतांना माझे वडील भाऊसाहेब रामभाऊ पोटफोडे यांचा अपघातात मृत्यू झाला. वडील वारले त्यावेळी मी पहिलीला जात होतो. लहान वयात वडलांचे छत्र हरपल्याने त्याचे मानसिक आणि आर्थिक परिणाम मला आणि माझ्या कुटुंबियांना दीर्घकाळ भोगावे लागले. नुकत्याच चाळीशीत प्रवेश केलेल्या घरातील तरुण आणि कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्यामुळे आम्ही सगळे कोलमडून पडलो. वडलांच्या नंतर माझ्या आजीने ती मरेपर्यंत म्हणजे जवळपास १८ वर्षे आपल्या लाडक्या लेकाचे सुतक पाळले. वडलांना घरात आणि गावात सगळे अण्णा म्हणायचे. प्रामाणिक वागणुकीमुळे गावात त्यांना खूप मान आणि प्रतिष्ठा होती. त्यांच्या शब्दाला किंमत होती. गावात सगळे त्यांना घाबरायचे.

अण्णाच्या जाण्यामुळे त्यांनी आमच्या शिक्षणाविषयी जी स्वप्न होती ती पूर्ण होऊ शकली नाहीत. माझे शिक्षण पुढे पूर्ण झाले नाही याची मला आयुष्यभर खंत राहील. घरात मी सगळ्यात लहान असल्याने माझा ते फार लाड करायचे. खाऊ, खेळण्या यांची घरात रेलचेल असे. आमच्याकडे त्यावेळी राजदूत कंपनीची मोटारसायकल होती. राजदूत गाडीच्या पेट्रोल टाकीवर बसून त्यांच्यासोबत जायला मला खूप आवडायचे. अण्णा गाडी घेऊन बाहेर निघाले की, मी मला बरोबर नेण्याचा हट्ट करत असे. कितीतरी वेळा मी त्यांच्या गाडी मागे धावत गेल्याचे आठवते.

राजकीय वर्तुळात त्यांचा सक्रिय सहभाग असे. अहमदनगर जिल्हा दूध संघाचे ते अनेक वर्ष संचालकही होते. त्यांच्या पुढाकाराने गावातील अनेकांना त्यांनी गाई, म्हशी, बैलजोडी त्याचबरोबर शेतीच्या इतर कामासाठी कर्ज मिळवून देण्यात मदत केली. गावातील अनेकांच्या अडीअडचणीत त्यांनी पुढाकार घेऊन मदत केली. म्हणूनच गावातील प्रत्येक घरात त्यांना मान मिळत असे. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांची आठवण काढतात, त्यांचा आदराने उल्लेख करतात. मला असं वाटते हीच त्यांच्या छोट्याश्या आयुष्याची खरी कमाई असावी.

दिनांक ७ जुलै १९८९ ला जिवलग मित्र भाऊसाहेब फलके यांच्या सोबत शेवगावला जात असतांना भगूर गावाजवळ झालेल्या अपघातात दोन्ही भाऊसाहेबांचा मृत्यू झाला. आमचे कायमचे पोरके झालो. नियतीने आमचे बालपण कायमचे हिरावून नेले.

अण्णा तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन _/\_