बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

तालिबानी राजवटीमुळे बदलणारी आंतरराष्ट्रीय समीकरणे


 


'रोम जेव्हा जळत होते तेव्हा निरो बासरी वाजवत होता' इतिहासातील या प्रसिद्ध कथेची पुनरावृत्ती अफगाणिस्तानात झाली आहे असे म्हणावे लागेल. अफगाणिस्तान जळत होते तेंव्हा सगळे जग डोळे मिटून शांत बसले होते. निरोला त्याच्या पापाची शिक्षा तर मिळाली, आता संपूर्ण जगाला शांत बसण्याची काय शिक्षा मिळते हे येणारा काळच ठरवेल. बरोबर २० वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेन्टर वरील हल्ल्यानंतर अमेरिकेने ज्या घाईत अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उलथून टाकली होती, अगदी त्याच घाईत तेथून काढता पाय घेतला आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज ३ लाख अफगाणी सैनिकांना ७५ हजार तालिबानी हरवू शकणार नाहीत हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा आत्मविश्वास किती पोकळ होता हे तालिबानने दोनच महिन्यात संपूर्ण अफगाणिस्तानवर परत सत्ता प्रस्थापित करून दाखवून दिले. या सत्तांतराने येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरील समीकरणे पार बदलून जाणार आहेत.

अफगाणिस्तानातील सत्तांतराचा सर्वाधिक फायदा पाकिस्तान भारताविरोधात कसा घेता येईल या प्रयत्नात राहणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी चाल खेळायला सुरुवात देखील केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'तालिबानने अफगाणिस्तानला गुलामगिरीच्या साखळ्यातून मुक्त केले आहे' असे विधान करून अफगाणिस्तानातील सत्तांतराचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. सामरिकदृष्ट्या अफगाणिस्तानला लागून असेलेली सीमा पाकिस्तानला शांत ठेवायची आहे. जेणे करून जास्तीत जास्त सैनिक हे भारतीय सीमेवर तैनात राहतील. पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात तालिबानचा खूप प्रभाव आहे आणि हा प्रभाव पाकिस्तानसाठीही घातक ठरू शकतो. ज्या पद्धतीने तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला त्या पद्धतीने ते आपल्या वायव्य सरहद्द प्रांतात उपद्रव करू शकतात याची जाणीव पाकिस्तानला आहे. म्हणूनच पाकिस्तानने घुसखोरी टाळण्यासाठी अफगाणिस्तान सीमेवर तारेचे कुंपण घालण्याचे काम आधीच पूर्ण करून घेतले आहे. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानला भारताविरोधात थेट युद्ध लढणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात तालिबानचा उपयोग काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया वाढवण्यासाठी ते करतील यात शंका नाही. भारताला कोंडीत पकडण्यासाठी चीनचा देखील तालिबानला पाठिंबा राहील. एकीकडून पाकिस्तान आणि तालिबान तर दुसरीकडून चीन अशा कात्रीत भारत सापडणार आहे.

चीनने उघडपणे तालिबानसोबत मैत्री करण्यासाठी हाथ पुढे केला आहे. तालिबानसोबत मैत्रीकरुन चीन एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेला शह देण्याबरोबरच भारतालाही कोंडीत पकडण्याचा चीनचा मनसुबा आहे. तालिबानसोबत मैत्रीमुळे चीनला सामरिकदृष्ट्या मध्य आशियात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कुठलाच अडसर राहणार नाही. रेशीममार्ग बनवण्याच्या बहाण्याने चीन याभागात आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. भविष्यात नव्या अफगाणी सरकारला लागणारे माहिती आणि तंत्रज्ञान पुरवण्यासाठी चीन पुढाकार घेईल. अफगाणिस्तानच्या बाजारपेठेवर चीनचा डोळा नक्कीच असणार आहे. रशियाची भूमिका तालिबानसोबत मैत्रीचीच असेल. ज्या तालिबानचा जन्मच मुळी रशियाशी युद्ध करण्यासाठी झाला होता, ते दोघेही आता अमेरिकेविरोधात एक होतांना दिसतील. चीन आणि रशिया या दोघांसाठी तालिबान शासित अफगाणिस्तान ही शस्त्रास्त्रांसाठी मोठी बाजारपेठ ठरणार आहे. त्यादृष्टीने हे दोन्ही देश तालिबानसोबत सोईची भूमिका घेतील. 

शिया बहुल इराण आणि सुन्नी तालिबान यांच्यात यापूर्वी फार काही चांगले संबंध राहिलेले नाहीत. पूर्वीच्या राजवटीत १९९६-२००१ दरम्यान तालिबानने अनेक अल्पसंख्यांक शिया धर्मियांचे हत्याकांड घडवून आणले होते. १९९८ मझार-ए-शरीफ येथील दूतावासातील ८ इराणी अधिकाऱ्यांची तालिबानने हत्त्या केली होती. याची जखम इराणच्या मनात जरी असली तरी ते तालिबानशी यावेळी थेट संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे इराणचा कट्टर विरोधी सौदी अरेबिया मात्र तालिबानच्या मदतीने इराणवर अंकुश ठेवण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रयत्नशील राहील.  पूर्वीच्या तालिबान राजवटीला सौदी अरेबिया आणि यूएई या आखाती देशांनी मान्यता दिली होती. त्यावेळच्या राजवटीत तालिबानने केलेल्या क्रूर अत्याचारामुळे मान्यता देणाऱ्या या दोन्ही देशांची प्रतिमा एक प्रकारे मलिन झाली होती. परंतु यावेळी हे दोन्ही देश मात्र सावध पवित्रा घेतांना दिसत आहेत. तरीही हे दोन्ही देश तालिबानच्या बाजूनेच झुकलेले राहतील. यूरोपातील देश खास करून ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे कधीच तालिबान शासनाला मान्यता देणार नाहीत. 

इतर महत्वाचे मुस्लिम देश तुर्की आणि मलेशिया यांची नव्या तालिबान राजवटीविषयी काय भूमिका असेल हे महत्वाचे ठरणार आहे. तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्यापूर्वी तुर्कीने काबूल विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी उचलण्याचा प्रस्थाव ठेवला होता. तालिबानने तुर्कीच्या या हस्तक्षेपाला जोरदार विरोध केला आहे. तुर्की हा नाटोचा सदस्य देश आहे त्यामुळे तो तालिबान राजवटीला उघडपणे पाठिंबा देणार नाही. तुर्कीचे पाकिस्तान सोबत घनिष्ठ संबंध आहेत तर पाकिस्तानचे तालिबानशी. भविष्यात पाकिस्तानमुळे तुर्की आणि तालिबानची जवळीक वाढू शकते. अफगाणिस्तानचे इतर शेजारी देश तजाकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांची तालिबान आणि अफगाणिस्तानमधून येणारे निर्वासित भविष्यात डोकेदुःखी वाढवू शकतात. या तिन्ही पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत संघातील देशांना तालिबानशी जुळवून घेण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

अफगाणिस्तानात पायाभूत सुविधा उभारण्यात भारताचे फार मोठे योगदान आहे. रस्ते, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक संस्था या बरोबरच ऊर्जा क्षेत्रात भारताने फार मोठी गुंतवणूक केलेली आहे. अफगाणिस्तानचे संसद भवन आणि सलमा धरण हे महत्वाचे प्रकल्प भारताने पूर्ण केलेले आहेत. अफगाणिस्तानातील सत्तांतर हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. नवे तालिबानी शासन भारतासोबत कसे संबंध ठेवते हे महत्वाचे ठरणार आहे. जगाच्या व्यासपीठावर या नव्या शासनाला मान्यता मिळो अथवा ना मिळो, तालिबानच्या एक हाती सत्तेला आता भविष्यात तरी कुठलाच अडसर दिसत नाही. भारताने अजूनही या घटनाक्रमावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतू भारताला काश्मीरमध्ये तालिबानचा हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. रशिया, कतार आणि यूएईच्या माध्यमातून भारताचे तसे प्रयत्न चालूही झालेले असतील.

तालिबानच्या सरकारचे स्वरूप कसे असेल याबाबत अजून निश्चितपणे सांगता येत नसले तरी, अभ्यासकांच्या मते तालिबान आपला कट्टरतावाद सोडून काहीशी मावळ भूमिका घेऊ शकतो. त्याशिवाय त्यांना चीन आणि रशिया सह अमेरिकेच्या विरोधी गोटातील देश मान्यता देणार नाहीत.


दि. २२ ऑगस्ट २०२१ रोजी दैनिक पुण्यनगरीच्या सर्व आवृत्तीत हा लेख प्रसिद्ध झाला आहे. 

बुधवार, ७ जुलै, २०२१

वडिलांचा स्मृतिदिन

 


आज वडलांना जाऊन ३२ वर्षे झाली. मी जवळपास सहा वर्षांचा असतांना माझे वडील भाऊसाहेब रामभाऊ पोटफोडे यांचा अपघातात मृत्यू झाला. वडील वारले त्यावेळी मी पहिलीला जात होतो. लहान वयात वडलांचे छत्र हरपल्याने त्याचे मानसिक आणि आर्थिक परिणाम मला आणि माझ्या कुटुंबियांना दीर्घकाळ भोगावे लागले. नुकत्याच चाळीशीत प्रवेश केलेल्या घरातील तरुण आणि कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्यामुळे आम्ही सगळे कोलमडून पडलो. वडलांच्या नंतर माझ्या आजीने ती मरेपर्यंत म्हणजे जवळपास १८ वर्षे आपल्या लाडक्या लेकाचे सुतक पाळले. वडलांना घरात आणि गावात सगळे अण्णा म्हणायचे. प्रामाणिक वागणुकीमुळे गावात त्यांना खूप मान आणि प्रतिष्ठा होती. त्यांच्या शब्दाला किंमत होती. गावात सगळे त्यांना घाबरायचे.

अण्णाच्या जाण्यामुळे त्यांनी आमच्या शिक्षणाविषयी जी स्वप्न होती ती पूर्ण होऊ शकली नाहीत. माझे शिक्षण पुढे पूर्ण झाले नाही याची मला आयुष्यभर खंत राहील. घरात मी सगळ्यात लहान असल्याने माझा ते फार लाड करायचे. खाऊ, खेळण्या यांची घरात रेलचेल असे. आमच्याकडे त्यावेळी राजदूत कंपनीची मोटारसायकल होती. राजदूत गाडीच्या पेट्रोल टाकीवर बसून त्यांच्यासोबत जायला मला खूप आवडायचे. अण्णा गाडी घेऊन बाहेर निघाले की, मी मला बरोबर नेण्याचा हट्ट करत असे. कितीतरी वेळा मी त्यांच्या गाडी मागे धावत गेल्याचे आठवते.

राजकीय वर्तुळात त्यांचा सक्रिय सहभाग असे. अहमदनगर जिल्हा दूध संघाचे ते अनेक वर्ष संचालकही होते. त्यांच्या पुढाकाराने गावातील अनेकांना त्यांनी गाई, म्हशी, बैलजोडी त्याचबरोबर शेतीच्या इतर कामासाठी कर्ज मिळवून देण्यात मदत केली. गावातील अनेकांच्या अडीअडचणीत त्यांनी पुढाकार घेऊन मदत केली. म्हणूनच गावातील प्रत्येक घरात त्यांना मान मिळत असे. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांची आठवण काढतात, त्यांचा आदराने उल्लेख करतात. मला असं वाटते हीच त्यांच्या छोट्याश्या आयुष्याची खरी कमाई असावी.

दिनांक ७ जुलै १९८९ ला जिवलग मित्र भाऊसाहेब फलके यांच्या सोबत शेवगावला जात असतांना भगूर गावाजवळ झालेल्या अपघातात दोन्ही भाऊसाहेबांचा मृत्यू झाला. आमचे कायमचे पोरके झालो. नियतीने आमचे बालपण कायमचे हिरावून नेले.

अण्णा तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन _/\_

रविवार, २५ एप्रिल, २०२१

कोरोना योद्धा : बाळू डाॅक्टर


कोरोना विषाणूच्या जागतिक रोग साथीमुळे सध्या भारतभर हाहाकार माजला आहे. रोज आपल्या समोर मित्र परिवारातील किंवा आप्तस्वकीयांमधील कुणीतरी कोरोनामुळे गेल्याच्या बातम्या येऊन धडकत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच दवाखाने कोरोना रुग्णांनी भरून गेले असून औषधे, ऑक्सिजन आणि बेडचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. दवाखान्यात जागा नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपार मिळत नाहीत. आपल्या माणसांना वाचवण्यासाठी नातेवाईकांची सगळीकडे धावाधाव चालू आहे. खासगी दवाखाने तर अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहेत. ग्रामीण भागातही तीस ते पन्नास हजार रूपये डिपाॅझिट दिल्याखेरीज दवाखान्यात प्रवेशच मिळत नाही. या संकट काळात अनेक ठिकाणी औषधांचा काळाबाजार होताना आपण पहातोय. बऱ्या होणाऱ्या रुग्णांना दवाखाने लाखोंची बिलं हातात देत आहेत. सामान्य लोकांना तर खासगी दवाखान्यातील उपचार परवडत नाहीत आणि सरकारी दवाखान्यात बेड मिळत नाही. या कोंडीत सामान्य लोकं मात्र भरडत आहेत.


या भीषण परिस्थितीत अमरापूर ता. शेवगाव येथे डाॅक्टर अरविंद पोटफोडे ऊर्फ "बाळू डाॅक्टर" कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कोरोना रुग्णांना बाळू डाॅक्टर अगदी नाममात्र दरात योग्य उपचार देत आहेत. विशेष म्हणजे ते अमरापूर गावातील रुग्णांना मोफत सेवा देतात. गेल्या महिन्याभरात त्यांनी हजारो रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. माणसावर आलेल्या या संकटाला अनेक जण संधी समजून पैशाची लटू करत असताना एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मात्र सामाजिक बांधिलकी जपत आहे. बाळू डाॅक्टर यांच्या या सेवेची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. नगर सारख्या दुष्काळी भागातील गरीब, कष्टकरी, शेतकरी यांची अखंड सेवा करून बाळू डाॅक्टर यांनी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या निरपेक्ष सेवेसाठी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनता सदैव त्यांची ॠणी राहील. भारतात कोरोनावर सर्वात स्वस्त इलाज करणाऱ्या डाॅक्टरांमध्ये बाळू डाॅक्टर यांचा नक्कीच समावेश करावा लागेल.

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

बाल कविता : पक्षांची भरली शाळा

 

(Photo Credit : FLICKR USER SOROUSH JAVADI // CC BY-SA 2.0)

पक्षांची भरली शाळा

वीजेच्या खांबाजवळ
पक्षांची भरली शाळा
तारेचाच केला वर्ग
आकाशाचा झाला फळा

खंडोजी धीवर गुरूजी
आले निळा कोट घालून
कावळेराव मुख्याध्यापक
उभे चोचीत छडी घेऊन

टिटवीने जोरात केली
शाळा भरायची गर्जना
कोकिळा ताईने गायली
मग सकाळीची प्रार्थना

साळुंखी आणि पोपटाचे
नव्हते पाढे पाठ
बगळ्यांनी गिरवले मग
फळ्यावर पाढे आठ

चिमण्यांनी गायली
कविता एक छान
पारव्यांनी डोलावली
ताला सुरात मान

मोराने घातला होता
छान छान गणवेश
बदक आणि कोंबडीला
नव्हता वर्गात प्रवेश

होला आणि कोतवाल
आज होते गैरहजर
वेड्या राघुची नुसती
घड्याळाकडे नजर

चातक बघु लागला
शाळा सुटायची वाट
पिंगळ्याने वाजवली घंटा
पक्षी उडाले एकसाथ