बुधवार, ७ जुलै, २०२१

वडिलांचा स्मृतिदिन

 


आज वडलांना जाऊन ३२ वर्षे झाली. मी जवळपास सहा वर्षांचा असतांना माझे वडील भाऊसाहेब रामभाऊ पोटफोडे यांचा अपघातात मृत्यू झाला. वडील वारले त्यावेळी मी पहिलीला जात होतो. लहान वयात वडलांचे छत्र हरपल्याने त्याचे मानसिक आणि आर्थिक परिणाम मला आणि माझ्या कुटुंबियांना दीर्घकाळ भोगावे लागले. नुकत्याच चाळीशीत प्रवेश केलेल्या घरातील तरुण आणि कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्यामुळे आम्ही सगळे कोलमडून पडलो. वडलांच्या नंतर माझ्या आजीने ती मरेपर्यंत म्हणजे जवळपास १८ वर्षे आपल्या लाडक्या लेकाचे सुतक पाळले. वडलांना घरात आणि गावात सगळे अण्णा म्हणायचे. प्रामाणिक वागणुकीमुळे गावात त्यांना खूप मान आणि प्रतिष्ठा होती. त्यांच्या शब्दाला किंमत होती. गावात सगळे त्यांना घाबरायचे.

अण्णाच्या जाण्यामुळे त्यांनी आमच्या शिक्षणाविषयी जी स्वप्न होती ती पूर्ण होऊ शकली नाहीत. माझे शिक्षण पुढे पूर्ण झाले नाही याची मला आयुष्यभर खंत राहील. घरात मी सगळ्यात लहान असल्याने माझा ते फार लाड करायचे. खाऊ, खेळण्या यांची घरात रेलचेल असे. आमच्याकडे त्यावेळी राजदूत कंपनीची मोटारसायकल होती. राजदूत गाडीच्या पेट्रोल टाकीवर बसून त्यांच्यासोबत जायला मला खूप आवडायचे. अण्णा गाडी घेऊन बाहेर निघाले की, मी मला बरोबर नेण्याचा हट्ट करत असे. कितीतरी वेळा मी त्यांच्या गाडी मागे धावत गेल्याचे आठवते.

राजकीय वर्तुळात त्यांचा सक्रिय सहभाग असे. अहमदनगर जिल्हा दूध संघाचे ते अनेक वर्ष संचालकही होते. त्यांच्या पुढाकाराने गावातील अनेकांना त्यांनी गाई, म्हशी, बैलजोडी त्याचबरोबर शेतीच्या इतर कामासाठी कर्ज मिळवून देण्यात मदत केली. गावातील अनेकांच्या अडीअडचणीत त्यांनी पुढाकार घेऊन मदत केली. म्हणूनच गावातील प्रत्येक घरात त्यांना मान मिळत असे. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांची आठवण काढतात, त्यांचा आदराने उल्लेख करतात. मला असं वाटते हीच त्यांच्या छोट्याश्या आयुष्याची खरी कमाई असावी.

दिनांक ७ जुलै १९८९ ला जिवलग मित्र भाऊसाहेब फलके यांच्या सोबत शेवगावला जात असतांना भगूर गावाजवळ झालेल्या अपघातात दोन्ही भाऊसाहेबांचा मृत्यू झाला. आमचे कायमचे पोरके झालो. नियतीने आमचे बालपण कायमचे हिरावून नेले.

अण्णा तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन _/\_

रविवार, २५ एप्रिल, २०२१

कोरोना योद्धा : बाळू डाॅक्टर


कोरोना विषाणूच्या जागतिक रोग साथीमुळे सध्या भारतभर हाहाकार माजला आहे. रोज आपल्या समोर मित्र परिवारातील किंवा आप्तस्वकीयांमधील कुणीतरी कोरोनामुळे गेल्याच्या बातम्या येऊन धडकत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच दवाखाने कोरोना रुग्णांनी भरून गेले असून औषधे, ऑक्सिजन आणि बेडचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. दवाखान्यात जागा नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपार मिळत नाहीत. आपल्या माणसांना वाचवण्यासाठी नातेवाईकांची सगळीकडे धावाधाव चालू आहे. खासगी दवाखाने तर अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहेत. ग्रामीण भागातही तीस ते पन्नास हजार रूपये डिपाॅझिट दिल्याखेरीज दवाखान्यात प्रवेशच मिळत नाही. या संकट काळात अनेक ठिकाणी औषधांचा काळाबाजार होताना आपण पहातोय. बऱ्या होणाऱ्या रुग्णांना दवाखाने लाखोंची बिलं हातात देत आहेत. सामान्य लोकांना तर खासगी दवाखान्यातील उपचार परवडत नाहीत आणि सरकारी दवाखान्यात बेड मिळत नाही. या कोंडीत सामान्य लोकं मात्र भरडत आहेत.


या भीषण परिस्थितीत अमरापूर ता. शेवगाव येथे डाॅक्टर अरविंद पोटफोडे ऊर्फ "बाळू डाॅक्टर" कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कोरोना रुग्णांना बाळू डाॅक्टर अगदी नाममात्र दरात योग्य उपचार देत आहेत. विशेष म्हणजे ते अमरापूर गावातील रुग्णांना मोफत सेवा देतात. गेल्या महिन्याभरात त्यांनी हजारो रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. माणसावर आलेल्या या संकटाला अनेक जण संधी समजून पैशाची लटू करत असताना एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मात्र सामाजिक बांधिलकी जपत आहे. बाळू डाॅक्टर यांच्या या सेवेची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. नगर सारख्या दुष्काळी भागातील गरीब, कष्टकरी, शेतकरी यांची अखंड सेवा करून बाळू डाॅक्टर यांनी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या निरपेक्ष सेवेसाठी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनता सदैव त्यांची ॠणी राहील. भारतात कोरोनावर सर्वात स्वस्त इलाज करणाऱ्या डाॅक्टरांमध्ये बाळू डाॅक्टर यांचा नक्कीच समावेश करावा लागेल.

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

बाल कविता : पक्षांची भरली शाळा

 

(Photo Credit : FLICKR USER SOROUSH JAVADI // CC BY-SA 2.0)

पक्षांची भरली शाळा

वीजेच्या खांबाजवळ
पक्षांची भरली शाळा
तारेचाच केला वर्ग
आकाशाचा झाला फळा

खंडोजी धीवर गुरूजी
आले निळा कोट घालून
कावळेराव मुख्याध्यापक
उभे चोचीत छडी घेऊन

टिटवीने जोरात केली
शाळा भरायची गर्जना
कोकिळा ताईने गायली
मग सकाळीची प्रार्थना

साळुंखी आणि पोपटाचे
नव्हते पाढे पाठ
बगळ्यांनी गिरवले मग
फळ्यावर पाढे आठ

चिमण्यांनी गायली
कविता एक छान
पारव्यांनी डोलावली
ताला सुरात मान

मोराने घातला होता
छान छान गणवेश
बदक आणि कोंबडीला
नव्हता वर्गात प्रवेश

होला आणि कोतवाल
आज होते गैरहजर
वेड्या राघुची नुसती
घड्याळाकडे नजर

चातक बघु लागला
शाळा सुटायची वाट
पिंगळ्याने वाजवली घंटा
पक्षी उडाले एकसाथ