मंगळवार, २ मे, २०१७

मराठी साहित्य (Marathi Sahitya) : नवीन यु ट्यूब चॅनेल

नमस्कार मित्रहो! 
वाचनाची आवड आहे? 
पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाचनासाठी वेळ काढू शकत नाहीत? तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय यु ट्यूबचे नवे चॅनेल, *मराठी साहित्य (Marathi Sahitya)*. या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील कथा, कादंबरी, कविता, ललित, बाल वाङमय, वैचारिक, चरित्र, वर्णन, समीक्षा, नाटक, अध्यात्म, इतिहास आणि संशोधन या सारख्या विविध साहित्य प्रकारातील दर्जेदार ग्रंथांवर चर्चा करून त्यावरील माहिती प्रसारीत करणार आहोत.
विविध मान्यवर साहित्यिक, ब्लॉगर यांच्याशीही आपण गप्पा मारणार आहोत. त्याच बरोबर वाचन संस्कृती वाढवण्यात हातभार लावणा-या  व्यक्ती, संस्था आणि वाचनालये यांचीही माहिती वेळोवेळी तुम्हाला या चॅनेलच्या माध्यमातून देणार आहोत.
तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका. *मराठी साहित्य*
सबस्क्राईब बटणाशेजारील घंटीवर नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत जाईल.
(सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून *SUBSCRIBE* हे बटण दाबा)


आम्ही आपल्या सर्वाच्या सहकार्याची अपेक्षा करत आहोत. चला तर मग, वाचन संस्कृती वाढवण्यात आपणही आपल्या परीने हातभार लावूयात.
धन्यवाद
_ *मराठी साहित्य Marathi Sahitya*
(मित्रहो आपल्याला विनंती आहे की, हा संदेश आपल्या सर्व मित्र, नातेवाईकांना आणि सर्व ग्रूपवर अवश्य पाठवा)

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

ऑफशोअर रीग पर्यंतही पोहचला ग्रंथ तुमच्या दारीचा विस्तार



दुबई/अजमान (२१.०४.२०१७)

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी' या वाचन चळवळीचा विस्तार भारतभर तर झालाच आहे पण भारता व्यतिरिक्त जगाच्या विविध देशातही दर्जेदार मराठी ग्रंथ वाचकांपर्यत पोहोचवण्याचं काम या संस्थेने केले आहे. युएई तील मराठी माणसांत ही योजना फार लोकप्रिय झाली असून दुबई, शारजा, अजमान, आबू धाबी, फुजैरा आणि रास अल खैमा या महत्त्वाच्या अमिरातमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी वाचक वर्ग निर्माण झाला आहे. आता तर या योजनेचा विस्तार आखाती समुद्रात जिथं तेलाचे उत्पादन होते अशा ऑफशोअर प्लॅटफॉर्मपर्यंत पोहचला आहे. ग्रंथ तुमच्या दारी शारजा येथील समन्वयिका सौ. नंदा शारंगपाणी याचे पती श्री जगदीश शारंगपाणी हे ऑफशोअर कंपनीत कार्यरत असून या कंपनीत अनेक मराठी भाषक इंजिनियर  व टेक्निशियन काम करतात. एकदा ऑफशोअर गेल्यावर साधारणपणे दोन तीन महिने सुट्टी नसते अशा वेळी हे लोक विरंगुळा व ज्ञानवर्धनाचे साधन म्हणून मराठी ग्रंथ वाचनाचा आस्वाद घेतात. वाचन झाल्यावर ग्रंथ आपापसात बदलतात, दोन महिन्यांनी परत नवीन ग्रंथ प्लॅटफॉर्मवर घेऊन जातात. यातील एक वाचक तर अझरबेजान या देशात ही असून दर महिन्याला ते नवनवीन ग्रंथ वाचण्यासाठी नेतात. असे सौ. नंदा शारंगपाणी यांनी सांगितले. निमित्त होते ग्रंथ तुमच्या दारी युएई ची त्रैमासिक बैठक. ही बैठक आजमान येथे दिनांक २१ एप्रिलला मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

बैठकीच्या सुरूवातीला समन्वयिका विशाखा पंडित यांचे वडील वि. भा. देशपांडे यांना एक मिनिट शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठी नाट्यकोशकार व प्रसिद्ध नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र  तथा वि. भा. देशपांडे यांचे गेल्या महिन्यात ९ मार्चला पुण्यात निधन झाले होते. यावेळी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

बैठकीस मुख्य समन्वयिका सौ. सुजाता भिंगे यांनी प्रारंभ करून प्रत्येक ग्रंथ पेटी मागे किती वाचक आहेत याचा आढावा घेतला व अजून नवीन वाचक कसे या योजनेत जोडले जातील यासाठी सर्व समन्वयकांनी प्रयत्न करावेत यावर त्यांनी भर दिला. दुबई विभागात आता एकुण २८ पेट्या आणि १९ समन्वयकांचे मिळून जवळपास २०० वाचक झाले आहेत. ग्रंथ परिवारात दाखल झालेल्या समन्वयिका श्वेता पोरवाळ आणि प्रचिती तलाठी गांधी यांनी आपला परिचय करून दिला.

आबू धाबी या राजधानीच्या शहरात मराठी माणसांची संख्या भरपूर असूनही दुबई सारखा तिथं ग्रंथचा प्रसार झाला नाही अशी खंत आबू धाबीच्या समन्वयिका नीलिमा वाडेकर यांनी व्यक्त केली. तिथं ग्रंथचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवीन समन्वयक शोधने आणि जमल्यास गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दुबईत झालेल्या वाचक मेळाव्याच्या धर्तीवर असाच एखाद्या मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे; जेणेकरून आबू धाबीतील वाचक वर्गापर्यंत ग्रंथची ओळख पोहचेल. सध्या आबू धाबीत केवळ एकच ग्रंथ पेटी आहे.

बाल ग्रंथ पेट्या फार लोकप्रिय होत असून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विभागण्यात यावे जेणेकरुन विविध उपनगरातील बाल वाचकांना या बाल साहित्याचा आस्वाद घेता येईल. द गार्डन्स विभागात नेहा अग्निहोत्री यांच्याकडे देण्यात आलेल्या ग्रंथ पेटीच्या महिला वाचक आठवड्यातून एकदा एकत्र जमून ग्रंथ अभिवाचन सारखा स्तुत्य उपक्रम राबवतात. तसेच भारतातून सुट्टीवर आलेले काही जेष्ठ नागरिकही ग्रंथचे वाचक होत आहेत असे नेहा आग्नीहोत्री म्हणाल्या.  

ग्रंथ तुमच्या दारी, दुबई विभाग सोशल मिडीयाच्या वापरात जरा मागे पडला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवीन वाचकापर्यंत पोहचणे शक्य आहे त्यामुळे ग्रंथचे फेसबुक पेज नियमित अपडेट करण्यात यावे असाही ठराव संमत करण्यात आला. समन्वयिका विशाखा पंडित व प्रचिती गांधी मिळून ग्रंथ तुमच्या दारी युएई ची नवीन वेबसाईट तयार करत असून, त्यात ग्रंथची सर्व माहिती अपलोड करण्यात येईल. सर्व समन्वयकांची माहिती, उपलब्ध ग्रंथ, आत्तापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांची माहिती यासारख्या गोष्टी अपलोड करण्यात येणार आहेत. वेगवेगळे समन्वयक यात लेख लिहीणार आहेत. समन्वयक गणेश पोटफोडे हे युट्यूबवर नवीन वाहिनी चालू करत असून त्यासाठी लागणार्या गोष्टीसाठी स्वप्निल जावळे यांचे सहकार्य लाभत आहे. या वाहिनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरील ग्रंथचे परीक्षण, ओळख व चर्चा करण्यात येणार आहे.

प्रत्येक समन्वयकाने आपापल्या वाचकांसाठी काव्यसंमेलने, ग्रंथ अभिवाचन असे कार्यक्रम आयोजित करावेत अशी सूचना किशोर मुंढे यांनी मांडली.

आजमानचे समन्वयक वीरभद्र कारेगांवकर आणि मनिषा कारेगांवकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले.

कार्यक्रमाला सुजाता व घनःशाम भिंगे, नीलिमा वाडेकर, समिश्का व स्वप्निल जावळे, धनश्री व कमलेश पाटील, विशाखा पंडित, नेमिका जोशी, प्रचिती तलाठी गांधी, नंदा शारंगपाणी, अपर्णा पैठणकर, श्वेता व इंद्रनील करंदीकर, किशोर मुंढे, मनिषा व वीरभद्र कारेगांवकर, नेहा व हरी अग्नीहोत्री, श्वेता व सचिन पोरवाळ आणि गणेश पोटफोडे हे उपस्थित होते.

ग्रंथची पुढील बैठक उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर थेट सप्टेंबर महिन्यात होईल अशी माहिती विशाखा पंडित व सुजाता भिंगे यांनी दिली.

~ गणेश भाऊसाहेब पोटफोडे (दुबई)

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

दुबईत साजरा झाला मराठी भाषा दिन









कविवर्य कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस महाराष्ट्रासह जगभरात दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा दुबईतील ग्रंथ तुमच्या दारी व मोरया इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने "कुसुमाग्रज तुमचे आमचे" हा बहारदार कार्यक्रम आयोजित करून दुबईत मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या अनेक कविता, गाणी, आणि नाट्य प्रवेश वाचनाच्या रसग्रहनाने दुबईकर मंत्रमुग्ध झाले.

ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम अवतरला त्या ग्रंथ तुमच्या दारीच्या समन्वयिका विशाखा पंडित यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. मराठीतील दर्जेदार ग्रंथ यु ए ई तील मराठी वाचकांपर्यंत पोहचवणे हा ग्रंथ तुमच्या दारीचा हेतू आहे. या कार्यात अधिकाधिक प्रमाणात वाचकांनी सहभागी व्हावं असे आवाहन त्यांनी केले. दुबईत नवीन ग्रंथ पेट्या वाढत असून हे नवीन वाचक वर्ग वाढत असल्याचे सूचक लक्षण असल्याचे त्यांनी सांगून सर्व समन्वयकांचे व वाचकांचे आभार मानले. थोड्याच कालावधी इंटरनॅशनल सीटी दुबई येथे मोठा वाचक वर्ग तयार झाल्याने तेथील वाचकांच्याच वर्गणीतून नवीन २२वी ग्रंथ पेटी व एक बाल ग्रंथ पेटी समिश्का जावळे व स्वप्निल जावळे या समन्वयकांना सुपूर्द करण्यात याली. जावळे दाम्पत्यांनी त्यांच्या मुलगा स्वराज याच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून ही बाल ग्रंथपेटी प्रायोजित केली आहे.

शाल्वली बोरकर, सानिका गाडगीळ, रिया गायकवाड आणि अनुष्का देसाई या शाळकरी मुलींनी "सरस्वतीच्या नौका या युग यात्रेस निघाल्या" आणि "हसरा लाजरा... सुंदर साजिरा श्रावण आला" ही गीतं रसिकांसमोर सादर करून स्वरमंडपातील वातावरण वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. परदेशात राहूनही या मुली संगीताचे व गायनाचे धडे गायिका चैत्राली जानेफळकर यांच्याकडून घेत असून त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच होते. तसेच गायिका श्रुतिका निमखेडकर यांनीही "तुझ्या तांबुस तेजाची ज्योतं" या गीताने मैफिलीत स्वरांचे रंग भरले. अर्चित अग्निहोत्री याने गायलेल्या "काही बोलायलाचे आहे पण बोलणार नाही" या गीताला प्रेक्षकांनी विषेश दाद दिली. हार्मोनियमवर मेघन श्रीखंडे आणि तबल्यावर प्रसाद सांगोडकर यांनी संगत दिली. 

यानंतर सुरू झाला कुसुमाग्रजांच्या कवितांचा नदी सम प्रवाह समुद्रा रूपी रसिक प्रेक्षकांच्या भेटीच्या ओढीने ओसंडू लागला. डाॅ. सुप्रिया सुधाळकर, वसुधा कुलकर्णी, मनोज पाटील, विशाखा पंडित आणि गणेश पोटफोडे यांनी कुसुमाग्रजांच्या काही प्रसिद्ध काव्यरचना सादर केल्या. दुरस्थ, निरभ्र, तत्वज्ञान, माझ्या मराठी मातीचा, चंद्र, प्रेम कुणावर करावं?, प्रेम कर भिल्ला सारखं, कणा, रद्दी, आगगाडी आणि जमीन, अखेर कमाई, जोगिया, जखमांचे देणे, गाभारा, करार, पाऊलचिन्हे, मौन आणि असाही एक सावता यासारख्या कवितांचा समावेश होता. आहान सुधाळकर या पहिलीत इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या बाल कलाकाराने "टपालवाले टपालवाले" या कवितेचे वाचन करून विदेशात राहूनही आम्ही मातृभाषा शिकतो हा संदेश दिला.

प्रसिद्ध निवेदिका आणि गायिका चैत्राली जानेफळकर यांनी "माझे जगणे होते गाणे", "नवीन काही गा हो आता", "दूर निनादे स्वरसंमेलन", "युगामागुनी चालली रे युगे ही", आणि "वेडात मराठे वीर दौडले सात" या डाॅ गोपाळ मिरीकर यांनी दिलेल्या चालीत दर्जेदार व सुरेल गीतांनी कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत नेली. नाट्य अभिनेते मनोज पाटील आणि लेखिका वसुधा कुलकर्णी या दोघांनी मिळून नटसम्राट नाटकातील आप्पा कावेरी यांच्यातील "बायको म्हणजे बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी" हा प्रसिद्ध संवाद सादर केला. मनोज पाटील यांनी आपल्या कणखर आवाजात नटसम्राट नाटकातील आप्पा बेलकलकर यांचे "आपला बाप चोर आहे", "टु बी ऑर नाॅट बी", "दुर व्हा सगळं निरर्थक आहे" हे गाजलेले संवाद सादर करून प्रेक्षकांच्या काळजाच्या ठीकर्‍या केल्या. त्यांच्या या सादरीकरणाने प्रेक्षकांना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नटसम्राट चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या भूमिकेची आठवण झाली. वसुधा कुलकर्णी यांनीही कावेरीचा एक हृदय पिळवटून टाकणारा संवाद सादर करून रसिकांना काहीकाळ भावनिक केले.

चैत्राली जानेफळकर यांनी कार्यक्रमाचे नियोजनबद्ध सूत्रसंचालन करून प्रेक्षकांना सुरवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवले. कार्यक्रमाचा स्तर हा सर्वांच सहभागी कलाकारांनी फारच वरचा ठेवला व कुसुमाग्रज ह्या नावाला पुर्ण न्याय देवून नक्षत्रांचे देणे या गाजलेल्या कार्यक्रमाची आठवण सर्वांना करुन दिली. भविष्यात असेच साहित्य, कला, संस्कृतीशी निगडीत कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतील असे प्रतिपादन विशाखा पंडित यांनी केले. ग्रंथ तुमच्या दारी दर तीन महीन्यातून एकदा विविध प्रकारचे वाचक केदरीत कार्यक्रम आयोजित करणार आहे. या सारख्या कार्यक्रमाला मोरया इव्हेंट सहकार्य करेल असे मनोज पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाची सांगता सुप्रसिद्ध कलाकार मेघन श्रीखंडे यांनी गायलेल्या "सर्वात्मका सर्वेश्वरा" या ययाती नाटकातील पदाने झाली. डाॅ. सुप्रिया सुधाळकर यांनी मोरया इव्हेंट चे सर्वेसर्वा व कार्यक्रमाचे आयोजक मनोज पाटील, सहभागी कलाकार आणि प्रेक्षकांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आभार मानले. सहभागी सर्व कलाकारांना विशाखा पंडित यांच्या हस्ते  स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

~ गणेश भाऊसाहेब पोटफोडे (दुबई)

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

कविता : फांदी तुटली तुटली




फांदी तुटली तुटली
त्याला सुगरणीचा खोपा
मारी झाडाला चकरा
जीव झाला वेडापिसा

फांदी तुटली तुटली
आता कुठं ठेवू बाळ
कसा नियतीचा फेरा
झाला घरट्याचा काळ

फांदी तुटली तुटली
माझ्या पिल्लांची झोळी
आता कुठं गाऊ अंगाई
सदा भरलेली डोळी

फांदी तुटली तुटली
गेला मोडून संसार
दिस भरले गर्भाचे
त्याला कशाचा आधार

~ गणेश
(१८.०१.२०१७)